Thursday, June 13, 2019

अनंतराव... उत्साहाचा झरा...



आज सकाळी अनंतराव गेले. वय वर्षे ८६. अखेरच्या दिवसापर्यंत चालत-फिरत होते, बोलत होते. आज सकाळी त्यांनी विश्रांती घेतली. कदाचित त्यांच्या आयुष्यातील ही पहिलीच विश्रांती असावी. पूर्वी च्यवनप्राशची एक जाहिरात होती. त्यात एक संवाद होता. साठ साल के बूढे या साठ साल के जवान… ती जाहिरात अनंतरावांना अगदी तंतोतंत लागू होती. अनंतराव म्हणजे कायमच तरुण वाटायचे. त्यांचं वय वाढलं, वार्धक्य आलं, तरी कार्यप्रवृत्तीत वार्धक्याची लक्षणं कधीच दिसली नाहीत. ना त्यांच्या हाती कधी काठी आली. ना कधी अनंतरावांच्या चालण्याचा वेग मंदावला. एका हातात छोटी बॅग घेऊन लगबगीने कुठेतरी जाणारे अनंतराव आता पुन्हा कधीच दिसणार नाहीत. उत्साहाचा एक अखंडपणे वाहत असलेला झरा आज शांत झाला.

अनंतराव म्हणजे कायम काही ना काही कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणारा माणूस. त्यांची आणि माझी पहिली ओळख झाली माझ्या लहानपणीच झाली. अस्मादिकांचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड रवी पत्की ते त्यावेळी आमच्या वॉर्डचे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. त्यावेळी अनंतराव मला पहिल्यांदा भेटले. मी अगदीच लहान होतो. पण प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा उत्साह आणि पुढाकार घेण्याची वृत्ती अजूनही लक्षात आहे. भारतीय जनता पार्टीचं काम असो, गणेशोत्सव किंवा लोकमान्यनगर भाडेकरू संघाचं काम असो, शाळा समितीचे काही काम असो किंवा दत्तमंदिराचं काम असो अनंतराव सर्वात पुढे. बरं दोन-पाच वर्षे नाही, तर गेली अनेक वर्षे ते या कामामध्ये कार्यरत होते. एक नाहीतर दुसरं, हे नाहीतर ते असं सुरू असायचं. कोणताही उपक्रम किंवा संस्था घ्या अनंतरावांनी आहेतच. लोकमान्यनगर आणि अंनतराव हे कधीच एकमेकांपासून वेगळं करता येणार नाही.

अनंतराव व्यवसायाने रंगभूषाकार अर्थात मेकअप आर्टिस्ट होते. ती सर्व कामं आणि दौरे वगैरे सांभाळून अनंतरराव इतर सर्व व्याप सांभाळायचे. आमच्या भागात त्यावेळी भाजपाचे तीन मुख्य खांब होते. एक आमच्या कॉलनीतील अनंतराव जोशी, दुसरे चिमणबागेतील माधवराव कानिटकर आणि तिसरे नवी पेठेतील कुर्डेकर. मतदारयाद्या कशा पहायच्या, स्लिपा कशा लिहायच्या, पत्रकं वगैरे वाटताना कसं बोलायचं हे त्यांच्याकडूनच शिकायला मिळायचं. १९९२ साली विजयाताई केंजळे आमच्या वॉर्डातून निवडणूक लढवित होत्या. त्यावेळी प्रत्येक घरी मतदान स्लीपबरोबर अक्षता देऊन मतदानाला निमंत्रित करण्याची शक्कल अनंतरावांनी लढविली होती. विजयाताई त्यावेळी पराभूत झाल्या आणि वंदना चव्हाण निवडून आल्या. निवडणूक महापालिकेची असो किंवा पदवीधरची अनंतराव प्रत्येक ठिकाणी हिरीरीनं पुढंच असायचे.

 
   (अनंतरावांकडे जाताना कायम नजरेस पडणारी ही भिंत...)

निवडणुकीच्या दिवशी अनंतरावांच्या घरीच कार्यकर्त्यांचं जेवण असायचं. मी तर तेव्हा अगदीच लहान होतो. पण अनंतरावांच्या बरोबर असल्यामुळं निवडणूक, प्रचार नि मतदानाच्या दिवशी असणारी यंत्रणा, पोलिंग एजंट आणि इतर सर्व प्रक्रिया अगदी जवळून पहायला मिळाल्या. अनुभवायला मिळाल्या. अनंतरावांनी पक्षाकडे स्वतःसाठी कधी तिकिट मागितलं की नाही माहिती नाही. पण पक्षाचा जो उमेदवार असेल त्याचा प्रचार अनंतराव मनापासून करायचे. मालतीबाई परांजपे, नंदू फडके आणि इतर नेते उमेदवारांच्या वेळच्या आठवणी ते रंगात आले की सांगायचे. १९९०मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून तर मला ते अगदी लख्ख आठवतायेत. तेव्हा शिवसेना-भाजप युतीचे शशिकांत सुतार आमच्याकडे उमेदवार होते. तेव्हापासून अगदी आता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही अनंतराव सक्रिय होते.

 
   (२०१७च्या महापालिका निवडणुकीदरम्यान अनंतरावांची झालेली भेट...)

लोकमान्यनगर भाडेकरू संघ आणि आताचा सदनिकाधारक संघ, बालविकास मंदिर यांचा गाडाही अनंतरावांनी अनेक वर्षे हाकला. पाण्याची बिलं तयार करणं, त्यांची वसुली कऱणं, लाइटची बिलं वाटणं वगैरे कामं अनंतरावांनी अनेक वर्षे केली. लोकमान्यनगरचा पुनर्विकास हा गेली अनेक वर्षे रखडलेला प्रश्न आहे. त्यासाठीही अनंतरावांची धडपड सुरू होती. आज ना उद्या पुनर्विकास होईल, या आशेवर ते होते. मध्यंतरी सदनिकाधारक संघाची सूत्रे कॉनलीतील काही तरूण मंडळींनी त्यांच्याकडून स्वीकारली. अनंतराव, तुम्ही खूप वर्षे कष्ट केले. आता तुम्ही विश्रांती घ्या. आम्ही बघतो सगळं, असं आम्ही त्यांना म्हटलं. त्यावेळी अनंतराव काहीसे नाराज झाले होते. पण ती नाराजी त्यांनी कधीच बोलून दाखविली नाही. की आमचे संबंध दुरावले नाहीत. त्यांना हटविण्यासाठी आम्ही सूत्रे हातात घेतली नव्हती हे त्यांना कदाचित कळलं असावं. गेली चार-पाच वर्षे सर्व कारभार पाहताना आमच्या नाकात दम येतोय. अनंतरावांनी इतकी वर्षे कसं सांभाळलं असेल, हे आता समजतंय.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेवटी मन की बात केली. तेव्हा तो कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरा करण्याचे आदेश भाजपा कार्यकर्त्यांना होते. कॉलनीतील दत्तमंदिर चौकात झालेल्या कार्यक्रमाला अनंतराव आवर्जून उपस्थित होते. तसंही ते पक्षाच्या जवळपास प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असायचे. आमच्या भागातील प्रचार त्यांची भेट घेतल्याशिवाय पूर्णच व्हायचा नाही. धीरज घाटेच्या आई-वडिलांच्या पंच्याहत्तरीचा कार्यक्रम झाला, त्याला अनंतराव उपस्थित होते. तीच आमची अखेरची भेट. कार्यक्रमाला आले तेव्हा अनंतरावांना म्हटलं, अनंतराव बसा. त्यावेळी ते मला म्हटले, तू म्हणतोयस म्हणून बसतो. नाहीतर अजूनही मी उभा राहू शकतो. आणि अनंतराव कितीही वेळ उभे राहू शकले असते, हे अगदी निश्चित.

वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं. अनेक दुःख पदरी आली. पण भेटल्यानंतर त्यांनी त्याचं रडगाणं कधीही गायलं नाही. कधी त्याबद्दल तक्रार केली नाही. वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून ठेवलं. कायम कार्यरत राहिले. त्यांना स्वस्थ बसलेलं कोणीच पाहिलं नाही. देवाची साथ म्हणा किंवा दैवाची साथ म्हणा, अनंतराव शेवटपर्यंत ठणठणीत होते. वयाच्या ८६व्या वर्षीही एकटे रहायचे. स्वतःचं स्वतः करायचे. अगदी शेवटचे काही दिवस त्यांना थोडा त्रास झाला असेल तोच. त्यापलिकडे काही नाही. त्यांना आरोग्याचं वरदानच होतं म्हणा ना. खणखणीत बोलणं, अधून मधून तिरकस विनोद करण्याची वृत्ती आणि स्मरणशक्ती या गोष्टी अखेरपर्यंत कायम होत्या.



प्रचाराला मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही मिळणं कठीण, झोपडपट्ट्या ऑप्शनला टाकणं किंवा उमेदवार पराभूत होणार हे माहिती असूनही जीव तोडून प्रचार करणं इथपासून अनंतराव पक्षासाठी झटत होते. त्यामुळे अनंतरावांना सध्याचे दिवस एकप्रकारे आनंद देणारेच म्हटले पाहिजे. एकीकडे धीरजनं प्रचंड मेहनतीनं बांधलेला आमचा वॉर्ड आणि संघटन कौशल्याच्या आधारावर जोडलेले असंख्य कार्यकर्ते आणि दुसरीकडे सलग दुसऱ्यांदा स्वबळावर केंद्रामध्ये सत्तेवर आलेला भारतीय जनता पक्ष… दोन से दोबारा हे दृष्य अनंतरावांनी याचि देही याचि डोळा पाहिले.

लोकमान्यनगरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे तीन खंदे आधारस्तंभ गेल्या वर्षभरात काही महिन्यांच्या अंतराने मरण पावले. पहिले प्रा. शरद वाघ, दुसरे आमच्या भागात संघाचे काम रुजविणारे-वाढविणारे भालचंद्र कोल्हटकर तथा भालजी आणि आता अनंतराव जोशी. प्रत्येकाचा कॅनव्हास वेगळा. कामाचा आयाम वेगळा. कामाची व्याप्ती वेगळी. पण विचारांवर निष्ठा, समर्पित वृत्ती आणि कामाचा झपाटा एकसमान.

आयुष्यभर ज्या विचारासाठी खस्ता खाल्ल्या त्या विचाराला देशातील जनतेने बहुमताने आपलेसे केले आहे, स्वीकारले आहे, ही परिस्थिती अशा सर्व समर्पित कार्यकर्त्यांसाठी दिलासादायक अशीच आहे.


विनम्र आदरांजली...

No comments: