Friday, August 17, 2012

एक साली मख्खी....



इगा इगा इगा

एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है... नाना पाटेकरचा एक प्रचंड गाजलेला डायलॉग. त्या डायलॉगची आठवण करून देणारा एक अफलातून पिक्चर सध्या तेलुगूमध्ये धुमाकूळ घालतोय... त्याचं नाव इगा. इगा म्हणजे माशी.

नेहमीच्या कथानकापेक्षा हटके स्टोऱ्या घेऊन प्रेक्षकांपर्यंत जाणं ही दाक्षिणात्य चित्रपटांची खासियत. इगा चित्रपटांत त्याचा अगदी मस्त अनुभव येतो. अर्थात, तेलुगू पिक्चरची माहिती ब्लॉगवर देऊन फायदा काय, असा विचार मनात येऊ शकतो. पण लवकरच हा पिक्चर हिंदीमध्ये डब करण्यात येत असून हृतिक रोशन वगैरे मंडळींचा आवाज चित्रपटाला असणार आहे, असे समजते. त्यामुळे सर्वांनाच हा चित्रपट पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे.

वास्तविक पाहता, तेलुगू समजत नसेल तरी चित्रपट अगदी व्यवस्थित समजतो. चित्रपट हे दृष्य माध्यम असल्यामुळे शब्दांविना अडत नाही. त्यामुळेच ई टीव्हीत काम करीत असताना जवळपास वीस ते पंचवीस तेलुगू चित्रपट पाहिले होते. शिवाय काही काही शब्दांचे अर्थ चित्रपट पाहून पाहून समजायला लागतात. त्यामुळे भाषेचे प्राथमिक ज्ञानही हळूहलू वाढत जाते. तेव्हा सध्याचा तुफान गर्दी खेचणारा इगा पाहण्याची संधी मी हैदराबादला गेलो होतो, तेव्हा सोडली नाही. आमच्या दिलसुखनगर भागातच असलेल्या मेघा थिएटरवर अवघ्या चाळीस रुपयांमध्ये मस्त एसीत बसून चित्रपट पाहिला. स्वस्त तिकिटे आणि मस्त थिएटर हे हैदराबादचे किंवा एकूणच दाक्षिणात्य राज्यांचे वैशिष्ट्य.

नानी आणि त्याच्या घरासमोर राहणाऱ्या बिंदू नावाच्या एका मुलीची ही गोष्ट. नानी हा फटाक्यांची रोषणाई वगैरे करणारा एक होतकरू तरुण आणि ती एका शैक्षणिक एनजीओमध्ये काम करणारी कन्यका म्हणजे बिंदू. सुरुवातीच्या साधारण अर्ध्या तासात दोघांमध्ये प्रेम फुलत जातं. त्या दोघांमध्ये अपेक्षेप्रमाणे एक व्हिलन एन्ट्री मारतो. व्हिलनची भूमिका कन्नड अभिनेता सुदीपनं उत्तम वठवलीय. रग्गड श्रीमंत असलेला सुदीप पैशांच्या जोरावर बिंदूकडून प्रेमाची अपेक्षा करीत असतो. (चित्रपटातील व्हिलनचे प्रेम म्हणजे शरीरसंबंध हे ओघानं आलंच.)



असा हा सुदीप बिंदूवर मरणाऱ्या नानीचा खून करतो. ते सुद्धा बिंदू जेव्हा त्याच्या प्रेमाला होकार देणार असते अगदी तेव्हा. नानी मेल्यानंतर बिंदू आपलीच होणार, अशा थाटात सुदीप वावरत असतो. मात्र, नानी एका माशीच्या रुपाने पुनर्जन्म घेतो आणि बदला घेण्यासाठी सज्ज होतो. जसे एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है..., एक मुंगी हत्तीला लोळवू शकते तसेच एक माशी व्हिलनला कशी नेस्तनाबूत करते, हे चित्रपटातून अगदी समर्थपणे दाखविण्यात आले आहे. अर्थातच, ऍनिमेशनच्या सहाय्याने.

माशी म्हणून तिला जन्मल्यानंतर येणाऱ्या अडचणी, व्हिलनचा मुकाबला करताना जाणविणाऱ्या समस्या आणि त्यावर मात करून लढविलेल्या विविध क्लृप्त्या अशा एक से बढकर एक गोष्टींमुळे चित्रपट रंजक आणि पाहणेबल झाला आहे. आता इगा कोणकोणत्या क्लृप्त्या लढविते आणि कसे कसे व्हिलनला चरफडविते, हे वाचण्यापेक्षा पाहण्याचाच अनुभव अधिक भारी आहे. नानी म्हणजे सुदीपला मेटाकुटीस आणणारी माशी आहे, हे बिंदूला समजते का, एका छोट्याशा माशीला मारून टाकण्यासाठी सुदीप कसे कसे प्रयत्न करतो, त्यांना इगा कशी पुरून उरते, हे प्रत्येकाने अगदी जरुर जरुर पाहण्यासारखे आहे.

भारतातही इतके चांगल्या दर्जाचे ऍनिमेशन असलेले चित्रपट तयार होऊ शकतात, हे रोबोटने दाखवून दिले होते. आता इगानेही त्याच पंक्तीत जाऊन बसण्याची कामगिरी केली आहे. तेव्हा हिंदीमध्ये इगा येईल तेव्हा अगदी जरूर पहा. तो पर्यंत यू ट्यूबवरील गाण्यांवर आणि ट्रेलरवर समाधान माना...


Thursday, August 02, 2012

खोडसाळपणाच... पण कुणाचा?

असं म्हणतात, की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,
अन् दोन-पाचशे मेल्याशिवाय पोलिसांना घटनेचं गांभीर्य कळत नाही...

पुण्यात झाले फक्त चार स्फोट,
अन् अवघा एक जण जखमी झाला,
तरीही मिडीयावाल्यांचा आरडाओरडा
आणि देशभर चर्चेला हुरूप आला...

...एसआयटी आणि एनआयएसह आणखी
पाच पन्नास संस्था पुण्यात थडकल्या,
तरी पण पोलिसांच्या प्रमुखाला चार स्फोट
म्हणजे खोडसाळपणा आणि बाता वाटल्या...

एखाद्या स्फोटानंतर कसं बोलावं, काय बोलावं
याचेही आता क्लासेस उघडावे लागतील,
आणि आर आर आबांच्या “हादसा”च्या कहाण्या
पोलिसांना समजावून द्याव्या लागतील...

अहो, माहिती येण्यापूर्वी प्लीज
वाट्टेल ते बडबडू नका,
माईक दिसला म्हणून
लोकांच्या जखमेवर मीठ चोळू नका...

स्फोट जरी किरकोळ असले तरी,
लोकांची चांगली चार हात फाटली,
लोकांच्या भावनांशी खेळताना
पोलिसांनो, तुम्हाला लाज नाही वाटली...

कदाचित रोजच्या स्फोटांमुळे
पोलिसांच्या मेल्या असतील संवेदना,
नि मृतांच्या आकड्यावरून
ठरत असतील अधिकाऱ्यांच्या भावना...

धागेदोरे सापडले आहेत, काही जण ताब्यात आले आहेत,
अशी वाक्यही नेहमीचीच असली तरी बरी वाटतात...
पण खोडसाळपणाच्या भाषा तुमच्याबद्दलच्या
उरल्यासुरल्या सन्मानाची वाट लावतात...

म्हणूनच असं म्हणतात, की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,
अन् दोन-पाचशे मेल्याशिवाय पोलिस घटनेकडे गांभी्र्यानं पहात नाही...