Thursday, November 30, 2017

कुछ कुछ काँग्रेस, सबकुछ मोदी...

सुरत, भरूच, भावनगर, राजकोट आणि आता अहमदाबाद... शहरांमधून फिरत असताना, लोकांशी बोलत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते आणि ती म्हणजे यंदाची निवडणूक दिसायला तरी एकतर्फी नाही. म्हणजे पूर्वी कसं मोदी एके मोदी असं असायचं. नरेंद्र मोदी या नावासमोर कुणीच टिकायचं नाही. पण यंदा तरी तसं दिसत नाही. लोकंही ठामपणे सांगत नाहीत आणि आपल्याही जाणवतही नाही. कारण मुळात मोदी पंतप्रधान झाले आहे. त्यांचे ट्रस्टेड लेफ्टनंट अमित शहा हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्याशिवाय गुजरात भाजपा अगदीच शून्य नसली, तरी मोदी आणि शहा यांच्या तोडीचा नेता आजच्या घडीला भाजपामध्ये नाही, हे मान्य करावेच लागेल.

गुजरातमध्ये फिरत असताना भाजपाचे एक नेते भेटले. त्यांनी म्हटलेलं वाक्य एक हजार टक्के खरं आहे. गुजरातमध्ये भाजपाच्या नेत्यांचा क्रम लावायचा झाला, तर एक ते शंभरपर्यंतचे सर्व क्रमांक मोदींनाच द्यावे लागतील. त्यांनंतर इतर नेत्यांचे क्रमांक सुरू होतील. त्यामुळे जिथं नरेंद्र मोदी या नावाचा इतका महिमा आहे, तिथे ती व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात नसल्याचा परिणाम होणारच. शिवाय आनंदीबेन पटेल काय, विजय रुपाणी काय किंवा नितीन पटेल काय, या मंडळींचा तेवढा करिष्मा नाही, लोकप्रियता नाही किंवा तेवढी उंचीही नाही. त्याचाच फायदा काही प्रमाणात काँग्रेस उचलताना दिसते आहे.


काँग्रेस सर्वात यशस्वी कुठे झाली आहे, तर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यात काँग्रेसला यश आलं आहे. यंदाची निवडणूक नेहमीसारखी एकतर्फी नाही. काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत दिसते आहे. उभी आहे... हे मत माझं नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं किंवा समर्थकांचं नाही. तर हे मत आहे, भाजपाच्या हक्काच्या मतदारांचं. काँग्रेसने प्रचाराच्या रिंगणात कमबॅक केले आहे. जीएसटी आणि नोटाबंदी हे केंद्रातील मुद्दे तर आहेतच. आरक्षणाचा मुद्दा आहे. मोदींच्या विकासाच्या दाव्यावर आक्षेप घेणारी राहुल यांची भाषणे अशा सर्व गोष्टींचा हा परिणाम आहे. स्थानिक वृत्तपत्रांमधूनही त्याला चांगली प्रसिद्धी मिळते आहे. माध्यमांमध्येही पूर्वी जसं मोदी एके मोदी असायचं तशी परिस्थिती बिलकुल नाही.

अर्थात, गुजरातमधील समस्या आणि अडचणी यांच्याबद्दल बोलायला काँग्रेसकडे काही नाही. म्हणजे रस्ते, वीज, पाणी आणि उद्योग यांच्याबद्दल ठोस काही आकडे सादर करून किंवा रिपोर्टच्या आधारे बोलायला काँग्रेस तयार नाही. राहुल गांधी एका सभेत म्हणतात राज्यात तीस लाख बेरोजगार आहेत, तर दुसऱ्या सभेत म्हणतात पन्नास लाख बेरोजगार आहेत. मग ते भाजपाच्या नेत्यांकडून टीकेचे लक्ष्य होतात. (मुळात सहा लाखच बेरोजगार असल्याचं मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं म्हणणं आहे.) काँग्रेसचे स्थानिक नेते देखील नोटाबंदी आणि जीएसटीवर भरभरून बोलतात. पण राज्य सरकारविरुद्ध बोलायला त्यांच्याकडे फारसं काही नसतं. रस्ते, वीज नि पाणी यांच्याबद्दल ते जास्त बोलत नाहीत. कारण मुळातच त्याबद्दल फार बोलण्यासारखं नाही. काँग्रेसने राज्यातील काही मुद्दे काढून आणि राज्य सरकारच्या अपयशावर बोट ठेवून निवडणूक लढली असती, तर फायदा अधिक झाला असता असं अगदी नक्की वाटतं.

काँग्रेसने यंदा काही गोष्टी चांगल्या केल्या आहेत. तिकिट वाटप करतानाही यंदा सर्व स्थानिक नेत्यांना थोडं दूरच ठेवलंय. राहुल गांधी यांच्या टीममधील सदस्यांनी स्वतः लक्ष घालून जिथे काँग्रेसला विजय शक्य आहे, तिथल्या तिकिटांचे वाटप केले आहे. उमेदवारांची नावं निश्चित करताना योग्य खबरदारी घेतली आहे. जेणेकरून स्थानिक नेत्यांच्या वशिलेबाजीला आळा बसेल आणि योग्य त्या उमेदवाराला संधी मिळू शकेल. विजयाची संधी देखील निर्माण होईल. थोडक्यात म्हणजे काँग्रेसवर स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याच्या दिशेने राहुल यांनी काही पावले पुढे टाकण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, जसा फायदा तसा तोटा. अशा निर्णयाचा काही प्रमाणात विपरित परिणाम होतानाही दिसतो आहे. स्थानिक काँग्रेसचे अध्यक्ष आणि पदाधिकारी नाराज झाल्याचं चित्र आहे. राहुल यांच्या टीममधील सदस्यांना ही नाराजी जाणवते आहे. म्हणजे काँग्रेस काही ठिकाणी कमावते आहे, पण काही ठिकाणी गमावते पण आहे.


गुजरातमध्ये हिंदुत्व हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काँग्रेसने इतकी वर्षे स्वतःची प्रतिमा मुस्लिमांचे मसिहा अशी निर्माण केली होती. तीच प्रतिमा काँग्रेसला मारक ठरते आहे आणि या निवडणुकीतही तोच मुद्दा काँग्रेसला अडचणीचा ठरणारा आहे. त्याबद्दलही पुढे लिहिनीच. पण यंदा राहुल गांधी यांना सॉफ्ट हिंदुत्वाचा जो मार्ग स्वीकारला आहे, त्यामुळे काँग्रेसवर मुस्लिम अनुनयाचा बसलेला शिक्का दूर व्हायला सुरूवात होईल. राहुल यांनी आता जवळपास पंधराहून अधिक मंदिरांना गुजरातमध्ये भेटी दिल्या आहेत आणि दर्शन घेतले आहे. सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेणे ही काँग्रेससाठी एक प्रकारची क्रांतीच म्हटली पाहिजे. थोडक्यात म्हणजे काँग्रेसने ही निवडणूक अत्यंत विचारपूर्वक आणि गांभीर्याने लढविण्याचे ठरविलेले आहे, हे त्यांच्या कृतीतून दिसते आहे. पूर्वी हे होताना दिसत नव्हते. 

दुसरी आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसकडे जसे स्थानिक मुद्दे नाहीत, तसे स्थानिक नेतेही नाहीत. किंवा राष्ट्रीय स्तरावरचे अहमदभाई पटेल यांची प्रतिमा देखील गुजरातचा नेता म्हणून नाही. बाकी शक्तीसिंह गोहील, भरतसिंह सोळंकी, अर्जुन मोढवाडिया, तुषार अमरसिंह पटेल वगैरे फक्त फ्लेक्सवर झळकण्यापुरते राज्यभरातील नेते आहेत. प्रत्यक्षात त्यांना मानणारा मोठा वर्ग नाही. म्हणजे भाजपा नको, तर कोणत्या नेत्याकडे पाहून मतदारांनी काँग्रेसकडे सत्ता सोपवायची या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळेच अनेक मतदार हे संभ्रमावस्थेत आहेत. कदाचित त्यांना भाजपाला मत द्यायचं नसेलही. पण काँग्रेसकडेही कोणी लायक उमेदवार नाही. काँग्रेसवर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे ते सांगताना कुछ कहा नही जा सकता, कुछ भी हो सकता है वगैरे सांगतात.

नेत्यांचा विचार केला, तरी भाजपाकडेही परिस्थिती फारशी चांगली नसली, तरीही नरेंद्र मोदी हा हुकुमी एक्का त्यांच्याकडे आहे आणि त्यावरच ही निवडणूक लढविली जाते आहे. भाजपाने गुजरातेत इतर राज्यांचे इतके मुख्यमंत्री उतरविले, देशभरातील तितके नेते आणले वगैरे बातम्या झळकत असतात. पण हे काही आज अचानक घडलेलं नाही. पूर्वीही तसंच होत होतं. अर्थात, देशभरातून कोणीही आलं किंवा कितीही नेते आले तरी नरेंद्र मोदी हेच गुजरातचे डॉन आहेत. मेरे पास माँ है... तसं मेरे पास मोदी है अशीच गुजरात भाजपाची परिस्थिती आहे. त्याच नावावर भाजपा देखील निवडणूक लढत आहे. प्रचार, प्रसिद्धी, सभा, भाषणे आणि नाव यामध्ये सबकुछ मोदीच आहे.आणि मोदींचा चेहरा, त्यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास यांच्यावरच भाजपाची भिस्त आहे. अन्यथा स्थानिक नेत्यांच्या जोरावर भाजपा पुन्हा सत्तेत येऊ शकेल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी ही व्यक्ती निवडणुकीत नसली, भाजपासाठी फॅक्टर मात्र, तोच आहे. काँग्रेसने चांगली टक्कर दिली आहे. वातावरण निर्मिती केली आहे. पण नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा किंवा जनतेचा विश्वास संपादन करू शकेल, असा नेता त्यांच्याकडे नाही. हीच त्यांची अडचण आहे. 

1 comment:

Radhika Kulkarni, शुभदाताई said...

छान! पुढे काय? याची उत्सुकता आहे.