Tuesday, June 11, 2013

अडवाणींचे प्रतिमाभंजन


शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती सत्तेवर असतानाचा किंवा युतीची सत्ता नुकतीच गेली, तेव्हाचा काळ. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये काहीतरी वादग्रस्त विधान करून वादाचा धुरळा उडविलेला. मग त्यावर वाद आणि प्रतिक्रियांचा जोरदार प्रतिध्वनी उमटत होता. त्यामध्ये चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांची आज इतक्या वर्षांनंतरही लक्षात राहिलेली प्रतिक्रिया... ‘बाळासाहेब, आमच्या मनामध्ये तुमची जी प्रतिमा आहे, तिला धक्का पोहोचविण्याचा अधिकार खुद्द तुम्हालाही नाही...’ सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या एकूणच वर्तनाबद्दल पक्षातील त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते यांची भावनाही नानापेक्षा वेगळी असण्याची शक्यता नाही. ‘अडवाणी, आमच्या मनात तुमची जी प्रतिमा आहे, तिला धक्का लावण्याचा अधिकार खुद्द तुम्हालाही नाही. त्यामुळे असे कोणतेही पाऊल उचलू नका, ज्यामुळे गेल्या ६५ वर्षांत निर्माण झालेल्या तुमच्या प्रतिमेचे भंजन होईल.’

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे गोव्यातील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीला लालकृष्ण अडवाणी यांनी मारलेली दांडी आणि नंतर दिलेला तीन संसदीय पदांचा राजीनामा. आजवरच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीला अनुपस्थित राहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. मुळात अडवाणी हे खरोखरच आजारी होते की त्यांचा आजार राजकीय होता, याबद्दल चर्चा करण्याचे काहीच कारण नाही. कारण दुसऱ्याच दिवशी सत्य समोर आले. शिवाय ८५ वर्षीही एकदम तंदुरुस्त असणारे अडवाणी नेमके बैठकीच्या तीन दिवसांतच आजारी पडले, म्हणजे नक्की काय, हे सूज्ञ मंडळींना समजले होतेच. 

मुद्दा आहे अडवाणी यांच्या प्रतिमेचा. भाजपच्या आजवरच्या वाटचालीत अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे दोनच नेते असे आहेत, की ज्यांचे स्थान कोणालाही घेता येणार नाही. अगदी नरेंद्र मोदी यांनाही ते शक्य नाही. शून्यातून पक्ष उभा करणे म्हणजे काय, हे या दोघांनी करुन दाखविले आहे. त्यामुळेच वाजपेयी आणि अडवाणी यांना एकमेकांपासून वेगळे करणे शक्य नाही. वाजपेयी-अडवाणी हे भाजप कार्यकर्त्यांसाठी एका अर्थाने जोडशब्दच आहेत. एक घेतला की ओघाने दुसरा आलाच. हे दोघे सर्वप्रथम १९४८ मध्ये भेटले. त्यानंतर पाच वर्षांनंतरची म्हणजे १९५३ची घटना. अडवाणी यांनी स्वतःच सांगितलेली. 

दिल्लीच्या पालिका निवडणुकीत जनसंघाला यश मिळावे म्हणून वाजपेयी-अडवाणी खूप झटत होते. मात्र, जनसंघाला त्या निवडणुकीत दणकून पराभव पत्करावा लागला. निकाल जाहीर झाल्यानंतर पराभवाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी ते दोघे पहाडगंज येथील टॉकीजमध्ये सिनेमा पाहण्यासाठी गेले. योगायोगाने तो सिनेमा होता, राजकपूर यांचा ‘फिर सुबह होगी.’ त्यानंतर जवळपास ४३ वर्षांनी भाजप देशात सत्तेवर आला आणि भाजपसाठी खऱ्या अर्थाने ‘सुबह’ झाली. ती केवळ वाजपेयी-अडवाणी यांच्या जोडगोळीमुळेच. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदान आहे, यात शंकाच नाही. पण भाजपला सत्तेपर्यंत नेण्यात या दोघांचाच सिंहाचा वाटा आहे, हे विधान सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

तेव्हा वाजपेयी-अडवाणी यांनी पक्षासाठी घेतलेले परिश्रम आणि वारंवारच्या पराभवातूनही पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याची त्यांची जिद्द नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखी नाही. त्यामुळे त्यांना वगळले तर भाजप भले मोठे शून्य आहे. असे असतानाही सध्याची परिस्थिती अडवाणी यांच्या पंतप्रधान बनण्यासाठी अजिबात अनुकूल नाही, हे सत्य त्यांनी खुल्या दिलाने स्वीकारले पाहिजे. अनेक दशके राजकारणात असूनही अडवाणी यांची निष्कलंक प्रतिमा आणि या वयातही तंदुरुस्त राहून राजकारणात सक्रिय राहण्याचे कसब वाखाणण्यासारखे आहे. विचारांवरील निष्ठांबद्दल शंका घेण्याचे धाडस काँग्रेस नेतेही करणार नाहीत. मात्र, वय त्यांच्या बाजूने नाही. भाजपचे कार्यकर्ते नसलेल्या देशभरातील तमाम तरुणांना आणि कुंपणावरील मतदारांना आकर्षित करेल, अशी वाणी आणि व्यक्तिमत्त्व अडवाणी यांच्याकडे नाही. जे वाजपेयी यांच्याकडे होते आणि कदाचित मोदी यांच्याकडे आहे. हे सत्य ८५ वर्षांच्या अडवाणी यांनी मोठ्या मनाने स्वीकारून तरुण नेतृत्त्वासाठी जागा करून दिली पाहिजे.

वास्तविक पाहता, २००९ मध्ये अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखालीच भाजप लढला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या जागा वाढण्याऐवजी घटल्या होत्या आणि काँग्रेसने बऱ्याच वर्षांनी दोनशेचा टप्पा पार केला होता. तेव्हा भाजपचा पराभव का झाला? तो अडवाणी यांच्यामुळेच झाला का? वगैरे चर्चा करण्याची ही वेळ नाही. मात्र, तेव्हा अडवाणी यांना संधी मिळाली होती आणि त्याचे सत्तेत रुपांतर करण्याचे कसब अडवाणी यांना जमले नाही, हा इतिहास आहे. त्याला कोणीही नाकारणार नाही. इतिहासात अनेकांना संधीच मिळत नाही. अडवाणी यांना मात्र, ती मिळाली होती. तिचे सोने करणे त्यांना जमले नाही.

भाजपमधीलच अनेक नेत्यांनी हे सत्य स्वीकारले आहे. भाजपचे प्रदेश पातळीवर महत्त्वाची भूमिका बजविणारे एक आमदार गेल्या वर्षी भेटले होते. ते यासंदर्भात भरभरून बोलले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘वाजपेयी-अडवाणी हे आजही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आदरणीय नेते आहेत. त्यांच्या परिश्रमांमुळेच आम्ही येथे आहोत, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, सध्याची परिस्थिती वाजपेयी-अडवाणींचा नाही, याचीही जाणीव ठेवली पाहिजे. परिस्थिती बदलली आहे. त्याप्रमाणे पक्ष तसेच नेतृत्त्वाने बदलले पाहिजे. हे दोन्ही नेते सध्याच्या परिस्थितीसाठी योग्य नाहीत. त्यामुळेच आज अडवाणी काय, वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालीही निवडणूक लढविली असती, तरी यश मिळालेच असते अशी खात्री देता येणार नाही.’

तेव्हा तुमचे पक्षातील अतुलनीय योगदान लक्षात घेऊन सुद्धा ‘तुमच्याऐवजी दुसरा’ असा निर्णय भाजप घेणार असेल तर त्यात काहीही चूक नाही. परिवारातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तुम्ही ते मोकळ्या मनाने स्वीकारता, की रुसून बसता हे महत्त्वाचे आहे. कोणता शिक्का बसेल याची पर्वा न करता, रामजन्मभूमी आंदोलनात झोकून देणारे विचारनिष्ठ अडवाणी लोकांनी पाहिले आहेत. हवालाच्या डायरीमध्ये फक्त ‘एल. के.’ अशी अद्याक्षरे आढळल्यानंतर निर्दोष सिद्ध होईपर्यंत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेणारे तत्त्वनिष्ठ अडवाणी लोकांनी पाहिले आहेत. आता मनाचा मोठेपणा दाखवून स्वतःच्या शिष्यासाठी मनापासून बाजूला होणारे अडवाणी लोकांना पहायचे आहेत. तसे झाले तरच अडवाणी यांच्या प्रतिमेचे भंजन होणार नाही. 

(‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीत ११ जून रोजी प्रसिद्ध झालेला लेख.)

2 comments:

जीवन भावसार said...

छान...पण निष्कलंक हा शब्द खटकतो.

Unknown said...

ashish khup chan....