Wednesday, June 17, 2009

आई...

"ती' माझ्या रक्तातच आहे...

आठ मे 2009. "मदर्स डे'च्या बरोब्बर दोन दिवस आधी. माझ्या आईचं निधन झालं. गेल्या अनेक वर्षांपासून ती आजारी होती. पण तरीही तिची जगण्यासाठीची झुंज सुरु होती. पण आठ वर्षानंतर तिनं दम तोडला. गेल्या अनेक दिवसांपास्नं आईवर लिहायचं होतं. वास्तविक पाहता आईवर लिहायचं तर पुस्तकही लिहिता येईल. पण मी माझ्या आईवर लिहिलेलं वाचणार कोण? त्यामुळं माझ्या ब्लॉगवर लिहायला काय हरकत आहे. प्रयत्न करुनही कमी शब्दात लेख आटोपणं शक्‍य झालेलं नाही. काहीसा "स्वान्त सुखाय" लिहिलेला हा लेख इथं देत आहे...

मध्यंतरी कोटेशन्सचं एक पुस्तक वाचत होतो. त्यात आईबद्दल एक सुंदर विचार लिहिला होता. "गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर. सो ही क्रिएटेड मदर्स...' हे झालं इंग्रजीचं. आईचं वर्णन करण्यासाठी यापेक्षा अधिक सुंदर वाक्‍य कोणते असू शकेल? मराठीतही अशाच पद्धतीनं आईची महती गायली गेलीय. मराठीतही एक गाणं आहे, "आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून "श्री"च्या राजानंतर शिक रे अ आ ई...' कोणी म्हणतं आई म्हणजे जिच्या आत्म्यात ईश्‍वराचा वास असतो, ती व्यक्ती म्हणजे आई.

अर्थात, जोपर्यंत आई होती तोपर्यंत मला या गोष्टींचं फारसं अप्रूप वाटलं नव्हतं. पण आठ मे ला आई गेली आणि राहून राहून हे विचार माझ्यासमोर तरळत होते. माझी आई नेहमी म्हणायची की, "जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला माझी किंमत कधीच कळणार नाही. पण मी गेल्यावर माझं महत्व तुला नक्की समजेल.' आज माझी आई माझ्याबरोबर नाही. आठवणींनी आणि तिच्या विचारांनी ती जरी कायम माझ्याबरोबर असली तरी आई आता पुन्हा मला कधीच भेटणार नाही. पण मला आईची किंमत पुरती कळून चुकलीय. ती अमूल्य आहे. आई असतानाही हे माहिती होतंच. पण आज ती जवळ नाही. त्यामुळं तिचीं उणीव अधिकच जाणवतेय.

आई नावाचं विद्यापीठ...

आई म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. तिनं आमच्यावर मारुन मुटकून कधीच संस्कार केले नाहीत. शिस्त लावली नाही. पण तिचं वागणं बोलणंच असं होतं की हळूहळू आम्हीही तिचं अनुकरण करु लागलो. तिचा माझ्यावर इतका प्रभाव होता की, आज माझ्यामध्ये असलेल्या बऱ्याच चांगल्या सवयी या फक्त तिच्यामुळेच आहेत, असं मी म्हणेनं. (अर्थात, मला नीट ओळखणाऱ्यांना माझ्यातले वाईट गुण चांगले माहिती आहेत. त्याचा आणि माझ्या आईचा काहीही संबंध नाही, हे सांगायला नकोच.) अगदी माझ्या लहानपणापासून ते तिच्या अखेरच्या दिवसांपर्यंत. देवावर अगाध श्रद्धा, शिक्षणाचं महत्त्व, साधी राहणी, अत्यंत कष्टाळू आणि जिद्दी, तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातली सर्वोत्तम "कुक', अशा अनेक गोष्टी तिचं वर्णन करताना लिहिता येतील.

शिक्षणाची गोडी...

लहानपणापासनं तिनं मला अभ्यासाची गोडी लावली. ती फार शिकलेली होती असं नाही. इंटरनंतर एखाद दुसरं वर्ष तिनं केलं असेल. पण तरीही तिला शिक्षणाचं महत्व पटलेलं होतं. "आपल्याकडे खूप पैसे नाहीत. बापजाद्यांची इस्टेट नाही. त्यामुळं चांगलं शिकलं तरच आपलं आयुष्य सुखात जाईल. तुला शिकायचं असेल तर वेळप्रसंगी मी माझे दागिने मोडेन पण तू खूप शिक,' हा संवाद तिच्या तोंडी कायम असायचा. सुरवातीला मला शिकण्याचा खूप कंटाळा होता. त्यामुळं माझं कसं होणार याची चिंता तिला कायम सतावत असायची. पण नंतर मात्र मला हळूहळू शिक्षणाचं महत्व पटू लागलं. आजच्या घडीला माझ्याकडे ज्या तीन-चार पदव्या आहेत, त्याचं श्रेयं आई-बाबांनाच जातं. आईचं हस्ताक्षर खूप सुंदर होतं. माझं अक्षर चांगलं असावं, यासाठी तिचा खूप आग्रह होता. या गोष्टीसाठी मी तिचा अनेकदा मार खाल्ल्याचं मला अजूनही आठवतंय.

हरामाचा पैसा नको...

पैसा आयुष्यात महत्वाचा आहे. पण पैसा म्हणजेच सर्वस्व नाही, हे मला तिच्याकडूनंच समजलं. वडील "महिंद्र ऍण्ड महिंद्र'मध्ये होते. पण पगार बेताचाच होता. पण अत्यंत परिस्थितीतही आईनं संसार अगदी नेटानं सुरु ठेवला. वडिलांच्या कंपनीमध्ये दोनवेळा "लॉक आऊट' जाहीर करण्यात आला होता. त्यामुळं तीन-चार महिने कंपनीतनं पगार येणार नव्हता. पण अशा परिस्थिततही पहिल्या वेळी शिवणकाम करुन आणि दुसऱ्या वेळी पाळणाघर सुरु करुन तिनं बाबांना आर्थिक हातभार लावला.
कुरियरसाठी लागणाऱ्या कापडी पिशव्या किंवा कव्हर्स ती शिवायची. एका कव्हरचे आकारानुसार चार आणे ते बारा आणे मिळायचे. दिवसभरात असे वीस-पंचवीस रुपये ती मिळवायची. पाळणाघर चालवायची तेव्हा तीन-चार मुलांचे पंधराशे ते दोन हजार रुपये दरमहिना ती कमवत असे. पण पैशाच्या चणचणीची धग आमच्यापर्यंत कधीच पोचली नाही. वास्तविक पाहता आईचे वडिल म्हणजे माझे दादा आजोबा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यामुळं तिच्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती, असं म्हटलं तरी चालेल. पण सासरी तशी परिस्थिती नव्हती. हल्ली ज्याला "ऍडजस्टमेंट' म्हणतात, ती आईंनं खूप केली. अर्थातच, कोणतीही कुरबूर न करता.

तिचं आणखी एक म्हणणं असायचं. "हरामाचा पैसा अजिबात पचत नाही. त्यामुळं फुकटचा एक रुपयाही आपल्याला नको.' एखाद्या दुकानदारानं गडबडीत जर सुटे परत देताना पैसे जास्त दिले तर प्रामाणिकपणे ती पैसे परत करायची. पाचवी-सहावीत असताना आम्ही एकदा आमच्या इथल्या काका हलवाईकडे गेलो होतो. आम्ही पाचशे रुपये दिले आहेत असं समजून त्यानं सुटे पैसे परत केले. आईनं मात्र, शंभर रुपयेच दिले होते. त्यामुळं तिनं उरलेले पैसे परत केले. दुकानदारालाही आईचं आश्‍चर्य वाटलं. पण आईचं उत्तर ठरलेलं होतं. हरामाचा पैसा पचत नाही. अशा छोट्या मोठ्या प्रसंगांमधून माझ्यावर झालेले संस्कार आयुष्यभरासाठी पुरणारे आहेत. कोणाचा एक रुपया तिनं घेतला नाही की बुडवला नाही.

"आपल्याला राजाचा राजवाडा नको. आपण खाऊन पिऊन सुखी आहोत आणि तेच बरं आहे.' सगळ्यांना येतात तशा अनेक अडचणी आल्या, अनेक संकटं आली. त्यातली काही आर्थिकही होती. पण दोनवेळच्या जेवणाची ददात आम्हाला कधीच जाणवली नाही. तसंच आईचं आदरातिथ्य इतकं होतं की, आमच्याकडे आलेला कोणीच न खाता-पिता गेला नाही. इतकंच काय तर अनेक छोटे प्राणी-पक्षीही आमच्याकडे रोज मेजवानी झोडायचे. रोज भाताच्या कुकरचं प्रेशर पडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा ती कावळे आणि चिमण्यांना तो भात वाढायची. कावळे-चिमण्या देखील स्वयंपाकघराच्या खिडकीवर बसून त्याची वाट पाहायचे. हल्ली हल्ली तर कबुतरं, साळुंकी आणि छोटीशी खारुताई देखील नित्यनियमाने येतात. आई धार्मिक होती. प्रथा, परंपरा आणि रुढी पाळण्याची तिला जबर हौस. पण स्वयंपाक झाल्यानंतर नेवैद्य दाखवण्यापूर्वी ती पक्ष्यांसाठी भात वाढायची. तिची एकूणच धार्मिक वृत्ती पाहता हे मात्र, थोडंसं अजब होतं.

धार्मिक आणि देवभोळी

आई खूप धार्मिक आणि परंपरावादी होती. पण त्याचा जाच आम्हाला कधीच झाला नाही. उलट तिच्यामुळं अनेक स्तोत्र, मंत्र आणि आरत्या यांचं आमचं पाठांतर झालं. जोपर्यंत आई धडधाकट होती तोपर्यंत ती श्रावणी आणि कार्तिकी सोमवारचा उपास धरायची. सक्काळी सक्काळी नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिरातल्या शंकराच्या पूजेला जायची. अनवाणी जायची. हरितालिकेचं आणि वटपौर्णिमेचं व्रत करायची, चैत्रगौर बसवायची, संक्रांत आणि चैत्राचं हळदी-कुंकू साजरी करायची. हल्ली क्वचितच ऐकू येणारं अविधवा नवमी तसंच धुरित्री पाडवा हे व्रतही तिनं शेवटच्या वर्षापर्यंत केलं.

गणपतीत मानाचे गणपती आणि नवरात्रीमध्ये महत्वाच्या देवींचं दर्शन अगदी रांगेत उभं राहून घेणं नित्याचंच! नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी एखाद्या देवीची साडी-चोळीनं ओटी भरणं आलंच. गणपती विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पहिल्या पाच आणि रात्री दगडूशेठ-मंडईच्या गणपतींचं दर्शन कधीच चुकलं नाही. चालती फिरती असताना प्रत्यक्ष आणि अर्धांगवायू झाल्यानंतर तिनं अगदी गेल्या वर्षीपर्यंत टीव्हीवर बाप्पांचं दर्शन घेतलं. अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातली देवीची साडेतीन पिठं, पंढरपूर, वाडी, अक्कलकोट, गाणगापूर आणि इतर बऱ्याच ठिकाणी तिनं धार्मिक पर्यटन केलं. इतकं करुनही काही वेळा अपयश आलंच तरी त्याचं खापर तिनं कधीच देवावर फोडलं नाही. कितीही बिकट परिस्थिती आली तरी तिचा देवावरचा विश्‍वास तसूभरही ढळला नाही. तितक्‍याच मनोभावे ती देवाची पूजा करतच राहिली.

द बेस्ट "कुक'

आईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचं सुगरण असणं. गोडाचा शिरा, आळूची भाजी, पोहे, छोट्या आणि बरोब्बर गोल पोळ्या, पुरणाची दिंडं, सांबार, पावभाजी, रव्या बेसनाचे लाडू, ओल्या नारळ्याच्या वड्या आणि करंज्या, ताक घालून पालकाची भाजी, थालिपीठ आणि असे असंख्य पदार्थ खावे तर फक्त तिच्या हातचे. आईच्या हाताला अशी काही चव होती की, विचारता सोय नाही. लहानपणापासून मी तिच्या हातचं खात असल्यामुळं मला असं वाटत असेलही कदाचित. पण काही पदार्थ करावे तर तिनंच.

नागपंचमीला पुरणाची दिंडं, दिव्याच्या अमावास्येला गोड दिवे, कोजागिरीला मसाला दूध, दिवाळीत ओल्या नारळाच्या करंज्या, पहिला पाऊस पडला की कांदा भजी याची इतकी सवय झाली होती की बस्स! दणगेलं, गवार ढोकळी, डाळ ढोकळी, सुरळीच्या वड्या, ढोकळा आणि पराठे हे खास गुजराती पदार्थही ती उत्तम करायची. तिचा जन्म आणि जवळपास निम्मं आयुष्य बडोद्यात गेलं होतं. त्यामुळं ओघानं हे आलंच. अर्थात, अर्धांगवायू झालापास्नं हे सारंच संपलं. ती एक नंबरची सुगरण होती. त्यामुळंच कदाचित मला चविष्ट आणि निरनिराळे पदार्थ खाण्याचं व्यसन लागलं असावं. माझी आई पण माझ्यासारखीच चवीनं खाणारी होती. पण साधं अंडही तिनं कधी खाल्लं नाही. आम्ही जर घरी ऑम्लेट केलं तरी ती भांडी आम्हालाच घासावी लागायची. तिनं त्यालाही हात लावला नाही.

जीव भांड्यात...

आईला स्वतःला आवड होती ती वेगवेगळ्या प्रकारची भांडी जमवायची. एकवेळ ती नवी साडी घ्यायची नाही. एखादा दागिना कमी घेईल. पण बाजारातलं नवं भांडं ती जरुर घ्यायची. तांबं, पितळ, स्टील, ग्लास आणि अगदी ऍल्युमिनियमपासून बनवलेली भांडी तिनं जमवली. वेगवेगळ्या प्रकारची ताटं, डिशेस, वाट्या-भांडी, पराती, पातेली, ग्लासेस, डब्बे इथपासून ते अगदी छोटे-मोठे चमचे व लहान डब्यादेखील. आज जर आमच्या घरातली सगळी भांडी एकत्र केली तर कदाचित एखाद-दुसरी खोली सहज भरुन जाईल. आतापर्यंत आमच्या घरी जी काही कार्य झाली त्यावेळी आम्हाला कधीही बाहेरुन एक भांड भाड्यानं आणावं लागलं नाही.

तिचा जीव भांड्यांमध्ये रमत होता, असं म्हटलं तरी चालेल. पण नुसती भांडी जमवून ती थांबली नाही. दोन-तीन महिन्यांनी किंवा दिवाळीसारखं निमित्त साधून त्यातली बहुतांश भांडी ती स्वतः घासायची आणि पुसायची. हा नियम अगदी अपवादानंच मोडला गेला. एखादं भांडं पडलं किंवा नीट घासलं गेलं नाही तरी तिचा जीव वरखाली व्हायचा. भांडी ठेवायची तिची स्वतःची एक पद्धत होती. त्यामुळं लहानपणी चोरून काही खाल्लं तर ते तिला अगदी सहजपणे कळायचं. राहून राहून एक आश्‍चर्य वाटतं की, त्यावेळी बाबांचा पगार फारसा नसतानाही आईनं इतकी भांडी जमविलीच कशी?

आईनं काही वर्षे पाळणाघरही चालवलं. अर्थात, तेव्हा गरज म्हणून तिनं हा व्यवसाय सुरु केला. पण आवाक्‍यपेक्षा अधिक मुलं तिनं कधीच सांभाळली नाही. एकावेळी दोन किंवा तीन. त्यापैकी सौरभ कट्टी आणि मीरा देशपांडे हे दोघे तर आमच्याकडे तीन महिन्यांचे असल्यापासून होते. आईनं त्यांचा सांभाळ स्वतःच्या मुलांपेक्षा म्हणजेच आमच्यापेक्षा अधिक काळजीपूर्वक केला असावा. सकाळी आठ-नऊ वाजल्यापास्नं ते संध्याकाळी सात- आठ वाजेपर्यंत ते आमच्या घरीच असायचे. आईचा त्यांना इतका लळा लागला की, आमची आई हीच त्यांची खरी आई आहे, असं त्यांना वाटायचं. त्यामुळंच ते तिला मिनाक्षी आई म्हणायचे. मिनाक्षी आईनं त्या दोघा-तिघांचे केलेले लाड पाहिल्यानंतर खरं तर आम्हाला त्यांचा खूप हेवा वाटायचा. जस्ट जोकिंग. पण आईचा त्यांच्यावर खूप जीव होता. आम्हाला त्यांचा तीन-चार वर्षांपर्यंत हे दोघेही आमच्याकडे असायचे. नंतर दोघेही आमच्या घरापासून दूर गेले. पण आजपर्यंत त्यांचे आणि आमच्या घराचे बंध जुळलेले आहेत.

तल्लख बुद्धी...

तिची बुद्धी आणि स्मरणशक्ती अगदी तल्लख होती. आईचे भाऊ-बहिण, भाचे-पुतणे आणि इतर अनेकांचे वाढदिवस तिचे तोंडपाठ होते. प्रत्येकाच्या वाढदिवशी ती आवर्जून त्यांना फोन करायची. आणखी एक म्हणजे पेपरमध्ये वाचलेली प्रत्येक गोष्ट आणि बातमी तिच्या लक्षात असायची. पूर्वी कधीतरी महाराष्ट्र केसरी जिंकणारा सईद चाऊस असो किंवा आजचा सोन्याचा भाव काय आहे, या गोष्टी तिच्या अगदी तोंडपाठ असायच्या. अखेरच्या दिवसांमध्ये तिला टीव्ही पाहण्यासाठी बाहेरच्या खोलीत येणं जमत नसे. त्यावेळी टीव्हीवर ती तिच्या आवडीच्या मालिका फक्त ऐकायची. पण आवाजावरुन कोण कलाकार आता बोलतो आहे, हे तिला समजायचं. अखेरच्या दिवसांमध्ये शरीरानं तिला साथ दिली नसली तरी तिची बुद्धी मात्र कायमच तिच्या बाजूनं होती (शेवटचे सहा-सात दिवस सोडले तर) ही खूपच दिलासादायक गोष्ट होती.

आयुष्यभरात माझ्या आई-बाबांनी एकवेळ इस्टेट कमी कमाविली असेल. पण त्यांनी माणसं खूप जोडली. नातेवाईक असो, मित्र-मैत्रिणी असो किंवा शेजारीपाजारी. मदतीच्या प्रसंगी धावून जाणं हे दोघांच्याही रक्तात भिनलेलं. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतरचं सात-आठ वर्षांचं आयुष्य तिनं अगदी हसत हसत काढलं. पथ्य पाळली. पण पथ्य पाळतानाच ती अगदी मनसोक्त जगली. ती आयुष्याला कंटाळलीय, असं कधीही वाटलं नाही. "तू देवाचं इतकं करतेस. तरी मग तुला इतका त्रास का होतोय. देव बिव काही नाही...' असं तिला चिडवण्यासाठी मी म्हणायचो. त्यावेळी ती सांगायची की, "देवाचं करते म्हणूनच इतका कमी त्रास होतोय. देवधर्म केला नसता तर आणखी झाला असता.' हे पॉझिटिव्ह थिंकिंग थक्क करणारं होतं, ते देखील सगळं शरीर थकलं असताना.

ग्रेट फादर!
दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अखेरच्या काही वर्षांत बाबांनी आईची केलेली सेवा. एखाद्या पुरुषानं आपल्या पत्नीची इतकी सेवा केल्याचं मी तरी पाहिलेलं नाही. असणार यात शंका नाही. मी तर असं म्हणेन की शेवटची काही वर्ष आई जगली ती बाबांमुळेच. सकाळी उठल्यावर तिचं तोंड धुणं, संडास आणि बाथरुमला नेणं, आंघोळ घालणं, औषधं-गोळ्या यांचे डोस सांभाळणं आणि बरच काही. ते देखील कोणतीही चिडचिड न करता. अखेरच्या दिवसांमध्ये तर एखाद्या नर्सला लाजवेल इतकी काळजी ते आईची घ्यायचे. "हॅट्‌स ऑफ टू माय फादर टू!'
"आई-वडिलांची सेवा कर. आयुष्यात तुला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही,' हे वाक्‍य देखील तिच्या तोंडी कायम असायचं. अर्थात, तिनं तिच्या आईची खूप सेवा केली होती, हे आम्हाला माहिती होतं. माझ्या आईची तिच्या आईवर खूप श्रद्धा होती. खूप जीव होता. त्यामुळंच कदाचित आमची आजी ज्या दिवशी गेली बरोब्बर त्याच दिवशी माझ्या आईचं देखील निधन झालं. आठ मे रोजी. इतरांसाठी हा निव्वळ योगायोग असेलही किमान मला तरी त्याकडे योगायोग म्हणून पाहता येणार नाही. कारण आठ मे पूर्वी चार-पाच दिवस आई बऱ्यापैकी सिरीयस होती. तिला शुद्ध नव्हती, असं म्हटलं तरी चालेल. सात मे रोजी पण ती जाते की राहते अशी परिस्थिती होती. पण अखेर तिनं सात तारीख मागे टाकली आणि आठ मे हाच तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला. "मदर्स डे'च्या बरोब्बर दोन दिवस आधी.

आज आईला जाऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला. पण आई गेली यावर अजूनही विश्‍वास नाही. मला अजूनही असं वाटतं की, शुक्रवारी रात्री बेलापूरहून घरी गेल्यानंतर आई माझी वाटत पाहत असेल. आत गेल्यावर आई विचारेल, ""जेवलास का?, काय जेवलास?'' किंवा घरातून निघताना सांगेल, ""नीट जा आणि पोचल्यावर फोन कर. रोज वेळेवर जेवत जा आणि नीट काम कर.'' टीव्हीवर जर एखाद्या बातमीला माझा व्हॉईस ओव्हर असेल किंवा माझं नाव असेल तर फोन करुन मला सांगेल, ""आशिष, आम्ही ऐकली आज तुझी बातमी.'' किंवा विचारेल, ""अरे, आज तू ऑफिसला नाही गेलास का? तुझा आवाज नव्हता?'' पेपरमध्ये काम करत असेन तर विचारेल की, आज तुझी काही बातमी किंवा लेख आहे का?

आपल्या सर्वात जवळचं माणूस गेल्यानंतर त्याची उणीव आपल्याला किता भासू शकते, हे माझ्या कल्पनेच्याही पलिकडचे होते. पण गदिमांनी गीत रामायणामध्ये लिहिलेलं अगदी खरं आहे.

"दोन ओंडक्‍यांची होते सागरात भेट,
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ'

आई गेली तेव्हा सध्या "एनडीटीव्ही'त काम करणाऱ्या प्रसाद काथे या एका जुन्या सहकाऱ्याचा एसएमएस आला, ""आई आपल्या रक्तातच असते.'' थोडक्‍यात म्हणजे आई कायम आपल्या बरोबर असते. कधीही परत न येण्यासाठी गेली असली तरी! ही गोष्टही तितकीच खरी आहे.

15 comments:

भानस said...

'आई आपल्या रक्तातच असते ’ हेच सत्य.
आई गेलीये खरी पण आता तुमच्यात जास्त उरलीये.जास्त काही लिहीत नाही, उगाच शब्द पोकळ भासतील.

Unknown said...

ekda ek mulga foothball khelay la jat asato!ani nehami khup kharab khelaycha!ek divas tyanchya club chi final match asate!ha mulga coach la mhanto me khelto!coach sangto tu kadhich neet khelat nahis!pan aaj aplya kade players kami ahet so tu khel pan kharab khelalas tar bagh!ha mulga tya divshi khup jabardasta khelto!6-7 goals ekta karto ani match jinkun deto!coach mhanto'are kai aaj itka bhari khelalas?baki veli kai zala hota tula?mulga mhanala'mala foot ball nahi avadat me mazya baban sathi yaycho!te blind hote ani tyanchi ashi ichha hoti ki me foot ball khelava!te mala gheun yayche pan tyancha sathi me yaycho pan tyana disat naslyamule me kasahi khelaycho!pan kal maze baba expire zale!ani mala mahit ahe ki te ata baghu shaktat ani te mala pahat ahet!all above from the sky!so i am to play the best of the games now onwards!
even I lost my Father in2006.but still he is with me watching me all above from the sky!that how is his son doing after his absence.so they are with us always!

अमोल परांजपे said...

तुझ्या आईला मी कधीच भेटू शकलो नाही... ती आजारी असताना खरंतर पुण्यात यायचं खूप डोक्यात होतं. पण ते डोक्यातच राहिलं... कृतीत उतरलंच नाही, इतर अनेक गोष्टींसारखं. पण हा लेख वाचून आई गेल्यावर तिला भेटून आल्यासारखं वाटलं. लेख स्वान्त सुखाय लिहिल्यानं मोठा झाल्याचं तू सुरूवातीलाच लिहिलंयस, ते केवळ विनयापोटी... कारण लेख वाचताना आजिबात वाटत नाही की मोठा झालाय म्हणून... खरंतर तू आणखी लिहावंस, असं वाटू लागलंय आता.

NiKs said...

Kharach I hav no words to post...

Anonymous said...

Phar chan zala aahe tumacha Aai warcha lekh! Aaj wachla!
Mi attaparyant phakt Khanyawarche lekh wachle hot tumche,Ani mala te phar awadale hoTE...Pan ha lekh wachlyawar tumchya Jibhela itaki chaan chaw kuni lawali te samajale..Shewati ghari je sanskar hotat tyachi chaap aapalya ayushyat pratyek thikani padat jaate!
Abhinandan!
Lekh ajibaat lambalelela nahi..Ani tumhi Aaai war pustak lihile tar me nakkich wachen!

Dr. Amit Bidwe, Daund

Anonymous said...

kharach aase wachale ki dolyat pani yet.

ऋयाम said...

far chaan lihila aahe.

kharach aahe ki: -
"shewati aai ti aaich..."

athshree said...

Ashish,
mi Shripad Athalye..
athavale ka....??? nav olkhiche vatatay? punyat hoto...E-tv ....sadhya Ratnagirit ahe ...Tarun Bharat....ok ...this we will talk later...
Mi tula atta he lihitoy mhanaje maze vadil gele 2007 may madhye.....vay 82 hote....mi gharat lahan padlyamule mala je kahi karayche hote tyanchyasathi te karata ale nhai....maza sttle honyacha sangharshach khup zala tyamulehi kahi goshti jamalya nahit...mi te gelyapasun aswastha ahe...pan hi aswsthata baher padat nahiye...pan mala tuzya blog varil aaivarchya lekhamule navi kalpana milali...mi lihin kadhitari.....
aai baddalcha lekh motha zalay mhantos...pan are aaibaddal sangave tevadhe thodech na re..
athavani path sodat nahit re ashish....path sodat nahit...!
...............

nakshatranchya vatevarati
gele nighoni kon....
mi asach bhambavuni
shodhato kunachi khun...

saryach vata lamb
kiti kinari jamale pakshi....
ubhya janmi mazya neto
vahuni athavacnche pakshi....

kuthe khol nadicha doh
valayat valaye kashi umatati...
varyasave sangava deto
mani kase usase datati...

...
atat tula lihita lihita suchali...finishing legel..pan ata lihivat nahi...thambato....!
bhetu...!

Anonymous said...

no words re bhaava, pann aatya cha majhya jivanaat ek mottha ani mahatvaacha vaataa aahe, (mhanun bhaag aahe lihine... kunala dakhavinya karita nahi, kunala sangnya karita nahi)... toh vaataa mhanje maaze naav aani naav hi identity "SATYAJIT" ani hey tiney mala kalat nastaana, majhya kaanaat saangitle, maajhe baarasey kele... aani mi Prasad asunahi Prasad SATYAJIT muddamun laavato. Kaaran fakt ek, meena aatya prati che prem.

prashant.anaspure said...

आईच्या आठवणींचा खजिनाच...
तुमच्या घरी आईला भेटलो तेव्हा भरपूर गप्पा मारल्या. पहिल्यांदा भेटतोय असं वाटलंच नाही. एक सच्चा लेख लिहिलात, खुप बरं वाटलं. एकदम चित्र डोळ्यासमोर आलं.

Anonymous said...

खरच खूप भाग्यवान आहेस तु, आणि असेच बरेच जण.
कदाचित मीच माझ्या आईला अलोख्ला नसेल. पण असे सगळीकडे नसत रे. आणि हे सुधा लिहिताना माझ्या मात्र डोळ्यात अश्रूच आहेत. मला पण वाटत आहे कि असे काही तरी मझ्या कडे असते तर मी खूप खुश झालो असतो . पण उगाच शिळ्या कढीला उत कशाला आणायचं......
फक्त तु खूपच भाग्यवान आहेस मित्र.....आणि जगात असेच सगळे राहोत....ईश्वर चरणी प्रार्थना...दुसरं काय ...

Anonymous said...

माझा आई वर राग नाही आहे....एका हळव्या मुलाची हि व्यथा आहे .... दुसर्यांकडे बघून मी फार व्यथित होतो, त्यांचा हेवा वाटतो ..... त्यांचा द्वेष नाही वाटत पण स्वतःची कीव येते..... पुन्हा एकदा सगळा विसरून माझ्या रोजच्या कामात लक्ष्य घालतो, लोक मागची पाटी पुसतात मी फक्त फोडून टाकतो, उगाच एखादा तुकडा कधी कधी तुझ्या लेखा सारखा हाताला लागतो .... हातात घेतो तर हाताला जखम होते....रक्त (कुठल ...तु लेखात लिहिलेले ) वाहू लागते....पुन्हा तो सुधा तुकडा फेकून देतो.....

कदाचित ह्या सगलांमुळे मी कधीच आई वेडा नव्हतो...कदाचित तुमुलेच आई विना जीना सिख लिया....जन्म मिळाला पण प्रेम ....अजून वंचित आहे....कदाचित आता तर मला त्याची आवशकता नाही .....अगदी ठाम पणे.....कदाचित मी वेडा वाटेन...दगड वाटेन....होय मी मात्र असाच आहे.

kiransays said...

आशिष, काय लिहू रे? हे सगळे मी अनुभवले आहे.

Anonymous said...

khup manapasun ani sahaj likhan.

Unmesh Gujarathi said...

डोळ्यात पाणी आणलं राव…
- उन्मेष गुजराथी