Thursday, October 04, 2012

जातीय तेढ नसलेला इतिहास

गृहखात्यानेच लिहावा…


 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचे पोलिसांच्या लेखणीतून फेरलेखन होणे आवश्यक आहे. म्हणजे पोलिसांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे तरी तसाच संदेश लोकांपर्यंत पोहोचतो आहे. शिवाजी महाराजांनी ज्या नरराक्षसाचा कोथळा काढला, त्याचे पोस्टर्स किंवा प्रतिमा लावण्यात येऊ नयेत, पुण्याच्या लाल महालात महाराजांनी ज्या सरदाराची बोटे छाटली, त्याचा उल्लेख गणपतीच्या देखाव्यातून वगळण्यात यावा, शिवरायांची भव्य प्रतिमेला गणेशोत्सव मिवरणुकीत आणण्यात येऊ नये, अन्यथा दंगल भडकेल, असले भन्नाट जावईशोध राजमान्य राजश्री आर. आर. पाटील यांच्या गृहखात्याने लावले आहेत. 

अशा परिस्थितीत, कदाचित भविष्यात जातीय तेढ वाढू नये, म्हणून महाराजांचा धर्मनिरपेक्ष इतिहास लिहिण्याचे काम आर. आर. आबांना पार पाडावे लागेल. भाषणांच्या पुस्तकाप्रमाणेच आबांनी एखादे सुविचारांचे पुस्तक लिहावे, असा सल्ला अजितदादा पवार यांनी दिलाच आहे. त्यालाच जोडून आमची विनंती आहे, की आबांनी शिवरायांचा धर्मनिरपेक्ष इतिहास लिहावा, म्हणजे उगाच महाराष्ट्रात धार्मिक तेढ बिढ निर्माण होणा्र नाही आणि पोलिसांच्या डोक्यालाही ताप राहणार नाही. तेव्हा आबा तुम्ही हे कार्य तातडीने हाती घ्याच…

आबांनी किंवा त्यांच्या पोलिसी खात्याने हा इतिहास लिहावयास घेतला, तर तो काहीसा असा असेल…

प्रसंग पहिला… 


छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त कोण करतो, असा सवाल विजापूरच्या एका राजाच्या दरबारात उपस्थित केला गेला. तेव्हा अ नावाच्या एका सरदाराने महाराजांना जेरबंद करण्याचा विडा उचलला. शिवाजी महाराजांना जेरबंद करण्यासाठी ‘अ’ हा सरदार महाराष्ट्रावर चाल करून आला. लाखो सैनिक, घोडदळ, पायदळ, तोफा आणि बऱ्याच महिन्यांची रसद घेऊन मदमस्त ‘अ’ चालून आला. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीचे मंदिर त्याने फोडले. मंदिराप्रमाणेच मूर्तीचीही विटंबना केली. एकावेळी आख्खा बोकड संपविणाऱ्या या नरराक्षसाने महाराष्ट्रातील अनेक मठमंदिरांवर हल्ला चढविला. 

चिडून शिवाजी महाराज आपल्यावर चाल करून येतील आणि भल्यामोठ्या सैन्याच्या जोरावर आपण त्यांचा अगदी सहजपणे पराभव करू, अशा धुंदीत हा ‘अ’ राहिला. मात्र, शिवराय हे पण काही कच्च्या गुरूचे शिष्य नव्हते. त्यांनी ‘अ’ला जावळीच्या खोऱ्यात ओढून आणले. शिवरायांची भेट घेण्यासाठी ‘अ’ प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचला. तिथे शामियान्यात ‘अ’ने महाराजांना गळाभेटीसाठी बोलाविले. शिवरायांची मान बगलेत दाबून ‘अ’ने महाराजांच्या पाठीवर कट्यारीचा वार केला. शिवरायांनी पोलादी अंगरखा म्हणजेच संरक्षक कवच घातले होते. त्यामुळे या हल्ल्यातून महाराज बचावले. ‘अ’चा वार फुका गेला. महाराजांनी वाघनखे काढली आणि ‘अ’च्या पोटात खुपसून थेट त्याचा कोथळाच काढला. महाराजांनी इतक्या त्वेषाने प्रतिहल्ला चढविला, की ‘या xx’ असे म्हणज धिप्पाड ‘अ’ क्षणार्धात जमिनीवर कोसळला.

प्रसंग दुसरा…


औरंगाबादहून नगरमार्गे बारामती, अशी मजल दरमजल करीत ‘शा’ पुण्यात दाखल झाला. डोंगरी किल्ल्यांमध्ये महाराजांची मक्तेदारी मोडून काढणे, आपल्याला जमणार नाही, हे ‘शा’ने ओळखले होते. त्यामुळे त्याने मैदानातच महाराजांशी दोन हात करण्याचे ठरविले आणि पुण्याच्या लाल महालात ‘शा’ने आपला डेरा टाकला. त्याने बंदोबस्त वाढविला. पुण्याच्या आतमध्ये प्रवेश करणे जिकीरीचे बनले होते. ‘शा’च्या सैन्याशी समोरासमोर युद्ध करणे शक्य नाही, हे महाराजांनी ताडले होते. त्यांनी अत्यंत धाडसी योजना आखली. लाल महालाचा कोपरा न कोपरा शिवरायांना माहिती होता. त्यामुळे लाल महालावर हल्ला करून थेट ‘शा’चाच मुडदा पाडायचा, असा महाराजांचा गनिमी कावा होता. त्यानुसार एका संध्याकाळी लग्नाच्या वरातीत खुद्द महाराज आणि त्यांचे काही निवडक सरदार सहभागी झाले. सर्वांनी इतके बेमालूम वेषांतर केले होते, की कोणाला या काव्याचा थांगपत्ताही लागला नाही. 

लाल महालापाशी येताच शिवराय आणि सर्व मावळे एका ठिकाणी जमा झाले. तेथे महाराजांनी सरदारांना आणि मावळांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. महाराजांना लाल महालाची खडा न खडा माहिती होता. महाराजांनी खिडकीतून स्वयंपाकघरात प्रवेश केला. तेथून महाराज ‘शा’च्या शयनकक्षात घुसले. महाराज आणि त्यांचे सरदार लाल महालात घुसले आहेत, हे कळताच ‘शा’ची चांगलीच तंतरली. त्याच्या अंगात कापरं भरलं. तो घामाघूम झाला. आपला जीव कसा वाचवायचा, याचा विचार तो करू लागला. खिडकीतून पळून जायचा प्रयत्न करणाऱ्या ‘शा’वर महाराजांची तलवार चालली. ‘शा’च्या उजव्या हातांची बोटे तुटली आणि तिथून ‘शा’ थेट जनानखान्यात पळाला. महाराज तिथे पोहोचले. जनानखान्यात बुरख्यामध्ये असलेल्या ‘शा’ला महाराजांनी ओळखलेच आणि पुणे सोडून जाण्याच्या अटीवर त्याला जीवदान दिले. ‘शा’ पाय लावून पळत सुटला आणि थेट औरंगजेबाच्या दरबारात पोहोचला. एव्हाना महाराज आणि त्यांचे सरदार सिंहगडच्या दिशेने पसार झाले.

प्रसंग तिसरा…
‘मु’ सम्राट ‘औ’चा सरदार असलेला मिर्झाराजे जयसिंह आणि ‘दि’ हे स्वराज्यावर चालून आले. ‘मु’  सैन्य आणि शिवरायांचे मावळे यांच्यात घनघोर युद्ध झाले. ‘मु’च्या सैन्याने पुरंदरच्या किल्ल्यावर हल्ला चढविला. मुरारबाजी देशपांडे यांनी ‘मु’च्या सैन्याला पळता भुई थोडी करून ठेवली होती. मात्र, ‘मु’च्या सैन्याची संख्या आणि ताकद प्रचंड असल्यामुळे पुरंदरची बाहेरची तटबंदी भेदली गेली. तरीही लढवय्या मुरारबाजींनी हार मानली नाही. मुरारबाजी यांचे शौर्य आणि पराक्रम पाहून ‘दि’ चकितच झाला आणि त्यांच्याकडे पाहतच बसला. ‘दि’ने मुरारबाजी यांच्यासमोर तहाचा प्रस्ताव ठेवला आणि ‘मु’लांच्या सैन्यात मोठे सरदार पद देऊ केले. मात्र, महाराजांशी आणि पर्यायाने स्वराज्याशी प्रतारणा करणे मुरारबाजींना बाप जन्मात शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावावर विचार करण्यासाठीही वेळ दवडला नाही आणि युद्ध सुरूच ठेवले. 

मात्र, एका भाल्याने मुरारबाजी यांचा वेध घेतलाच. मात्र, शिर धडापासून वेगळे झाल्यानंतरही मुरारबाजी यांची तलवार काही मिनिटे तशीच सपासप फिरत होती, असे इतिहासकार सांगतात. इतका त्वेष आणि जोश त्यांच्यामध्ये होता. पुरंदरच्या या लढाईत मुरारबाजींनी प्राणांची बाजी लावली. महाराजांना पराभव स्वीकारावा लागला. स्वराज्यातील २३ किल्ले ‘मु’ना द्यावे लागले आणि युवराज संभाजीराजे यांच्यासह ‘औ’च्या भेटीसाठी आग्र्याला जाण्याची मिर्झाराजे जयसिंह यांची अट मान्य करावी लागली.

प्रसंग चौथा… 


मान्य केलेल्या अटीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला निघाले. त्याठिकाणी ‘औ’चा मोठा दरबार भरला होता. वास्तविक पाहता, शिवराय हे मराठ्यांच्या साम्राज्याचे राजे. त्यामुळे त्यांचा मान पहिल्या रांगेत असायला हवा होता. मात्र, पराभूत आणि पळपुट्या सरदारांच्या मागील रांगेत शिवरायांना स्थान देऊन ‘औ’ने महाराजांचा पाणउतारा केलाच. स्वाभिमानी शिवरायांना हा अपमान सहन होणे शक्यच नव्हते. ‘आमचा अपमान करण्यासाठीच ‘औ’ने आम्हाला येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे का,’ असा थेट सवाल करीत महाराज तेथून त्यांच्या कक्षाकडे रवाना झाले. 

‘औ’ने महाराजांच्या छावणीला लष्कराचा गराडा घातला. शिवराय नजरकैदेत अडकले. आता येथून बाहेर कसे पडायचे, याच्याच विवंचनेत महाराज होते. अखेरीस महाराजांना शक्कल सुचली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आजारी पडण्याचे नाटक केले. महाराजांची तब्येत सुधारावी, म्हणून साधूसंत, फकीर, मौलवी मंडळींना सुकामेवा, मिठाई तसेच फळफळावळीचे पेटारे पाठविण्यात यावे, असा प्रस्ताव पुढे आला. ‘औ’नेही त्याला मान्यता दिली. काही दिवस असेच जाऊ दिल्यानंतर महाराजांनी एका दिवशी स्वतः पेटाऱ्यातून ‘औ’च्या हातावर तुरी देण्याचे निश्चित केले. योजनेनुसार एका पेटाऱ्यात स्वतः शिवराय आणि दुसऱ्या पेटाऱ्यात युवराज संभाजीराजे बसले आणि पाहता पाहता ‘औ’च्या नजरबंदीतून पसार झाले. महाराजांना नजरकैदेत ठेवून तिथेच त्यांचा खात्मा करण्याचे ‘औ’चे मनसुबे महाराजांनी उधळून लावले आणि शिवराय सुखरुप स्वराज्यामध्ये पोहोचले.

(महाराजांवर चालून आलेल्या काही सरदारांची नावे ही खऱ्याखुऱ्या इतिहासातील म्लेंच्छ नावांशी साधर्म्य राखणारी वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि उगाच डोक्यात राग घालून घेऊन धार्मिक तेढ पसरवू नये.)

छत्रपती शिवरायांचा इतिहास लवकरात लवकर म्लेंच्छमुक्त केला पाहिजे. जेणेकरून त्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही. अर्थात, या खानावळीचा सध्याच्या मंडळींना पुळका का यावा… त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या किंवा वास्तव सांगितले तर चालू स्थितीत कोणाच्या पोटात शूळ का उठावा… मिरवणुकांमध्ये अशा पोस्टर्स आणि छायाचित्रांचे प्रदर्शन जर होत असेल तर काहींच्या छातीत जळजळ होऊन गरळ का बाहेर पडावी… हे कोणालाही न उलगडलेले कोडे आहे. अफझलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, औरंगजेब, सिद्दी जौहर आणि मुघल, आदिलशाही, निजामशाही यांच्यातील तमाम सरदार हे पोटात कळ येणाऱ्यांचे बापजादे होते किंवा जावई होते, अशा थाटात महाराजांच्या जीवावर उठलेल्या खानावळीचे समर्थन करण्याची अहमहिका मंडळींमध्ये सुरू आहे.

वेळीच हे थांबावे, अशी आवश्यकताही कोणाला वाटत नाही. उलट धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या नावाखाली शिवरायांच्या कार्यकर्त्यांनाच चेपण्याचे प्रयत्न सुरू असतात. आता शिवरायांवर आक्रमण करणारी मंडळी मुसलमान होती, हा काही महाराजांचा दोष नाही ना. शिवाय ते कोणत्याही जाती-धर्माचे असले तरीही तुम्ही शिवरायांच्या बाजूने आहात, की अफझलखानाच्या बाजूने, हे विचारण्याची हिंमत कोणाच्यातही नाही. कारवाईचा ढोस मात्र, शिवरायांच्या मावळ्यांनाच. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे कितपत योग्य आहे. 

काही वर्षांपूर्वी डोंबविली येथील एका मंडळाने अफझलखानाचा कोथळा काढणारे शिवाजी महाराज असा देखावा मिरवणुकीसाठी केला होता. अर्थातच, धार्मिक तेढ निर्माण होईल, या कारणाखाली पोलिसांनी त्याला आक्षेप घेतला. त्याविरोधात हे कार्यकर्ते न्यायालयात गेले. तेथे न्यायालयाने स्पष्टपणे निकाल दिला आहे. ‘छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला, हे ऐतिहासिक सत्य मुस्लिमांना स्वीकारावेच लागेल…’

तेव्हा लवकरात लवकर महाराजांचा इतिहास म्लेंच्छमुक्त करून टाकावा, म्हणजे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही आणि दंगलीही भडकणार नाहीत. बघा पटतंय का...