Showing posts with label Mumbai Bomb Blast. Show all posts
Showing posts with label Mumbai Bomb Blast. Show all posts

Thursday, July 14, 2011

दळभद्री नालायकांनो



भारतात काय स्पिरीटचा कारखाना आहे...

नेमेचि येतो मग पावसाळा या धर्तीवर आता भारतामध्ये नेमेचि होतात मग बॉम्बस्फोट अशी पद्धत सुरु झाली आहे. भारतात कुठे ना कुठे तरी बॉम्बस्फोट होतात. मग कधी जयपूर, कधी वाराणसी, कधी पुणे, कधी दिल्ली, कधी सुरत, कधी बेंगळुरू, कधी अहमदाबाद, कधी गुवाहाटी आणि नेहमी मुंबई.

बॉम्बस्फोट होतात, मग नेहमीप्रमाणे एनआयएचे पथक स्फोटाला भेट देते. सर्व पुरावे गोळा करते, मग गृहमंत्री येतात. कधी पॅण्ट सांभाळतात कधी लुंगी सांभाळणारे असतात. तो येऊन लोकांना उगाच अक्कल शिकवतात. उगाचच बाहेर पडू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, एकी बाळगा, सदैव जागरुक रहा इइ. फक्त गृहमंत्री येत नाहीत, विरोधी पक्षनेत्यांची भेट होते, मूड असेल तर पंतप्रधानही येऊन जातात. यूपीए अध्यक्ष सोनिया गांधीही येण्याची शक्यता असते. राज्याचे मुख्यमंत्री, राज्यांचे नेते यांच्याही भेटी होतात. मिडीयाला बाईट देऊन तेही टीव्हीवर झळकतात. विरोधी पक्ष सरकारवर टीका करतात. सरकार म्हणतं विरोधी पक्षांनी स्फोटांचं राजकारण करु नये. हे नेहमीचंच झालं आहे.

लोकांना उगाचच अक्कल शिकवून मग काथ्याकूट होतो ते हा स्फोट कोणी घडवून आणला त्यावर. कोणी म्हणतं लष्करै तैय्यबा, कोण म्हणतं अल कायदा. सध्या इंडियन मुजाहिदीनचा जोर आहे. मग त्यासाठी आरडीएक्स वापरलं की अमोनियम नायट्रेट वापरलं याच्यावर चर्चा झडतात. मग बसस्टॉपला टार्गेट का केलं, रेल्वेला टार्गेट का केलं, यावर टीव्ही चॅनेल्सवर वादसंवाद रंगतो. जुन्या स्फोटांच्या तारखा आणि घडलेल्या घटना यांच्या आठवणी या निमित्ताने निघतात. सरकार आणि पोलीस काय करतात, यावर चर्चा रंगते. सरकारने काय करायला पाहिजे, याबद्दल तज्ज्ञ त्यांची त्यांची मतं मांडतात. कोणी पोलिसांच्या नावानं बोटं मोडतात, कोणी इंटेलिजन्सच्या नावानं खडे फोडतं. इंटरनेट, ट्वीटर, फेसबुक यांच्यावर देशप्रेमाचा उमाळा येतो.

अफझल गुरुच्या फाशीचा मुद्दा पुन्हा चर्चेत येतो, कसाब कसा बिर्याणी झोडतोय, यावर टीका होते. मग बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांचे काय हा मुद्दा चर्चेत येतो. सारीच वांझोटी चर्चा. आपण फक्त वांझोट्या चर्चाच करतो. सरकारला सामान्य माणसाचं काहीच देणंघेणं नाही. राजकीय पक्षांनाही काही पडलेली नाही. ऐसे हादसे होतेही रहते हे, असं राज्याचा गृहमंत्री म्हणतो. तर काँग्रेसचा युवराज म्हणतो हल्ले होतच राहणार. बोला आता तुम्ही आम्ही करणार काय. म्हणूनच सामान्य माणूस फेसबुर ट्वीटर रिअॅक्ट होत राहतो, टीव्हीवर चर्चा करत राहतो. त्यातून काहीही साध्य होत नाही. पण हे सोपस्कार पडत राहतात.

स्फोट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लोक कसे कामावर आले, शाळा कशा नेहमीप्रमाणे भरल्या, कॉलेज कट्टे कसे फुलून गेले, लोकल कशा भरभरून वाहताहेत, अशी दृष्य आणि बातम्या दाखवून न्यूज चॅनेल्स मुंबईच्या स्पिरीटची चर्चा करतात. अहो, कसलं स्पिरीट प्रत्येकाला उद्याची चिंता आहे. उद्या कामावर नाही गेलो तर एक दिवसाचा पगार कापला जाणार, शाळेत-कॉलेजात नाही गेलो आणि मार्क कमी पडले तर उद्या अॅडमिशन कोण देणार, या विवंचनेत तो घराबाहेर करतो. त्यामुळं हे काही स्पिरीट फिरीट नाही. ही हतबलता आहे. अहो, मुंबईच नाही तर इतर सर्व शहरे दुसऱ्या दिवशी नेहमीच्या व्यवहारांमध्ये गुंतून जातात. कारण त्यांना जगायचं आहे. मुंबईत आणि शहरांमध्ये काय स्पिरीटचा कारखाना आहे, सारखं स्पिरीट स्पिरीट करायला. ही हतबलता आहे, दुसरा पर्यायच नाही. त्याला काय करणार. खरं, तर हे स्पिरीट स्पिरीट करणाऱ्यांवरच या स्पिरीटचा उपयोग केला पाहिजे.

वाढलेल्या महागाईत रुपया रुपया कमाविण्यासाठी रोज मरावं लागतं. सामान्य माणूस रोजच मरतोय. या एसीमध्ये बसलेल्या राजकारण्यांना त्याचा काय पत्ता. त्यांचा काय समजणार हे. रोज मरणं आणि एकदाचं कायमचं मरणं, यातला फरकही आता मिटून चालला आहे. नालायक राजकारणी आणि निर्लज्ज यंत्रणा असलेल्या भारतात जन्माला आलो ते मरण्यासाठीच. त्यामुळे सामान्य माणसाला मरणाची भीती नाहीये. तो घरातून बाहेर पडतो तेच मरण्यासाठी.

असो. आता ११-७ झाले. २६-११ झाले. १३-२ झाले. काल १३-७ झाले. आता पुन्हा कोठे आणि कधी स्फोट होणार याची वाट पाहत बसण्यापेक्षा आणि त्यात आपण आणि आपले जवळचे नसावेत, यासाठी देवाचा धावा करत बसण्यापलिकडे सामान्यांच्या हातात काहीही नाही. कारण आपण सर्वसामान्य आहोत. अतिरेक्यांसाठी सॉफ्ट टार्गेट आहोत. निलाजऱ्या राजकारण्यांसाठी मतांची पेटी आहोत. महागाईच्या भस्मासुराचे भक्ष्य आहोत. नक्षलवद्यांचे लक्ष्य आहोत. कारण आपण सर्वसामान्य आहोत.


भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात सर्वसामान्य माणसाचे हे हाल, हे मजबूत लोकशाहीचेच 'लक्षण' आहे. एकीकडे आपण लोकशाहीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे हीच लोकशाही सर्वसामान्य माणसाचा गळा घोटणार.


जय हिंद, जय लोकशाही...