Sunday, August 26, 2018

सोशल मीडियावरील उरबडवे


केरळमधील मदतकार्याच्या निमित्ताने...

केरळ म्हणजे देवाची स्वतःची भूमी… गॉड्स ओन कंट्री… केरळमध्ये जो महाप्रलय आलाय त्याबद्दल व्यक्त करावे तितके दुःख थोडे आहे. एर्णाकुलम, त्रिश्शूर, पटनमतिठा आणि अल्लपुळा हे सर्वाधिक फटका बसलेले जिल्हे आहेत. हा प्रलय नेमका कशामुळे आलाय हे कालांतराने स्पष्ट होईलच. मानवी चुका आणि धरणांमधील पाण्याचे फसलेले नियोजन ही प्राथमिक कारणे वाटत आहेत. मात्र, तज्ज्ञ आणि अभ्यासक त्याबद्दल योग्य ते मतप्रदर्शन करतील. फेसबुकावरील आणि सोशल मीडियावरील अभ्यासकांनी त्याबद्दल न बोललेलेच बरे. पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांनी त्याबद्दल अत्यंत योग्य असे विश्लेषण केलेले आहे. मात्र, केरळमधील महाप्रलयापेक्षाही अधिक महाभयंकर आणि शिसारी आणणारा महाप्रलय हा सोशल मीडियावर आलेला आहे. अत्यंत हीन दर्जाच्या फेसबुक पोस्ट्स आणि दळभद्री वृत्ती दर्शविणारे मेसेजेचा हा महाप्रलय माझ्यासारख्या अनेक संवदेनशील मंडळींसाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे. 


काय तर म्हणजे केरळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांचे प्रमाण अधिक आहे म्हणून तिथे महाप्रलय आला आहे? मुस्लिम आणि ख्रिश्चन हे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवून आणतात म्हणून त्यांना मिळालेली ही शिक्षा आहे. केरळमध्ये धर्मांतरे घडवून आणली जातात आणि राष्ट्रीय स्वसंयेवक संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ले होता, त्यांच्या हत्या घडवून आणल्या जातात म्हणून केरळला मदत पाठवूच नका. ती धर्मांतरासाठी नि स्वयंसेवकांच्या हत्या घडविण्यासाठी वापरली जाईल. चर्च आणि मशि‍दींकडे हात पसरून मदत मागा की… कशाला भारतीय सैन्य आणि संघाची मदत स्वीकारता? केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर बीफ खाणारा समाज आहे. त्यांच्या गैरकृत्यांची शिक्षा पुरामुळे मिळाली आहे. उघडउघडपणे गोमातेची हत्या करणाऱ्यांना चांगला धडा मिळाला आहे. अर्थतज्ज्ञ असणाऱ्या एका व्यक्तीने काय ट्वीट केले, तर शबरीमलामध्ये महिलांना प्रवेश देण्याचा आणि सध्याच्या घटनांचा संबंध तपासून पाहिला पाहिजे. नंतर सारवासारव केली. पण अशा पद्धतीचे संबंध लावायचे प्रयत्नही झाले. संयुक्त अरब अमिरातीने सातशे कोटींची मदत जाहीर केल्याच्या मुद्द्यावरूनही बराच गहजब माजला. हे पैसे धर्मांतरासाठीच वापरले जातील वगैरे… ती मदत जाहीर झालेलीच नव्हती हे पुढे स्पष्ट झालेच. 
 
   केरळ प्रांताचे सहसंघचालक के. के. बलराम

अत्यंत निर्लज्जपणे अशा प्रतिक्रिया व्यक्त करणारे कोण आहेत तर स्वतःला उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत समजणारे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे आहेत. संघाचे स्वयंसेवक म्हणवणारेच असे मेसेजेस फॉरवर्ड करण्यात अग्रेसर आहेत. संकटात सापडणाऱ्याला मदतीचा हात पुढे केला पाहिजे, ही आपली संस्कृती. पण सोशल मीडियावर विनाकारण उरबडवेगिरी करणाऱ्या अनेकांना त्या संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे, असे खेदाने म्हणावे लागते आहे. आमच्या एका मित्राने फेसबुकावर एक पोस्ट टाकली. बकरी ईदच्या दिवशी मशिदीचीमध्ये पाणी साचले म्हणून त्या गावातील मुस्लिम नागरिकांची व्यवस्था मंदिरातील एका खोलीत करण्यात आली. तसेच त्यांना नमाज पढण्यासाठी मंदिराचा की मंदिरातील खोलीचा उपयोग करू दिला. कठीण परिस्थितीतही जातीय सलोखा कसा टिकविला जात आहे, हे दर्शविणारी ती पोस्ट होती. त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या तर आपलीच आपल्याला लाज वाटावी. (विरुद्ध बाजूची बातमी देखील वाचायला मिळते. पण अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात.) हिंदू धर्मभोळे आहेत, संघ स्वयंसेवकांच्या इतक्या हत्या केल्या तरीही.. किंवा सापाची जात कितीही दूध पाजले तरी… वगैरे वगैरे. देवा काय हे… अहो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी संघ मुख्यालयात आणि शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर नमाज पढण्यासाठी मुस्लिम व्यक्तींना परवानगी दिल्याचे दाखले सापडतात. गुगल जरा सर्च करून पाहा. देवरस आणि ठाकरे यांच्या हिंदुत्वापेक्षा अधिक कट्टर हिंदुत्ववादी कोणी असेल असे वाटत नाही. कोणत्या गोष्टीचा तर्क कुठे लावायचा याला काहीतरी मर्यादा असावी. पण सर्व देशाची आणि हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावरच आहे, अशा थाटात सोशल मीडियावरील उरबडवे वावरताना दिसत आहेत.


सोशल मीडियावरून उठलेले विद्वेषी मेसेज वाचल्यानंतर केरळमध्ये कोणाशी तरी बोलले पाहिजे, असे वाटले. आणि मग केरळ प्रांताचे सहसंघचालक के. के. बलराम यांच्याशी बोललो. मागे केरळला गेलो होतो तेव्हा कण्णूरला त्यांची आवर्जून भेट घेतली होती. जवळपास तास-दीडतास चर्चाही झाली होती. फॅमिली कोर्टात त्यांची कुठली तरी केस चालू होती. पण त्यातही वेळात वेळ काढून त्यांनी मला वेळ दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर बलरामजी यांच्याशी पुन्हा एकदा बोलले पाहिजे, असे राहून राहून वाटत होते. पण वाटून वाटून ते राहतच होते. अखेर रविवारी त्याला मुहूर्त मिळाला. माझ्या मनातील अनेक प्रश्न त्यांच्याशी मोकळेपणाने शेअर केले. 

बलराम म्हणाले, की केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवाभारतीच्या नावाने मदतकार्यात सहभागी झाला आहे. संघाचे स्वयंसेवक सेवाभारतीच्या बॅनरखाली मदतकार्य करीत आहेत. संघासह सर्व सामाजिक संघटनांचे आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते फक्त आणि फक्त मदतकार्यात गुंतलेले आहेत. सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करण्यात आणि परस्परांना शिव्या घालत बसायला त्यांना अजिबात वेळ नाही. अगदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्तेही मदतकार्यात सहभागी आहेत. ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांच्या संघटनाही झोकून मदतकार्य करत आहेत. प्रत्येकाचे क्षेत्र वेगवेगळे आहे. बालेकिल्ले वेगवेगळे आहेत. पण सर्व जण काम करीत आहेत. सर्वांची भूमिका ही परस्परांना पूरक अशीच आहे.

सोशल मीडियावर देशभरात काहीही मेसेज फिरविण्यात येत असले तरीही केरळमधील नागरिक सूज्ञ आहेत. त्यांच्यामध्ये अशा कोणत्याही अंधश्रद्धा नाहीत, की अमुक केल्यामुळे पूर आला किंवा तमुक केल्यामुळे पूर आला. संघ स्वयंसेवकांच्या हत्या केल्यामुळे हा प्रलय आला आहे किंवा केरळमध्ये बीफ खातात म्हणून ही शिक्षा झाली, अशी कोणतीही भावना नागरिकांच्या मनात नाही. संघ स्वयंसेवकांच्या मनातही नाही. आम्ही सर्व स्वयंसेवक फक्त आणि फक्त केरळ पुन्हा एका उभे करण्यासाठी झटतो आहोत. खरं तर सर्वच जण त्यासाठी झटत आहेत. माकपचे कार्यकर्ते आणि संघाचे स्वयंसेवक यांच्यामध्ये मदतकार्यावरून मारामाऱ्या होत आहेत का, परस्परांना ठोकले जाते आहे का, असा प्रश्न त्यांना विचारला. अशा घटना फार घडलेल्या नाहीत. एकदोन ठिकाणी तसं झालंही असेल, पण ते सर्वच ठिकाणी होतंय, असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यालाही काही वेगळी परिमाणं आहेत का, हे तपासून पाहिलं पाहिजे.


न राहून संघाबद्दलचा शेवटचा प्रश्न त्यांना विचारलाच. वास्तविक पाहता, मला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माहिती आहे किंवा संघाच्या स्वयंसेवकांची जी ओळख आहे, त्यावरून माझ्या मनात तरी काहीही शंका नाहीत. १९९७मध्ये कझाकस्तान आणि सौदी अरेबिया यांच्याविमानांची हवेत टक्कर होऊन झालेल्या अपघातात जवळपास ३५० प्रवाशांचा मृत्यू झालाहोता. बहुतांश प्रवासी हे मुस्लिम होते. अपघातानंतर चरखी दादरी येथे विमानं कोसळली होती. त्यावेळी छिनविछिन्न झालेल्या मृतदेहांचे अवयव एकत्र करणे, मृतांच्या नातेवाईकांना मृतदेहांची ओळख पटवून देण्याचे काम करणे आणि लागेल ती प्रत्येक मदत संघाचे स्वयंसेवक त्या वेळी करीत होते. विमानातील प्रवासी कोणत्या जातीचे आहेत किंवा धर्माचे आहेत, याचा फारसा विचार न करता मदतकार्य त्यावेळी करण्यात आले होते. ही आठवण मनात होतीच. पण तरीही सातत्याने सोशल मीडियावर वाचनात येत होतं, म्हणून तो प्रश्न मनात होता आणि त्यामुळेच तो विचारला. 

एखाद्या मुस्लिमबहुल किंवा ख्रिश्चनबहुल गावांमध्ये संघाचे स्वयंसेवक किंवा सेवाभारतीचे कार्यकर्ते मदत करत आहेत ना? त्यांचे उत्तर होते, अर्थातच. तुम्हाला तर माहिती असेलच की मदतकार्य करताना अशा पद्धतीने कधीच भेदभाव केला जात नाही. संघाच्या स्वयंसेवकांकडून कधीही असे कृत्य होणार नाही. जात, धर्म, पंथ, भाषा आणि सर्व भेदाभेद विसरून मदतकार्य सुरू आहे. सुदैवाने केरळमध्ये अशा पद्धतीने मेसेजेसचा सुळसुळाट नाहीये. आणि असे मेसेज माझ्या अपरोक्ष फिरत असले, तरीही त्यांना फारसं कोणी गांभीर्यानं घेत नाही, हे मी निश्चित सांगू शकतो.

माझे बहुतांश पत्रकार मित्र हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहेत. कार्यकर्ते आहेत किंवा समविचारी आहेत. फक्त एक-दोन काँग्रेस विचारांचे आहेत. त्यांच्याकडूनही तेथील मदतकार्यांचे फोटो, माहिती आणि वर्णन समजत होतेच. त्यामुळे सर्वच जण तिथं मदतकार्यात आहेत, हे समजत होतंच. पण तरीही संघाच्या अधिकृत व्यक्तीकडून माहिती मिळावी, म्हणून त्यांच्याशी बोललो. केरळमध्ये प्रत्यक्ष मदतकार्यात कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून तिथली परिस्थिती ऐकल्यानंतर माझ्या मनात नसलेल्या पण सोशल मीडियावरील उरबडव्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळाली होती. केरळमध्ये पूर ओसरेल. पाण्याचा निचरा होईल. मदतकार्याच्या जोरावर केरळ पुन्हा एकदा उभे राहील. पण आपल्याकडे सोशल मीडियावर मानवताविरोधी उरबडव्यांच्या नीच वृत्तीचा निचरा कधी होईल… संकटाच्या समयी देखील परस्परांची उणीदुणी काढून एकमेकांना हिणवण्याच्या मनोवृत्तीचा पूर कधी ओसरेल… आम्हीच हे करतोय ते काय करतायेत असे प्रश्न विचारून कायम दुसऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याच्या मानसिकतेला कधी ओहोटी लागेल…   

 

कदाचित कधीच नाही. कारण सोशल मीडियावर आपल्याला करायचं काहीच नाहीये. फक्त लाइक, कॉमेंट (ती देखील फारसा विचार न करता) आणि फॉरवर्ड, शेअर करायचं आहे. ते देखील एकप्रकारचं मदतकार्य आहे, देशकार्य आहे, असं समजणारे लोक आहेत. ती मंडळी असेपर्यंत अशा मेसेजेसचा सुळसुळाट सुरूच राहील. पण सुदैव असं, की प्रत्यक्षात काम करणारे हातही आहेत. ते सर्वच विचारांच्या संघटनांचे आहेत. फक्त एकाच नाहीत. ते एकमेकांचे विरोधक असतीलही. वैरीही असतील. पण सध्या एकमेकांना पूरक भूमिका घेऊन मदतकार्य करीत आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी खूप दिलासादायक आहे. कदाचित माझ्यासारख्याच अनेकांसाठीही… 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या स्वामी अग्निवेश यांना यांना मारहाण करणारे कार्यकर्ते (कार्यकर्ते भाजपाचे होते, की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही), हिंदुत्वाच्या नावाखाली तथाकथित पुरोगामी विचारवंतांच्या हत्येच्या आरोपांखाली अटक झालेले ढोंगी हिंदुत्ववादी आणि केरळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत खालच्या दर्जाचे मेसेजेस फिरविणारे बेगडी हिंदुत्ववादी तसंच संघ स्वयंसेवक म्हणून मिरविणारे हे एकाच माळेचे मणी आहेत, असं खेदानं म्हणावसं वाटतं. हिंदुत्व आणि संघ देखील असं कधीच सांगत नाही. किमान मला जो संघ माहिती आहे, मला हिंदुत्वाची ओळख आहे ती अशी नाही. 

Sunday, August 12, 2018

ओजस्वी वाणी आणि ओघवती लेखणी


 

कलेचा मर्मज्ञ... कलैग्नार

मुथ्थुवेल करुणानिधी… धार्मिक कार्यक्रमांमध्ये तसेच सणसमारंभाच्या निमित्ताने वाद्य वाजविण्यासाठी जाणाऱ्या समाजात जन्माला आलेला गरीब मुलगा. वाणी आणि लेखणीच्या जोरावर तब्बल सहा दशके तमिळनाडूच्या राजकारणावर स्वतःची अमीट छाप निर्माण केली. ही गोष्ट मला करुणानिधी यांची सर्वाधिक भावते. चित्रपटांच्या कथा आणि पटकथा लिहिताना, संवाद लेखन करताना साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या कलाकाराने मनसोक्त मुशाफिरी केली. आपला विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्यातील विविध प्रकारांचा खुबीने उपयोग केला. साहित्याच्या क्षेत्रात यशस्वी झालेला हा कलावंत राजकारणातही भलताच यशस्वी ठरला. तेरा वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे करुणानिधी पाचवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. साहित्य, चित्रपट आणि राजकारण अशा तीनही क्षेत्रांमध्ये स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या कलैग्नार तथा करुणानिधी यांच्या कारकिर्दीतील वेगळे पैलू, आठवणी आणि किस्से…
….



गॉगल आणि शाल ही ओळख…
करुणानिधी म्हटले सर्वसामान्य लोकांना पिवळी शाल आणि काळा गॉगल या दोन गोष्टीच प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात. करुणानिधी यांनी देखील आपली ही ओळख अगदी शेवट शेवटपर्यंत जपली. अगदी प्रारंभीच्या काळात करुणानिधी यांना १९५३मध्ये एका अपघाताला सामोरे जावे लागले. त्या अपघातात कलैग्नार यांच्या डाव्या डोळाला जबर मार लागला. जखमी झालेल्या डोळ्यावर परिणाम झाला. अनेक उपचार झाले. शस्त्रक्रिया पार पडल्या. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. पुढे त्याच डोळ्याला १९६७मध्ये पुन्हा मार लागला. अधूनमधून त्यांचा डोळा दुखायचा आणि त्रास देखील व्हायचा. चार वर्षांनी म्हणजे १९७१मध्ये अमेरिकेत त्यावर शस्त्रक्रिया झाली नि त्यानंतर ते काळा चष्मा वापरायला लागले. अगदी २००० सालापर्यंत ते काळा चष्मा वापरायचे. नंतर २००० नंतर त्यांनी पारदर्शक काचांचा काळा चष्मा वापरायला सुरुवात केली. 

करुणानिधी यांची शाल ही काळ्या चष्म्यापेक्षाही अधिक चर्चेत राहिली. पिवळ्या शालीबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जातात. करुणानिधी पूर्वी पांढरी किंवा हिरवी किंवा वेगळ्या रंगाची शाल खांद्यावर घ्यायचे. काही वर्षांपूर्वी घशाच्या आजारामुळे त्यांच्या गालांना सूज आली. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना खांद्यावर उबदार शाल ठेवण्याचा सल्ला दिला. जेणेकरून सूज येणार नाही. तेव्हापासून करुणानिधी पिवळी शाल खांद्यावर घेऊ लागले, असे उल्लेख सापडतात. 

अर्थात, पिवळी शाल घेण्याचा सल्ला ज्योतिषाने दिला होता, असाही दावा काही जण करतात. पिवळी शाल घेतल्यानंतर तुमच्या राजकीय कारकि‍र्दीला कधीच आहोटी लागणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावरून अनेकांनी करुणानिधींवर टीका केली. तुम्ही पिवळीच शाल का घेता? पिवळी शाल न घेता तुम्ही का बाहेर पडत नाही? भाषणांमध्ये निरीश्वरवाद मांडणारे आणि नास्तिक असल्याचा दावा करणारे तुम्ही ज्योतिष कधीपासून पाळायला लागले, अशी उघडउघड टीका गोपालस्वामी उर्फ वैको यांनी त्यांच्यावर केली होती.



मंदिरावर करुणा… 

करुणानिधी यांचे घर चेन्नईतील गोपालपुरम भागात आहे. काही वर्षांपूर्वी एका स्नेह्यांकडे जाणे झाले. ते देखील गोपालपुरम भागातील करुणानिधी यांच्या सोसायटीमध्येच रहायला होते. व्यवस्थापन तसेच आर्थिक क्षेत्राशी ते संबंधित आहेत. अनेक कंपन्यांमध्ये संचालक आणि सल्लागार म्हणून ते काम करतात. त्यांनी सहज गप्पांमध्ये विषय निघाला तेव्हा सांगितले होते, की करुणानिधी भाषणांमध्ये नास्तिक असल्याचे दाखले जरूर देतात. मात्र, आमच्या गोपालपुरममध्ये श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे. तिथे श्रीकृष्णाप्रमाणेच शिवा, कामाक्षी, गणपती, हनुमान यांच्याही मूर्ती आहेत. या मंदिरातील पूजा, प्रसाद आणि इतर सर्व खर्च करुणानिधी कुटुंबीयांमार्फतच केला जातो. 

इतकेच काय तर करुणानिधी यांच्या घरातून बाहेर रस्त्यावर आल्यानंतर डाव्या हाताला हे मंदिर आहे. करुणानिधी यांनी त्यांच्या ड्रायव्हरला सूचना देऊन ठेवलेल्या होत्या, की कोठेही जायचे असले, तरीही घरातून बाहेर पडल्यानंतर मंदिराकडे पाठ होईल अशा पद्धतीने गाडी बाहेर काढायची नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर मंदिराकडे तोंड असेल, अशाच पद्धतीने गाडी बाहेर निघाली पाहिजे. करुणानिधी यांनी अखेरपर्यंत नियमाचे पालन केले, असेही आमच्या स्नेह्यांनी आवर्जून सांगितले. आता मंदिराकडे तोंड झाल्यानंतर किमान मनातल्या मनात तरी देवाला नमस्कार करायचे का, हे मात्र न उलगडलेले कोडेच आहे.


एमजीआर यांच्याशी दोस्तीचा प्रस्ताव

सुरुवातीच्या काळात एम. करुणानिधी आणि एम. जी. रामचंद्रन यांच्या खास दोस्ती होती. करुणानिधी यांनीच एमजीआर यांना राजकारणात आणले. कलैग्नार यांचे संवाद, कथा नि पटकथांमुळे एमजीआर प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. मात्र, अण्णादुरै यांच्या निधनानंतर दोन्ही नेत्यांचे फारसे जमले नाही. करुणानिधी यांच्यावर एमजीआर यांनी आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका ठेवला. तेव्हा द्रमुकमधून एमजीआर यांची हकालपट्टी झाली. पुढे एमजीआर यांनी अण्णा द्रमुकची स्थापना केली आणि पाच वर्षांमध्ये तमिळनाडूची सत्ता हस्तगत केली. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की ते जिवंत असेपर्यंत करुणानिधी पुन्हा सत्तेवर येऊ शकले नाहीत. सलग दहा वर्षे ते मुख्यमंत्री राहिले.

ज्येष्ठ समाजवादी नेते बिजू पटनाईक यांनी या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले. करुणानिधी आणि बिजू पटनाईक यांचे संबंध खूप घनिष्ट होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला करुणानिधी यांनी जोरदार विरोध केला होता. आणीबाणीच्या विरोधातील अनेक नेत्यांनी त्या काळात तमिळनाडूत आश्रय घेतल्याचे अनेक उल्लेख सापडतात. करुणानिधी हेच त्यामागे होते, हे उघड आहे. कदाचित तेव्हापासून बिजूबाबू आणि कलैग्नार यांच्यात ऋणानुबंध निर्माण झाले असावेत. 



पुढे याच दोस्तीतून बिजूबाबूंनी १९७९ साली करुणानिधी आणि एम. जी. रामचंद्रन यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. हे दोन्ही नेते एकत्र यावेत, यासाठी बिजूबाबूंनी १९७९मध्ये प्रयत्न केले. १२ सप्टेंबर १९७९ रोजी कलैग्नार आणि बिजूबाबू यांच्यात मद्रास येथे बैठक झाली. हा प्रस्ताव कोणाचा आहे, असा सवाल करुणानिधी यांनी बिजूबाबूंना विचारला. तेव्हा त्यांनी एमजीआर यांची असे उत्तर दिले. असाच प्रश्न एमजीआर यांनी बिजूबाबूंना विचारला त्यावेळी त्यांनी करुणानिधी असे उत्तर दिले. हा गेमप्लॅन खूप वर्षांनंतर करुणानिधी यांच्या लक्षात आला, हा भाग वेगळा. 

तेव्हा करुणानिधी आणि बिजूबाबू यांच्यात सविस्तर चर्चा झाली. एमजीआर हे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, तर पक्षाध्यक्ष म्हणून करुणानिधी हेच असतील. पक्षाचे नाव द्रमुक असेच असेल. तर पक्षाचा अधिकृत झेंडा म्हणून अण्णा द्रमुकचा झेंडा कायम राहील, असा हा प्रस्ताव होता. एमजीआर आणि करुणानिधी या दोघांनाही हा प्रस्ताव तत्वतः मान्य झाला होता. करुणानिधी यांनी बिजूबाबूंना आनंदाने मिठी मारल्याचा उल्लेखही आढळतो. नंतर चेपॉक येथील विश्रामगृहातील एका बंद खोलीत दोन्ही नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली. द्रमुकचे अन्बळगन नि अण्णा द्रमुकचे नेदुन्चेळीयन यांची स्वतंत्र बैठक झाली. दोन्ही पक्षांनी तातडीने कार्यकारी समितीची बैठक बोलविण्याचे मान्य केले. 

अण्णा द्रमुकचा विलिनीकरणाचा प्रस्ताव असेल तर तो स्वीकारण्यात चूक काय?’ असा सवाल करुणानिधी यांनी चेन्नई येथील बैठकीनंतर पत्रकारांना केला. तर वेल्लोर येथे अण्णा द्रमुकच्या बैठकीमध्ये एमजीआर यांनी या विलिनीकरणाबाबत अवाक्षरही काढले नाही. उलट त्यांच्या नेत्यांनी द्रमुकवर टीकेची झोड उठविली. नंतर द्रमुक नेत्यांनीही अण्णा द्रमुक आणि एमजीआर यांच्यावर टीका करण्यास प्रारंभ केला. बिजूबाबू यांनी दोन्ही नेत्यांचे मन वळवून विलिनीकरणाचा केलेला हा प्रयत्न अगदी थोडक्यात फसला. अण्णा द्रमुकच्या काही मंत्र्यांनी एमजीआर यांना हा प्रस्ताव फेटाळून लावा, असा सल्ला दिला होता. त्यामुळेच ते बैठकीत काहीच बोलले नाही, असे आरोप नंतर द्रमुककडून झाले. अर्थात, तेव्हा पुलाखालून पाणी वाहून गेले होते. 

भविष्यात दोन्ही नेते आणि पक्ष एकत्र येऊ शकतात, हा धोका लक्षात घेऊन इंदिरा गांधी यांनी त्यांचा खास दूत सी. एम. स्टीफन यांना तमिलनाडूत पाठविला. द्रमुक नेते मुरासोली मारन यांच्याशी त्याने चर्चा केली आणि काँग्रेससोबत येण्याबाबत विनंती केली. द्रमुकने इंदिरा गांधी यांना समर्थन देऊन काँग्रेससोबत युती करण्याचे निश्चित केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-द्रमुक युतीला ३९पैकी ३७ जागा मिळाल्या. त्यापैकी द्रमुकने १६ जागा जिंकल्या. अण्णा द्रमुकला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर दोन्ही द्रमुक आणि अण्णा द्रमुकमध्ये विलिनीकरणाबाबत कधी चर्चा देखील झाली नाही.
… 



जयललिता यांच्याशीही वैर कायम…

एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी तमिळनाडू विधानसभेत प्रवेश केला. १९८९मध्ये तमिळनाडूच्या विधानसभेत रणकंदन झाले. तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला म्हणून द्रमुक आमदार चिडले होते. त्यावेळी जयललिता यांना धक्काबुक्की झाली. एका आमदाराने जयललिता यांच्या साडीला हात घातला आणि साडी फेडण्याचा प्रयत्न केला. करुणानिधी यांनी देखील त्यावेळी त्या आमदारावर काहीच कारवाई केली नाही. किंवा त्याचा निषेधही केला नाही. यामुळे संतापलेल्या जयललिता यांनी योग्यवेळी बदला घेण्याची शपथ घेतली. त्यानंतर करुणानिधी सभागृहात असताना त्यांनी कधीच विधानसभेत पाऊल ठेवले नाही. मला त्यांचा चेहराही बघायचा नाही, असे त्या म्हणायच्या. 

जयललिता २००१मध्ये सत्तेवर आल्या. तेव्हा करुणानिधी यांना मध्यरात्री एका अट्टल गुन्हेगारासारखे फरपटत नेऊन अटक करण्याची कारवाई जयललिता सरकारने केली होती. एका वयोवृद्ध नेत्याविरुद्ध अशा पद्धतीने कारवाई केल्याचा सर्व स्तरातून निषेध झाला होता. मात्र, १९८९मध्ये आपल्या साडीला हात घालण्यात आल्याच्या कृत्याचा जयललिता यांनी संधी मिळताच अशा पद्धतीन बदला घेतला, अशी प्रतिक्रिया तमिळनाडूतील राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक व्यक्त करतात.

जयललिता आणि करुणानिधी यांच्यातील वैर इतके टोकाचे होते, की मरिना बीचवर दफनविधी करण्यासाठी देखील जयललितांच्या राजकीय वारसदारांनी करुणानिधींना परवानगी नाकारली. अखेर परवानगीसाठी कोर्टामध्ये जाऊन झगडावे लागले. करुणानिधी आणि जयललिता हे हाडाचे वैरी आता या जगात नाही. या निमित्ताने द्रमुक आणि अण्णा द्रमुकमधील राजकीय वैमनस्याला मूठमाती मिळावी, अशी अपेक्षा करायला हरकत नाही…

(पूर्व प्रसिद्धीः महाराष्ट्र टाइम्स १२ ऑगस्ट २०१८)