Showing posts with label Habibganj. Show all posts
Showing posts with label Habibganj. Show all posts

Friday, March 15, 2013

हिंदुस्थान का दिलदार दिल…




चलो भोपाळ...
 मध्य प्रदेशात दुसऱ्यांदा आणि भोपाळमध्ये पहिल्यांदाच चाललो असल्यामुळं शहराबद्दल प्रचंड उत्सुकता होती. आधी एकदा भावाच्या लग्नासाठी इंदूरला गेलो होतो. पण तेव्हा पाचवी-सहावीत होतो. शिवाय ती ट्रीप अगदी धावपळीची झाली होती. त्यामुळं इंदूरला फक्त जाऊन आलो होतो. यंदा मात्र, मला भोपाळ एन्जॉय करायचं होतं. भारतातील इतर अनेक शहरांप्रमाणेच हे शहरही जुने भोपाळ आणि नवे भोपाळ असे विभागलेले आहे. जुन्या शहराचा तोंडावळा मागास किंवा अविकसीत आणि नवे भोपाळ चकाचक आणि सोयीसुविधांनी उपयुक्त असे. मुस्लिम नागरिकांची टक्केवारी साधारण १२ ते १५ टक्के. पण तरीही सध्या हे शहर दंगलींमुळे फारसे चर्चेत नसते. बाबरी मशीद कोसळल्यानंतर उसळलेल्या दंगलीत शंभर सव्वाशे जणांचा बळी गेला होता. त्यानंतर किरकोळ दगडफेक वगळता दंगल झालेली नाही, अशी माहिती आमचे ‘साम’ मित्र शरद व्दिवेदी यांनी दिली. त्यांच्याबरोबरच शहराची सफर घडली आणि शहराची माहितीही समजली. भोपाळमध्ये फिरताना अनेक चढउतार जाणवतात. एखाद्या डोंगराळ भागात शहर बसल्यासारखं वाटतं.

मुळात भोपाळ हे तसे राजधानीचे शहर वाटत नाही. म्हणजे इथं उड्डाणपूल नाहीत. मॉल किंवा मल्टिप्लेक्सही अगदी आता आता येऊ लागलेत. मार्केट पण तुलनेने खूप मोठे नाही. मेट्रो नाही, वाहतूकही फार वेगवान नाही. धावपळ नाही आणि लगबगही नाही. शिवाय भोपाळ इंदूरपेक्षाही छोटे. इथे फारसे उद्योग धंदेही नाहीत. स्वतःचा व्यवसाय, सरकारी नोकरी, बँका, शाळा-कॉलेजे आणि इतर सरकारी आस्थापनांमध्ये नोकरी हे रोजगाराचे स्रोत. कंपन्या, कारखाने किंवा सध्या भरात असलेली आयटी यापासून भोपाळ दूरच आहे. पण इथली माणसं दिलदार आहेत. खुल्या आणि मोठ्या मनाची आहेत. आदरातिथ्य करायला हात आखडता घेणारी नाहीत. 

इथल्या मंडळींचं हिंदी एकदम शुद्ध, अस्खलित आणि गोड. मिठ्ठी हिंदी. साजूक तुपातील जिलबी जशी असते, अगदी तश्शी गोड. मराठी भाषेत जशी पुण्याची मराठी शुद्ध आणि मस्त आहे, तशीच भोपाळ किंवा माळवा प्रांतातील हिंदी एकदम शुद्ध आणि गोड. त्यांनी हिंदीत बोलत रहावं आणि आपण तल्लीन होऊन ऐकत रहावं, असंच वाटतं. अनेक शब्दही एकदम खास हिंदीतील. आमचा कार्यक्रम होता त्या हॉलला नाव होतं, विज्ञान विमर्श विथीका... विज्ञान विमर्श कळलं हो.. पण विथीका म्हणजे काय. विथीका म्हणजे गंभीर चर्चा करण्याची किंवा विचार विमर्श करण्याची जागा. आता आपल्या इथल्या एखाद्या व्यक्तीचं हिंदी कितीही चांगलं असलं तरी असले शुद्ध शब्द ऐकल्यानंतर विकेट जायचीच. तशी आमचीही विकेट गेली. मग अनेक जणांशी बोलल्यानंतर या शुद्ध हिंदी शब्दाचे अर्थार्जन झाले. गमतीचा भाग सोडला तरी भोपाळमध्ये हिंदी ऐकण्यास एकदम मधुर वाटते.

बडा तालाब…
प्रकाश झा यांच्या बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग भोपाळमध्ये झालेले आहे. त्यापैकी राजनिती चित्रपटाचा क्लायमॅक्स जिथं होतो, ते तलावाशेजारचं विस्तीर्ण मैदान हे आमचा सेमिनार होता, त्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर. मैदानाच्या बाजूलाच मोठ्ठा तलाव आहे. याच तलावातून भोपाळला पाणी पुरविलं जातं आणि आजूबाजूच्या गावांना शेतीसाठी पाणी दिलं जातं. पाण्याची योग्य ती पातळी राखण्यासाठी एक छोटं धरणही तिथं आहे. हाच तलाव शहरातील मुख्य अशा बडा तालाबला जोडला गेलेला आहे. हा बडा तालाब जवळपास पंधरा अठरा किलोमीटर पसरलेला आहे. तेच शहरातील प्रमुख आकर्षण केंद्र आहे. हा तलाव रात्री मुंबईतील क्वीन्स नेकलेस सारखा भासतो. संध्याकाळी हवा खायला किंवा फिरायला, रात्री आइस्क्रिम-ज्यूससाठी इथं येतात. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उभारलेलं भारत भवन, नवी विधानसभा, सचिवालय, मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे निवास्थान अशा महत्त्वाच्या अनेक इमारती याच परिसरात आहेत. व्दिवेदी यांच्या गाडीतून या सर्व ठिकाणांची सफरही झाली.

पोहे नि जिलेबी…
सकाळी सातच्या सुमारास भोपाळ स्टेनशवर उतरलो आणि मुख्य गेटमधून बाहेर पडलो. समोर पाहतो तर नाश्त्याचे ठेले आमच्या स्वागतासाठी सज्ज होते. मदनमहाराज का हॉटेल हे त्यातल्या त्यात मोठं. शेजारीच असलेल्या एका ठेल्यामध्ये आम्ही शिरलो. कडकडून भूक लागली होतीच आणि ठेल्यावर सजविलेले पोहे वगैरे पाहून तर भूक आणखीनच चाळवली गेली. कचोरी उसळ, सामोसा उसळ, पोहे उसळ, पोहे-जिलेबी असा भरभक्कम नाश्ता तिथं उपलब्ध होता. पोहे-जिलेबी हा नाश्ता भोपाळमधील (कदाचित मध्य प्रदेशमधीलही) सर्वाधिक लोकप्रिय आणि सहज उपलब्ध होणारा नाश्ता आहे, असं मला तिथल्या तीन-चार दिवसांच्या मुक्कामादरम्यान समजून गेलं. भोपाळवासिय पोह्यांवर मनापासून प्रेम करतात. कारण पुढले तीनही दिवस सकाळी नाश्त्यासाठी पोहे-जिलेबी होतेच.


पोहे हा माझाही विक पॉइंट असल्यामुळं माझी ऑर्डर तीच होती. लिंबू-मिरची आणि टोमॅटो लावून मस्त सजवलेले पोहे पाहिल्यानंतर कोणीही तीच ऑर्डर केली असती. अगदी आपल्या घरी करतात तसेच पोहे, त्यावर इंदौरी शेव, त्यावर जीरामण म्हणजे खास इंदौरी मसाला आणि त्यावर छोले. व्वा… व्वा… जीरामण म्हणजे सगळीकडे चाट मसाला म्हणून जी पावडर विकली जाते, त्याच्या जवळपास जाणारा पण त्यापेक्षा खूपच चांगला असा मसाला. जीरे, हिंग, सैंधव (काळे मीठ), मोठी दालचिनी, लवंग आणि गरम मसाल्याचे आणखी काही पदार्थ असे एकत्र कुटून हे जीरामण तयार होते. चवीला आंबट गोड आणि काहीसे तिखट असलेले जीरामण एकदम पाचक. त्यामुळे कितीही खाल्ले तरी काही फिकीर नाही. (अर्थात, जीरामण आहे म्हणून उगाच जास्त खा... खा... खायची आवश्यकता नाही...)

जेवण आणि नाश्त्यामध्ये कांद्याचे प्रमाण वाढण्याची सुरूवात कदाचित मध्य भारतापासून होत असावी. कारण इथं पोह्यांवर कांदा टाकणं मस्ट आहे. सक्काळी सक्काळी कांदा खायचा नसल्यामुळं त्यानं घातलेला कांदा बाजूला काढून पोहे खाल्ले. भल्या सकाळी अशा जबरदस्त नाश्त्याने आमच्या दिवसाची सुरूवात झाली. एक प्लेट पोहे झाल्यानंतर आम्ही (मी आणि मि. प्रणव पवार) जिलेबीची प्लेट मागविली. जिलेबीही एकदम जबरी. बेतास बेत गोड आणि गरर्मागरम. जिलेबीच्या पिठात केशरी किंवा पिवळा असा कोणताच रंग मिसळत नसल्यामुळं खरपूस तळल्यानंतर येणारा रंग हाच जिलेबीचा रंग असतो, हे वेगळेपण.

भोपाळमध्ये नाश्ता भलताच स्वस्त आहे. म्हणजे पोहे, जिलेबी, सामोसा, पॅटिस किंवा कचोरी काहीही घ्या अवघ्या पाच रुपयांमध्ये. अर्थात, टपरी किंवा गाडीवर मिळणाऱ्या गोष्टींचे हे भाव आहेत. म्हणजे आपल्याकडे गल्लोगल्ली पोहे-उप्पीटच्या गाड्या असतात तसं. आता तिथंही दहा-बारा रुपये अगदी सहज घेतात. त्या तुलनेत पाच रुपये अगदीच स्वस्त म्हटलं पाहिजे.

मानव स्वास्थ्य हर्बल उद्यान
 इंडियन मीडिया सेंटरची वार्षिक बैठक भोपाळमधील विज्ञान आणि प्रौद्योगिकी भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील चर्चासत्र, कार्यक्रम, प्रदर्शनी वगैरे आयोजित करण्यासाठी एक हक्काची जागा. त्याठिकाणी राहण्याची तसेच सेमिनार हॉल वगैरेची एकत्रित व्यवस्था असल्याने आमची व्यवस्था तिथेच करण्यात आली होती. या विज्ञान भवनच्या परिसरात जाणवलेली थोडीशी निराळी गोष्ट म्हणजे मानव स्वास्थ्य हर्बल उद्यान… असं उद्यान किंवा छोटीशी बाग कुठं आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण ती कल्पना नक्कीच दाद देण्यासारखी होती.




मानव स्वास्थ्य हर्बल उद्यान म्हणजे, एका छोट्याशा बागेत मनुष्याच्या शरीराच्या रचनेसारखी आकृती तयार केली आहे. त्यामध्ये शरीराचे वेगवेगळे भाग कप्प्यासारखे दाखविण्यात आले आहेत. म्हणजे डोके, गळा, छाती, हृदय, पोट वगैरे वगैरे. प्रत्येक कप्प्यात संबंधित अवयवाला होणाऱ्या रोगांवर आयुर्वेदात कोणती वनस्पती उपचारांसाठी वापरतात, त्या वनस्पती आहेत. अर्थात, केसांसाठी महाभृंगराज किंवा मेहंदी, हृदयासाठी सिंदूर, गळ्याला तुळशी, डोळ्यांसाठी गुलबकावली, नाकासाठी लसूण आणि इतर अवयवांसाठी इतर अनेक वनस्पती. मेहंदी, सिंदूर, गुलबकावली, लाजाळू आणि असंख्य वनस्पतींची माहिती इथं उपलब्ध आहे. शिवाय कोणती वनस्पती कोणत्या अवयवासाठी लाभदायक आहे, याचाही उलगडा होतो.

हीच खरी राष्ट्रीय एकात्मता
दोन दिवसांच्या सेमिनारमध्ये रात्रीच्या भोजनात दालबाटी चूर्मा, कढी चावल असा मस्त मेन्यू ठेवण्यात आला होता. त्यामुळं ताव मारणं आलंच. पण हा मेन्यू रात्री असल्यामुळं थोडं हातचं राखूनच ताव मारला. दालबाटी आणि चूर्मा हा राजस्थानी पदार्थ असला तरी मध्य प्रदेशातही हे पदार्थ लोकप्रिय आहेत. बरं हे तयार करणारा मुख्य आचारी मिश्रा आणि त्याच्या हाताखाली काम करणारी मंडळी उत्तर प्रदेशातील. (राज ठाकरे यांच्या भाषेत भैय्या.) पदार्थ राजस्थानी, ठिकाण मध्य प्रदेश, तयार करणारे उत्तर प्रदेशी आणि खाणारे नवी दिल्ली, महाराष्ट्र, चंडीगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामधील. भारतातील पदार्थ माणसांना जोडतात, ही थिअरी सिद्ध करण्यासाठी आणखी काय पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मता म्हणतात, ती हीच नाही का.


हलकी तिखट आणि घट्ट अशी डाळ, साजूक तुपात तळलेले कणकेच्या पिठाची बाटी. सोबतीला वांग्याची झणझणीत भाजी. रव्याचा लाडू आणि कढी भात. आहाहाहाहाहाहा… अर्थात गुजराती किंवा महाराष्ट्रीयन थाळीत मिळते त्यापेक्षा ही कढी वेगळी. आपल्याकडे ताक असेल तशी कढी असते. आंबट-गोड. गुजराती थाळीमध्ये मिळणारी कढी ही गोड असते. मात्र, राजस्थानी कढीचावलमध्ये आम्हाला तिखट कढी मिळाली. त्यामध्ये गोळे मिसळलेले होते. म्हणजे जशी गोळ्यांची आमटी असते तशीच गोळ्यांची कढी. गुजराती कढीपेक्षा हा स्वाद तसा फिकाच वाटला.

फिक्यावरून आठवलं, इथला साधा चहा एकदम फिका असतो. म्हणजे कमी गोड. शिवाय चहामध्ये दुधाचे प्रमाणही अधिक. मात्र, उकळी कमी. त्यामुळे चहा तसाही फिक्काच वाटतो.

स्टेशनवर तब्बल पाच तास
जाताना पुणे-लखनऊ गाडीचे रिझर्व्हेशन मिळाले होते. मात्र, येतानाचे ह. निजामुद्दीन-म्हैसूर सुवर्णजयंती एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन प्रचंड सेटिंग लावल्यानंतरही कन्फर्म झाले नाही. कारण त्या गाडीला भोपाळमधून फक्त दोनच कोटा होता. त्यामुळं त्या गाडीचं तिकिट रद्द करून रात्रीच्या झेलम एक्स्प्रेसचं (खरं तर पॅसेंजर) तिकिट काढलं आणि रिझर्व्हेशन कन्फर्मही झालं. पण झेलम एक्स्प्रेम तब्बल पावणेसहा तास उशिरा होती. म्हणजे हळूहळू हा उशीर वाढत जात होता. सुरूवातीला एक तास मग दोन, अडीच असं करत झेलमनं पाचचा आकडा गाठला. मग काय येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे बोर्ड वाचणे आणि सेमिनारमध्ये मिळालेल्या साहित्याचा फडशा पाडणे असे दोनच कार्यक्रम उरले होते. पण तेही फार काळ टिकले नाही. 

पूर्वी शाळेमध्ये रेल्वे स्टेशनवर एक तास किंवा दोन तास वगैरे विषय निबंध लिहिण्यासाठी असायचे. तेव्हा आपण मारे पानेच्या पाने भरभरून लिहायचो. रेल्वे स्टेशनचं वर्णन करायचो. किती मज्जा येते वगैरे लिहायचो. पण रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहत थांबल्यामुळं मनस्ताप होतो, हे मला त्या दिवशी कळलं. परीक्षेमध्ये असले निंबध लिहायला लावणाऱ्या शिक्षकांना रेल्वे स्टेशनवर रात्री अपरात्री पाच तास थांबण्याची शिक्षा द्यायला हवी, खरं तर. उगाच काहीतरी निबंध लिहायला सांगतात. असो.

शिवाय वेळही रात्रीची असल्यानं आणि स्टेशनही हबीबगंज असल्यानं (पुण्याच्या शिवाजीनगरसारखं) माहोलही फारसा नव्हता. त्यामुळं वेळ कसा घालवावा, असा प्रश्नच पडला होता. अखेरीस १० वाजून १० मिनिटांनी येणारी झेलम सकाळी ३ वाजून ५५ मिनिटांनी आली. दिवसभरही ती गाडी डकाव डकाव करतच चालली होती. म्हणजे दुपारी अडीचला पोहोचणारी गाडी रात्री आठ वाजता पुणे स्टेशनात दाखल झाली. खरं तर रेल्वे प्रवास जिव्हाळ्याचा पण प्रथम या झेलम एक्स्प्रेसच्या प्रवासाचा तिटकारा आला… अर्थात, भोपाळ दौऱ्याचा शेवट रटाळ असला तरी आठवणी मधुर आहेत.

भोपाळमध्ये भेटलेल्या माणसांविषयी पुढील ब्लॉगमध्ये...