Thursday, January 28, 2010

शंभर टक्के मराठी, दोनशे टक्के मुंबईकर!



खमंग आणि रुचकर वडापाव

मध्यंतरीच्या काळात माझ्या ब्लॉगवर (http://ashishchandorkar.blogspot.com) "वडापाव'वर एक लेख लिहिला होता. त्याला वेगवेगळ्या ठिकाणहून काही प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील सर्वात वेगळी आणि आनंददायक प्रतिक्रिया होती ती अमेरिकेतल्या संदीप नावाच्या एका ब्लॉग वाचकाची. संदीप म्हणतो, ""तुमचा लेख मला खूपच आवडला. तुमचा लेख वाचल्यानंतर मला अमेरिकेतील शिकागो शहरातील एका दुकानाची आठवण झाल्यावाचून राहत नाही. त्या ठिकाणी सुखाडिया नावाच्या माणसाने एक भव्य दुकान थाटलेय. "शॉपिंग मॉल'च म्हणा ना. तिथल्या "रेस्तरॉं'च्या "मेन्यू कार्ड'वर "बॉम्बे वडापाव'चा उल्लेख आहे. हा "बॉम्बे वडापाव' तीन डॉलर्सला मिळतो.''

शंभर टक्के मुंबईचा असलेला वडापाव आता फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे; तर परदेशातही मिळू लागला आहे आणि तिथेही त्याचे नाव नुसते वडापाव असे न राहता "बॉम्बे वडापाव' असे नोंदले गेले आहे. त्यातच वडापावची लोकप्रियता लक्षात येते. तसेच वडापाव आणि मुंबई यांचे किती अतूट नाते आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मुंबईने महाराष्ट्राला काय दिले, असा प्रश्‍न विचारल्यानंतर अनेकांची अनेक उत्तरे असतील. कोणी म्हणेल बाळासाहेब ठाकरे, कोणी म्हणेल सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर, कोणी म्हणेल "फायटिंग स्पिरीट', कोणी म्हणेल बॉलीवूडची मायानगरी इ.इ. पण मला विचारले तर माझे उत्तर असेल- मुंबईने महाराष्ट्राला "वडापाव' दिला.

महाराष्ट्राबाहेर मराठी पदार्थ म्हणून मान्यता पावलेला आणि अस्सल खवय्यांच्या पसंतीस उतरलेला सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडापाव. अस्सल मराठमोळा आणि 100 टक्के मुंबईकर. अगदी दिल्लीपासून ते हैदराबादपर्यंत आणि अहमदाबादपासून ते कोलकत्तापर्यंत बॉम्बे वडापाव (शिवसेनेच्या भाषेत बोलायचे झाले तर मुंबई वडापाव) मिळू लागलाय. भारतातील बहुतांश राज्यात वडापाव मिळतो आहे. प्रांतानुरूप आणि तिथल्या चवीनुरूप काही किरकोळ बदल झाले आहेत. म्हणजे गुजरातमध्ये कापलेला कांदा, बीट आणि कोबी यांच्या सलाडबरोबर वडापाव "सर्व्ह' करतात. तर हैदराबादमध्ये "आलू बोंडा' म्हणून ब्रेडच्या स्लाईसबरोबर वडा दिला जातो. प्रत्येक ठिकाणची चव आणि स्वरूप वेगळे; पण वडापाव तोच अस्सल मराठमोळा.

साबुदाणा खिचडी, थालिपीठ, झुणका-भाकरी, मटारच्या करंज्या, खारी पॅटीस, झणझणीत मिसळ आणि इतरही अनेक पदार्थांच्या तुलनेत वडापाव हा अधिक झपाट्याने महाराष्ट्रभर रुजला आणि सामोसा किंवा कचोरीच्या स्पर्धेतही टिकला. बटाट्यापासून केलेले सारण हाच बटाटा वड्याचा खरा आत्मा. त्याची चव जितकी चांगली तितका वडापाव रुचकर. सोबतीला गोड किंवा तिखट अशी ओली चटणी, कांदा लसूण मसाला किंवा सुकी चटणी असा लवाजमा असतो. पण खरी चव असते ती नुसत्या वड्याचीच. मग तो किती झणझणीत आहे, त्यातील मसाला कसा आहे, त्यात लिंबाचा रस मिसळला आहे का, अशा अनेक गोष्टींवर वड्याची चव ठरते. मग तो वडा नुसता खाल्ला काय किंवा पावाबरोबर खाल्ला काय, एकदम जन्नत. बरोबर तळलेली लवंगी मिरची मात्र हवी. मग गोड-तिखट चटण्या असो किंवा नसो.

मुंबईतील छबिलदास जवळच्या "श्रीकृष्ण'चा अतिमहागडा वडा, कीर्ती कॉलेजजवळचा खमंग वडापाव (हा विक्रेता चुरापाव विकूनही पैसे वसूल करतो), हुतात्मा चौकातील (टेलिफोन एक्‍स्चेंजजवळचा) वडापाव, परळच्या भोईवाडा चौकातील वडापाव, सीएसटीसमोरचा आरामचा वडापाव, ठाण्यातील कुंजविहारचा वडापाव, कर्जतचा दिवाडकरचा वडा, पुण्यातील जोशींचा वडा, सहकारनगरचा कृष्णा किंवा कॅम्पातील फेमस वडापाव, औरंगाबादचा भोला वडापाव, कोल्हापूरचा दीपकचा वडा इ.इ. ही यादी आणखी खूप वाढत जाईल आणि अनेक जण त्यामध्ये नवे नवे स्पॉट्‌स नमूद करता येतील. थोडक्‍यात म्हणजे मुंबईत उगम
पावलेल्या वडापावची ओळख आणि चव सगळीकडे पोचलीय.

फार लवाजमा नसल्यामुळे अगदी गल्लोगल्लीच्या गाड्यांवरही वडापाव दिसू लागला. तयार करायला सोपा आणि ग्राहकही पुष्कळ त्यामुळे "वडापाव' लवकरच सर्वदूर पोचला. गरिबातील गरीबापासून ते गर्भश्रीमंतापर्यंत प्रत्येकाला खमंग वडापाव आवडतो. मग तो सचिन तेंडुलकर का असेना. वडाभाव हा त्याचा "वीक पॉईंट' असतो. त्यामुळे गल्लोगल्ली गाड्यांवर मिळणाऱ्या वडापावलाही "हायजिनिक' स्वरूप देण्याच्या नादात "वडापाव' दुकानांमध्ये गेला. मग तो "प्लॅस्टिक'चे ग्लोव्हज घालून तयार करण्यात येणारा जम्बो किंग वडापाव असो, गोली वडा असो किंवा शिवसेनेचा "शिववडा'. पुण्यातील जोशी वडेवाले असो किंवा रोहित वडेवाला. शिवसेनेनेही आता चौकाचौकांत "शिववडा'च्या गाड्या टाकून ब्रॅंडिंगचा प्रयत्न सुरू केला आहे. वडापावची देखील साखळी पद्धतीची दुकाने निघतील, याची कल्पना कोणीच केली नव्हती. पण आता ती वस्तुस्थिती आहे.

"फक्त एका रुपयात वडापाव' अशा जाहिरातीपासून सुरू झालेले मार्केटिंग आता "हायजिनिक वडापाव'पर्यंत येऊन पोचले आहे. पण कोणी कितीही आणि काहीही म्हटले तरी गाडीवर कढईतल्या उकळत्या तेलात तळले जाणारे गरमागरम खमंग वडे खाण्याची मजा काही औरच. मग थोडंसं तोंड भाजलं तरी त्याचं काही वाटत नाही. आणि एकदा तोंड खवळलं की दुसरा वडापाव खाल्ल्याशिवाय आपण तिथून हलत नाही. अशा वडापावची चव नेहमी आपल्या जिभेवर रेंगाळायला लावण्याचे श्रेय दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचे नसून या मुंबापुरीचे आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच मुंबई बाहेरच्या मंडळींना मुंबईत गेलो आणि वडापाव खाल्ला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. ते त्यामुळेच.


(मुंबई सकाळच्या वर्धापनदिनानिमित्त निघालेल्या विशेष पुरवणीतील लेख...)

Saturday, January 23, 2010

ऋषितुल्य युगपुरुष...

हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 83 वा वाढदिवस. साहेबांनी आज 84 व्या वर्षांत पदार्पण केलंय. साहेबांना दीर्घायुष्य
लाभो, याच शुभेच्छा आणि देवाकडे प्रार्थना. साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने साहेबांच्या काही मोजक्‍या छायाचित्रांच्या माध्यमातून साहेबांना माझ्या ब्लॉगकडून शुभेच्छा...

आशिष चांदोरकर




















Tuesday, January 19, 2010

`आपल्या` ब्लॉगला पुरस्कार...



माझ्या नियमित आणि अनियमित वाचकांना नमस्कार

गेल्या चार साडेचार वर्षांपासून ब्लॉग लिहितोय. दोन वर्षांपूर्वी स्टार माझा या वृत्तवाहिनीनं घेतलेल्या स्पर्धेत ब्लॉगला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं होतं. २०१० या नव्या वर्षाची सुरवातही चांगली झालीय. औरंगाबादच्या ओम एचआरडी इन्स्टिट्यूटनं आशिषचांदोरकर.ब्लॉगस्पॉट.कॉम या ब्लॉगलची पुरस्कारासाठी निवड केली आणि सोमवारी (दिनांक १८ जानेवारी) हा पुरस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदानही झाला.

माझी दिवंगत आई, बाबा आणि इतर कुटुंबियांना माझ्या ब्लॉगसाठीचा हा दुसरा वुसरा पुरस्कार प्रदान. त्यांच्यामुळेच मी इथवर पोचलो आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच मला यापुढेही यश मिळत राहील, असं वाटतो. सो इटस टू देम ओन्ली...

पुरस्कार वितरण समारंभाची बातमी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्याची लिंक खाली देत आहे. यापुढेही आपला लोभ माझ्यावर (माझ्यापेक्षा माझ्या ब्लॉगवर अधिक) राहील, अशी अपेक्षा आणि विश्वास मला आहे.


आपला,

आशिष अरविंद चांदोरकर


कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिप...



लोकसत्ता...

Monday, January 11, 2010

वेड लावणा-या कलाकृती...



'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना...!

कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करुन कलाकार होता येत नाही. कला ही उपजतच असावी लागते. ही आणि अशी अनेक वाक्य आपण प्रत्येकवेळी ऐकलेली असतात. पण जर अशा गोष्टींचा प्रत्यय आला तर आपला त्यावर चटकन विश्वास बसतो. असंच काहीसं माझं झालंय.

देव कोणाच्या हातात काय कला निर्माण करेल काही सांगता येत नाही, हे पाहण्याची संधी मला नुकतीच मुंबईत मिळाली. शशिकांत धोत्रे या अगदी उदयोन्मुख कलावंतानं साकारलेल्या चित्रांचं प्रदर्शन पाहिलं आणि मला ही गोष्ट मनोमन पटली. सोलापूरातल्या मोहोळ तालुक्यामधल्या एका छोट्याशा खेड्यात वाढलेल्या शशिकांत धोत्रे नामक चित्रकाराची ही गोष्ट. ही गोष्ट एखाद्या हिंदी किंवा मराठी चित्रपटात हुबेहूब शोभेल अशीच वाटते.



वडार समाजात जन्माला आलेल्या शशिकांतचे वडील दगड फोडण्याचं काम करतात. आई गृहिणी आहे. रस्त्याच्या कडेला बसून दगड फोडण्याचं काम करणारे अनेक जण आपण आतापर्यंत पाहिले असतील. मोठे-मोठे दगड फोडून त्याचे बारीक दगड करण्याचं काम किती कष्टाचं असू शकतं याची आपण कल्पनाच केलेली बरी. तर असं वडार काम करणा-या घरात शशिकांतचा जन्म झाला. पण वडिल करतात ते दगड फोडण्याचं पारंपरिक काम करण्याची वेळ शशिकांतवर आली नाही. कारण देवानं त्याच्या हातामध्ये दगड फोडण्यासाठी लागणा-या सामर्थ्यापेक्षा चित्र साकारण्याचं कसब निर्माण केलं होतं.

शाळेत असताना चित्र काढण्यावरुन त्यानं अनेकदा शिक्षकांचा ओरडा खाल्ला होता. प्रसंगी मारही खाल्ला होता. शाळेतल्या अनेक भिंती शशिकांतनं चितारलेल्या कलाकृतींनी भरुन गेल्या होत्या. मग कधी त्या त्यानं स्वतःहून काढलेल्या होत्या. तर कधी शाळेतल्या काही कलासक्त शिक्षकांनी त्याच्याकडून करवून घेतल्या होत्या. पुढे दहावी-बारावीचा टप्पा पार करुन शशिकांत मुंबईच्या सुप्रसिद्ध जेजे महाविद्यालयात शिकण्यासाठी दाखल झाला. पण तिथं महिना-दोन महिने काढल्यानंतर शशिकांतनं तिथनं पळ काढला आणि स्वतःच कलेची आराधना करु लागला.



शशिकांतच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं ही चित्र फक्त पेन्सिलच्या सहाय्यानं काढली आहेत. भारतात अशा पद्धतीनं चित्र काढणारे चित्रकार खूप थोडे आहे. जगामध्ये मायकेल एंजेलो हा चित्रकार अशा पद्धतीनं चित्र काढायचा. शशिकांतनं काळ्या पेपरवर काढलेली ही चित्र पाहिली की डोळे दिपून जातात. एकेक चित्र काढायला साधारण सहा ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. मुंबईतल्या तुलिका आर्ट गॅलरीमध्ये भरलेल्या प्रदर्शनात शशिकांतची दहा-बारा चित्र लावलेली आहेत. त्यापैकी एकही चित्र ७५ हजार रुपयांपेक्षा कमी नाही. तर प्रदर्शनातलं सर्वाधिक महागडं चित्र दीड लाख रुपयांना आहे. मुख्य म्हणजे प्रदर्शनातील सर्वच्या सर्व चित्र विकली गेलेली आहेत.

व्यक्तीचित्र रेखाटताना शशिकांतनं अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करुन ते चित्र चितारलं आहे. गफ्फार नावाच्या त्याच्या लहानपणीच्या मित्राचं काढलेलं चित्र तर प्रचंड अफलातून आहे. त्याची बसण्याची लकब, पायावर जखमेची खूण, गोट्यांचे रंग, गोट्या खेळताना चेह-यावर असणारे भाव अशा सर्व गोष्टी त्यानं हुबेहूब हेरल्या आहेत. तन्वी साळकर या मैत्रिणीची दोन पोट्रेट काढताना त्यानं थोडंसं वेगळेपण जपलं आहे. एक चित्र लग्नापूर्वीचं तर दुसरं लग्नानंतरचं आहे. ही दोन्ही चित्र पाहिली की शशिकांतच्या कलेला दाद दिल्याशिवाय रहावत नाही. घराच्या खिडकीतून नव-याची वाट पाहणारी नवविवाहिती तर अफलातून आहे. (म्हणजे चित्र अफलातून आहे.) आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणारे हे 'रिमेम्बरन्स' नक्की पहायला हवं.

एखाद्या खेड्यातनं आणि प्रचंड गरीबीतून वर आलेला शशिकांत आता चांगलाच लोकप्रिय झालाय. त्याला अनेक प्रतिष्ठित पारितोषिकांनी गौरवण्यात आलंय. येत्या काही महिन्यात तो लंडनलाही जाणार आहे. शशिकांतच्या भविष्यातील वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा...

शशिकांत धोत्रेबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा...

http://www.tulikaartsgallery.com/index.php?page=2&isArtist=315

Friday, January 08, 2010

अस्सल मराठमोळं जेवण...



तांबे उपहारगृह

गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कारप्रमाणेच किंवा सत्कारपेक्षाही अधिक लोकप्रिय आणि नावाजलेलं आणखी एक उपहारगृह म्हणजे तांबे उपहारगृह. मरीन लाईन्स रेल्वेस्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर व सीएसटीपास्नं टॅक्सीनं फक्त तेरा ते पंधरा रुपये अंतरावर. त्यामुळं इच्छित स्थळी पोहोचणं फारसं अवघड नाही. (आणि जरी अवघड असलं तरी खरा खवय्या कसंही करुन इथं आल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला नकोच.)

अफलातून चव...
तांबे उपहारगृहाची खरी ओळख म्हणजे इथल्या मराठमोळ्या खाद्यपदार्थांची अफलातून चव. कोथिंबीर वडी, आळू वडी, भाजणीच्या पिठाचं थालिपीठ आणि लोणी, डाळिंब्यांची (सोललेल्या कडव्या वालाची) उसळ, आळूची पातळ भाजी (आळूचं फदफदं), उकडलेल्या बटाट्याची डोसा भाजी (घरगुती पद्धतीनं केलेली उडप्यासारखी नव्हे...) मूग आणि मटकीची उसळ, कढी-भात, कढी- मूगडाळ खिचडी, चवळी-पालक आणि इतर अनेक चविष्ट पदार्थ. ओल्या काजूची (काजूगराची) उसळ हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य!

औरंगाबाद सकाळचे मुख्य वार्ताहर अभय निकाळजे, मुंबई सकाळमधील सहकारी अभय न. जोशी तसंच मंगेश मधुकर कुलकर्णी आणि मी असे आम्ही चौघे तांबे उपहारगृहामध्ये गेलो होतो. सकाळचे चौघे तांबे उपहारगृहामध्ये जाऊन अक्षरशः खूष झालो. तिथल्या जेवणावर दिलखूष झालं. कुठं जायचं कुठं जायचं असं ठरत असतानाच तांबे उपहारगृहाचं नाव पुढे आलं आणि सर्वांनीच त्याला पसंती दिली. मग सकाळच्या फोर्ट कार्यालयातनं ठाकूरद्वार गाठलं.

ब्राह्मणी जेवण...
ब्राह्मणी पद्धतीचं मराठी जेवण इथं फर्स्ट क्लास मिळतं. ब्राह्मणी कुटुंबामध्ये ज्या पद्धतीनं तिखट बेताचंच आणि गुळाचा वापर सढळ हाताने असतो, त्याच पद्धतीची चव इथं चाखायला मिळते. कमी तिखट असलं तरी हे मराठी पदार्थ कमी तिखट असले तरच किंवा थोडेसे गूळचट असले तरच चांगले लागतात, हे सांगायला नको. आळूची भाजी त्याच पठडीतली. पण आळूच्या भाजीला लाल मिरच्यांची फोडणी दिलेली असते. हे इथलं वेगळेपण. त्यामुळंच चवही थोडीशी वेगळी.



डाळिंब्याची उसळ...
इथं गेल्यानंतर आवर्जून खायची गोष्ट म्हणजे डाळिंब्याची उसळ. एकदम घट्ट (रस्सा एकदम कमी) अशी ही उसळ पुण्यातल्या कोहिनूर मंगल कार्यालय किंवा ज्ञानल मंगल कार्यालयातल्या उसळीची आठवण करुन देते. डाळिंब्याची उसळही थोडीशी गोड असेल तर अधिक चांगली लागते. तांबेंनीही हे जाणलंय. पालक पनीरपेक्षा पालक-चवळी असं वेगळंच कॉम्बिनेशन इथं चाखायला मिळतं. शिवाय झुणका-भाकर आहेच. अर्थात, झुणका हा तिखट नाही, हे वेगळं सांगायला नकोच. पण झुणका झणझणीत असेल तरच चांगला लागतो. त्यामुळं इथं झुणका-भाकरी न खाणंच उत्तम. इतर पदार्थ ट्राय केले तर उत्तम.

अनेक पर्याय...
द बेस्ट गोष्ट म्हणजे इथं लिमिटेड किंवा अनलिमिटेड स्वरुपात थाळी मिळतेच. पण तुम्हाला थाळी नको असेल तर भाज्या आणि उसळी यांच्यासाठी प्लेट सिस्टीमही आहे. त्यामुळं आवडीच्या दोन-चार भाज्या, भाकरी किंवा पोळ्या, सोबतीला आळूवडी किंवा कोथिंबीर वडी, एखादं थालिपीठ अशी ऑर्डर दिली तर मग विचारायलाच नको. शिवाय भाजी किंवा उसळीची क्वांटीटी दोघांना पुरेल इतकी असते. त्या अंदाजानं आपण ऑर्डर देऊ शकतो. शेवटी मूगडाळ खिचडी आणि कढी किंवा पांढरा भात आणि कढी हा मेन्यू बेस्ट. एक प्लेट भात किंवा खिचडी दोघांना पुरते. त्यामुळं इथंही अंदाज घेऊनच ऑर्डर देऊ शकतो. इतकं सगळं खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात थोडी जागा असेल तर एक ग्लास सोलकढी प्या. (आम्ही प्यायली होती, हे आलंच)

स्वच्छता आणि टापटीप....
इथली आणखी एक ओळख म्हणजे इथली स्वच्छता आणि टापटीप. स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण इथले वेटरही एकदम स्वच्छ आहेत. शिवाय टिपिकल मराठी उपहारगृहांमध्ये ग्राहकाकडे ज्या तुच्छतेनं पाहिलं जातं तो अनुभव इथं येत नाही. फक्त काहीवेळा पदार्थ लवकर संपलेले असतात. त्याला पर्याय नाही, असं म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं. इथले दरही खूप जास्त आहेत, असं नाही. माफक दर आणि उत्तम चव असं वर्णन करायला हरकत नाही. चार जणांनी यथेच्छ हादडल्यानंतर साधारणपणे तीनशे रुपयांपर्यंत बिल येतं, असा अनुभव आहे. साधारण तीन-चार वेळचा. त्यामुळं जास्त चिंता करु नका आणि ओरपा...


तांबे उपहारगृह
२७७, मापला महल,
जे. एस. मार्ग, ठाकूरद्वार,
गिरगांव, मुंबई – ४००००४
०२२-२३८९९००९
०२२-२३८६४२२३

मायेच्या हाताची मराठी चव...



श्रीयोग डायनिंग हॉल (डोंबिवली)

मुंबईमध्ये आल्यानंतर काही वेळचा अपवाद वगळला तर रोजरोज अण्णाकडे खाऊन ('साम'चा कॅन्टिनवाला) वैताग आला होता. मग महाराष्ट्रीयन पद्धतीचं आणि अगदी घरच्यासारखं जेवण जेवायची खूप इच्छा झाली होती. एकदम साधं, शुद्ध शाकाहारी आणि सात्विक जेवण जेवायला कुठंतरी जायला हवं, असं कित्येक दिवसांपास्नं वाटत होतं. दोनवेळा अचानक हा योग जुळून आला. पहिला योग म्हणजे डोंबिवलीमधल्या श्रीयोग डायनिंग हॉलमधलं (आईच्या हाताची चव...) जेवण आणि दुसरं म्हणजं गिरगावातल्या ठाकूरद्वारजवळच्या तांबे उपहारगृहामधलं जेवण. दोन्ही ठिकाणचं जेवण म्हणजे लय भारी. पहिल्या ठिकाणी मराठी पद्धतीनं तयार केलेली थाळी तर दुसरीकडे टिपिकल मराठी पद्धतीचं बिसमिल्लाह जेवण!

श्रीयोग डायनिंग हॉल...!

मध्यंतरी ई टीव्हीतला माझा जुना सहकारी आणि सध्या आयबीएन-लोकमतचे निखिल वागळे यांच्यानंतरचे आधारस्तंभ श्री.राजेंद्र हुंजे याच्या घरी गेलो होतो. तरी साधारणपणे दोन महिने उलटले. तेव्हा रात्री कुठंतरी 'कार्यक्रम' करायचा आणि थोडंसं जेवायचं, असं ठरलं होतं. पण नेमके एक-दोन जण आलेच नाहीत. मग उरलो फक्त मी आणि राजेंद्रच. मग 'कार्यक्रम' करायचं रद्द झालं आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवायचं ठरलं. राजेंद्रनं आई भोजनालयात जाऊ असं म्हटलं. मी पण होकार दिला. स्टेशनजवळच (पूर्वेला) आई भोजनालय म्हणजेच श्रीयोग डायनिंग हॉल आहे. अगदी पाच मिनिटांवर.

आईच्या हाताची चव...

मायेच्या हाताची मराठी चव... अशीच जाहिरात करण्यात आल्यामुळं जेवण कसं असणार याची उत्सुकता होतीच. शिवाय श्रीकांत मोघे, सुनील बर्वे, प्रशांत दामले आणि इतर अनेक नेते-अभिनेते तिथं जेवून गेले असल्यामुळं उत्सुकता अधिकच ताणली गेली. मेन्यू कार्ड न पाहताच दोन थाळीची (अनलिमिटेड हे आलंच!) ऑर्डर दिली. सुरळीच्या वड्या, बिटाची कोशिंबीर, छोल्यांची उसळ, टॉमेटो-बटाटा रस्सा भाजी, आळूची भाजी, मऊसूद घडीच्या पोळ्या, एक मोठी वाटी श्रीखंड, ताक आणि सरतेशेवटी मस्त सोलकढी... सोबतीला इतर काही पदार्थ असतील तर ते लक्षात नाही. पण ताट एकदम खचाखच भरलेलं आणि वाढपाची सेवाही अगदी शिस्तीत. (आखडता हात न घेता...)

घरचं जेवण...

पोळ्या म्हणजे अगदी घरच्या सारख्या. मऊ आणि तेल लावलेल्या. इतर ठिकाणी मिळणा-या वातड पोळ्या खाऊन इतका कंटाळा आला होता की, मायेच्या हाताच्या मराठी चवीमुळं दोन काय चांगल्या चार पोळ्या जास्त गेल्या. शिवाय सोबतीला आळूची भाजी (काही जण त्याला छद्मीपणे फदफदं असं म्हणतात) असल्यामुळं व्वा! क्या बात है... आळूची भाजी माझी मोस्ट फेव्हरेट असल्यामुळं मला वेड लागलं होतं. पुण्यात श्रुती मंगल कार्यालयात किंवा पूना गेस्ट हाऊसमधल्या चवीला थोडीशी गुळचट असणा-या आळूच्या भाजीची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. छोले, आमटी आणि टोमॅटो-बटाटा रस्सा भाजीही चवीला घरच्यासारखीच. तिखट बेताचंच. गूळही थोडा सैल हातानंच वापरलेला. भातही मोकळा आणि गरमागरम. भात मोकळा असला तरी त्यामध्ये सोडा मात्र नव्हता. कारण नंतर पोट डब्ब होत नाही.

ताकही घट्ट आणि गोड. इतर अनेक ठिकाणी ताकाच्या नावाखाली पांढरं पाणी देण्याची वाईट खोड असते. पण इथलं ताक म्हणजे एकदम घट्ट आणि गोड. जेवताना अधूनमधून ताक पिऊन संपवलं तरी हरकत नाही. जेवणानंतर अपेटायझर म्हणून सोलकढी आहेच. ती पण एखाद्या मालवणी रेस्तरॉच्या तोंडात मारेल अशी. ताटात स्वीट म्हणून दोन-तीन ऑप्शन्स. गुलाबजाम, अंगूर मलाई, श्रीखंड आणि एखाद दुसरा... तुम्हाला आवडेल ते घ्या. स्वीटपेक्षा या सर्व गोष्टींचीच चव इतकी तोंडावर राहते की विचारता सोय नाही. सर्व पदार्थांवर यथेच्छ ताव मारल्यानंतर आपण अगदी तृप्त भावनेनं बाहेर पडू लागतो. इथं एका थाळीचा भाव १३० रुपये इतका आहे. पण स्वीट नको असेल तर किंवा इतर दिवशी हा दर कमी असतो. साधारण शंभर रुपयांच्या आसपास. पण पैसा वसूल जेवण आहे. सो डोन्ट वरी एन्जॉय इट!!!

श्रीयोग डॉयनिंग हॉल
(मायेच्या हाताची मराठी चव... श्रीयोग)
पी. मालवीय मार्ग, रामनगर,
डोंबिवली (पूर्व) – ४२१२०१.
२८६०८७१, (फॅक्स) – २८६१६०३
sachin_bodas@yahoo.com

Monday, January 04, 2010

इडियटगिरीपेक्षा गांधीगिरीच श्रेष्ठ!



ऑल इट नॉट दॅट वेल...

"मुन्नाभाई एमबीबीएस" आणि "लगे रहो मुन्नाभाई...' या गाजलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शक राजकुमार हिरानी याचा थ्री इडियटस हा चित्रपट कसा आहे, हे पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. पण थ्री इडियटस हा चित्रपट त्या दोन्ही चित्रपटांची उंची गाठू शकलेला नाही, असं मला प्रामाणिकपणे इथं कबूल करावसं वाटतं. माझ्या या मताशी फार कोणी सहमत होणार नाही. पण तरीही मला ते मत मांडल्याशिवाय रहावत नाही.

आपलं शिक्षण हे सर्वोत्तम विद्यार्थी कोण आहे, हे शोधण्यासाठी उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काय सर्वोत्तम आहे, हे शोधण्यासाठी आपली शिक्षण पद्धती उपयुक्त नाही. त्यामुळंच आपली महाविद्यालयं ही एकाच साच्यातून एकाच पद्धतीचे विद्यार्थी तयार करणारा कारखाना आहे, अशी टीका होते. ती खरीही आहे. त्यावरच थ्री इडिटस बेतलेला आहे. नेहमीप्रमाणेच आमीर खान आणि माधवन यांच्या भूमिका झक्कास आहेत. शर्मन जोशी देखील कमी पडल्याचं जाणवत नाही. करीना कपूरही छोट्या रोलमध्ये लक्षात राहते.

सर्वप्रथम म्हणजे थ्री इडियटसचा विषय एकदम भन्नाट आहे. परंपरागत शिक्षणपद्धती किती बोगस आणि तकलादू आहे, हे त्यात दाखवण्यात आलंय. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त पहिला येणाऱ्याला महत्त्व आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि त्यानंतरच्या लोकांना इथं फारसं महत्त्व नाही. त्यामुळं जो तो पहिल्या क्रमांकासाठी धावतोय. आपण किती मनापासून शिकतो, त्याचा आपल्याला आयुष्यात किती उपयोग होतो, दैनंदिन जीवनात आपल्याला शिक्षणाचा किती उपयोग होतो, याचा काहीही विचार न करता आपण पाठांतर करतो आणि परीक्षेमध्ये सगळं बाहेर काढतो. अशा या शिक्षण पद्धतीवर थ्री इडियटसनं प्रकाशझोत टाकलाय.

अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तीन (किंवा चार) तरुणांची ही कथा आहे. इंजिनिअर किंवा डॉक्टर व्यतिरिक्त माणसानं काही होऊच नये की काय, अशा पद्धतीनं पालक विचार करतात आणि त्या ओझ्याखाली विद्यार्थी-विद्यार्थिनी पार दबून जातात. मग कोणी परीक्षेच्या टेन्शनमुळं आत्महत्या करतं तर कोणी वाईल्ड फोटोग्राफीचा छंद सोडून इंजिनिअर होण्यासाठी रॅट रेसमध्ये उतरतो. थोडक्यात म्हणजे जो तो स्वतःच्या आवडी निवडी सोडून पारंपरिक शिक्षणाच्या मागं धावतोय. अशा या जळजळीत विषयावर राजकुमार हिरानी स्टाईलनं कोरडे ओढण्यात आले आहेत.

कॉलेजमधलं रॅगिंग, विद्यार्थ्यांच्या गमती-जमती, आमीर आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या करामती अशा अनेक गोष्टींमुळे चित्रपटाला मस्त तडका मिळालाय. कॉलेजच्या गॅदरिंगच्या वेळी उडालेली धम्माल किंवा जावेद जाफरीच्या घरी माधवन आणि शर्मन जोशी यांनी वठवलेला प्रसंग पोट धरुन लोळायला लावणारे आहेत. इतरही काही प्रसंगांमधून पोट धरुन हसायला होतं. पण चित्रपट म्हणून जी सलगता हवी किंवा लिंक रहायला हवी, ती थोडीशी इथं जाणवत नाही. वेगवेगळे प्रसंग फक्त एकत्र केल्यासारखे वाटतात. काही वेळा तर अतर्क्य आणि अशक्यप्राय गोष्टी दाखवून चित्रपटाला थोडंसं वास्तवतेपासून दूर नेल्यासारखं वाटतं.

आमीर खाननं वेगवेगळ्या शहरांमध्ये वेषांतर करुन जाऊन चित्रपटाची पब्लिसिटी केली होती. त्याचा प्रसिद्धी माध्यमांमधून चांगलाच गवगवा झाला होता. चेतन भगत यांच्या फाईव्ह पॉईंट समवन या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. मात्र, चित्रपटाच्या श्रेय नामावलीत भगत यांचा अनुल्लेख केल्यामुळे भगत चांगलेच भडकले आहेत. त्यांचा आणि आमीर खान यांचा वाद सध्या चांगलाच रंगलाय. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट तुफान चालतोय. वेगळा विषय, वेगळी मांडणी आणि आमीरच ग्लॅमर यामुळं चित्रपटाला चांगला गल्ला तयार करताय आलाय.

इतकं सगळं असूनही मनापासनं सांगायचं तर मला हा चित्रपट तितकासा आवडलेला नाही. दोन मुन्नाभाईंच्या तुलनेत थ्री इडियटस फिका पडतो आणि तुफान मनोरंजनाची अपेक्षा ठेवली तर अपेक्षाभंग झाल्याशिवाय राहत नाही.इतकं सगळं असलं तरी डोन्ट वरी एकदा बघायला नक्कीच हरकत नाही...