Tuesday, April 12, 2011

तमिळनाडूत कमळ फुलण्याची शक्यता

नागरकोईलमध्ये भाजपला संधी



प्रदेशाध्यक्श राधाकृष्णन यांचे पारडे जड
तमिळनाडूच्या रणसंग्रामात द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यात घमासान युद्ध सुरु असताना राष्ट्रीय पक्श असलेल्या काँग्रेस आणि भारतीय जनता पक्शाला मात्र या निवडणुकीतून फारशा आशा नाहीत. काँग्रेसने तरी द्रमुकबरोबर युती करून पंधरा-वीस जागांची बेगमी करुन ठेवली असली तरी भाजपला मात्र, या निवडणुकीत नेहमीप्रमाणेच अपयशाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोईल मतदारसंघ भाजपसाठी लक्की ठरण्याची शक्यता असून इथून विजय निश्चित आहे, अशी आशा भाजपचे कार्यकर्ते बाळगून आहेत.

भारतीय जनता पक्शाने नागरकोईल मतदारसंघातून पक्शाचे प्रदेशाध्यक्श पाँडी राधाकृष्णन यांना रिंगणात उतरविले आहे. राधाकृष्णन हे अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री होते. गेल्या अनेक दशकांपासून राजकारणात असूनही अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगणारे राधाकृष्णन हे अविवाहित आहेत. साध्या राहणीमुळे ते कन्याकुमारीचे कामराज म्हणूनही ओळखले जातात. राधाकृष्णन हे व्यवसायाने वकील आहेत. राधाकृष्णन हे हिंदू मुनान्नी या लढवय्या संघटनेचे ‍१९८० मध्ये पूर्णवेळ कार्यकर्ते होते. तेव्हापासून ते सार्वजनिक जीवनात आहेत.
राधाकृष्णन यांनी यापूर्वी दोनवेळा लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, दोन्हीवेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुस-या वेळी त्यांना कम्युनिस्ट पक्शाच्या उमेदवाराकडून ६५ हजारांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी त्यांना अडीच लाख मते मिळाली होती. वाहतूक राज्यमंत्री असताना कोलाचेल-तिरुवत्तर आणि थ्युकालय-थडीक्कारमकोलम या गावांदरम्यान केलेल्या पक्क्या डांबरी सडकांमुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणावर सोय झाली, अशी आठवण इथले मतदार अजूनही काढतात.

गेल्या अनेक वर्षांपासून मी लोकांची कामे करतो आहे. त्याचा विचार करून लोक मला यंदा नक्की संधी देतील. सामान्य कार्यकर्ता ही माझी ओळख आहे आणि मी अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकतो, हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे यंदा भाजपला नक्की संधी आहे. शिवाय आमच्या मतदारसंघात ख्रिश्चन मतदारांची संख्या लक्शणीय आहे. आतापर्यंत ख्रिश्चन समाज आम्हाला कधीच मतदान करीत नव्हता. पण आता आमची ख्रिश्चन संघटनांबरोबर बैठक झाली असून चर्च लवकरच तसा आदेशही जारी करण्याची शक्यता आहे. तेव्हा भाजप यंदा नक्की खाते उघडणार, असा विश्वास राधाकृष्णन यांनी महारष्ट्र टाइम्सशी बोलताना व्यक्त केला.


अर्थात, दक्शिण तमिळनाडूचे राजकीय विश्लेषक अण्णामलाई यांनी मात्र, भाजपच्या विजयाची शक्यता खूपच कमी असल्याचे सांगितले. राधाकृष्णन हे खूप चांगले उमेदवार आहेत. मात्र, तमिळनाडूमध्ये द्रमुक किंवा अण्णा द्रमुकची मदत घेतल्याशिवाय दुस-या कोणत्याही पक्शाचा उमेदवार निवडून येत नाही, हा इतिहास आहे. भाजपला हा इतिहास पुसायचा असेल तर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पण तशी शक्यता कमीच दिसते आहे.

3 comments:

Anonymous said...

Public Report?

Sachin Deshpande

Anonymous said...

Gadkari Vaani Vidi Peetana Chvaychaa nustich kaadi, Mhanaycha ana Advanina ya nivadnukit bandhen maadi!! Best wishes!!

Ravi Godbole

Anonymous said...

Kaay Saaheb, BJP che khaate ughadle ka? Jaya total force ne aali!!