Tuesday, February 25, 2014

हम दो हमारे पाँच…

बुरसटलेला विचार...


प्रत्येक हिंदू दांपत्याने किमान पाच मुलांना जन्म दिला पाहिजे, हे विश्व हिंदू परिषदेचे सर्वाधिक ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे वक्तव्य वाचून हसावे की रडावे हेच समजेनासे झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील संघटना बुरसटलेल्या विचारांच्या आहेत, अशी टीका नेहमीच केली जाते. त्यात बहुतांश प्रमाणात तथ्य नसले तरीही सिंघल यांच्यासारखी मंडळी टीकाकारांना अशी संधी देण्याचे काम करीत असतात.


संघटनेचे नाव विश्व हिंदू परिषद असले तरीही जगातील सर्व हिंदूंच्या हिताचा ठेका संबंधित संघटनेकडे नाही. उलटपक्षी संघ परिवारातील सर्वाधिक उग्र आणि भडक संघटना हीच विश्व हिंदू परिषदेची ओळख आहे. शिवाय १९८९ आणि १९९१च्या काळात असलेली संघटनेची लोकप्रियताही आता राहिलेली नाही. रामजन्मभूमीचे आंदोलन उभारून बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारण्यापासून पळ काढणारी हीच विश्व हिंदू परिषद आणि हेच ते अशोक सिंघल. त्यामुळे संघ परिवारातील अनेक स्वयंसेवकांचाही या संघटनेवर विशेष लोभ नाही.

हिंदू दांपत्याला पाच मुले हवीत, हे सिंघल यांचे हे वैयक्तिक मत आहे, की विश्व हिंदू परिषदेचे मत आहे, की संघाचीही हीच भूमिका आहे, याबद्दल काही स्पष्ट झालेले नाही. अर्थात, त्याने फारसा फरक पडणार नाही. असे वक्तव्य करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संघटना मूर्खच म्हणायला हवी. मध्यंतरी कोची येथे पार पडलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत दत्तात्रय होस्बाळे यांनी हिंदू दांपत्यांनी कमीत कमी तीन मुलांना जन्म द्यायला हवा, अशी बुरसटलेली भूमिका मांडली होती. तेव्हाही संघ आणि होस्बाळे टीकेचे धनी झाले होते. तेव्हा संघही सिंघल यांच्यापेक्षा खूप काही वेगळी भूमिका मांडणारा नाही.

१९८० च्या दशकांत जेव्हा राजीव गांधी यांनी संगणकीकरणाचा धडाका सुरू केला होता, तेव्हा संघ परिवारातील भारतीय मजदूर संघ नावाच्या एका संघटनेने अशीच बुरसटलेली आणि प्रगती रोखणारी भूमिका घेत संगणकीकरणाला विरोध केला होता. काय झाले आता त्या भूमिकेचे. मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांची पोरं नि पोरी आता मोबाईलवर इंटरनेट पाहण्यात मग्न असतील. त्यावेळी कामगार कपातीची भीती दाखवून मजदूर संघाने त्रागा केला होता. सिंघल यांची ही भूमिका देखील त्याच बुरसटलेल्या विचारांच्या पंक्तीत बसणारी आहे.

साधूसंत आणि भगव्या वेशातील मंडळींच्या गराड्यात अडकलेल्या अशोक सिंघल यांचा भारतातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब जनतेशी दुरान्वयेही संबंध राहिलेला नाही, हेच त्यांच्या वक्तव्यातून समोर येते. मुळात सध्या नवरा आणि बायको अशा दोघांनी नोकऱ्या केल्यानंतरही घर चालविणे कठीण होऊन बसले आहे. अवकाशात गेलेले महागाईचे रॉकेट खाली येण्याचे नाव घेत नाही. सिंघल यांच्याच विचारांचे नरेंद्र मोदी सत्तेवर आले तरी ते महागाई कमी करू शकतील, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे महागाई वाढतच जाणार.

महागाईने खिशावर मारलेला डल्ला, घरासाठीचे हप्ते, इतर कुठले कुठले हप्ते, एका किंवा फारतर दोन पोरांच्या शिक्षणावरील खर्च, अगदी सामान्यपणे आयुष्य जगतानाही होणारी त्रेधातिरपीट यांच्यामुळे सर्वसामान्य माणूस कसाबसा दिवस ढकलतो आहे. तो छान आनंदात जगतो आहे, असा कोणाचाही  दावा नाही. सिंघल यांचे समर्थक कदाचित असा दावा करू शकतील. भविष्यात पेट्रोल भडकणार, गॅस सिलिंडरचे दर महागणार, भाज्या आणि तेलाचे दर वधारणार, घरांच्या किंमती आणखी वाढणार नि उत्तम तसेच दर्जेदार शिक्षणही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होत जाणार. त्यामुळे मिळेल तितके उत्पन्न कमी, अशीच परिस्थिती असणार आहे.

त्यातून मुलांची किंवा घरातील ज्येष्ठांची आजारपणं, वाढत्या वयाबरोबर वाढत जाणारा शिक्षणावरील खर्च, अॅडमिशनसाठी अव्वाच्या सव्वा घेतली जाणारी डोनेशन्स, आजूबाजूच्या नवनवीन व्यवधानांमुळं मुलांच्या पालकांकडून वाढत जाणाऱ्या अपेक्षा आणि त्यावर वाढत जाणार खर्च, त्यांच्या भविष्यासाठी करावी लागणारी तरतूद अशा सर्व गोष्टींची सिंघल तुम्हाला काहीच कल्पना दिसत नाहीये. बायको आणि एक-दोन पोरांचा संसार रेटताना माणूस मेटाकुटीला येतोय. तुमचं काय जातंय, ‘पाच पोरं जन्माला घाला,’ असं सांगायला.


तुम्हाला नसली तरीही या सर्व परिस्थितीची जाण हिंदू धर्मातील मध्यमवर्गीय आणि गरीब दांपत्याला आहे. कारण तो सोसतो आहे. त्यामुळेच ‘हम दो हमारे दो’वरून ‘हम दो हमारा एक’ असा नवा नारा घराघरातून दिला जातोय. सरकारने कोणताही जनजागृती न करताच नागरिकांनी स्वतःहूनच हे धोरण स्वीकारले आहे. कारण त्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच त्यांच्यासमोर नाही. तेव्हा तुमच्या परिषदेने कितीही चिंतन बैठका घेतल्या, बौद्धिकं घेतली, घरोघरी जनसंपर्क अभियान राबविले तरीही हिंदू समाज तुमच्या अशा मूर्खासारख्या वक्तव्यांना बधणार नाही.

सिंघल, अहो सारा हिंदू समाज सोडा. तुमच्या संघटनेच्या आणि संघ परिवारातील कार्यकर्त्यांना किंवा स्वयंसेवकांना विचारा. ‘हम दो हमारे पाँच’चा अंगीकार करण्यास ते तयार आहेत का? एकदा तरी तुम्ही हे विचारलं असतं ना, तरी तुम्हाला इतकं काही काही ऐकावं लागलं असतं की ते वक्तव्य करण्याची हिंमतही तुम्ही केली नसती. तेव्हा हिंदू समाजाप्रमाणेच परिषदेच्या कार्यकर्त्यांशी असलेला संपर्कही घटलेला दिसतोय.

भारतातील विविध धर्मियांची टक्केवारी किती ते पाहूयात. २००१ च्या जनगणेनुसार भारतात एकूण एक अब्ज दोन कोटी ८६ लाख दहा हजार ३२८ नागरिक आहेत. त्यापैकी ८२ कोटी ७५ लाख ७८ हजार ८६८ हिंदू आहेत. एकूण लोकसंखेच्या ८०.५ टक्के. मुस्लिम आहेत तेरा कोटी ८१ लाख ८८ हजार २४०. एकूण लोकसंख्येच्या १३.४ टक्के. ख्रिश्चन आहेत दोन कोटी ४० लाख ८० हजार १६. एकूण टक्केवारी अवघे दोन पूर्णांक तीन. बाकी शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ज्यू मंडळींच्या लोकसंख्येशी सिंघल प्रभृतींना काही वावडे वाटण्याची शक्यता नाही. तेव्हा येत्या पन्नास वर्षांमध्ये तरी सिंघल यांना जी भीती वाटतेय, ती प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही. 



तुम्हाला जर मुस्लिमांचे आणि ख्रिश्चनांचे अनुकरणच करायचे असेल ना, तर ते ‘हम दो हमारे पाँच’ अशा चुकीच्या पद्धतीने करू नका. हिंदू नागरिकांचा सेक्स रेशो ९३१ आहे. मुस्लिमांचा तो ९३६ आहे आणि ख्रिश्चनांचा १००९ आहे. मुलगा आणि मुलगी यांचा सेक्स रेशो सुधारण्यात दोन्ही धर्मांचा आदर्श घ्या. हिंदू धर्मातील चाइल्ड सेक्स रेशो फक्त ९२५ आहे. मुस्लिमांमध्ये तो ९५० आणि ख्रिश्चनांमध्ये ९६४ इतका आहे. अनुकरण करायचे ना तर इथे करा. ख्रिश्चनांचा साक्षरता दर ८०.३ टक्के आहे. हिंदू धर्मातील साक्षरता ६५ टक्क्यांवरच अडकलीय. ती ८० टक्क्यांपेक्षा अधिक करा. हिंदू धर्मात महिलांचे साक्षरतेचे प्रमाण ५३.२ इतकी आहे. दुर्गा भारतीच्या मदतीने हा दर कसा वाढले, यावर लक्ष केंद्रीत करा. इतके केलेत तरी खूप पुरेसे आहे.


शिवाय ‘हम पाच हमारे पच्चीस’ ही घोषणा भाजपवाल्यांनी प्रसिद्ध केलेली. त्यात तथ्य किती आणि फक्त घोषणेसाठी घोषणा किती, याचा अभ्यास कोणीही केलेला नाही. मात्र, हिंदू असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो किंवा शीख असो महागाई तसेच जगतानाच्या समस्या सर्वांसाठीच सारख्या आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना उत्तम आणि उज्ज्व भविष्य मिळावे, अशी इच्छा असलेला कोणताही सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा गरीब पालक दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचे धाडस करणार नाही. मग तो कोणत्याही धर्माचा असो. त्यामुळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुस्लिम माणूसही ‘हम पाँच हमारे पच्चीस’ किंवा ‘हम दो हमारे पाँच’ची भूमिका मान्य करेल, याची ‘सूत’राम शक्यता नाही.

तेव्हा सिंघल हिंदू धर्माच्या संकेतांप्रमाणे निवृत्ती स्वीकारून वानप्रस्थाक्षमाची वाट धरा. तेच तुमच्यासाठी, हिंदू धर्मासाठी आणि संघ परिवारासाठीही योग्य आहे.

ता. क. – हिंदू दांपत्यांनी एक किंवा दोनऐवजी पाच-पाच मुलांना जन्म दिला, तरी संघशाखांची रोडावलेली संख्या वाढेल, अशी आशा बाळगू नका. हिंदू समाजाची संख्या कशी वाढेल, यापेक्षा परिवाराने संघाचा कणा असलेल्या शाखांची आणि शाखांवरची संख्या कशी वाढेल, याचा विचार केल्यास ते सर्वांसाठीच चांगले आहे.

6 comments:

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

सत्यविचार पाहता, आणि आपला विचार त्या कसपट्टीवर घासता, आपण ५ मुले पाहिजेत ह्याचा अर्थ ५ मुलगे असाच ग्राह्य धरलेला दिसतो... ५ मुली असाव्यात असा जर आग्रह कोणी धरला असेल तर तुमचा हा टीकावाद फोल ठरतो... कारण त्यात बरीच गृहितके भरली आहेत...

सिंघल किंवा अन्य अशा व्यक्तीस अधिक स्पष्टीकरण मागितल्याविना त्यांच्या वक्तव्यावर टीका करणारे अगदीच निरर्थक वेळ वाया घालवतात असे वाटण्याइतके...

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

पाच अपत्ये हवी असे जाहीर सांगणारी व्यक्ती बुरसटलेल्या विचारांची नसून आजच्या जगातली धाडसी व्यक्ती असू शकते एवढाच निष्कर्ष तुमच्या सर्व लेखावरून काढता येईल... त्यातही त्यांनी जर पाचही मुलीच हव्यात असा आग्रह धरला तर त्यांच्यापेक्षा तुमचा अभ्यास कमी आहे असेही दिसते...

Uma said...

jar 5 hi muli zalya tari fayada kay ? love -jihad sarakhya muslim sapalyana tya bali padalya tar hum do hamare paanch la kahihi artha urat nahi. aani mhanun 5 mulage asach consider karun vaktavya kela gela ahe. ka ? tar mhane hindunche te vanshaj asatil ani tyamule hindu dharma rahil pudhe.
Ashishjini lihilela lekh barobar ahe.

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

फारसे ज्ञान नसतानाही सांगू शकतो की ज्या पाईप मधून आपल्या घरात पाणी पोहोचू शकते त्याच पाईपमधून आपल्या घरातली औषधे, खते आणि विषाणू सुद्धा उलटा प्रवास करू शकतात मग लव्ह-जिहाद सारख्यांना घाबरायचे कारण काय... मुलगी थोडीच त्यांची होणार... अहो तिकडे गेली तरी ती आमचेच काम करणार ह्यावर आईबापांचा विश्वास हवा आणि ते घडवून आणायची धमक देखिल हवी...

पहिल्या पाच मुली लाभल्यावर मग षष्ठं स्थानी मुलगा झाला तरी हरकत नाही कारण नाहीतरी आपण सूर्यषष्ठी साजरी करतोच ना? कन्याषष्ठी नांवाची काही तिथी कुठे ही सापडत नाही...

Unknown said...

namdhari vinavi navachya khavisa, hya sarva mulanch kivha mulicha sambhal karnyasathicha kharch kay tuza baap karnar?

psiddharam.blogspot.com said...

http://www.openthemagazine.com/article/nation/the-untold-census-story