Sunday, April 13, 2014

अब की बार, शिरोळे खासदार…

देशभरात परिवर्तनाची लाट असताना पुण्यात काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. मुख्य कारण म्हणजे राष्ट्रकुल घोटाळ्यामध्ये पुण्याचे काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी अडकले. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि ‘ऑक्सफर्ड ऑफ इस्ट’ असलेल्या पुण्याच्या खासदाराला तिहार तुरुंगात धाडण्यात आले. त्यामुळे कलमाडींचा पत्ता कापण्यात आला. काँग्रेसने पुण्यातून तरूण उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. टू जी, राष्ट्रकुल, कोळसा खाणवाटपासह अनेक घोटाळ्यांमध्ये काँग्रेस अडकली आहे. तेव्हा पुणेकर मतदार भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारावर विश्वास टाकतात, की नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठिशी ठामपणे उभे राहतात का, याचे औत्सुक्य सर्वांना लागून राहिलेले आहे. 



यंदाही चौरंगी लढत

पुण्याची निवडणूक गेल्यावेळेस प्रमाणेच चौरंगी होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, काँग्रेसचे विश्वजीत कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक पायगुडे आणि ‘आप’चे प्रा. सुभाष वारे यांच्यातच लोकसभेची निवडणूक रंगणार आहे. भाजपचे अनिल शिरोळे हे गेल्यावेळीच निवडून आले असते. मात्र, मनसेचे रणजित शिरोळे (७५ हजार ९३०) आणि बहुजन समाज पक्षाचे डी. एस. कुलकर्णी (६२ हजार ९८१) यांनी खेचलेल्या मतांमुळे अनिल शिरोळे यांना फटका बसला आणि ते अगदी निसटत्या फरकाने म्हणजे अवघ्या पंचवीस हजार ७०१ मतांनी पराभूत झाले. यंदा मात्र, परिस्थिती पूर्णपणे निराळी आहे. गेल्यावेळी भाजपची मते फुटली आणि शिरोळे यांना फटका बसला. यंदा मात्र, काँग्रेसला सर्वाधिक फटका बसणार असून फायदा भाजपच्या पथ्यावर पडणार, अशी चिन्हे आहेत.

पुण्यात जशी लढत चौरंगी आहे. तशाच शिरोळे यांच्यासाठी चार गोष्टी दिलासादायकही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ची गेल्या निवडणुकीइतकी यंदा हवा नाही. दुसरे म्हणजे डी. एस. कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. उलट ते भाजपमध्येच दाखल झाले आहेत. दिल्लीमध्ये सरकार चालविण्यात साफ अपयशी ठरल्यामुळे ‘आप’चा ताप उतरलेला आहे, हा तिसरा मुद्दा. चौथी आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे विश्वजीत कदम हे पुण्याबाहेरील उमेदवार आहेत. नवखे आणि अननुभवी आहेत. पुण्याची संस्कृती, परंपरा, समाजकारण आणि राजकारण यांच्याशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नाही. या सर्वच्या सर्व गोष्टी अनिल शिरोळे यांच्याच पथ्यावर पडणाऱ्या आहेत.


राज आणि मनसेबद्दल नाराजी

राज ठाकरे यांच्या मनसेने मतदारांचा भ्रमनिरास केला आहे. पुण्यामध्ये मतदारांनी भाषणांना भुलून राज यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली आणि पुण्यातून मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी कोणतीही भरीव नि चमकदार कामगिरी केलेली नाही. वेळोवेळी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीशी संगनमत करून स्वतःच्या पदरात काहीतरी पाडून घेण्याशिवाय मनसेच्या नगरसेवकांनी काहीही केले नाही. नवनिर्माणाची पहिली वीटही न रचल्यामुळे त्यामुळे मतदार मनसेला विटले आहे.

मध्यंतरी पुण्यात घेतलेल्या सभेमध्येही राज यांनी पुण्याच्या समस्या आणि अडचणींना हात न घालता भलतेच मुद्दे आळवले आणि मतदारांचा भ्रमनिरास केला. ‘टोल’च्या मुद्द्याचा त्यांना पुण्यातील सभेत साफ विसर पडला. पुण्यासाठी काय करणार, याबाबत त्यांनी चकार शब्दही काढला नाही. उद्धव यांच्यावर टीका, गोपीनाथ मुंडे यांची नक्कल आणि नितीन गडकरी यांची भलामण इतक्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे हे इतरांपेक्षा कसे उजवे आहेत, याबाबत न बोलणेच त्यांनी टाळले. पुणेकर मतदार सूज्ञ आहेत. राजकीय बोलबच्चनला ते महापालिका निवडणुकीत भुलले. मात्र, यावेळी ते भुलतील अशी आशा करणे व्यर्थ आहे.
  
दहा वर्षे गायब

शिवाय त्यांचे उमेदवार दीपक पायगुडे हे दहा वर्षांनंतर अचानक उगवले आहेत. २००४ मध्ये भवानी पेठेतून पराभूत झाल्यानंतर ते अंतर्धान पावले. ‘मनसे’च्या अंतर्गत राजकारणाला वैतागून पक्षापासून चार हात दूरच थांबू लागले. खुद्द राज ठाकरे यांनीही त्यांनी अनेकदा अव्हेरले. मनसेतील अनेक नेते आणि गट त्यांच्याविरोधात होते. तरीही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मनातून उतरलेल्या पायगुडे यांना उमेदवारी दिली. ‘राजसाहेबां’च्या आदेशामुळे बहुसंख्य कार्यकर्ते काम करीत असले तरीही मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या किती हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे गेल्या वेळी राज ठाकरे यांच्या भाषणबाजीला भुलून ‘मनसे’च्या वळचणीला गेलेला भाजपचा बहुतांश परंपरागत मतदार यंदा पुन्हा भाजपकडे वळेल, यात शंका नाही. तसेही मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या सख्ख्या उमेदवाराला डावलून सावत्र मोदीभक्ताला पाठिंबा देण्याइतपत पुणेकर मतदार मूर्ख नाही. शिवाय मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत सांगितल्याप्रमाणे, कमळाला मत म्हणजेच मोदींना मत. महायुतीला मत म्हणजेच भाजपला किंवा कमळाला मत. त्यामुळे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी इंजिनाचे बटण दाबण्याची चूक मोदीप्रेमी मतदार कशाला करेल.

डीएसके यांनी गेल्या निवडणुकीत मोठी भूमिका बजाविली होती. यंदाही ते आपकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक होते. पण ते रिंगणात नाहीत. ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते, तर भाजपची मतेच त्यांनी फोडली असती. त्यापैकी बहुतांश मते ही ब्राह्मण आणि मध्यमवर्गीय असती, हे ओघाने आलेच. पर्यायाने शिरोळे यांचे मताधिक्य कमी होण्यास डीएसके कारणीभूत ठरले असते. मात्र, डीएसके यांच्या सूज्ञपणामुळे हा धोका टळलेला आहे. त्यामुळे गेल्यावेळी शिरोळे यांचे जसे नुकसान झाले, तसा फटका यंदा त्यांना बसण्याची शक्यता कमी आहे.

‘आप‘ने पुण्यातून सुभाष वारे यांना उमेदवारी दिली आहे. वारे हे समाजवादी विचारांचे जुने कार्यकर्ते आहेत. मात्र, त्यांना राजकारणाचा काहीही अनुभव नाही. समाजवादी आंदोलनात ते अनेक वर्षांपासून असले तरीही पुणेकरांच्या अडीअडचणी तसेच समस्या सोडविण्यासाठी त्यांनी यापूर्वी विशेष आंदोलन केल्याचे स्मरणात नाही. दिल्लीत सरकार स्थापन केल्यानंतर ‘आप’चा फियास्को झाला आणि त्यांच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीचा ताप उतरला. त्यामुळे वारे यांची उमेदवारी म्हणावी तितकी तुल्यबळ राहिलेली नाही. तरीही ते लढत आहेत. त्यांचा फटकाही काही प्रमाणात भाजपला आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला बसणार आहे.


विश्वजीत कदम बाहेरचे उमेदवार

राहता राहिले काँग्रेसचे विश्वजीत कदम. सांगली जिल्ह्यातील कडेगांव-पलूस मतदारसंघाच्या यादीत कदम यांचे मतदार म्हणून नाव आहे. त्यामुळे मी पुण्यातीलच आहे, पुण्यातच शिकलो आणि वाढलो, असा प्रचार करीत असले तरीही ते सांगलीचे आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. अनेक वर्षांपासून पुण्यात आहे, असा दावा ते करीत आहेत. मात्र, ते पुणे काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हते. एलबीटी, बीडीपी, डीपी, बीआरटी किंवा मेट्रो या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केल्याचे किंवा भूमिका घेतल्याचे स्मरणात नाही. पुण्याची वाहतूक समस्या, पीएमटी वाचवा, नदीसुधार, प्रदूषण, वाढती लोकसंख्या आणि इतर अनेक मुद्द्यांवर त्यांनी कधीच समोर येऊन भूमिका मांडली नाही. ना पक्षाच्या व्यासपीठावर ना वैयक्तिक स्वरूपात.

उलट कदम कुटुंबीयांनी भारती विद्यापीठाच्या आवारातील पुणेकरांच्या सोयीचा आणि वर्दळीचा असलेला रस्ता वाहतुकीसाठी कायमचा बंद करून टाकला. कात्रज, धनकवडी नि बालाजीनगर परिसरातील अनेक रहिवाशांची त्यामुळे कोंडीच झाली. पुणेकरांच्या सुखदुःखांशी देणेघेणे नसलेल्या विश्वजीत कदम यांच्या पाठिशी पुणेकर कशासाठी उभे राहतील, हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय कदम कुटुंबीयांचा ‘स्वभाव’ आणि पुणेकरांचा स्वभाव जुळून येणे कठीण वाटते.

केवळ ‘राहुल ब्रिगेड’चे सदस्य म्हणून त्यांना तिकिट मिळाले आहे. अत्यंत तरुण वयात उमेदवारी मिळाल्यामुळे काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ आमदार त्यांच्यावर खार खाऊन आहेत. तूर्तास नाराजी मिटलेली आहे, असे चित्र रंगविले असले तरीही कलमाडी समर्थक आणि पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून त्यांना दगाफटका होण्याची अजिबात शक्यता नाही, असे मानण्याचे अजिबात कारण नाही. सुरूवातीला कदमांचे काम घरचे काम असल्याच्या आनंदात करणाऱ्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेतेही विश्वजीत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे आघाडीत बिघाडी होणारच नाही, असे समजून कसे चालेल.


विचारांचे पक्के, कार्यकर्त्यांचे लाडके

सरते शेवटी राहिले अनिल शिरोळे. ते अस्सल पुणेकर आहेत. पुण्यातच लहानाचे मोठे झाले. पुण्याची शान असलेल्या गणेशोत्सवाशी ते पहिल्यापासून कार्यकर्ता म्हणून जोडलेले आहेत. तरुणांची संघटना पतित पावन संघटनेच्या संस्थापकांपैकी एक आहेत. महापालिकेतून मा. डॉ. हेडगेवार यांचे तैलचित्र काढण्याचा मुद्दा किंवा आदमबाग मशिदीविरोधातील मोर्चा असो, यांत्रिक कत्तलखान्याला विरोधाचे प्रकरण किंवा दादोदी कोंडेदव यांचा पुतळा हटविण्याचा विषय असो किंवा बीआरटीविरोधातील जनआंदोलन असो… प्रत्येकवेळी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता ही ओळख त्यांनी सार्थ ठरविलेली आहे. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता, अशी त्यांची ओळख आहे. फक्त निवडणुकीपुरता आला आणि नंतर गायब झाला, असा हा नेता नाही.

शिरोळे हे भाजप आणि संघ परिवारातील जुने कार्यकर्ते आहेत. विचारांशी पक्के आहेत. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासून संघविचार आणि हिंदुत्वाच्या विचाराशी बांधले गेलेले आहेत. स्वभावाने शांत आणि मृदूभाषी आहेत. शक्यतो कोणत्याही वादात न अडकता साधेपणाने काम करीत राहणे, ही त्यांची शैली आहे. १९९२ साली ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. पहिल्यापासूनच त्यांची प्रतिमा स्वच्छ प्रतिमेचा नेता अशीच राहिलेली आहे. महापालिकेकडून मिळणाऱ्या मानधनासह कोणतेही फायदे न घेणारा, पालिकेच्या खर्चाने नगरसेवकांनी परदेश दौरे करू नये, असे ठामपणे सांगणारा, वैयक्तिक स्वार्थासाठी ‘अॅडजस्टमेंट’ न करणारा आणि कोणत्याही परिस्थिती पक्षाच्या भूमिकेशी एकनिष्ठ राहणारा नेता, ही त्यांची प्रतिमा आहे. या प्रतिमेचा त्यांना निवडणुकीत नक्की फायदा होईल.

संघाची यंत्रणा कार्यरत

आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघ परिवाराने ही निवडणूक नेहमीपेक्षा अधिक गांभीर्याने घेतलेली आहे. काँग्रेसला हटवायचे असेल तर ‘अभी नही तो कभी नही’ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसला हटविण्यासाठी परिवारातील अनेक संघटना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कामाला लागलेल्या आहेत. संघविचारांच्या मतदाराला घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची रचना लागण्यास सुरुवात झाली आहे. ही यंत्रणा भारतीय जनता पक्षाच्या यंत्रणेपेक्षा पूर्ण वेगळी आहे. संघाची ही यंत्रणा कोणाला दिसत नाही. मात्र, त्यांचे काम सुरू असते. यंदाच्या निवडणुकीत संघाची ही यंत्रणाही मोलाची भूमिका निभावणार आहे.

समीकरण शिरोळेंच्या बाजूने

मतांची आकडेवारीही यंदा शिरोळे यांच्याच बाजूने कौल देते. गेल्या निवडणुकीत मनसे आणि डीएसके यांनी घेतलेल्या एक लाख अडतीस हजार मतांपैकी बरीचशी मते ही भाजपची होती. तो आकडा एक लाख ३८ हजार मतांचा आहे. त्यापैकी डीएसके यांनी खेचलेली भाजपची मते पुन्हा अनिल शिरोळे यांच्याकडे वळतील. गेल्यावेळी रणजित शिरोळे यांनी भाजपची जी मते खाल्ली, त्यामध्ये बरीच घट होईल. मनसेकडून झालेल्या भ्रमनिसारामुळे मनसेने खेचलेला भाजपचा मतदार मोठ्या प्रमाणावर मूळ पक्षाकडे परतेल. मनसेचा उमेदवार काँग्रेसच्या आणि विशेषतः कलमाडींच्या जवळचा आहे. सर्वत्र संचार असणाऱ्या दीपक पायगुडे यांचा फटका भाजपला कमी आणि काँग्रेसला अधिक बसण्याची शक्यता आहे. शिवाय काँग्रेसवर नाराज असलेले कलमाडी कदाचित पायगुडे यांना मदत करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

भाजपवर नेहंमी जातीयवादाचा आरोप करून काँग्रेसकडे जाणारी समाजवादी आणि डाव्या विचारांची मते कदाचित ‘आप’चे वारे खेचू शकतील. त्यामुळे तिथेही फटका काँग्रेसलाच बसणार हे नक्की.. झोपडपट्टीतील काही मतदार, कष्टकरी वर्ग, हमाल, मोलमजुरी करून जीवन जगणारे कामगार, रिक्षाचालक या वर्गामध्ये ‘आप’ची सर्वाधिक क्रेझ आहे. दिल्लीतही याच वर्गाने त्यांना साथ दिली. पुण्यामध्ये या वर्गाची सर्वच्या सर्व नसली तरी काही प्रमाणात मते ‘आप’कडे नक्की वळणार. हा मतदार पारंपरिक काँग्रेसचा मतदार. त्यामुळे ‘आप’ने खेचलेली बहुतांश मते ही काँग्रेसचीच असतील. भाजपची नव्हे. 


रिपब्लिकन मतांचा फायदा

भाजपने १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत तीन लाख मतदारांची व्होटबँक राखलेली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना फटका बसला आणि ते दोन लाख ५४ हजारांवर स्थिरावले. डीएसके आणि मनसेकडे गेलेले मतदार पुन्हा भाजपकडे वळल्यामुळे पक्ष पुन्हा तीन लाखांचा आकडा गाठणार हे नक्की. सोबतीला रिपब्लिकन पक्षाची हमखास मते आहेत. रिपब्लिकन पक्षाची बहुतांश मते ही एकगठ्ठा आणि निश्चित असतात. काँग्रेसने मुबलक पैसे वाटले, तरीही ६० ते ७० टक्के रिपब्लिकन मते युतीच्या उमेदवाराला मतदान करतील. मोदी यांच्या सभेतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षात घेतली तर वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, ते समजून येईल. पुण्यातील रिपब्लिकन मतांपैकी किमान वीस हजार मते तरी शिरोळेंच्या पारड्यात नव्याने पडणार आहेत. जी नेहमी काँग्रेसकडे वळतात.

मोदी यांच्या सभेनंतर प्रत्येक मतदारसंघात कुंपणावरील किमान पाऊण ते एक टक्का मते भाजपच्या बाजूने वळतात, असे विश्लेषक सांगतात. पुण्यामध्ये हा निकष लावायचा झाला तर वीस ते पंचवीस हजार मते भाजपच्या बाजूने वळतील, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच या मोदीमय वातावरणाचा अनिल शिरोळे यांना नक्की फायदा होईल. शिवाय मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी संघ परिवाराने उभारलेल्या यंत्रणेचा फायदाही शिरोळे यांनाच आहे.

तेव्हा भाजपच्या परंपरागत तीन लाख दहा हजारांच्या आकड्यामध्ये किमान पन्नास ते साठ हजार मतांची वाढच होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसला गेल्या निवडणुकीत दोन लाख ८० हजार मते मिळाली होती. तर २००४ मध्ये तीन लाख ७४ हजार मते. अगदी तीन लाख ७४ हजार मते काँग्रेसची हक्काची आहेत, असे मानले तरीही मनसे आणि आप यांच्यामुळे काँग्रेसलाच फटका बसणार आहे. शिवाय कलमाडी आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी आहेच. त्यामुळे हा फटका किमान पन्नास हजार मतांचा असेल, असे गृहित धरायला हरकत नाही.

मतांचे समीकरण जुळवून पाहिले, तर अनिल शिरोळे तीस ते चाळीस हजार मतांच्या फरकाने अगदी सहजपणे निवडून येतील. तेव्हा गेल्यावेळी निसटत्या फरकाने पराभूत झालेल्या अनिल शिरोळे यांना विजयाची सुवर्णसंधी असून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची अमूल्य संधी पुणेकरांना आहे, असे म्हणायला हरकत नाही.

 

लास्ट अॅण्ड बेस्ट…

लेखाच्या शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. माझ्या स्मरणशक्तीनुसार जनसंघाचे दिवंगत नेते दीनदयाळ उपाध्याय यांनी व्यक्त केलेले हे मत आहे. (इतर कोणा ऩेत्याचे असल्यास कृपया खुलासा करावा.) राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करताना काय विचार करून मतदान केले पाहिजे, हे त्यांनी सांगितले होते. अनेक पक्ष आणि अनेक उमेदवार निवडणुकीत असतात.

मतदारांनी मतदान करताना प्रथम ‘पार्टी’ पहावी. ‘पार्टी’चा इतिहास, त्यांनी आतापर्यंत केलेले काम, त्यांचे नेते, नेत्यांचे चारित्र्य आणि ‘पार्टी’शी संबंधित सर्व गोष्टींचा अभ्यास करून मग चांगल्या ‘पार्टी’ला मतदान करावे.

दोन्ही ‘पार्टी’ चांगल्या असतील, तर मग दोन्ही पक्षांच्या ‘पॉलिसी’चा अभ्यास करावा. पक्षांचे परराष्ट्र धोरण, संरक्षणविषयक धोरण, शिक्षण, शेती, आरोग्य, महिला आणि इतर धोरणांचा आढावा घेऊन योग्य पक्षाला मतदान करावे.

दोन्ही पक्षांची ‘पॉलिसी’ एकसारख्या उत्तम असतील, तर मग ‘पर्सन’ म्हणजे उमेदवार कोण आहे, त्याचे योगदान काय, त्याचा अनुभव काय, त्याची ‘कमिटमेंट’ काय हे पाहून मतदान करावे.
मला वाटतं, तिन्ही गोष्टींमध्ये अनिल शिरोळे हे इतर तीनही उमेदवारांपेक्षा सरस आहेत. त्यामुळे अनिल शिरोळे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे निश्चित आहे.

(शंभर दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्वासन देणारी आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडालेली काँग्रेस, पाकिस्तान आणि चीनकडून भारताच्या अब्रूचे धिंडवडे निघत असताना हताशपणे मौन बाळगणारे सरदार मनमोहनसिंग नि सोनिया गांधी आणि राजकारण कशाशी खातात, ही साधी गोष्ट माहिती नसलेले राहुलबाबा… अशा स्वाभिमानशून्य लोकांच्या हातात देश सोपवायचा नसेल, तर अनिल शिरोळे यांनाच मत देऊन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायला हवे.)

संबंधित पोस्ट...

१) कशी साधली मोदींनी हॅटट्रिक


२) कसे आहेत हे मोदी...


4 comments:

Unknown said...

मनसे च्या कार्यकर्त्यांशी बोलले तर बरेच जण म्हणतात की काम मनसे चं करत आहोत पण वैयक्तिक मत मात्र भाजपला देणार. Cross voting हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

Unknown said...

देव करो आणि असेच घडो...! सर्व मेहनती कार्यकर्त्यांच्या परिश्रमांना फळ मिळो..! 1989 च्या निवडणुकीत श्री. अण्णा जोशींची अशीच हवा तयार झाली होती जशी 2009 च्या निवडणुकीत शिरोळेंची होती आणि अण्णा फक्त 10 हजारांच्या फरकाने पडले.. त्यानंतर 1991 च्या निवडणुकीत ते निवडून आले... तेच लॉजिक लावायचं तर आता शिरोळेच निवडून येणार...!

Unknown said...

Ashish i like it . You had said exact words and exact history of all party. Really it was good information and true information.

Unknown said...

राज ठाकरे मुळे आम्ही पण गेल्या वेळी मनसे ला मतदान केले होते पण ह्या वेळी अम्ही परत भाजप ला मतदान केले आहे