
पाणीपुरी प्रेमींसाठी नवा "स्पॉट'
भेळेच्या गाडीवर गेल्यानंतर तुम्ही रगडा पॅटिस, रगडा पुरी, भेळ किंवा एसबीडीपी (शेव बटाटा दहीपुरी) यापैकी काहीही खा पण सर्वात शेवटी एक प्लेट पाणीपुरी होणारच. पाणीपुरी हा पदार्थ आवडत नाही, अशी व्यक्ती अगदी विरळ. माझ्या ओळखीत आहेत एक-दोन जण असे पण बहुतेक सर्वांनाच पाणीपुरी आवडते.
तुम्ही जर पाणीपुरीचे अगदी "डाय हार्ड' फॅन असाल तर शनिवार वाड्याजवळ उभ्या असणाऱ्या भेळ-पाणीपुरीच्या अनेक गाड्यांपैकी "दिल्ली चाट' अशी पाटी असलेल्या गाडीवर जाऊन पाणीपुरी खाच. तुम्ही जर अस्सल चाहते असाल तर फक्त एक प्लेट खाऊन तुम्ही स्वस्थ बसूच शकणार नाही. दुसरी प्लेटही पाहता पाहता संपून जाईल.
बालगंधर्व पुलावरील गाडी, पत्र्या मारुतीजवळील गाड्यांपैकी लक्ष्मी रस्त्याकडील गाडी, पेशवाईच्या चौकातील गाडी, एसएनडीटीजवळ किंवा बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर असलेली "कल्याण भेळ', सारसबागेतील भेळ व चाटची तमाम दुकाने, डेक्कन- संभाजी बाग परिसरातील तमाम गाड्या व इतर भागांमध्ये मिळणाऱ्या पाणीपुरीच्या तुलनेत शनिवारवाड्याजवळ उभ्या असलेल्या या गाडीवरील पाणीपुरी नक्कीच वरचढ आहे, असा दावा मी छातीठोकपणे करु शकतो. गेल्या दीड-दोन वर्षांपासून या ठिकाणची पाणीपुरी खाऊन हे शिक्कमोर्तब करण्यात आले आहे. फक्त मीच नाही तर आमच्या ऑफिसमधील अनेकांनी हे मान्य केले आहे.
पाणीपुरीचा आत्मा असतो पुदीना चटणीचे पाणी. पाणीपुरीतील पुरी सर्व ठिकाणी सारखीच असते. शिजविलेले वाटाणेही सगळीकडेच असतात. पण "दिल्ली चाट'च्या पाणीपुरीत जे तिखट पाणी टाकतात, त्याला तोडच नाही. मिरचीचा ठेचा व पुदीना चटणी यांचे जे काही अफलातून मिश्रण असते ते प्रत्यक्ष चव चाखूनच पाहिले पाहिजे. पाणीपुरी तयार करणारा जो "चाचा' आहे तो स्वतः ते पाणी तयार करतो. त्यामुळे रोज पाण्याची चव सारखीच असते.
शिवाय तुम्हाला तिखट किंवा गोड पाणीपुरी जशी पाणीपुरी हवी असेल त्यानुसार अप्रतिम "कॉम्बिनेशन' तुम्हाला मिळते. चिंच-गुळाचे गोड पाणी व मिरची-पुदीनाचे तिखट पाणी यांची चव इतर ठिकाणपेक्षा येथे अगदी "हटके' आहे. त्यामुळेच एकदा येथे येऊन गेलेला खवय्या पुन्हा फिरकला नाही, असे होणारच नाही.
पाणीपुरीसाठी कोठेही जायची तुमची तयारी असेल तर मग एकदा शनिवारवाड्याजवळ येऊन जाच!