Friday, February 11, 2011

सकाळी नऊ वाजताच

धुंधुरमासाचं भरपेट जेवण

सकाळी नऊ वाजता तुम्ही कधी जेवला आहात का? मी जेवलोय. गेल्या रविवारीच सक्काळी सक्काळी भरपेट जेवण्याचा आनंद लुटलाय. निमित्त होतं धुंधुर मासाच्या कार्यक्रमाचं. थंडीच्या मोसमात (बहुधा संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीत) एकेदिवशी सक्काळी सक्काळी एकत्र यायचं आणि थंडीमध्ये पोषक ठरतील, अशा पदार्थांवर ताव मारायचा. लोकमान्य नगरमधील जुने संघमित्र प्रदीप कोल्हटकर यांनी दिलेल्या निरोपाचं बरहुकुम पालन करीत मी धुंधुर मासाचा कार्यक्रम होणार होतो तिथं दाखल झालो. सिंहगड रस्त्यावरील अनुबंध इमारतीच्या टेरेसवर हा कार्यक्रम अगदी दणक्यात पार पडला. (सगळ्यात पहिल्यांदा प्रसाद जोशी या आमच्या लोकमान्य नगरमधील मित्राकडे धुंधुर मासानिमित्ताने जेवलो होतो. काही लोक त्याला धर्नुमास असंही म्हणतात.)

महेश चांडक, अनिल भांबुरकर, सचिन कुलकर्णी, प्रसाद बापट या जुन्या संघमित्रांची आणि नूमविच्या ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापक माधव परांजपे यांची भेट ही धुंधुर मासाच्या कार्यक्रमाइतकीच संस्मरणीय ठरली. सुरुवातीला सचिन कुलकर्णी यांचे छोटेखानी भाषण झाल्यानंतर आम्ही भोजनस्थानी दाखल झालो. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या विश्व संघ शिबिराची माहिती सचिननं दिली. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या सहाय्यानं. संघ बदलत असल्याचं पुन्हा एकदा अनुभवलं. भोजनावर ताव मारण्यासाठी साधारणतः तीस ते पस्तीस जण उत्साहानं आले होते. टेरेसवर मस्त पंगत मांडली होती. बसण्यासाठी सतरंज्या अंथरल्या होत्या. त्यासमोर पानं मांडली होती. दूर कुठेतरी उदबत्ती लावली होती. त्याचा सुवास दरवळत होता. मग सगळे जण पानावर आले. ज्येष्ठ नागरिकांची पंगत खुर्चीवरच बसली.


एकेक पदार्थ पानात पडू लागले आणि पाहूनच मन तृप्त होत गेलं. सुरुवातीला वाढण्यात आला मुळ्याचा चटका. म्हणजे मुळा किसून त्याची फोडणी देऊन केलेली कोशिंबीर. नंतर आली लेकुरवाळी भाजी. भोगीच्या दिवशी घरोघरी ही भाजी केली जाते. गाजर, वांगी, बटाटा, टोमॅटो, पावटा, श्रावण घेवडा आणि इतर अनेक भाज्या एकत्र करून ही भाजी तयार करतात. लेकुरवाळ्या भाजीनंतर वाटीमध्ये गरमागरम वाफाळती कढी वाढण्यात आली. भोजनमंत्र सुरु होण्याआधीच कढीचा एक घोट घेण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.


वाफाळत्या कढीच्या सोबतीला मुगाच्या डाळीची खिचडी आली. ती पण मस्त गरम होती. मला वाटलं सगळं संपलं. पण छे. आता वेळ होती बाजरीच्या तीळ पेरलेल्या भाकरीची. चतकोराचे दोन तुकडे पानात आले. भाकरीवर मस्त लोण्याचा गोळा आला. जवळपास सगळे पदार्थ पानात आल्यानंतर माधवरावांनी खड्या आवाजात भोजनमंत्र म्हटला आणि पुढच्या मिनिटाभरात सगळे जण आक्रमण म्हणत तुटून पडले. आधी गरमागरम कढी-खिचडी खावी का गरम लोणी पाघळलेली भाकरी खावी, या विचारात असतानाच खिचडीला हात घातला आणि सकापाहता पाहता कढी-खिचडीचा फडशा पडला. कढी-खिचडी संपता संपता ताटात गुळाच्या पोळीनं प्रवेश केला. बरं, येताना नुसती आली नाही, सोबतीला चमचाभर तूपही घेऊन आली.

वेळ सकाळी नऊची आणि सहा पदार्थ. इतकं संगळं संपेल की नाही, याची खात्रीच नव्हती. कारण इतक्या सकाळी इतकं भरपेट जेवण करण्याची ही पहिलीच वेळ. (गेल्या दोन-तीन वर्षांतील तरी) पण एकेक पदार्थ इतके चविष्ट होते की विचारता सोय नाही. त्यातही मुळ्याचा चटका सर्वाधिक उजवा (डावीकडे वाढला असूनही) ठरला. कढीपासून सुरु झालेली चवीची चढती भाजणी मुळ्याच्या चटक्यापाशी येऊन थांबली. बाजरीची भाकरी आणि भाजी, कढी आणि खिचडी सोबतील मुळ्याचा चटका आणि गुळाच्या पोळीचा गोडवा. आणखी काय पाहिजे. मस्त दिलखुष आणि पेटही खूष. सगळ्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारल्यानंतर सर्वजण पानांवरून उठले.



मग माझा शोध सुरु झाला की, बाबा हे जेवण कोणी केलंय. प्रदीपला विचारल्यानंतर तो म्हटला, की माधवराव यांच्या मिसेसने हा सारा स्वयंपाक केला आहे. मग नूमवित मी तुमच्या वर्गात होतो, असं माधवरावांना सांगितलं. त्यांना आठवणं शक्यच नव्हतं. कारण त्यालाही आता बारा पंधरा वर्षे उलटली होती आणि मी काही ब्राईट स्टुडंट नव्हतो. जेवण एकदम फर्स्ट क्लास असल्याचं माधवरावांना सांगितलं. त्यांनीही त्या मायमाऊलीचं (त्यांच्या भाषेत आमच्या राष्ट्रपती) कौतुक केलं. पदार्थ सगळेच करतात. पण चव एखादीच्याच हाताला असते. आम्ही आमच्या पंढरपुरी स्टाईलनं जमले तितकं केलंय, असं सांगून माधवरावांनी कौतुकाचा त्यांच्याइतक्याच सभ्य, सुसंस्कृत आणि नम्रपणे स्वीकार केला.

इतके सगळे पदार्थ पहाटे पहाटे उठून तयार करायचे आणि शिवाय इतक्या चांगल्या चवीचे. त्या मायमाऊलीचं कौतुकच करावं तितकं थोडं आहे. एक से बढकर एक पदार्थांवर ताव मारून आणि जुन्या मित्रांचा स्नेहपूर्ण निरोप घेऊन आम्ही सगळे निघालो. (अर्थातच, शंभर रुपये शुल्क जमा करून. फुकट काहीही न देता, प्रत्येक कार्यक्रमाला शुल्क घेण्याची पद्धत आहे म्हणूच संघ आजपर्यंत टिकला, असं मला उगाचच वाटतं) निघताना पोट भरगच्च होतं आणि मन एकदम तृप्त होतं. थँक्स टू प्रदीप कोल्हटकर, माधवराव परांजपे आणि त्यांच्या राष्ट्रपती.

20 comments:

Anonymous said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

TUJHA BLOG VAACHTA VAACHTA TONDTAAT PAANI AALE... :) VEEDA PAHIJE...AATA ;)

श्रीपाद ब्रह्मे said...

मस्त रे. मीही कधी काळी (घरीच) लुटलेला हा धुंधुर आनंद पुन्हा जगलो...

Unknown said...

Mast.... Wachun pot Bharle.... sadhya Maha. Timesmadhe lihtos te pan takat ja na. karan paper japun thevta yet nahi (kantala) aani ainvelela kay khav te samjat nahi. tuza blog pahun tharawata yeil. tevha please.....
Thanx,
Sagar Nene

SEVAVARDHINI said...

व्वा..! छान..!!
पण आमच्या तोंडाला पाणी सुटलं त्याची भरपायी कोण न् कुठं करणार..?
काहीही असो...अशाच अनौपचारिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांनी काय साधलं आहे, हे फक्त ते करणारेच जाणतात.

Anonymous said...

Kai bolave...
Parva aamchyakadehi Dhanurmaas Jhala...Bajrichi Bhakri, Vangyachi Masala Bhaji... Khichadi... Loni... Aani gulachi poli....

Mahesh Prabhakar Kulkarni

Anonymous said...

Very nice blog sir....

Navneet Kamble

Anonymous said...

आता पुण्यात येऊन खाल्ल्याशिवाय आता तुमचा ब्लाग वाचायचा नाही, असं ठरवलय...

Nishikant Todkar

Anonymous said...

I m on diet.

Gangadhar Tipre

Anonymous said...

Atta Khalych Pahije.

Ashok Parude

Raviraj said...

nete aaj sakal sakalic blog vachla....maze pan bharpet zale

Anonymous said...

Keep it up please give me u r cell

Milind Kamble

Anonymous said...

Keep it up please give me u r cell

Milind Kamble

Anonymous said...

Keep it up please give me u r cell

Milind Kamble

YOGESH JOSHI said...

Good blog. keep it up.

Amit Bhide said...

Nete mar dala, kay susat lihitaho. Bas jam awadala. By d way punyala jaun tumhi jast khulalayat, ata kay home ground na

checkamol said...

वाह... मजा आली.. आपल्याकडे 'खाई त्याला खवखवे' अशी म्हण आहे. पण मला न खाताच खवखवायला लागलंय.

harshada.parab said...

वाफाळत्या कढीच्या सोबतीला मुगाच्या डाळीची खिचडी , बाजरीची तीळ पेरलेली भाकरी, गुळाची पोळी प्रत्येकी एक चमचा तुपासकट व्वा... सर कधी खायला मिळेल?
हर्षदा परब
harshadasp@gmail.com

Maharashtra Maza said...

अप्रतिम मित्रा ! जिभल्या चाटतच लेख वाचून काढला . शेजारी मुलगा बारावीचा अभ्यास करून शुक्रवारचे भोजन करत बसला होता, त्याला त्याच्या मित्रांना धुंधुरमासाचे जेवण १२वीच्या समारोपाला द्यायचा विचार करतो आहे. विठ्ठल मंदिरातील विक्रम सुर्वे कडून परांजपे मास्तरांनाही लाडीगोडी लावावी म्हणतो. तू हि आवर्जून ये.

Maharashtra Maza said...

अप्रतिम मित्रा ! जिभल्या चाटतच लेख वाचून काढला . शेजारी मुलगा बारावीचा अभ्यास करून शुक्रवारचे भोजन करत बसला होता, त्याला त्याच्या मित्रांना धुंधुरमासाचे जेवण १२वीच्या समारोपाला द्यायचा विचार करतो आहे. विठ्ठल मंदिरातील विक्रम सुर्वे कडून परांजपे मास्तरांनाही लाडीगोडी लावावी म्हणतो. तू हि आवर्जून ये.