Thursday, April 07, 2011

प्रचाराच्या जुन्या आठवणींना उजाळा

पुद्दुचेरीत बाळासाहेबांचे फॅन्स

तमिळनाडू डायरी

तमिळनाडूमध्ये गेल्या 44 वर्षांपासून काँग्रेस स्वबळावर सत्तेवर आलेली नसली तरी तमिळनाडूच्या पोटातच असलेल्या पुदुच्चेरीमधली परिस्थिती मात्र, खूपच वेगळी आहे. काँग्रेसशिवाय सरकार स्थापन करणे हे द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यापैकी कोणत्याही पक्षाला पुदुच्चेरीमध्ये शक्य होत नाही. काँग्रेसकडून दोनदा मुख्यमंत्रीपद भूषविलेले एन. रंगास्वामी यांनी दिल्लीतील दरबारींच्या राजकारणाला कंटाळून एन आर काँग्रेस नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला असून ते जयललिता यांच्याशी युती करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पुद्दुचेरीमध्ये विधानसभेच्या अवघ्या तीस जागा असून प्रत्येक मतदारसंघात अवघे पाच ते दहा हजार मतदान आहे.




पुद्दुचेरीमध्ये प्रवेश करताच निवडणुकीच्या लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या. म्हणजे लहानपणीचं वातावरण डोळ्यासमोर उभं राहिलं. ताई माई आक्का विचार करा पक्का आणि अमुक तमुकवर मारा शिक्का... अशा घोषणा देत फिरणाऱ्या रिक्षा, भडक रंगांनी रंगविलेल्या भिंती आणि जागोजागी लागलेली पोस्टर्स तसेच स्टिकर्स. कालांतराने निवडणूक आयोगाच्या कडक निर्बंधांमुळे हे चित्र नष्ट झाले आणि निवडणुकीतील गंमतच हरविली. पण पुद्दुचेरीमध्ये मात्र, कर्कश्श तमिळ गाण्यांच्या सहाय्याने प्रचार करणाऱ्या रिक्षा जागोजागी दिसतात. पुद्दुचेरीमध्ये येताना आणि पुद्दुचेरीहून तंजावूरकडे जाताना छोट्या छोट्या गावांमध्ये रंगवलेल्या भिंतीही नजरेस पडतात. कुठे करुणानिधींचा उगवता सूर्य दिसतो. तर कुठे अम्मांच्या पक्षाची दोन पाने दिसतात. मध्ये कधीतरी विजयकांत यांच्या चित्रपटांतील पोस्टर्सही लागलेली दिसतात. त्यामुळे म्हटलं चेन्नईमध्ये न दिसलेली गोष्ट पुद्दुचेरीमध्ये दिसल्यामुळे पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या.

पुद्दुचेरीचं महत्वाचं आकर्षण म्हणजे इथला अरविंदाश्रम. योगी अरविंद यांची समाधी. तिथं जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन तर घेतलंच पण मला ओढ लागली होती ती पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना भेटण्याची. भलताच लोकप्रिय माणूस. चौकापासून ते चौकीपर्यंत आणि बारशापासून ते मयतापर्यंत प्रत्येक ठिकाणी हजर राहणारे तसेच लोकांच्या अडल्या नडल्याला धावून जाणारे पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री. मुख्यमंत्री असूनही मोटरसायकल किंवा स्कूटरवरून फिरणारे, सहजपणे चौकात गप्पा झोडणारे किंवा टपरीवर कोणतीही लाज न बाळगता चहा पिणारे एन. रंगास्वामी. वेटरपासून ते रिक्षा ड्रायव्हरपर्यंत कोणालाही विचारा त्याच्याकडे रंगास्वामी यांचा मोबाईल नंबर असणारच. अशा रंगास्वामींना भेटण्याची खूप इच्छा होती. फोनवरुन त्यांच्याशी बराच वेळ बोलणंही झालं. पण ते प्रचारात व्यस्त असल्यामुळे प्रत्यक्ष भेट मात्र झाली नाही. पण निवडणुका झाल्यानंतर पुद्दुचेरीला पुन्हा एकदा निवांत या, असं निमंत्रण द्यायला मात्र, ते विसरले नाहीत.

बाळासाहेबांचे फॅन्स



मी महाराष्ट्रातून आलोय, म्हटल्यानंतर अनेकांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्यातून का, अशीच विचारणा केली. चेन्नईमध्ये वकिली करणारे एल. गणपती हे त्यापैकीच एक. गणपती हे बाळासाहेबांचे भलतेच फॅन. काँग्रेसच्या नेत्यांनी एन. रंगास्वामी यांना कसा त्रास दिला आणि त्यामुळे त्यांना काँग्रेस कशी सोडावी लागली याबद्दल गणपती हे भरभरून बोलत होते. थोड्या वेळाने गाडी पुन्हा बाळासाहेबांकडे वळली. मला त्या माणसाचे सडेतोड विचार पटतात. ते आणि त्यांचा पक्ष आमच्या पुद्दुचेरीमध्ये हवा होता, अशी गणपती यांची इच्छा. पण ते शक्य नाही, हे गणपती यांनाही माहिती. बाळासाहेबांसारखा एखादा खमक्या माणूसच आमच्याकडे हवा, या नोटवर त्यांनी माझा निरोप घेतला.

2 comments:

shrikrishna (Nashikwala) said...

boss farch chan tumcha janaya athavnaina ujala maila...vachun khup chan vatle...

Anonymous said...

बाळासाहेबांसारखा खमक्या माणूस सगळ्यांनाच हवा आहे. पण त्यांना सगळीकडं पाठवणं शक्य नाही. त्यामुळं त्यांच्याप्रमाणेच कार्य करा. जय महाराष्ट्र.

Santosh Gore