Sunday, August 26, 2018

सोशल मीडियावरील उरबडवे


केरळमधील मदतकार्याच्या निमित्ताने...

केरळ म्हणजे देवाची स्वतःची भूमी… गॉड्स ओन कंट्री… केरळमध्ये जो महाप्रलय आलाय त्याबद्दल व्यक्त करावे तितके दुःख थोडे आहे. एर्णाकुलम, त्रिश्शूर, पटनमतिठा आणि अल्लपुळा हे सर्वाधिक फटका बसलेले जिल्हे आहेत. हा प्रलय नेमका कशामुळे आलाय हे कालांतराने स्पष्ट होईलच. मानवी चुका आणि धरणांमधील पाण्याचे फसलेले नियोजन ही प्राथमिक कारणे वाटत आहेत. मात्र, तज्ज्ञ आणि अभ्यासक त्याबद्दल योग्य ते मतप्रदर्शन करतील. फेसबुकावरील आणि सोशल मीडियावरील अभ्यासकांनी त्याबद्दल न बोललेलेच बरे. पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांनी त्याबद्दल अत्यंत योग्य असे विश्लेषण केलेले आहे. मात्र, केरळमधील महाप्रलयापेक्षाही अधिक महाभयंकर आणि शिसारी आणणारा महाप्रलय हा सोशल मीडियावर आलेला आहे. अत्यंत हीन दर्जाच्या फेसबुक पोस्ट्स आणि दळभद्री वृत्ती दर्शविणारे मेसेजेचा हा महाप्रलय माझ्यासारख्या अनेक संवदेनशील मंडळींसाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे. 


काय तर म्हणजे केरळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांचे प्रमाण अधिक आहे म्हणून तिथे महाप्रलय आला आहे? मुस्लिम आणि ख्रिश्चन हे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवून आणतात म्हणून त्यांना मिळालेली ही शिक्षा आहे. केरळमध्ये धर्मांतरे घडवून आणली जातात आणि राष्ट्रीय स्वसंयेवक संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ले होता, त्यांच्या हत्या घडवून आणल्या जातात म्हणून केरळला मदत पाठवूच नका. ती धर्मांतरासाठी नि स्वयंसेवकांच्या हत्या घडविण्यासाठी वापरली जाईल. चर्च आणि मशि‍दींकडे हात पसरून मदत मागा की… कशाला भारतीय सैन्य आणि संघाची मदत स्वीकारता? केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर बीफ खाणारा समाज आहे. त्यांच्या गैरकृत्यांची शिक्षा पुरामुळे मिळाली आहे. उघडउघडपणे गोमातेची हत्या करणाऱ्यांना चांगला धडा मिळाला आहे. अर्थतज्ज्ञ असणाऱ्या एका व्यक्तीने काय ट्वीट केले, तर शबरीमलामध्ये महिलांना प्रवेश देण्याचा आणि सध्याच्या घटनांचा संबंध तपासून पाहिला पाहिजे. नंतर सारवासारव केली. पण अशा पद्धतीचे संबंध लावायचे प्रयत्नही झाले. संयुक्त अरब अमिरातीने सातशे कोटींची मदत जाहीर केल्याच्या मुद्द्यावरूनही बराच गहजब माजला. हे पैसे धर्मांतरासाठीच वापरले जातील वगैरे… ती मदत जाहीर झालेलीच नव्हती हे पुढे स्पष्ट झालेच. 
 
   केरळ प्रांताचे सहसंघचालक के. के. बलराम

अत्यंत निर्लज्जपणे अशा प्रतिक्रिया व्यक्त करणारे कोण आहेत तर स्वतःला उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत समजणारे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे आहेत. संघाचे स्वयंसेवक म्हणवणारेच असे मेसेजेस फॉरवर्ड करण्यात अग्रेसर आहेत. संकटात सापडणाऱ्याला मदतीचा हात पुढे केला पाहिजे, ही आपली संस्कृती. पण सोशल मीडियावर विनाकारण उरबडवेगिरी करणाऱ्या अनेकांना त्या संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे, असे खेदाने म्हणावे लागते आहे. आमच्या एका मित्राने फेसबुकावर एक पोस्ट टाकली. बकरी ईदच्या दिवशी मशिदीचीमध्ये पाणी साचले म्हणून त्या गावातील मुस्लिम नागरिकांची व्यवस्था मंदिरातील एका खोलीत करण्यात आली. तसेच त्यांना नमाज पढण्यासाठी मंदिराचा की मंदिरातील खोलीचा उपयोग करू दिला. कठीण परिस्थितीतही जातीय सलोखा कसा टिकविला जात आहे, हे दर्शविणारी ती पोस्ट होती. त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या तर आपलीच आपल्याला लाज वाटावी. (विरुद्ध बाजूची बातमी देखील वाचायला मिळते. पण अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात.) हिंदू धर्मभोळे आहेत, संघ स्वयंसेवकांच्या इतक्या हत्या केल्या तरीही.. किंवा सापाची जात कितीही दूध पाजले तरी… वगैरे वगैरे. देवा काय हे… अहो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी संघ मुख्यालयात आणि शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर नमाज पढण्यासाठी मुस्लिम व्यक्तींना परवानगी दिल्याचे दाखले सापडतात. गुगल जरा सर्च करून पाहा. देवरस आणि ठाकरे यांच्या हिंदुत्वापेक्षा अधिक कट्टर हिंदुत्ववादी कोणी असेल असे वाटत नाही. कोणत्या गोष्टीचा तर्क कुठे लावायचा याला काहीतरी मर्यादा असावी. पण सर्व देशाची आणि हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावरच आहे, अशा थाटात सोशल मीडियावरील उरबडवे वावरताना दिसत आहेत.


सोशल मीडियावरून उठलेले विद्वेषी मेसेज वाचल्यानंतर केरळमध्ये कोणाशी तरी बोलले पाहिजे, असे वाटले. आणि मग केरळ प्रांताचे सहसंघचालक के. के. बलराम यांच्याशी बोललो. मागे केरळला गेलो होतो तेव्हा कण्णूरला त्यांची आवर्जून भेट घेतली होती. जवळपास तास-दीडतास चर्चाही झाली होती. फॅमिली कोर्टात त्यांची कुठली तरी केस चालू होती. पण त्यातही वेळात वेळ काढून त्यांनी मला वेळ दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर बलरामजी यांच्याशी पुन्हा एकदा बोलले पाहिजे, असे राहून राहून वाटत होते. पण वाटून वाटून ते राहतच होते. अखेर रविवारी त्याला मुहूर्त मिळाला. माझ्या मनातील अनेक प्रश्न त्यांच्याशी मोकळेपणाने शेअर केले. 

बलराम म्हणाले, की केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवाभारतीच्या नावाने मदतकार्यात सहभागी झाला आहे. संघाचे स्वयंसेवक सेवाभारतीच्या बॅनरखाली मदतकार्य करीत आहेत. संघासह सर्व सामाजिक संघटनांचे आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते फक्त आणि फक्त मदतकार्यात गुंतलेले आहेत. सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करण्यात आणि परस्परांना शिव्या घालत बसायला त्यांना अजिबात वेळ नाही. अगदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्तेही मदतकार्यात सहभागी आहेत. ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांच्या संघटनाही झोकून मदतकार्य करत आहेत. प्रत्येकाचे क्षेत्र वेगवेगळे आहे. बालेकिल्ले वेगवेगळे आहेत. पण सर्व जण काम करीत आहेत. सर्वांची भूमिका ही परस्परांना पूरक अशीच आहे.

सोशल मीडियावर देशभरात काहीही मेसेज फिरविण्यात येत असले तरीही केरळमधील नागरिक सूज्ञ आहेत. त्यांच्यामध्ये अशा कोणत्याही अंधश्रद्धा नाहीत, की अमुक केल्यामुळे पूर आला किंवा तमुक केल्यामुळे पूर आला. संघ स्वयंसेवकांच्या हत्या केल्यामुळे हा प्रलय आला आहे किंवा केरळमध्ये बीफ खातात म्हणून ही शिक्षा झाली, अशी कोणतीही भावना नागरिकांच्या मनात नाही. संघ स्वयंसेवकांच्या मनातही नाही. आम्ही सर्व स्वयंसेवक फक्त आणि फक्त केरळ पुन्हा एका उभे करण्यासाठी झटतो आहोत. खरं तर सर्वच जण त्यासाठी झटत आहेत. माकपचे कार्यकर्ते आणि संघाचे स्वयंसेवक यांच्यामध्ये मदतकार्यावरून मारामाऱ्या होत आहेत का, परस्परांना ठोकले जाते आहे का, असा प्रश्न त्यांना विचारला. अशा घटना फार घडलेल्या नाहीत. एकदोन ठिकाणी तसं झालंही असेल, पण ते सर्वच ठिकाणी होतंय, असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यालाही काही वेगळी परिमाणं आहेत का, हे तपासून पाहिलं पाहिजे.


न राहून संघाबद्दलचा शेवटचा प्रश्न त्यांना विचारलाच. वास्तविक पाहता, मला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माहिती आहे किंवा संघाच्या स्वयंसेवकांची जी ओळख आहे, त्यावरून माझ्या मनात तरी काहीही शंका नाहीत. १९९७मध्ये कझाकस्तान आणि सौदी अरेबिया यांच्याविमानांची हवेत टक्कर होऊन झालेल्या अपघातात जवळपास ३५० प्रवाशांचा मृत्यू झालाहोता. बहुतांश प्रवासी हे मुस्लिम होते. अपघातानंतर चरखी दादरी येथे विमानं कोसळली होती. त्यावेळी छिनविछिन्न झालेल्या मृतदेहांचे अवयव एकत्र करणे, मृतांच्या नातेवाईकांना मृतदेहांची ओळख पटवून देण्याचे काम करणे आणि लागेल ती प्रत्येक मदत संघाचे स्वयंसेवक त्या वेळी करीत होते. विमानातील प्रवासी कोणत्या जातीचे आहेत किंवा धर्माचे आहेत, याचा फारसा विचार न करता मदतकार्य त्यावेळी करण्यात आले होते. ही आठवण मनात होतीच. पण तरीही सातत्याने सोशल मीडियावर वाचनात येत होतं, म्हणून तो प्रश्न मनात होता आणि त्यामुळेच तो विचारला. 

एखाद्या मुस्लिमबहुल किंवा ख्रिश्चनबहुल गावांमध्ये संघाचे स्वयंसेवक किंवा सेवाभारतीचे कार्यकर्ते मदत करत आहेत ना? त्यांचे उत्तर होते, अर्थातच. तुम्हाला तर माहिती असेलच की मदतकार्य करताना अशा पद्धतीने कधीच भेदभाव केला जात नाही. संघाच्या स्वयंसेवकांकडून कधीही असे कृत्य होणार नाही. जात, धर्म, पंथ, भाषा आणि सर्व भेदाभेद विसरून मदतकार्य सुरू आहे. सुदैवाने केरळमध्ये अशा पद्धतीने मेसेजेसचा सुळसुळाट नाहीये. आणि असे मेसेज माझ्या अपरोक्ष फिरत असले, तरीही त्यांना फारसं कोणी गांभीर्यानं घेत नाही, हे मी निश्चित सांगू शकतो.

माझे बहुतांश पत्रकार मित्र हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहेत. कार्यकर्ते आहेत किंवा समविचारी आहेत. फक्त एक-दोन काँग्रेस विचारांचे आहेत. त्यांच्याकडूनही तेथील मदतकार्यांचे फोटो, माहिती आणि वर्णन समजत होतेच. त्यामुळे सर्वच जण तिथं मदतकार्यात आहेत, हे समजत होतंच. पण तरीही संघाच्या अधिकृत व्यक्तीकडून माहिती मिळावी, म्हणून त्यांच्याशी बोललो. केरळमध्ये प्रत्यक्ष मदतकार्यात कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून तिथली परिस्थिती ऐकल्यानंतर माझ्या मनात नसलेल्या पण सोशल मीडियावरील उरबडव्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळाली होती. केरळमध्ये पूर ओसरेल. पाण्याचा निचरा होईल. मदतकार्याच्या जोरावर केरळ पुन्हा एकदा उभे राहील. पण आपल्याकडे सोशल मीडियावर मानवताविरोधी उरबडव्यांच्या नीच वृत्तीचा निचरा कधी होईल… संकटाच्या समयी देखील परस्परांची उणीदुणी काढून एकमेकांना हिणवण्याच्या मनोवृत्तीचा पूर कधी ओसरेल… आम्हीच हे करतोय ते काय करतायेत असे प्रश्न विचारून कायम दुसऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याच्या मानसिकतेला कधी ओहोटी लागेल…   

 

कदाचित कधीच नाही. कारण सोशल मीडियावर आपल्याला करायचं काहीच नाहीये. फक्त लाइक, कॉमेंट (ती देखील फारसा विचार न करता) आणि फॉरवर्ड, शेअर करायचं आहे. ते देखील एकप्रकारचं मदतकार्य आहे, देशकार्य आहे, असं समजणारे लोक आहेत. ती मंडळी असेपर्यंत अशा मेसेजेसचा सुळसुळाट सुरूच राहील. पण सुदैव असं, की प्रत्यक्षात काम करणारे हातही आहेत. ते सर्वच विचारांच्या संघटनांचे आहेत. फक्त एकाच नाहीत. ते एकमेकांचे विरोधक असतीलही. वैरीही असतील. पण सध्या एकमेकांना पूरक भूमिका घेऊन मदतकार्य करीत आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी खूप दिलासादायक आहे. कदाचित माझ्यासारख्याच अनेकांसाठीही… 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या स्वामी अग्निवेश यांना यांना मारहाण करणारे कार्यकर्ते (कार्यकर्ते भाजपाचे होते, की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही), हिंदुत्वाच्या नावाखाली तथाकथित पुरोगामी विचारवंतांच्या हत्येच्या आरोपांखाली अटक झालेले ढोंगी हिंदुत्ववादी आणि केरळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत खालच्या दर्जाचे मेसेजेस फिरविणारे बेगडी हिंदुत्ववादी तसंच संघ स्वयंसेवक म्हणून मिरविणारे हे एकाच माळेचे मणी आहेत, असं खेदानं म्हणावसं वाटतं. हिंदुत्व आणि संघ देखील असं कधीच सांगत नाही. किमान मला जो संघ माहिती आहे, मला हिंदुत्वाची ओळख आहे ती अशी नाही. 

5 comments:

Unknown said...

Real analysis

Unknown said...

खर वास्तव तू तूझ्या लेखनातून मांडल त्याबद्दल धन्यवाद, प्रत्येकाची मत वेगळी असतात कोणी डोळे उघडे ठेवून पहातो तर कोणी ते उघडे असल्याच ढोंग करतो प्रत्येक घटनेचा आपल्या स्वार्थासाठी कसा वापर करून घेता येईल याचा राजकारणी लोक विचार करतात.त्यांच्या हातात सोशल मिडिया आहेच, पण एक विनंती आहे कि तूझा लेख जास्तित जास्त लोकासमोर कसा येईल याचा विचार कर कारण नविन पिढि व्यतिरीक्त बाँल्गवरील वाचन करणारे कमीच, तूझा माहिती पूर्ण लेख वाचनीयच,धन्यवाद मित्रा.

Unknown said...

वास्तवदर्शी लेख !

नकुल चुरी said...

'संघ समजायचा असेल तर शाखेत यावे लागेल'
हे ज्यांना कळत नाही ते सोशल मिडीआवर अर्धवट ज्ञानाने गोंधळ घालतात.
अशांसाठी हा लेख म्हणजे अंजन आहे.

Swanand Kondolikar said...

👌