Monday, December 08, 2008

शूरा मी वंदिले...


माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु... जिंकू किंवा मरु... अनेक वर्ष फक्त टीव्ही वर पाहिलेलं हे समरगीत... या गीताचा प्रत्यक्ष अनुभव आला तो अतिरेक्‍यांनी संपूर्ण मुंबईला वेठीस धरल्यानंतरच... प्रत्यक्षात पुढं मृत्यू उभा ठाकल्यानंतरही निधड्या छातीनं फक्त आणि फक्त देशासाठी प्राण देण्याची तयारी म्हणजे काय हे मुंबईवरच्या हल्ल्यामुळं अगदी जवळनं अनुभवता आलं. मृत्युच्या गुहेत शिरुन मृत्यूचाच खातमा करणं प्रचंड अवघड, थरारक आणि जिगरीचं काम... पण एनएसजी कमांडो, लष्कराचे जवान, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलिस हे काम जीवावर उदार होऊन करत होते. अगदी दिवस-रात्र... तब्बल सलग सत्तावन्न तास...

अतिरेक्‍यांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र सामुग्री नसेलही... पण आहे त्या शस्त्रांनिशी लढण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाच्या चर्चा आता खूप होतील. पण तक्रार न करता आहे त्या शस्त्रांनिशी युद्धभूमीवर जायला आणि शत्रूचा सामना करायला अंगात धमक लागते. ती महाराष्ट्र पोलिसांनी दाखवली त्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांना सलाम.

हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर यांनी आधी पूर्ण माहिती घेऊन नंतरच मैदानात उतरायला हवं होतं, असा सूर आता ऐकू येतोय. पण प्रतापराव गुजरांच्या या महाराष्ट्रात शत्रूला संपवण्यासाठी वेडात हे तीन वीर दौडले त्यांचा पराक्रम अगदी बिनतोड... संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आणि ऑपरेशन फत्ते झाल्यानंतर फिल्मी मंडळींसह टूर काढायला पोलिस म्हणजे काही राजकारणी नाहीत. माझ्या मुंबईत काही तरी विपरित घडलंय आणि मला ते थांबवायचंय. त्यासाठी मला तातडीनं घटनास्थळी गेलंच पाहिजे, हेच अधिकाऱ्यांच्या डोक्‍यात होतं. हे प्रकरण आपल्या जीवावर बेतू शकेल, याचा अंदाज त्यांना कदाचित असेलही. पण असं असतानाही तातडीनं "फिल्ड'वर येऊन प्राणांची आहुती देणाऱ्या प्रतापराव गुजरांच्या या तीन सरदारांना सलाम.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसाठी आगीची धग तर नेहमीचीच. पण दहशतवादाची धग ते प्रथमच अनुभवत होते. युद्धभूमीप्रमाणे गोळीबार सुरु आहे. ग्रेनेड हल्ले होत होते. पण तरीही हॉटेलचं नुकसान होऊ द्यायचं नाही आणि लागलेली आग तातडीनं विझवायचीय हेच त्यांचं महत्वाचं काम होतं. त्यासाठी ते प्राणांची बाजी लावत होते. गोळीबार सुरु असताना ताजला लागलेली आग विझवण्यासाठी झटत होते. आपलं मरण डोळ्यासमोर असतानाही जवानांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना सलाम.

अतिरेक्‍यांना संपवून टाकण्यासाठी युद्ध सुरु होतं. हे युद्ध कव्हर करण्यासाठी काही अतिउत्साही पत्रकारही आले होते. तसंच काही नागरिक क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी येतात तसे ही लढाई पाहण्यासाठी आले होते. ही बघ्यांची गर्दी आवरण्याचं काम शीघ्र कृती दलाचे जवान, महाराष्ट्र पोलिस आणि राखीव पोलिस दलाच्या जवानांची होती. नेमून दिलेलं काम चोख पार पाडून ऑपरेशला मदत करणाऱ्या या सर्वांना सलाम.

राष्ट्रीय सुरक्षा दल म्हणजेच एनएसजीचे कमांडो आणि लष्कराचे जवान यांच्या अभिनंदनासाठी तर शब्दच अपुरे पडतील, अशी परिस्थिती आहे. अतिरेक्‍यांना कंठस्नान घालून त्यांनी मुंबईकरांसह सर्व भारतीयांना मोकळा श्‍वास घेण्याची संधी दिलीच. पण हे करताना हॉटेलमधल्या बंधकांना सोडविण्याची अवघड कामगिरीही त्यांनी पार पाडली. अतिरेक्‍यांचा खातमा करताना एकाही नागरिकाचा प्राण जाणार नाही, याची काळजी जवानांनी घेतली.

स्वातंत्रपूर्व काळात क्रांतिकारक जसे हातावर प्राण घेऊन इंग्रजांशी लढायचे. तशाच पद्धतीनं आधुनिक काळातले हे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु लढत होते. कुणासाठी फक्त देशासाठी... हल्ली देशासाठी काहीतरी करण्याची बोल बच्चनगिरी करणारे पुष्कळ आहेत. पण प्रत्यक्ष कृती करणारे अगदी थोडे. त्या यादीत लष्कराचे जवान किंवा एनएसजीचे कमांडो यांचं स्थान अगदी वरचं. ही यादी त्यांच्यापासूनच सुरु होते, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळंच कमांडो आणि जवानांना त्रिवार नव्हे, शतशः नव्हे, लाखो नव्हे अगदी अनंत अगणित सलाम.

अतिरेकी कितीही असो... आम्हाला कोणतंही काम अवघड नाही... जोपर्यंत एनएसजी आहे तोपर्यंत भारताकडे कोणीही वाकडा डोळा करुन पाहू शकत नाही, असं सांगणाऱ्या एनएसजी कमांडोजच्या आत्मविश्‍वासाला सलाम. सारं करुनही आपण काहीच न केल्याच्या आर्विभावात वावरणाऱ्या लष्करी जवानांच्या निरपेक्ष वृत्तीला सलाम. ऑपरेशन फत्ते झाल्यानंतर प्रेमानं दिलेलं गुलाबाचं फुल स्वीकारण्यासाठी शंभरदा विचार करणाऱ्या जवानांच्या निस्वार्थी हेतूंना सलाम. काळ्या कपड्यात राहूनही पांढऱ्या कपड्यांमधल्या बगळ्यांपेक्षा अधिक स्वच्छ आणि शुद्ध असलेल्या जवानांच्या खऱ्याखुऱ्या देशभक्तीला सलाम. अतिरेक्‍यांशी लढण्यात इस्रायलचे जवान सर्वाधिक पटाईत. अशा इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या एनएसजी कमांडोजच्या शौर्याला आणि लढवय्या वृत्तीला सलाम.

अतिरेक्‍यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना सलाम, जखमींना रुग्णालयात नेऊन माणुसकी जिवंत असल्याचं दाखवून देणाऱ्या मुंबईकरांना सलाम, जखमी रुग्णांवर अहोरात्र उपचार करणाऱ्या डॉक्‍टर तसंच परिचारकांना सलाम, हल्ला झाल्यानंतर रक्तदानासाठी तातडीनं ब्लड बॅंक गाठणाऱ्या रक्तदात्यांना सलाम, दक्ष मुंबईकरांना सलाम, युद्धजन्य परिस्थितीतही प्रेक्षकांपर्यंत सर्व माहिती पोचवणाऱ्या पत्रकारांना सलाम, काही न्यूज चॅनेल्सच अफवा पसरवत होती. पण तरीही या अफवांवर विश्‍वास न ठेवणाऱ्या आणि स्वतः अफवा न पसरवणाऱ्या सामान्यातल्या सामान्य नागरिकाला सलाम...

3 comments:

Heramb Kulkarni said...

Prataham …mi sagalya adhikari ani police dept including NSG chya javana chya Shauryala pranam karato..ani tynache uprkar mi kadhihi wisarnar nahi.
Police dalache 3 IMP Adhikari ashya bikat paristhiti madhe ekatra jatat....hyacha artha mi ek samya manus asa kadu shakato:
1. ektar tyana 3 adhikaryana hi paristhiti bikat he samajale nahi. (Intelligence failure and also questioning their intelligenece)
2. Tyana swataha chi position and responsibility samajali nahi...i.e. aapan gelo tar...aapalya magachya seneche kay hoil...hyacha wichar kela nahi..
3. Vedat marathe veer daudale saat...??? ase koanala mhanayache?...Paratapar rao gurjar na....ki jyana aadhi cha parabhav jivhari lagala hota..mhanoon te wede zale hote.....karkare,Kamte ani sakalskar hyana konata parabhav jivhari lagala hota?..Malegaon cha???..
4. he tinhi veer Atirekyanshi ladhata ladhata gele asate tar aamhi tyana Veer Sawarakar n peksha mottha sanman dila asata...pan..keval...vedat Marathe veer Dudale teen...hyala mazya mate...Ved..evadhech mahatwache aahe..Veer hi Upadhi yogya nahi.
5. Atirekya n sathi..he tinhi adhikari..Samanya manase marawi...tya pramane...kahi virodh na karata maran pawale...khara ladha dyayayacha asel tar he wacha: http://www.rediff.com/news/2008/dec/08mumterror-salute-the-brave-constables-of-d-b-marg-police-station.htm

6. Udya ashi Paristhiti mazya war aali..tar ek RSS cha Swayamsevak mhanoon...mi pan asech karen..hyabaddal shanka nahi...(ha maza Daava nahi...tar Vishwas aahe)

7. Udya jar Mrutya ashya Bhyad padhhatine zala tar...maze naav Atirekyan barobar lavayala..ajibat kacharu naye.

8. Eka Second madhe 10 bullets fire karnari MP6 gun chya samor Police Constable Tukaram javu shakato ....tyachya Dhairyala maza salam!!

Bhavana said...

Hey Asish, I so wish I could read through what you have written. But alas, I don't understand marathi very well. But I am glad you have written this blog in native language. I will send it to my Maharashtrian friends here.
bhavana

Mazemat said...

Yes, you have written nice things. Evernone have to come forward to praise our people those fought this war against Indians. But, personally speaking, I want to know burning eventualities of this terror attack from Mumbaiker journalist......We are eagerly waiting for that......Thanks