Saturday, December 27, 2008

बंगाली दिग्दर्शकाचा कौतुकास्पद प्रयत्न


"तहान' पाणी प्रश्‍न सोडवण्याची...

पाणी हाच धर्म... हे संत गाडगेबाबांचं ब्रीद शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या नावानं राज्य करणारी मंडळी विसरली आहेत की काय, अशी शंका येण्याइतकी परिस्थिती नक्कीच आहे. निदान महाराष्ट्राच्या काही भागात तरी आहे. पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. भारनियमनाची बोंबाबोंब तर सगळीकडेच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातलं शेतकरी आत्महत्यांचं लोण पश्‍चिम महाराष्ट्रातही पसरलंय. आबांच्या "सो कॉल्ड' कडक शासनानंतरही सावकारीचा पाश कायम आहे. अजूनही अनेक ठिकाणी पाण्यावरुन दलित-सवर्ण वाद धगधगतोय. पाण्याच्या खासगीकरणाचा मुद्दा येत्या काही वर्षांत वादग्रस्त बनण्याची चिन्हे आहेत. पण या सर्व परिस्थितीकडे माध्यमांचं विशेषतः चित्रपट माध्यमवाल्यांचं फार कमी लक्ष जातं.

मुळातच या विषयात काही सनसनाटी नाही. शहरी मध्यमवर्गाला आकर्षून घेण्याजोगा हा विषय नाही. शहरी मध्यमवर्गानं पाठ फिरवणं म्हणजे चित्रपट आपटण्याची हमखास हमी. त्यामुळं अशा गंभीर आणि धगधगत्या वास्तवाकडे वळण्याचं धाडस कोणी करताना दिसत नाही. पण हा किचकट आणि चित्रपटासाठी कंटाळवाणा ठरु शकणारा विषय हाताळण्याचं धाडस एका दिग्दर्शकानं केलंय. महाराष्ट्रातली समस्या मांडणारा हा माणूस मराठी नाही. हा माणूस आहे बंगाली. दासबाबू असं त्याचं नाव. गेली अनेक वर्षे दासबाबू यांनी "दूरदर्शन'साठी काम केलंय. "हे बंध रेशमांचे', "एक धागा सुखाचा', "वाजवा रे वाजवा' आणि "श्रीमंताची लेक' असे अनेक चित्रपट-मालिका दासबाबू यांनी दिग्दर्शित केल्या आहेत.

दासबाबूंचा "अशी ही तहान' हा चित्रपट सांगली आणि सातारापाठोपाठ आता मुंबईत प्रदर्शित झालाय. सदाशिव अमरापूरकर, विक्रम गोखले, अरुण नलावडे, सुनील बर्वे, अश्‍विनी एकबोटे, विजय चव्हाण, कुलदीप पवार अशी स्टार कास्ट आहे. विषय चांगला आहे. पण विविध शहरांमध्ये प्रामुख्यानं ग्रामीण भागात हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अनेक अडचणी आहेत. चित्रपटगृह हा चित्रपट लावून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळं या चित्रपटातून मला फार काही पैसा मिळणार नाहीये. पण मी झगडतोय ते शेतकऱ्यांपर्यंत संदेश पोचवण्यासाठी. आत्महत्या न करता समस्यांच्या विरोधात पेटून उठा, असा संदेश देण्याचा प्रयत्न दासबाबू "तहान'च्या माध्यमातून करताहेत. मुळात म्हणजे एका बंगाली माणसानं हा विषय हाताळला हीच गोष्ट कौतुकास्पद आणि काहीशी आश्‍चर्यकारक आहे. हा चित्रपट पाहताना तेलुगू चित्रपटांची आठवण येते. जमिनीच्या मुद्‌द्‌यावरुन शेतकऱ्यांना छळणारा सावकार किंवा जमीनदारांच्या विरोधात उभी राहणारी आंदोलनं हे विषयही तिथं चित्रपटात दिसायचे. त्याचीच आठवण "तहान' पाहताना होते.

किशोर नांदलस्करला कर्जासाठी छळणारा सावकार, दलित असल्यामुळे अश्‍विनी एकबोटेला घरच्या विहिरीवर पाणी भरु न देणारी सावकाराची बायको, एक घागर पाण्यासाठी अश्‍विनी एकबोटेला आपल्याबरोबर शय्यासोबत करायला लावणारा सावकार (शरद समेळ), नदीचं खासगीकरण करुन गावकऱ्यांना पाण्याला मोताद करणारं सरकार, "फिल्टर वॉटर'च्या कंपनीला नदी विकणारे आणि त्या कंपनीमध्ये भागीदारी करणारे मुख्यमंत्री असे अनेक प्रसंग वास्तवाची दाहकता दाखवून जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रश्‍नी कसं राजकारण होतं, सरकार किंवा मंत्री जनतेची आणि पत्रकारांची कशी फसवणूक करतात हे अगदी योग्य रितीनं यामध्ये दाखवण्यात आलंय. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लोकसत्ताचे पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचे आहेत. त्यामुळे ते "दोन फुल एक हाफ' इतकेच दर्जेदार आहेत. जगदीश खेबुडकरांच्या गीतांनी (आणि एका लावणीनं...) चित्रपटात धमाल आणलीय. चित्रपटातली तीन गाणी पाणी या विषयाभोवतीच आहेत. "टाकी तुडुंब भरा...' अशी लावणी दिलखेच आहे.

ही "राजकीय फॅंटसी' आहे, असं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. त्यामुळं यामध्ये कथा कशीही वळवली तरी ते विचित्र वाटत नाही. प्रत्यक्षात अनपेक्षित वाटणारे अनेक प्रसंग आणि घटना या चित्रपटामध्ये अगदी जोर देऊन चित्रित केले आहेत. शिवाय चित्रपटाचा वेग मंदावला आहे. हल्लीच्या वेगवान दुनियेत हा चित्रपट वेगाच्या दृष्टीनं म्हणजे "दूरदर्शन'च्या जुन्या काळातली "डॉक्‍युमेन्ट्री'च म्हटली पाहिजे. पण तरीही हा चित्रपट एकदा पहायला हरकत नाही. शहरी भागामध्ये पाण्याची समस्या इतकी जाणवत नाही. पण आपण जसजसं ग्रामीण भागात जातो तसतशी आपल्याला ही समस्या जाणवू लागते. त्यामुळंच ग्रामीण भागात या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळेल, यात शंकाच नाही. समस्या आहे ती चित्रपटाला चित्रपटगृह मिळतील किंवा कसे याचीच. दासबाबू हे यासाठी प्रयत्नशील आहेत.

दासबाबू
(दिग्दर्शक, लेखक आणि सहाय्यक सरव्यवस्थापक एमटीएनएल)
9869011212 आणि 9869281212
dasbabu_director@rediffmail.com

2 comments:

Anonymous said...

wa Nete wa...Jordar samikshak aahat Tumhi...Dasbabunsah Tumchahi ABHINANDAN

Devidas Deshpande said...

are tu kevhapasun asha vishayavar lihayala laglas?