Monday, January 04, 2010

इडियटगिरीपेक्षा गांधीगिरीच श्रेष्ठ!



ऑल इट नॉट दॅट वेल...

"मुन्नाभाई एमबीबीएस" आणि "लगे रहो मुन्नाभाई...' या गाजलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शक राजकुमार हिरानी याचा थ्री इडियटस हा चित्रपट कसा आहे, हे पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. पण थ्री इडियटस हा चित्रपट त्या दोन्ही चित्रपटांची उंची गाठू शकलेला नाही, असं मला प्रामाणिकपणे इथं कबूल करावसं वाटतं. माझ्या या मताशी फार कोणी सहमत होणार नाही. पण तरीही मला ते मत मांडल्याशिवाय रहावत नाही.

आपलं शिक्षण हे सर्वोत्तम विद्यार्थी कोण आहे, हे शोधण्यासाठी उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काय सर्वोत्तम आहे, हे शोधण्यासाठी आपली शिक्षण पद्धती उपयुक्त नाही. त्यामुळंच आपली महाविद्यालयं ही एकाच साच्यातून एकाच पद्धतीचे विद्यार्थी तयार करणारा कारखाना आहे, अशी टीका होते. ती खरीही आहे. त्यावरच थ्री इडिटस बेतलेला आहे. नेहमीप्रमाणेच आमीर खान आणि माधवन यांच्या भूमिका झक्कास आहेत. शर्मन जोशी देखील कमी पडल्याचं जाणवत नाही. करीना कपूरही छोट्या रोलमध्ये लक्षात राहते.

सर्वप्रथम म्हणजे थ्री इडियटसचा विषय एकदम भन्नाट आहे. परंपरागत शिक्षणपद्धती किती बोगस आणि तकलादू आहे, हे त्यात दाखवण्यात आलंय. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त पहिला येणाऱ्याला महत्त्व आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि त्यानंतरच्या लोकांना इथं फारसं महत्त्व नाही. त्यामुळं जो तो पहिल्या क्रमांकासाठी धावतोय. आपण किती मनापासून शिकतो, त्याचा आपल्याला आयुष्यात किती उपयोग होतो, दैनंदिन जीवनात आपल्याला शिक्षणाचा किती उपयोग होतो, याचा काहीही विचार न करता आपण पाठांतर करतो आणि परीक्षेमध्ये सगळं बाहेर काढतो. अशा या शिक्षण पद्धतीवर थ्री इडियटसनं प्रकाशझोत टाकलाय.

अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तीन (किंवा चार) तरुणांची ही कथा आहे. इंजिनिअर किंवा डॉक्टर व्यतिरिक्त माणसानं काही होऊच नये की काय, अशा पद्धतीनं पालक विचार करतात आणि त्या ओझ्याखाली विद्यार्थी-विद्यार्थिनी पार दबून जातात. मग कोणी परीक्षेच्या टेन्शनमुळं आत्महत्या करतं तर कोणी वाईल्ड फोटोग्राफीचा छंद सोडून इंजिनिअर होण्यासाठी रॅट रेसमध्ये उतरतो. थोडक्यात म्हणजे जो तो स्वतःच्या आवडी निवडी सोडून पारंपरिक शिक्षणाच्या मागं धावतोय. अशा या जळजळीत विषयावर राजकुमार हिरानी स्टाईलनं कोरडे ओढण्यात आले आहेत.

कॉलेजमधलं रॅगिंग, विद्यार्थ्यांच्या गमती-जमती, आमीर आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या करामती अशा अनेक गोष्टींमुळे चित्रपटाला मस्त तडका मिळालाय. कॉलेजच्या गॅदरिंगच्या वेळी उडालेली धम्माल किंवा जावेद जाफरीच्या घरी माधवन आणि शर्मन जोशी यांनी वठवलेला प्रसंग पोट धरुन लोळायला लावणारे आहेत. इतरही काही प्रसंगांमधून पोट धरुन हसायला होतं. पण चित्रपट म्हणून जी सलगता हवी किंवा लिंक रहायला हवी, ती थोडीशी इथं जाणवत नाही. वेगवेगळे प्रसंग फक्त एकत्र केल्यासारखे वाटतात. काही वेळा तर अतर्क्य आणि अशक्यप्राय गोष्टी दाखवून चित्रपटाला थोडंसं वास्तवतेपासून दूर नेल्यासारखं वाटतं.

आमीर खाननं वेगवेगळ्या शहरांमध्ये वेषांतर करुन जाऊन चित्रपटाची पब्लिसिटी केली होती. त्याचा प्रसिद्धी माध्यमांमधून चांगलाच गवगवा झाला होता. चेतन भगत यांच्या फाईव्ह पॉईंट समवन या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. मात्र, चित्रपटाच्या श्रेय नामावलीत भगत यांचा अनुल्लेख केल्यामुळे भगत चांगलेच भडकले आहेत. त्यांचा आणि आमीर खान यांचा वाद सध्या चांगलाच रंगलाय. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट तुफान चालतोय. वेगळा विषय, वेगळी मांडणी आणि आमीरच ग्लॅमर यामुळं चित्रपटाला चांगला गल्ला तयार करताय आलाय.

इतकं सगळं असूनही मनापासनं सांगायचं तर मला हा चित्रपट तितकासा आवडलेला नाही. दोन मुन्नाभाईंच्या तुलनेत थ्री इडियटस फिका पडतो आणि तुफान मनोरंजनाची अपेक्षा ठेवली तर अपेक्षाभंग झाल्याशिवाय राहत नाही.इतकं सगळं असलं तरी डोन्ट वरी एकदा बघायला नक्कीच हरकत नाही...

5 comments:

विनायक said...

I think,
Munnabahi aani 3 idiots yanchi tualana karanech chukichi aahe
donhi chitrapt kadhayacha vichar ,hetu vegala aahe
aani I think ki donhitun aapapale message yogay tarehen pohocahle aahet
( 3 idiots madhun jo massage pohochala to chetan bhagat la pohochavat aala nahi ase majhe spasht mat aahe)
aani 3 idiotschikahani realistik aahe, kvachit zombanari, te kalpnaaranjan nahi he ithe mahatvache tharate
mi AK cha fan nahi
pan mi nakki mhanen
hats off
AK &Raju
thanks
vinayak( baravit shukanara aani swatra;Chya icchene IIT JEE chi tayari karat asanara)

Vijay Deshmukh said...

मला चित्रपट सुसंगत वाटला नाही, मात्र विनायक यांचेशी मी सहमत आहे की तुलना चुकीची आहे. चित्रपटात अनेक गोष्टी चुकीच्या (पद्धतीने) दाखवल्या आहेत. त्या टाळता आल्या असत्या. यापेक्षा मला रॉकेटसिंग अधिक चांगला, स्पष्ट आणि प्रामणिक प्रयत्न वाटला.
१० वर्ष आमिर कुठे आहे हे त्याच्या मित्रांना माहीती नव्हतं ? आणि मिळाला पत्ता तो कॉलेज्ला नव्हता का ? करिना १० वर्ष थांबली आणि नंतर त्याच मुलाशी लग्न करायला तयार झाली ? डिलिव्हरीशी संबंधीत चित्रण अतिच वाटले... असो... चित्रपट बरा होता... मात्र आमिरच्या मानाने त्याचा दर्जा घसरत जातोय गजनी पासुन....

Anonymous said...

Check the sucide scene and its impact too...

Niranjan Phadke

Anonymous said...

Sir te khare aahe ki entainment chya drushtine tumche mhanae barobar aahe pan its a massage to our politicians.

Bhaskar Tare

Anonymous said...

Malahi agadi asach vatala...Munnabhai was much better than three idiots.