Monday, April 04, 2011

हटविलेला पुतळा कण्णगी यांचा

चेन्नईतही पुतळ्याचे राजकारण

पुतळ्यावरून झालेले रणकंदन आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या काळोखात अचानकपणे हलविला गेलेला पुतळा... पुण्यात घडलेल्या या घटनेसारखीच घटना चेन्नईमध्येही घडली होती, जवळपास दहा वर्षांपूर्वी. रातोरात हटविल्या
गेलेल्या पुतळ्यामुळे संपूर्ण तमिळनाडूत त्याचे तीव्र पडसाद उमटले होते आणि साहित्यिक, कलावंत सामान्य नागरिकांनही त्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. हटविण्यात आलेला पुतळा होता महिलांच्या न्यायासाठी झगडणा-या आणि तमिळ महिलांचा आदर्श असलेल्या कण्णगी यांचा.

आठव्या शतकातील एका तमिळ महाकाव्यामध्ये कण्णगी या नायिका असून त्यांनी न्यायाच्या रक्शणासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला, असे त्या महाकाव्याचा आशय आहे. त्यामुळे गेल्या अनेक शतकांपासून कण्णगी या तमिळ अस्मितेच्या मानबिंदू बनलेल्या आहेत. कण्णगी हे पात्र काल्पनिक असले तरी
तमिळनाडूच्या काही भागात त्यांची आजही पूजा केली जाते. १९६८ साली झालेल्या वर्ल्ड तमिळ क़ॉन्फरन्समध्ये ठराव केल्यानंतर कण्णगी यांचा पुतळा मरीना बीच येथे बसविण्यात आला होता. पण २००१ मध्ये अण्णा द्रमुकचे
सरकार सत्तेवर असताना तो पुतळा एकाएकी रात्री अचानक हलविण्यात आला. त्यावेळी अण्णा द्रमुकचे . पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री होते. जयललिता यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी
पनीरसेल्वम आले होते.



पुतळा हटविण्याची तीन वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पहिले कारण म्हणजे जयललिता यांच्यावर ओढविलेले संकट हे कण्णगी यांच्या पुतळ्यामुळे आलेले आहे. तो पुतळा त्याठिकाणी असल्यामुळेच जयललिता यांचा कठीण काळ सुरु झाला आहे, असे कोणीतरी जयललिता यांच्या मनात भरविल्यामुळेच तो पुतळा हटविण्यात आला, अशी एक थिअरी आहे. दुसरे म्हणजे कण्णगी यांच्या पुतळ्याची पाठ समुद्राकडे आहे, त्यामुळे पावसाने तमिळनाडूकडे पाठ फिरविली आहे, अशा कंड्या कोणीतरी पिकविल्या आणि त्यामुळे पुतळा हटविण्यात आला, असे काही जण सांगतात. अर्थात, सरकारने दिलेले कारण म्हणजे वाहतुकीला होत असलेला अडथळा. एका वाहनाने कण्णगी यांच्या पुतळ्याला धडक दिली होती, त्यामुळे तो दुरुस्तीसाठी हटविण्यात आला, अशी माहिती मुथ्थू रामचंद्रन यांनी दिली.

पुतळा हटविण्यात आल्यानंतर राज्यभरात सर्वत्र हलकल्लोळ माजला होता. लोकांनी निषेध मोर्चे काढले. विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण जयललिता या कोणालाही बधल्या नाहीत. पुतळ्याला हानी पोहोचू नये, म्हणून तो वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. पुतळा सुस्थितीत आहे, इतकेच जयललिता आणि पनीरसेल्वम माध्यमांना सांगत होते.

पुतळा हटविण्याचा विषय २००६ साली झालेल्या निवडणुकीचा मुद्दा झाला होता. पुन्हा सत्तेवर आलो तर पूर्वीच्याच ठिकाणी पुतळा पुन्हा सन्मानाने बसवू, असे आश्वासन करुणानिधी यांनी दिले होते. ते त्यांनी पाळले देखील. आज
कण्णगी यांचा पुतळा मरीना बीचवर मोठ्या दिमाखात उभा आहे. त्या पुतळा हटविण्याचा आणि पुन्हा बसविल्याचा उल्लेख करण्यास करुणानिधी अजिबात विसरलेले नाहीत.

बसमधून प्रवास करताना एका सहप्रवाशाला विचारले, की यंदा जयललिता सत्तेवर आल्यातर पुन्हा पुतळा हटवतील का? त्यावर त्याने उत्तर दिले, सरकार कोणाचे येणार याचा अंदाज अजून राजकीय पक्शांनाही आलेला नाही. त्यामुळे आपण येणार की नाही, याच चिंतेत ते आहेत. त्यामुळे त्यांना पुतळ्या बितळ्याची चिंता
सध्या नाही. तो नंतरचा प्रश्न आहे.

एसएसएम क़ॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्शण घेणा-या महेशकुमारला पुतळ्याबद्दल विचारले तर तो म्हणाला, नो आयडिया सरजी. आता बोला.

एमजीआर यांच्या घड्याळाची टिकटिक...
मरीना बीचवरच तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि तमिळनाडूतील सर्वाधिक लोकप्रिय सुपरस्टार एम जी रामचंद्रन यांची समाधी आहे. २४ डिसेंबर १९८७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे दुःख सहन झाल्यामुळे तमिळनाडूत त्यावेळी ३० जणांनी आत्महत्या करून आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या बरोबरच जीवन संपविले होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी मरीना बीच येथे एमजीआर यांची समाधी बांधण्यात आली आहे. द्रविडीयन चळवळीचे प्रमुख नेते अण्णादुराई आणि एमजीआर यांची समाधी शेजारीशेजारीच आहेत.

एमजीआर यांना महागडी घड्याळे जमविण्याचा आणि घालण्याचा मोठा शौक होता. त्यामुळे एमजीआर यांच्या काही अस्थि आणि त्यांच्या आवडीचे घड्याळ समाधीखाली ठेवण्यात आलेले आहे संपूर्ण काळ्या कुळकुळीत कडप्प्याने ही समाधी साकारलेली आहे. मध्यंतरीच्या काळात कोणीतरी अशी आवई उठविली की, समाधीच्या पृष्ठभागाला कान लावले, की अजूनही एमजीआर यांच्या घड्याळाची टिकटिक ऐकू येते. (पुण्यातही शनिवारवाड्यावर अजूनही काका, मला वाचवा, असे आवाज येत असल्याची अफवा गमतीनं का होईना कानावर येतेच) समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेले लोक दर्शन घेण्यापूर्वीच समाधीला कान लावून खरंच टीकटीक
ऐकू येते का? ते पाहतात.



वास्तविक पाहता २४ वर्षांनंतर घड्याळाची टीकटीक कशी ऐकू येईल? पण आजही अनेक जण नित्यनियमाने कान लावून आवाज येतो का? ते ऐकतात. अगदी जीन्सची पँट आणि टी-शर्ट घातलेले तरुण-तरुणी यांनाही मोह आवरता येत नाही. मग काय, मी देखील उत्सुकतेपोटी समाधीला कान लावून काही ऐकू येतंय का, ते पाहिलं.
पण अपेक्शेप्रमाणे काहीच ऐकू येत नव्हतं. माझ्यानंतर एका क़ॉलेजमधल्या तरुणानं कान लावला. त्यालाही काही ऐकू आलं नाहीच. त्याला विचारलं, काही ऐकून आलं का? हे सगळे मूर्ख आहेत, हे वाक्य उच्चारण्यापूर्वी त्यानं जो
एक शब्द (खरं तर अपशब्द) उच्चारला तो ऐकून पुण्यातच असल्याचा भास झाला आणि धन्य झालो.

आजचे वाक्यः बसमधून प्रवास करताना शेजारी बसलेल्या एका मुलाला विचारलं,
मला तमिळ शिकायचंय, हे तमिळमध्ये कसं बोलणार?
तो म्हणाला, नानकू तमिळ कोत्तुकोनम्...

तमिळनाडू डायरी...

खरा प्रचार चॅनल्सवरूनच

तमिळनाडू म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं मोठमोठाले फ्लेक्स, भव्य कटआऊट्स आणि फ्लोरसंट रंगांनी रंगविलेल्या भिंती. चित्रपटातील नटनट्यांचे मोठमोठाले फ्लेक्स पाहून राजकीय नेत्यांचेही तसेच भव्य फ्लेक्स वगैरे असतील, अशी धारणा होती. पण निवडणूक आयोगाच्या निर्बंधांमुळं इथं ते काहीही नाही. भव्य फ्लेक्स आहेत. पण ते द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या कार्यालयांमध्ये. प्रचाराचा विचार करता रस्त्यांवर शुकशुकाट आहे. मधूनच एखाद दोन रिक्शा द्रमुक किंवा अण्णा द्रमुकचे झेंडे लावून चाललेल्या दिसतात. पण बाकी सारे शांतशांतच.



नुसते रस्तेच नाही तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक या राज्यातील दोन प्रमुख कार्यालयांमध्येही शुकशुकाट. नेते नाहीतच आणि त्यामुळे कार्यकर्तेही नाहीत. आहेत फक्त सिक्युरिटी गार्डस आणि पोलीस. हाताच्या बोटावर मोजण्याइतके जे कार्यकर्ते दिसतात ते आपापल्या भागात प्रचार करताना येणा-या अडचणी सांगायला आलेले. द्रमुक अध्यक्श एम. करुणानिधी, त्यांचे पुत्र स्टॅलिन आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जे. जयललिता यांनी सध्या चेन्नई आणि परिसरावर लक्श केंद्रीत केले आहे. जयललिता यांनी शुक्रवारी संध्याकाळी चेन्नई शहरात रोड शो घेऊन मतदारांशी संवाद साधला. तर स्टॅलिन हे शनिवारी कोळथ्थूर (चेन्नई ग्रामीण) या त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात प्रचार करणार आहेत. रविवारी कलैंग्नार करुणानिधी यांची चेन्नईमध्ये जाहीर सभा आहे.

प्रचाराची खरी रंगत येते आहे, ती कलैंग्नार आणि जया टीव्ही या दोन चॅनल्सवर. कलैंग्नार हा करुणानिधी यांच्या मालकीचा चॅनल. तर जयललिता या जया टीव्हीच्या मालकीणबाई. अण्णा अरिवालयम इथं कलैंग्नार टीव्हीचं मुख्य कार्यालय आणि तिथंच द्रमुकचं हेडऑफिस. तर पोएज गार्डनमध्ये जे. जयललिता यांचा बंगला आणि शेजारीच जया टीव्हीचं हेडक्वार्टर. करुणानिधी यांच्या जाहीर सभा कलैंग्नारवरून लाईव्ह टेलिकास्ट केल्या जात आहेत. तर जयललिता यांचे रोड शोमधील भाषण जया टीव्हीवरून दिवसभर ऐकायला मिळतं. भाषा कळत नसली तरी जयललिता सगळीकडे एकच भाषण करतात, हे कळतं. ते देखील समोर लिहिलेल्या कागदावर वाचून. उलट करुणानिधी हे भाषणामधून मनमोकळा संवाद साधतात.

डीएमडीके पक्शाचे अध्यक्श आणि तमिळ अभिनेते विजयकांत यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानफटात लगाविल्याचे वृत्त सध्या इथल्या टीव्हीवर चर्चेने चघळते जाते आहे. विजयकांत यांची जयललिता यांच्याशी युती असल्याने जया टीव्हीवर त्या वृत्ताला थारा नाही. मात्र, कलैंग्नार आणि सन टीव्हीवर प्रत्येक बातमीपत्रात वारंवार ते दृष्य दाखवून चघळलं जातंय. सन टीव्ही हा दयानिधी कलानिधी मारन यांच्या मालकीचा चॅनल आहे. शिवाय दक्शिणेच्या चार राज्यांमधील ८५ टक्के केबल व्यवसाय करुणानिधी आणि कुटुंबीयांच्या हातात आहे.



इथं, जाणवलेला आणखी एक प्रकार म्हणजे लोक आपापल्या नेत्याबद्दल भरभरून बोलतात. मत देऊन आम्हाला काय फायदा, आम्ही मतदान केल्यामुळे थोडाच फरक पडणार आहे, आम्ही मतदानच करत नाही, असली वाक्य इथं ऐकायलाही मिळत नाही. अम्मा किंवा कलैंग्नार यापैकी त्याच्या आवडत्या व्यक्तीचे कौतुक तो सुरुच करतो. नुसतं कोण असं नाही तर ती व्यक्ती का पाहिजे, ते देखील दोन-चार वाक्यांमध्ये सांगतो. अर्थात, ते आपल्याला कळत नाही. पण भावना पोहोचतात.

चेन्नई म्हणजे दुसरी मुंबई. एक तर प्रशस्त रस्ते. दुसरं म्हणजे शहरातील बसव्यवस्था एकदम उत्तम आणि तिसरं म्हणजे समुद्र किनारा जवळच असल्यामुळं घाम आणि उकाडा यांचा अतूट संबंध. सकाळी आठ वाजताच अकरा साडेअकरा वाजल्यासारखं वाटतं. पण संध्याकाळ नंतर गार वारे वाहू लागल्यानंतर बरं वाटतं. इथले लोक तोडकं मोडकं हिंदी बोलतात. पण त्यापेक्शा उत्तम हिंदी बोलतात. तमिळा... असं म्हणून आपल्याला तमिळ येतं की नाही, याची खात्री करून घेतात आणि मग गाडी इंग्लिशकडे वळवितात. अर्थात, तरुण तरुणी मात्र, अधिक चांगल्या पद्धतीने हिंदीतून संवाद साधतात.

लिंबू सरवतवाल्याकडून शिकलेला आजचा तमिळ शब्दः नन्ड्री (धन्यवाद)

Tuesday, March 22, 2011

कावळे, चिमण्या, कबुतरं, खारूताई


आमचे रोजचे पाहुणे
तमाम पर्यावरणवादी मंडळींना हेवा वाटावा, असं चित्र गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या घरी रोज सकाळी दिसतंय. कावळा, चिमण्या, कबुतरं आणि अहो, आश्चर्यम म्हणजे चक्क खारूताईचं देखील आमच्या घराच्या खिडकीत रोज सकाळी आगमन होतं. अगदी न चुकता. ही मंडळी येतात आणि कोणतीही कुरबूर न करता खिडकीमध्ये ठेवलेल्या पदार्थांवर जोरात ताव मारतात. खरं, तर कावळ्यावर लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये याबद्दलचा ओझरता उल्लेख केला होता. पण आता न रहावल्यामुळं त्यावरच स्वतंत्र ब्लॉग लिहित आहे.

आई असल्यापासून आमच्याकडे एक पद्धत होती आणि अजूनही ती सुरु आहे. ती म्हणजे सक्काळी सक्काळी कुकर झाल्यानंतर गरमा गरम वाफाळलेला भात खिडकीतील कावळे आणि चिमण्यांना वाढायची. साधारणपणे १९७७ किंवा ७८ पासून असेल. मग भात वाढल्यानंतर कावळे, चिमण्यादेखील अगदी निर्धास्तपणे आमच्या खिडकीत येऊन मेजवानी झोडतात. कधी भात वाढायला उशीर झाला, की त्यांची कावकाव सुरु होते. कावळ्यांच्या पोटातही कावळे कोकलतात, याचा प्रत्यय आम्ही खूप पूर्वीपासून घेतो आहोत. जेव्हा केव्हा बाहेरगावी जातो, तेव्हा त्या बिचाऱ्यांचं काय होत असेल, असा विचारही मनात येऊन जातो.

अनेक वर्षांनंतर आजही आम्ही ती पद्धत जपली आहे. बदल फक्त इतका झाला आहे, की आता भातबरोबरच तुकडे केलेल्या पोळ्या, भिजविलेले पोहे, पोहे, भिजविलेला साबुदाणा, खिचडी, मुरमुरे अशी पदार्थांची रेलचेल झाल्यामुळे तमाम पक्शी एकदम खूष आहेत. घरात जे शिजतं ते आम्ही पहिल्यांदा त्यांना वाढतो. त्यामुळं जे शिजतं ते खाण्याची संधी त्यांना मिळते. पदार्थ जसे वाढले तसे पक्शीही वाढले आहेत. पूर्वी फक्त कावळे, चिमण्या आणि कबुतरं यायची. आता साळुंकी आणि अनोळखी पक्शी येऊनही आडवा हात मारताना दिसतात. फक्त पक्शीच नाही तर इटुकली पिटुकली खारूताई देखील येऊन पदार्थ फस्त करताना दिसते. रोज सकाळी पदार्थ वाढले की खारूताई आलीच म्हणून समजा.

मुक्या जीवांना खाल्ल्यानंतर पाणी पण प्यावंसं वाटत असेल, अशी आमची भाबडी समजूत असल्यामुळे आम्ही आता खलबत्त्यातील खलामध्ये त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवतो. या मंडळींचा इतका राबता इतका असतो, की साधारणपणे तास दीड तासात ते पाणी संपत. मग पुन्हा एकदा तो खल भरून ठेवावा लागतो. आपल्यालाच जर उन्हाळ्यात इतकी तहान लागत असेल तर उन्हातान्हात फिरणाऱ्या त्या मुक्या बिचाऱ्यांना किती तहान लागत असणार याचा विचारच केलेला बरा.


आमच्याकडे येणाऱ्या या पक्शांचं पण अनेकदा कौतुक वाटतं. गरमागरम पदार्थ वाढल्यानंतर जेव्हा एखादा पक्शी खिडकीत येतो, तेव्हा तो आणखी चार जणांना आरडाओरडा करून बोलावतो. कावळा असो किंवा चिमणी. मग आणखी एक दोन सहकारी येऊन खाऊ गट्टम करतात. पक्शांमध्येही शेअरिंग असतं, हे पाहून खूप गंमत वाटते. कधी कधी ते त्यांच्या इवल्याश्या चोचीमध्ये भाताचं ढेकूळ किंवा पोळ्यांचे तुकडे घेऊन जातात. घरट्यातील त्यांच्या पिल्लांना किंवा उडताही न येणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना नेतात माहिती नाही. पण चोचीत पदार्थ घेऊन भु्र्रकन उडून जातात. कदाचित एकांतात खाण्याची सवय असल्यामुळंही घेऊन जात असतील, देव जाणे.

कावळा तसं पहायला गेलं तर मांसाहारी. पण आमच्याकडे येणारे कावळे इतके शिस्तबद्ध आहेत, की इतक्या वर्षांच्या इतिहासात त्यांनी एकदाही बाहेरून मांसाहारी पदार्थाचा एक तुकडाही आणलेला नाही. पण कावळे जितके शिस्तबद्ध तितकीच कबुतरं बेशिस्त. कबुतर हे शांततेचं प्रतीक वगैरे असेल पण ते अस्वच्छतेचंही प्रतीक आहे. खाण्यासाठी रोज येतात आणि खाण्यापेक्शा इकडेतिकडे उडवाउडवीच जास्त करतात. खाणं कमी आणि चिवडणं जास्त. बरं, फक्त तितकंच नाही तर फक्त खिडकीतच थांबत नाहीत तर घरात येऊनही फडफड करतात. कावळे, चिमण्या किंवा खारूताई यांनी कधीच खिडकीची सीमारेषा ओलांडली नाही. पण कबुतरांनी हद्दच केलीय. बरं, नुसते घरात येत नाहीत तर येताना कधी पालापाचोळा, बारीक बारीक काड्या आणतात आणि घरभर करतात. कधीकधी पंखांची फडफड करून उच्छाद मांडतात. वैताग येतो त्या कबुतरांचा.

काल तर त्या दोन कबुतरांचा इतका राग आला होता, की समोर असते तर चांगली अद्दल घडविली असती. सक्काळी सक्काळी कबुतरं घरात घुसली. साधारणपणे आठची वेळ असेल. आता इतक्या सकाळी कशाला कडमडली काय माहिती. बरं, पंखांचा फडफडाट करून जाताना घरातील ट्यूबलाईट फोडून गेले हरामखोर... खाया पिया बहोत कुछ ट्यूब फोडा पाच पन्नास रुपये. संपूर्ण स्वयंपाकघर ट्यूबलाईटच्या काचांनी भरून गेलं. जळलं मेलं लक्शण त्या कबुतरांचं.... असो काय करणार. काहीही केलं तरी कबुतरं येणं थांबणार नाही आणि त्यांनी येणं थांबवावं, असंही आमचं म्हणणं नाही. पण त्यांनी चिमण्या-कावळ्यांसारखं शिस्तबद्ध तरी असावं, इतकीच आशा आहे. पण त्यांना समजावणार कोण?

बाकी काहीही असो, जे सुरु आहे ते खूप आनंददायी आहे. इथून पुढेही असंच सुरु रहावं आणि अधिकाधिक पक्शी तसंच खारूताया, याव्यात असंच आम्हाला (म्हणजे मला आणि बाबांना) वाटतं. फक्त एक आवाहन असं करावसं वाटतं, की तुम्हालाही जर शक्य असेल तर तुम्हीही या मुक्या पक्श्यांना खायला वाढत जा. खायला देणं शक्य नसेल तर खिडकीत किंवा गच्चीत त्यांच्यासाठी पाण्याची सोय तरी तुम्ही नक्कीच करू शकता. लोक पाणपोया सुरु करुन नागरिकांची सेवा करतात. तुम्ही पक्श्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून मुक्य जीवांची सेवा करा. पहा जमतंय का?

Tuesday, February 15, 2011

नवा बातमीदार

नाकाला पुन्हा मिरच्या झोंबणार

मराठी वृत्तपत्रसृष्टीत पत्रकारितेवर भाष्य करणाऱ्या, टीका करणाऱ्या आणि लोकांचे वाभाडे काढणाऱ्या ब्लॉगची परंपरा आणखी एक पाऊल पुढे गेली आहे. लेट्स भंकस, कळते-समजते, सहयोगी बातमीदार, फेकिंगन्यूज-ब्रेकिंगन्यूज आणि इतर काही ब्लॉगपुरती मर्यादित असलेली ब्लॉग परंपरा आता थेट सातासमुद्रापार गेली आहे. नवा बातमीदार हा नवा ब्लॉग मराठी पत्रकारितेत सुरु झाला असून हा ब्लॉग चालविणारी मंडळी थेॉ अमेरिकेत बसून ब्लॉग चालवित आहेत. (म्हणजे त्यांनी डिक्लेरेशन तरी तसं दिलंय बुवा)

याचाच अर्थ कोणी कोणावर टीका टिपण्णी केली आणि पत्रकाराच्या नाकाला मिरच्या झोंबल्या तरी त्याला हात चोळत बसण्यावाचून काहीही करता येणार नाही, असं दिसतंय. कारण पूर्वीप्रमाणेच हा ब्लॉगही बंद करावयाचा झाल्यास आता थेट अमेरिकेशी पंगा घ्यावा लागणार आहे. कारण आमच्या ब्लॉगमुळे तुमचे चारित्र्यहनन झाले असे वाटत असेल तर तुम्ही आम्हाला बिनदिक्कतपणे कायदेशीर नोटीस पाठवू शकता, असा नवा ब्लॉग नव्या बातमीदारवर पडला आहे. त्यात आयपी अॅड्रेस, संपूर्ण पत्ता आणि संपूर्ण नावही दिले आहे. त्यामुळे ज्यांना अशा ब्लॉगमुळे मनस्ताप होत असेल त्यांनी थेट अमेरिकी सायबर क्राईम डिपार्टमेंटशी संपर्क साधावा.

व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्यावर स्वतः निर्बंध घालायचे. आणि पत्रकारितेवरील स्वातंत्र्याच्या हल्ल्याच्या नावाने गळे काढणाऱ्यांविरोधात असे ब्लॉग वाढत जात आहेत, ही चांगलीच गोष्ट म्हटली पाहिजे. अर्थात, कोणत्याही प्रसंगी वाहवत न जाता इतर ब्लॉगवर आलेली परिस्थिती आपल्यावर ओढवू नये, याची जबाबदारी या ब्लॉगवर आहेच. तेव्हा नव्या सुरुवातीस शुभेच्छा...

नव्या बातमीदारवरील नवा ब्लॉग खालीलप्रमाणे...

लीगल डिसक्लेमर

या ब्लॉग मधील मतांशी आपण सहमत नसाल, आपणास जर अब्रूहनन झाल्यासारखे वाटत असेल तर आपण आम्हाला कायदेशीर नोटीस पाठवू शकता. अशी नोटीस आपण खालील पत्त्यावर पाठवू शकता -

Manish Birla,
Software Analyst, Microsoft,
1065, La Avenida Mountain View,
CA, 94043, US


भारतातील सायबर कायद्यानुसार, भारतीय हद्दीबाहेरील कार्यक्षेत्रातून कार्यान्वित असलेली वेबसाइट अथवा सायबर हालचाल यावर सध्या तरी काही नियंत्रण आणता येत नाही. आंतरराष्ट्रीय सायबर कायद्यानुसार मात्र एखाद्या व्यक्तीला जीवाला धोका संभवत असेल तर सायबर हालचाल रोखण्यासाठी परस्पर सहकार्य वापरले जाते. मात्र आम्ही व्यक्तीस्वातंत्र्य आणि पत्रकारितेच्या उच्च मूल्यांचे पालन करण्यास बांधील आहोत. आपण जर आम्हाला एखाद्या अनुचित बाबीसंदर्शात अमेरिकी कायद्याच्या अधीन राहून भारतातील सक्षम अमेरिकी वकिलातीमार्फत कायदेशीर नोटीस पाठविली तर आम्ही तिचा जरूर स्वीकार करू. त्यामुळेच आम्ही आमची ओळख लपवून ठेवलेली नाही. मात्र आम्ही थर्ड पार्टी सायबर फेसिलीटेटर आहोत, हे कृपया जरूर ध्यानात घ्यावे.

सायबर कायद्यान्वये एखाद्याची अथवा एखादीची फेक (बनावट) प्रोफाईल तयार करून त्या व्यक्तीच्या नावे सायबारविश्वात वावरणे आणि फीशिंग अर्थात आर्थिक फसवणूक हे सर्वात गंभीर गुन्हे मानले जातात. काही प्राथमिक बाबतीत आपण स्वत:ही खबरदारी घेऊन टाळू शकता. काही प्राथमिक बाबी आपण माहितीही करून घेऊ शकता. जसे तुम्ही ज्या संगणकावरून इंटरनेटचा वापर करताय त्याचा युनिक पत्ता अर्थात आयपी एड्रेस; कसा ते इथे बघा! अगदी सोपे आहे, तुम्हालाही सहज जमेल.. 'ई-मेल'ला आलेल्या हेडरवरुन तुम्हाला सायबर विश्वातल्या कुठल्या पत्त्यावरून ते 'ई-पत्र' आलेय ते अगदी काही क्षणात कळेल. ज्या 'आय-पी'वरुन ई-मेल आलाय तो 'आय-पी' इथे टाका आणि सर्च करा. कुठल्या शहरातून, कोणत्या संगणकावरून, कुठल्या इंटरनेट सर्व्हीस प्रोव्हायडरच्या (आयएसपी) कनेक्शनवरुन ई-मेल पाठविला गेला आहे ते कळेल. एव्ह्ढेच काय कुठला ब्राऊझर आहे, कोणती ओपरेटिंग सिस्टीम पाठविणारा वापरतोय हेही कळेल.

आमचे लोकेशन :
My IP address is: 66.45.240.66
My IP Address Location: Secaucus in United States
ISP of my IP: Interserver

Friday, February 11, 2011

सकाळी नऊ वाजताच

धुंधुरमासाचं भरपेट जेवण

सकाळी नऊ वाजता तुम्ही कधी जेवला आहात का? मी जेवलोय. गेल्या रविवारीच सक्काळी सक्काळी भरपेट जेवण्याचा आनंद लुटलाय. निमित्त होतं धुंधुर मासाच्या कार्यक्रमाचं. थंडीच्या मोसमात (बहुधा संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीत) एकेदिवशी सक्काळी सक्काळी एकत्र यायचं आणि थंडीमध्ये पोषक ठरतील, अशा पदार्थांवर ताव मारायचा. लोकमान्य नगरमधील जुने संघमित्र प्रदीप कोल्हटकर यांनी दिलेल्या निरोपाचं बरहुकुम पालन करीत मी धुंधुर मासाचा कार्यक्रम होणार होतो तिथं दाखल झालो. सिंहगड रस्त्यावरील अनुबंध इमारतीच्या टेरेसवर हा कार्यक्रम अगदी दणक्यात पार पडला. (सगळ्यात पहिल्यांदा प्रसाद जोशी या आमच्या लोकमान्य नगरमधील मित्राकडे धुंधुर मासानिमित्ताने जेवलो होतो. काही लोक त्याला धर्नुमास असंही म्हणतात.)

महेश चांडक, अनिल भांबुरकर, सचिन कुलकर्णी, प्रसाद बापट या जुन्या संघमित्रांची आणि नूमविच्या ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापक माधव परांजपे यांची भेट ही धुंधुर मासाच्या कार्यक्रमाइतकीच संस्मरणीय ठरली. सुरुवातीला सचिन कुलकर्णी यांचे छोटेखानी भाषण झाल्यानंतर आम्ही भोजनस्थानी दाखल झालो. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या विश्व संघ शिबिराची माहिती सचिननं दिली. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या सहाय्यानं. संघ बदलत असल्याचं पुन्हा एकदा अनुभवलं. भोजनावर ताव मारण्यासाठी साधारणतः तीस ते पस्तीस जण उत्साहानं आले होते. टेरेसवर मस्त पंगत मांडली होती. बसण्यासाठी सतरंज्या अंथरल्या होत्या. त्यासमोर पानं मांडली होती. दूर कुठेतरी उदबत्ती लावली होती. त्याचा सुवास दरवळत होता. मग सगळे जण पानावर आले. ज्येष्ठ नागरिकांची पंगत खुर्चीवरच बसली.


एकेक पदार्थ पानात पडू लागले आणि पाहूनच मन तृप्त होत गेलं. सुरुवातीला वाढण्यात आला मुळ्याचा चटका. म्हणजे मुळा किसून त्याची फोडणी देऊन केलेली कोशिंबीर. नंतर आली लेकुरवाळी भाजी. भोगीच्या दिवशी घरोघरी ही भाजी केली जाते. गाजर, वांगी, बटाटा, टोमॅटो, पावटा, श्रावण घेवडा आणि इतर अनेक भाज्या एकत्र करून ही भाजी तयार करतात. लेकुरवाळ्या भाजीनंतर वाटीमध्ये गरमागरम वाफाळती कढी वाढण्यात आली. भोजनमंत्र सुरु होण्याआधीच कढीचा एक घोट घेण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.


वाफाळत्या कढीच्या सोबतीला मुगाच्या डाळीची खिचडी आली. ती पण मस्त गरम होती. मला वाटलं सगळं संपलं. पण छे. आता वेळ होती बाजरीच्या तीळ पेरलेल्या भाकरीची. चतकोराचे दोन तुकडे पानात आले. भाकरीवर मस्त लोण्याचा गोळा आला. जवळपास सगळे पदार्थ पानात आल्यानंतर माधवरावांनी खड्या आवाजात भोजनमंत्र म्हटला आणि पुढच्या मिनिटाभरात सगळे जण आक्रमण म्हणत तुटून पडले. आधी गरमागरम कढी-खिचडी खावी का गरम लोणी पाघळलेली भाकरी खावी, या विचारात असतानाच खिचडीला हात घातला आणि सकापाहता पाहता कढी-खिचडीचा फडशा पडला. कढी-खिचडी संपता संपता ताटात गुळाच्या पोळीनं प्रवेश केला. बरं, येताना नुसती आली नाही, सोबतीला चमचाभर तूपही घेऊन आली.

वेळ सकाळी नऊची आणि सहा पदार्थ. इतकं संगळं संपेल की नाही, याची खात्रीच नव्हती. कारण इतक्या सकाळी इतकं भरपेट जेवण करण्याची ही पहिलीच वेळ. (गेल्या दोन-तीन वर्षांतील तरी) पण एकेक पदार्थ इतके चविष्ट होते की विचारता सोय नाही. त्यातही मुळ्याचा चटका सर्वाधिक उजवा (डावीकडे वाढला असूनही) ठरला. कढीपासून सुरु झालेली चवीची चढती भाजणी मुळ्याच्या चटक्यापाशी येऊन थांबली. बाजरीची भाकरी आणि भाजी, कढी आणि खिचडी सोबतील मुळ्याचा चटका आणि गुळाच्या पोळीचा गोडवा. आणखी काय पाहिजे. मस्त दिलखुष आणि पेटही खूष. सगळ्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारल्यानंतर सर्वजण पानांवरून उठले.



मग माझा शोध सुरु झाला की, बाबा हे जेवण कोणी केलंय. प्रदीपला विचारल्यानंतर तो म्हटला, की माधवराव यांच्या मिसेसने हा सारा स्वयंपाक केला आहे. मग नूमवित मी तुमच्या वर्गात होतो, असं माधवरावांना सांगितलं. त्यांना आठवणं शक्यच नव्हतं. कारण त्यालाही आता बारा पंधरा वर्षे उलटली होती आणि मी काही ब्राईट स्टुडंट नव्हतो. जेवण एकदम फर्स्ट क्लास असल्याचं माधवरावांना सांगितलं. त्यांनीही त्या मायमाऊलीचं (त्यांच्या भाषेत आमच्या राष्ट्रपती) कौतुक केलं. पदार्थ सगळेच करतात. पण चव एखादीच्याच हाताला असते. आम्ही आमच्या पंढरपुरी स्टाईलनं जमले तितकं केलंय, असं सांगून माधवरावांनी कौतुकाचा त्यांच्याइतक्याच सभ्य, सुसंस्कृत आणि नम्रपणे स्वीकार केला.

इतके सगळे पदार्थ पहाटे पहाटे उठून तयार करायचे आणि शिवाय इतक्या चांगल्या चवीचे. त्या मायमाऊलीचं कौतुकच करावं तितकं थोडं आहे. एक से बढकर एक पदार्थांवर ताव मारून आणि जुन्या मित्रांचा स्नेहपूर्ण निरोप घेऊन आम्ही सगळे निघालो. (अर्थातच, शंभर रुपये शुल्क जमा करून. फुकट काहीही न देता, प्रत्येक कार्यक्रमाला शुल्क घेण्याची पद्धत आहे म्हणूच संघ आजपर्यंत टिकला, असं मला उगाचच वाटतं) निघताना पोट भरगच्च होतं आणि मन एकदम तृप्त होतं. थँक्स टू प्रदीप कोल्हटकर, माधवराव परांजपे आणि त्यांच्या राष्ट्रपती.

Monday, January 24, 2011

विठ्ठलालाही भरून आलं....

भीमाण्णा गेले, भारत हळहळला


शास्त्रीय संगीताप्रमाणेच भजनं आणि अभंगांना घराघरात पोहोचविणारे स्वरभास्कर भीमसेन जोशी गेले आणि अवघा देश हळहळला. ज्यांनी विठ्ठलाच्या अभंग आणि भजनांना लोकांच्या ओठांवर आणलं तो भारतरत्न गेल्यामुळं विठ्ठलालाही भरून आलं असेल आणि त्याचेही डोळे पाणावले असतील.

अण्णांना भावपूर्ण आदरांजली...

Wednesday, January 12, 2011

ब्रेकिंग न्यूज अगेन...

स्वतःच्या कद्रूपणावर झालेली टीका सहन न झाल्यामुळे काही नतद्रष्ट लोकांनी लेट्स भंकस आणि बातमीदार (कळते-समजते आणि सहयोगी बातमीदार) असे ब्लॉग्ज बंद केले. पण बंदी घालून असे प्रकार थांबत नाहीत आणि कायमचे बंद तर होतच नाहीत. ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली असून ब्रेकिंग न्यूज नावाचा ब्लॉग पत्रकारितेतील गॉसिप करण्यासाठी सुरु झाला आहे. लेट्स भंकस आणि बातमीदार चालविणारी मंडळीच हा ब्लॉग चालवित आहेत की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पण तीच ही मंडळी आहेत, असे म्हणायला भलताच वाव आहे. प्रहार करण्याची स्टाईल, भाषेचा लहेजा, लोकसत्ताचे प्रचंड कौतुक आणि सर्व पेपर तसेच चॅनेल्समधील इत्थंभूत खबरा यामुळे ब्रेकिंग न्यूजही हीच मंडळी चालवित आहेत, अशा संशयास पुरेपूर वाव आहे. बापू अत्रंगे, अरुंधती पुणेकर, विसोबा खेचर आणि चांगदेव पाटील आर बॅक असं म्हणायला हरकत नाही.

मुळात टाईमपाससाठी असे ब्लॉग्ज चालविले जातात. पत्रकारितेतील काही लोकच हे ब्लॉग्ज चालवितात. एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढतात, कौतुक-अभिनंदन करतात, चुका दाखवितात आणि वेगवेळ्या वृत्तपत्रांमध्ये-चॅनेल्समध्ये घडणाऱ्या गोष्टींवर कॉमेंट्स करतात. आपल्या प्रश्नांची-समस्यांची कोणीच दखल घेत नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर लोक शेवटचा उपाय म्हणून अशा ब्लॉग्जवर त्या गोष्टी येतात. ब्लॉग्जवर अशा गोष्टी आल्यामुळे विशेष कोणताच फरक पडत नाही. मालक लोक त्याची फारशी दखलही घेत नाहीत. पण आपल्या मनातील गोष्टी शेअर केल्याचा आनंद लोकांना मिळतो आणि मिडियातील इतर लोकही त्यावर खमंग चर्चा करतात. असो.

अर्ध्या पॅटिसची गंमत, ओ मी गार्शियावाला आर्टिस्ट आहे, लोकसत्ताची जाहिरात असल्यामुळे कालनिर्णयवर लावलेली पांढरी पट्टी, पवार पंचविशी, साममध्ये पगारावरुन रंगले शीतयुद्ध, वृत्तगंधर्व इइ एकाहून एक सरस ब्लॉगहून तमाम पत्रकारांना हसवून हसवून लोळविणारे ब्लॉग्ज बंद झाले असले तरीही भविष्यात ब्रेकिंग न्यूजकडून तशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्शा आहे. बेस्ट लक टू ब्रेकिंग न्यूज!