Showing posts with label Babasaheb Purandare. Show all posts
Showing posts with label Babasaheb Purandare. Show all posts

Tuesday, November 24, 2015

‘सोशल मीडिया’ पुरस्काराबद्दल

आपणा सर्वांचे शतशः धन्यवाद

राज्यात सत्ताबदल झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारचं पानिपत झालं आणि भारतीय जनता पार्टी नि शिवसेना युतीचं सरकार सत्तेवर आलं. सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, सरकारी कर्मचारी, उद्योजक आणि इतर सर्वांसाठी नवे सरकार आल्यामुळं काय फरक पडला, बदल झाला माहिती नाही. पण एक महत्त्वपूर्ण बदल फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जाणवला. मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्री ऑनलाईन आले. त्यांची फेसबुक पेज निर्माण झाली. ट्विटर अकाउंट सुरू झाली. छोट्या-मोठ्या गोष्टींची दखल सोशल नेटवर्किंग साइटवरून घेतली जाऊ लागली. कार्यक्रमांची नि उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फेसबुक, ट्विटर नि व्हॉट्सअपचा उपयोग होऊ लागला. मुख्यमंत्र्यांनीही नुकतीच एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात ‘ब्लॉगलेखन’ करण्याची घोषणा केली आहे. 


अशा सगळ्या सोशल पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये ‘सोशल मीडिया’साठी राज्यस्तरावर स्वतंत्र पुरस्कार जाहीर केला जाणार असल्याची घोषणा केली. म्हणजेच ऑनलाइन स्वरुपाच्या लेखनासाठी हा पुरस्कार होता. वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी या माध्यमांप्रमाणेच ऑनलाईन माध्यमांनाही राज्य सरकारने मानाचे स्थान देण्याचा निर्णय घेतला होता. सर्वप्रथम राज्य सरकारचे यासाठी अभिनंदन केले पाहिजे. जमाना बदलतोय आणि त्याचबरोबर पत्रकारिताही बदलते आहे, याची जाणीव राज्य सरकारला झाली आणि त्यांनी तसे दाखवून दिले, हे महत्त्वाचे.
सोशल मीडियावर लेखन करणाऱ्या पत्रकारांसाठी हा पुरस्कार होता. म्हणजे फेसबुकवरील लेखन, ब्लॉग लेखन किंवा कोणत्याही वृत्तपत्राच्या वेबसाईटवर लिहिल्या जाणाऱ्या ब्लॉगलेखनासाठी. ‘सोशल मीडिया’ या नव्या माध्यमासाठी दिला जाणारा पहिला पुरस्कार मला मिळाला, तो माझ्या http://ashishchandorkar.blogspot.in/ या ब्लॉगसाठी. ‘ऑनलाईन’ अशा उल्लेखामुळे अनेकांचा उगाचच असा गैरसमज झाला, की मी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ऑनलाइन एडिशला शिफ्ट झालो की काय? अनेकांनी तशी विचारणाही केली. पण तसे नाही. मी पेपरमध्येच आहे आणि हा पुरस्कार आहे माझ्या ब्लॉगसाठी. मटा ऑनलाइनवरही माझा एक ब्लॉग आहे. पण हा पुरस्कार त्यासाठी नाही. 

http://ashishchandorkar.blogspot.in/ हा का सुरू केला, याची कहाणी खूपच मजेशीर आणि रंगतदार आहे. बुधवार, आठ नोव्हेंबर २००६ साली मी हा ब्लॉग सुरू केला. त्यावेळी मी ज्या संस्थेत होतो, तिथं कामाच्या असमान तासांमुळे खरं तर हा ब्लॉग सुरू झाला. म्हणजे काही उपसंपादकांना आठ तास ड्युटी आणि काही उपसंपादकांना सहा तास ड्युटी असा भेदाभेद होता. कंत्राटी उपसंपादक आणि परमनंट उपसंपादक असा भेद त्यावेळी होता. त्यामुळे ड्युटीमध्ये दोन तासांचा फरक होता. ‘तुम्ही ऑफिसला आठ तासच काम केले पाहिजे, पण ‘त्या’ दोन तासांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे वेगळे काम करू शकता,’ अशी सवलत तेव्हाच्या संपादकांनी दिली होती. त्यामुळे खरे आभार तेव्हाचे संपादक यमाजी बाळाजी मालकर यांचे मानायला हवेत. त्यांनी मोठ्या मनाने दिलेल्या सवलतीमुळेच  ब्लॉगलेखनाकडे वळण्याची संधी आम्हाला मिळाली. देविदास देशपांडे, विश्वनाथ गरुड, नंदकुमार वाघमारे आणि मी. आम्ही चौघांनीही ब्लॉगलेखन तेव्हाच सुरू केलं.


पण सर्वाधिक महत्त्वाचे आभार मानले पाहिजेत, आमचा दिलदार दोस्त देविदास प्रकाशराव देशपांडे याचे. तंत्रज्ञान, सोशल मीडिया, भाषेवरील प्रभुत्व, अवगत असलेल्या भाषा आणि अशा अनेक क्षेत्रांचे ज्ञान आणि माहिती त्याच्याकडे भरपूर असते. पण ते ज्ञान तो स्वतःपुरते मर्यादित ठेवत नाही. तर जवळपासच्या मित्रांना त्याबद्दल माहिती देत असतो. माहिती वाटत असतो, असंच म्हणा ना. त्यानंच मला खऱ्या अर्थानं ब्लॉगच्या विश्वात आणलं. ब्लॉग म्हणजे काय, तो कसा सुरू करायचा, त्यावर कसं लिहायचं, तो सजवायचा कसा, टेम्पेलट वगैरे वगैरे सर्व काही त्यानं सांगितलं. आजही त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आणि आजही तो काहीही हातचं राखून ठेवत नाही. त्यामुळं खरं तर या पुरस्कारावर माझ्याइतकाच त्याचाही अधिकार आहे. त्यामुळे त्याला खूप खूप धन्यवाद.
ब्लॉगलेखन सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ‘नव्याचे नऊ’ दिवस म्हणून सगळ्यांनी त्याकडे पाहिलं. मी इतकी वर्षे ब्लॉग लिहित राहीन, असं मला सुरुवातीला अजिबात वाटलं नव्हतं. पण अनेकदा पेपरात किंवा काम करीत असलेल्या माध्यमात तुम्हाला जे मांडायचं आहे, ते मांडणं शक्य नसतं. ते तुम्ही ब्लॉगवर मांडू शकता. काही गोष्टी संबंधित कंपनीच्या धोरणाविरुद्ध असतात, विचारांविरुद्ध असतात, समूहाच्या दृष्टीने अगदीच क्षुल्लक असतात किंवा ते वाचकांना आवडतीलच अशी खात्री नसते. असं सर्व लिखाण तुम्ही तुमच्या ब्लॉगवर करू शकता. वैयक्तिक आलेले अनुभव, वेगवेगळ्या घटनांवरची तुमची मतं असं काहीही तुम्ही ब्लॉगवर शेअर करू शकता. शिवाय या अमक्या विषयावर लिहायचं नाही, तमक्या विषयावर लिहिता येणार नाही, असला भानगड नाही. शिवाय कोणीही तुमचा ब्लॉग हटवू शकत नाही. यामुळे आज जवळपास नऊ वर्षे मी ब्लॉग लिहितो आहे आणि अजून तरी मला ब्लॉगवर लेखनाचा कंटाळा आलेला नाही. 

जवळपास सव्वा दोनशे ब्लॉग आतापर्यंत लिहिले असून दीड लाखांहून अधिक जणांनी हा ब्लॉग वाचलेला आहे. पण मला वाटतं की ब्लॉग संख्या किंवा वाचक संख्या यापेक्षाही ब्लॉगवर लिहिल्यानंतर तुम्हाला मिळणारा आनंद आणि वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सुदैवाने दोन्ही गोष्टींबाबत मला प्रचंड समाधान आहे.


राजकारण, क्रीडा आणि अर्थातच, हिंडणं नि खाणंपिणं या गोष्टी आपल्या सर्वाधिक आवडीच्या. त्या संदर्भातील लिखाण ब्लॉगवर सर्वाधिक आहे. सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रात छापून येणारे लेख अधिक सविस्तरपणे ब्लॉगवर येत होते. मात्र, तो ट्रेंड लवकरच बदलला. ‘साम मराठी’त गेल्यानंतर पेपरातलं लेखन थांबलंच. मग ब्लॉग लिहिण्याची फ्रिक्वेन्सी वाढली. त्यातून दोनवेळा निवडणुकीच्यानिमित्तानं महाराष्ट्रभर फिरता आलं. त्यातील अनुभव ब्लॉगवर टाकले. गुवाहाटी आणि केरळमधीलराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसंदर्भातील अनुभव ब्लॉगवर आहेत. तीनवेळा गुजरातमध्ये जाणं झालं. पहिल्यांदा ‘केसरी’साठी अभयजी कुलकर्णी यांच्यासोबत गेलो होतो. मात्र, नंतर दोनदागेलो, ते फक्त आणि फक्त ब्लॉगवर लिहिण्यासाठी. महाराष्ट्र टाइम्सकडून तमिळनाडूमधीलविधानसभा निवडणूक कव्हर करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणचे अनुभव व्यक्त करणारे ब्लॉगलिहिले. काही स्वतंत्रपणे आणि काही पेपरातील बातम्यांचे एक्स्टेंशन.


गेल्या वर्षी उत्तरप्रदेशात लोकसभेची निवडणूक कव्हर करण्यासाठी गेलो होतो. तिथे आलेले अनुभव ब्लॉगवर मांडले. त्याला तर भन्नाट प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेशबद्दल असलेले माझ्या मनातले समज गैरसमज या दौऱ्यामुळे बऱ्याच प्रमाणात दूर झाले. प्रत्यक्षात नेमके काय घडले, याचा ‘फर्स्ट हँड’ अनुभव घेता आला. लखनऊ, रायबरेली, अमेठी, बाराबंकी, अयोध्या, सुलतानपूर, वाराणसीआणि आझमगड अशा विविध शहरांमध्ये जाऊन मनसोक्तफिरलो. अयोध्येला जाऊन ‘रामलल्ला’चं दर्शन घेतलं. सगळीकडे सामान्यातल्या सामान्याशी बोललो. तिथली अवस्था प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. नुसतं फिरून उपयोग काय? ते लोकांपर्यंत पोहोचलं तर पाहिजे. म्हणून मग आलेले अनुभव आणि तिथली परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचविली. उत्तर प्रदेशातील ब्लॉगला तर प्रचंड म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिथं जाण्याचं सार्थक झालं, असंच मला वाटलं. 


‘सोशल मीडिया’साठीचा पुरस्कार २०१४ मध्ये केलेल्या लेखनासाठी होता. योगायोगानं मी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उत्तर प्रदेशात गेलोच होतो. तिथं आलेल्या भन्नाट अनुभवांचे ब्लॉग्ज मी स्पर्धेसाठी पाठविले होते. त्यापैकी ऐकूलाल या हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आदर्श उदाहरण असलेल्या चहाविक्रेत्याचीघेतलेली भेट, मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे इंद्रेशकुमारजी यांच्यासमवेत ‘एक दिवस’ आणि उत्तर प्रदेशातील एकूण अनुभव, सामाजिक-राजकीय परिस्थिती, तिथले लोक, त्यांची दुःख मांडणारा‘उत्तर प्रदेश, उत्तम प्रदेश’ असे तीन ब्लॉग स्पर्धेसाठी पाठविले होते. उर्वरित सर्व ब्लॉगची यादी आणि ते प्रसिद्ध केले तेव्हाची तारीख, ठिकाण वगैरे माहिती सोबत जोडली होती. अशा पद्धतीने तयार केलेल्या माझ्या प्रवेशिकेला (किंवा अर्जाला) सोशल मीडियाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. हा ‘सोशल मीडिया’साठीचा पहिलाच पुरस्कार आहे. याचा आनंद अधिकच आहे. तेव्हा सर्व परीक्षकांचेही जाहीर हार्दिक आभार. 


‘आई’ गेली तेव्हा खूप काही लिहावसं वाटत होतं. पण इतक्या सविस्तरपणे कुठंही छापून येणं अवघड होतं. कारण मी कोणी मोठा नाही आणि माझी आईपण खूप प्रसिद्ध नव्हती. पण माझ्यासाठी ती सर्व काही होती. अशा वेळी मला ब्लॉगचा आधार होता. म्हणून आईवर ब्लॉग लिहिला. ‘आई्’ एक व्यक्ती नाही तर संस्था आहे. ती कुणाचीही असो, त्यानं फारसा फरक पडत नाही. आई या व्यक्तिमत्त्वात असलेले गुण हे बहुतांश प्रमाणात समानच असतात. त्यामुळे कोणीही आपल्या आईवर लेख लिहिला असता, तरी तो थोड्याबहुत प्रमाणात सारखाच होण्याची शक्यता अधिक. कदाचित यामुळेच आई गेल्यानंतर लिहिलेला ब्लॉग बऱ्याच लोकांना आवडला. अनेकांनी तसं सांगितलं. ‘तुमचा आईवरचा ब्लॉग उत्तम आहे,’ असं यमाजी मालकरसाहेब आणि संजय राऊतसाहेब यांनीही आवर्जून सांगितलं होतं. कोणता संपादक इतक्या खुल्या मनानं ज्युनिअर लोकांचं कौतुक करतो. अपवाद असतील. आहेतही. पण खूपच कमी. ‘शौकिन’ या पुण्यातील पानविक्रेत्याच्या दुकानाबाहेर एक जण भेटला. ‘तुम्ही आशिष चांदोरकर का?’ असं त्यानं विचारलं. मी त्याला ओळखत नव्हतो आणि नावही ओळखीचं नव्हतं. पण त्यानं मला ओळखलं होतं. ‘तुमचा आईवरचा ब्लॉग वाचला. खूप आवडला. डोळ्यातून पाणी आलं…’ कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल, अशी ही घटना. असे असंख्य वाचक ब्लॉगला मिळत गेले. काही जण कायमचे वाचक झाले. काही जण आवडीनुसार अधूनमधून भेटणारे वाचक ठरले. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानायचे की ऋणातच राहणे पसंत करायचे, हा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. पण अशा वाचकांमुळेच पुन्हा पुन्हा लिहिण्याची उमेद निर्माण झाली. त्यामुळे त्यांना धन्यवाद आहेतच.

सुरुवातीच्या काळात अनेकदा हा काय ब्लॉग तर लिहितो, कोण वाचतो हे ब्लॉग वगैरे सूरही उमटले. ‘तुम्ही मंडळी खूप लिहिता बुवा…’ असा नापसंतीचा सूरही उमटला. खरंतर अशा प्रतिक्रियाच ब्लॉग लेखन अधिक जोमाने करण्यासाठी उर्मी निर्माण करीत होत्या. त्यामुळे अशा एकदम पुणेरी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांचेही आभार. पुढे पुढे तर ब्लॉग लेखनाचं व्यसन लागलं, असंच म्हणा ना. अगदी छोटे अनुभवही लिहिले. रस्त्यावरच्या एका फुगेविक्रेत्याला कॅडबरी दिल्याचा अनुभवअनेकांना आवडला. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविला तेव्हा संभाजी ब्रिगेडला आणि बाबासाहेबपुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ला विरोध करणाऱ्यांना धू धू धुणारा ब्लॉग लिहिला. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यावर टीका करणारे ब्लॉग लिहिले. ब्राह्मण महासंघाला फटकाविणारा लेख लिहिला. राज ठाकरे यांच्यावर टीका करणारे ब्लॉग लिहिले. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही खूप काही लिहिलं. शिवसेना-भाजप युती टिकावी, अशी मांडणी करणारा ब्लॉग लिहिला. युती तुटल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर ‘नाही, नाही, नाही म्हणजे हो’ असा ब्लॉग हाणला. पुण्यातले आमचे सर विकास मठकरी यांच्याबद्दल लिहिलं. अमित जोशीला झालेल्या मारहाणीनंतर लिहिलं. चित्रपटांबद्दल, विशेषतः दाक्षिणात्या चित्रपटांबद्दल लिहिलं. 


‘चार्ली हेब्दो’वरझालेल्या हल्ल्यानंतर लिहिलेल्या ब्लॉगमध्ये माझी भूमिका जगाच्या विपरित होती. त्यावरलोकांनी विरोधी प्रतिक्रिया व्यक्त करून मला धुवून काढलंय. पण पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केलेली भूमिका आणि मी लिहिलेला ब्लॉग यामध्ये साम्य होतं. पोप यांची प्रतिक्रिया वाचल्यानंतर लोकांनी मला धुतलं त्याचं विशेष काही वाटलं नाही. ‘भाजीवाल्याचा झाला वडा’ अशा शीर्षकाखाली सहा-सात ब्लॉग लिहिले. कोणाशीही दुरान्वये संबंध नसूनही काही जणांना तो आपल्याबद्दलच लिहिला आहे की काय, असे वाटू लागले. त्यांचा त्या ब्लॉग्जचा प्रचंड राग आला, याचाच अर्थ ते सत्य होतं. सत्य कटू असतं हेच खरं. मात्र, त्यांच्या विनंतीचा मान राखला जावा आणि उगाच कटकटी वाढू नये, यासाठी ते ब्लॉग्ज ड्राफ्ट केले. लोकमान्यटिळक यांच्या नावाने पत्रकारितेसाठीचा जीवनगौरव पुरस्कार ज्यांना मिळालाय, त्या मुजफ्फरहुसेन यांना भेटल्यानंतर त्यांच्यावरही ब्लॉग लिहिलाय.  
थोडक्यात काय तर जे जे वाटलं ते ते लिहिलं. जसं वाटलं तसं लिहिलं. खाण्यापिण्यासबाबत आणि फिरण्यासंदर्भात लेखनासाठी वर्डप्रेसवर स्वादिष्ट या नावाने स्वतंत्र ब्लॉग सुरू केलाय. त्यावरही चार-पाच ब्लॉग लिहून झालेत. अजून पुष्कळ लिहायचेत. लवकरच तेही लिहून होतील. 

‘ब्लॉग’ला मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार डॉ. अनिल फळे यांच्या संस्थेतर्फे दिला जाणारा चौथा स्तंभ पुरस्कार होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मिळाला होता. नंतरचे दोन उ्त्तेजनार्थ पुरस्कार ‘स्टार माझा’ आणि ‘एबीपी माझा’ चॅनेलतर्फे मिळाले होते. आणि हा चौथा म्हणजे राज्य सरकारचा ‘सोशल मीडिया’साठीचा पहिला राज्यस्तरीय पुरस्कार.


पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेकांनी स्वतःहून फेसबुकवर माझ्याबद्दल बरंच काही लिहिलं. बऱ्याच जणांनी व्हॉट्सअप, फेसबुक, एसएमएस आणि फोन करून अभिनंदन केलं. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांचे हार्दिक आभार. मनःपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे संपादक पराग करंदीकर आणि मटातील माझा सहकारी मित्र धनंजय जाधव यांचेही या निमित्ताने मला आभार मानायचे आहेत. माझा बालपणीपासूनचा मित्र आणि भाजपचा पुणे शहर सरचिटणीस धीरज घाटे यानं प्रदीप कोल्हटकरच्या हस्ते केलेला सत्कार तर जबरदस्तच. खरं तर सत्काराआधीचा सत्कारलहानपणापासून ज्यांच्यासोबत वाढलो आणि शिकलो, त्यांच्याकडून होणारं कौतुक, मिळणाऱ्या शुभेच्छा माझ्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. आमचे बंधू शिरीष चांदोरकर यांनी पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकदम बढिया बासुंदी करून शुभेच्छा दिल्या. त्याच्यासारखी बासुंदी आलम दुनियेत क्वचितच कुणाला जमत असेल, हा आपला दावाय. इतकं सारं कौतुक होतंय, त्यामुळं खूपच भन्नाट वाटतंय.

जे मला चांगलं ओळखतात, त्यांनी माझ्या मनातली सल बरोबर ओळखली. ‘आज आई हवी होती…’ ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये खूप वर्षांपूर्वी आईवर एक अग्रलेख लिहिला होता. त्यात एक वाक्य खूप छान होतं. ‘एखादी वाईट गोष्ट करताना आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो, की आईला काय वाटेल आणि एखादी चांगली गोष्ट घडली, तर असं वाटतं, की कधी एकदा आईला सांगतोय.’ खूपच मस्त वाक्यय हे. आज आई नाही, पण ती असती तर तिला खूपच आनंद झाला असता. अर्थात, बाबांना आनंद आहेच. त्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार मिळाला होता. मलाही मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पुरस्कार मिळणार असल्यानं त्यांना अधिक बरं वाटतंय.

माझ्यावर, माझ्या लेखनावर, ब्लॉगवर प्रेम करणाऱ्या आपणा सर्वांचे पुन्हा एकदा शतशः धन्यवाद…

Wednesday, August 19, 2015

हे तर महाराष्ट्र दूषण...

बी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वादविवाद आणि घुसळण यांच्यामुळे एक बरं झालं नेमकं कोण कोणत्या बाजूला आहे, हे स्पष्ट झालं. एकीकडे उठता बसता शाहू, फुले आणि आंबेडकरांचं नाव घ्यायचं, पुरोगामी महाराष्ट्र नि पुढारलेला महाराष्ट्र अशी जपमाळ ओढायची आणि दुसरीकडे जातीपातीवरून खुसपटं काढत बसायची. विशेषतः ब्राह्मणांबद्दल त्वेषानं आकस व्यक्त करायचा… अशी दुटप्पी भूमिका घेऊन भोंदूगिरी करणारे कोण आहेत, हे स्पष्ट झाले. पुरोगामीत्वाचे बुरखे टराटरा फाटले. जातीपाती निर्मूलनाची भूमिका घेऊन पुढे जाण्याच्या बाता करणाऱ्यांचे वस्त्रहरण झाले. नागव्यांची जत्रा अवघ्या महाराष्ट्राने पाहिली.


देश कुठे चालला आहे. जग कुठे चाललं आहे आणि ‘जाणता राजा’ म्हणून टेंभा मिरविणारी मंडळी लोकांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवून स्वतःची पोळी भाजून घेण्यात मश्गूल आहेत. मराठ्यांचा नेता म्हणून ओळख असलेल्या या नेत्यानं ब्राह्मणांना टार्गेट करण्यासाठी ‘संभाजी ब्रिगेड’, ‘जिजाऊ ब्रिगेड’ आणि ‘मराठा सेवा संघ’ अशी जातीयवादी संघटनांची पिलावळ जन्मास घातली. खतपाणी घातलं. तरुणांची माथी भडकाविली. विषवल्ली फोफावत राहील, याची अगदी पुरेपूर काळजी घेतली. पुरोगामी महाराष्ट्रात जातीपातीची विषवल्ली पसरविणारी ही विखारी पिलावळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच काळात फोफावली. आणि त्याला खतपाणी घातलं ‘जाणत्या राजा’नंच!

महाराष्ट्रात मनसोक्त सत्ता उपभोगणाऱ्या या जाणत्या राजानं आणि त्यांच्या पक्षानं स्वतःच्या जातीसाठी, म्हणजे मराठ्यांसाठी इतक्या वर्षांत काय केलं कोणास ठाऊक? वर्षानुवर्षे सत्ता उपभोगून ही मंडळी अजूनही मागासच आहेत. आरक्षणासाठी छात्या पिटताहेत. मोर्चे काढताहेत. निषेध करताहेत. आंदोलनं करताहेत. अहो, महाराष्ट्रात ४०-४५ टक्के असलेला तुमचा समाज. पाटीलकी, देशमुखी आणि इतर गोष्टींमधून सत्ता राबविण्याची परंपरा, सत्तेत बहुतांश मंत्री, आमदार तुमच्याच जातीचे. तरीही तुमचा समाज पिछाडलेला. का बुवा? आरक्षणाची भीक मागण्यासाठी हात पसरण्याची वेळ तुमच्यावर का आली? याचा विचार आधी करा. मग बाबासाहेब पुरंदरे, समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव यांच्या बदनामीची मोहीम उघडा. 



आणि तुम्ही ज्यांच्या नावाने खडे फोडताय, त्यांना संपविण्यासाठी आंदोलनं उभारताय, तीन टक्क्यांचं अस्तित्व संपविण्यासाठी जीवाचं रान करताय, तो ब्राह्मण समाज अनेक वर्षांपासून लढतोय, झटतोय आणि स्वतःचे महत्त्व दाखवून देतोय. बुद्धीच्या, ज्ञानाच्या, कष्टाच्या, मेहनतीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर आजही प्रचंड विरोधाच्या जमान्यातही तग धरून आहे. याचा कधी तरी विचार कराल की नाही? महाराजांच्या नावानं राजकारण करणं आणि जातीयवात पसरविण्याचे धंदे बंद करा. ब्राह्मणच नाही, तर सर्वच जातीमधील कष्टाळू आणि परिश्रम घेण्याची तयारी असलेल्या प्रत्येकाचेच भवितव्य उज्ज्वल आहे. फक्त आरक्षणाने काहीही साध्य होत नाही, हे कधीतरी समजून घ्या. कष्ट करणं हे भांडारकर फोडण्याइतकं सोप्प नाही, हे कधीतरी तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा. 

तर मुद्दा मराठा सेवा संघ आणि बी ग्रेडी संघटनांचा. मुळात शिवकालातील ब्राह्मण लोकांनाच टार्गेट करण्यासाठी या लोकांनी अभियान राबविलं. समर्थ रामदास हे ब्राह्मण करा त्यांना टार्गेट. दादोजी कोंडदेव ब्राह्मण करा त्यांना टार्गेट. अफझलखानाचा वकील कोणतरी कुलकर्णी म्हणजे ब्राह्मण. करा ब्राह्मणांना टार्गेट. ही मंडळी बाजीप्रभू देशपांडे यांनाही टार्गेट करायला निघाली होती. देशपांडे म्हणजे ब्राह्मणच अशी यांची धारणा. पण या येड्याखुळ्यांना कुठे माहितीये की सीकेपींमध्येही देशपांडे हे आडनाव असतं. बाजीप्रभू देशपांडे हे ब्राह्मण नव्हे तर सीकेपी होते. ही गोष्ट पुढे आल्यानंतर मग बी ग्रेडींचा कार्यक्रम मावळला. दुर्दैवाने बाबासाहेबांचं आडनाव पुरंदरे. म्हणजे ब्राह्मण. मग तेही या बी ग्रेडींच्या ‘टार्गेट लिस्ट’वर आले. 



स्वराज्याची चर्चा करताना कसला जातीपातीचा मुद्दा उपस्थित करता. जातींवर चर्चा करता. स्वराज्य आणि शिवाजी महाराज ही काय एकट्या मराठ्यांची जहागिरी आहे का? तुमच्याकडे शिवाजी महाराज या नावाचा मालकी हक्क कुणी दिलाय का? महाराज सर्वांचे आहेत. सर्व जातीधर्मांचे आहेत. फक्त महाराष्ट्राचे नाहीत, तर अवघ्या हिंदूराष्ट्राचे आहेत. ते होते म्हणून आज आपण आहोत, याची जरा तरी जाणीव ठेवा. स्वराज्य उभारण्यात अठरापगड जातींचा वाटा आहे, हे कसं विसरून चालेल आणि ही गोष्ट मान्य करावीच लागेल. अठरापगड जातींप्रमाणेच ब्राह्मणांनीही स्वराज्य उभारणीत योगदान दिलेलेच आहे. सिंहाचा वाटा नसेलही, पण खारीचा आहेच आहे. इतिहास संशोधक त्याबद्दल अधिक बोलू शकतील. तो माझा प्रांत नाही.

शिवाजी महाराजांकडे जसं जातीच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही तसंच शिवरायांच्या कोणत्याही सरदाराकडे वा शिवकालीन व्यक्तिमत्वाकडे जातीच्या नजरेतून पाहण्याची गरज नाही. अहो, शाळेत असताना दादोजी कोंडदेव यांचं आडनाव कुलकर्णी होतं हे कोणाला तरी माहिती होतं का? ते ब्राह्मण होते, हे देखील माहिती नव्हतं. त्यामुळं त्याचा अभिमान बाळगण्याची आवश्यकताच नव्हती. कोंडदेव हे महार, माळी, कोळी, चांभार किंवा आणखी कोणत्या तरी जातीतील असते, तरीही आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच असता. आकसाने त्यांचा पुतळा हटविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो. बी ग्रेडींच्या जातीपातीच्या राजाकारणामुळं दादोजींचं आडनाव कुलकर्णी होतं हे कळलं. फक्त ब्राह्मण म्हणून द्वेष करायचा. गुरू म्हणून तर नाकारायचंच पण तो माणूसच अस्तित्वात नव्हता, असेही दावे करायचे. कशामुळे तर फक्त ते ब्राह्मण होते म्हणून. ही कुठली दळभद्री वृत्ती. 

बाबासाहेबांच्या लिखाणावर आक्षेप घेणार कोण? बिनबुडाचे दावे करणार कोण श्रीमंत कोकाटे? इतिहास संशोधनात यांचे योगदान काय? महाराज गेले त्या किती ठिकाणी हा माणूस गेला? किती फिरला? किती कागदपत्रे यांनी तपासली आणि अभ्यासली. किती भाषांमधली कागदपत्रे पाहिली? फ्रेंच, इंग्रजी, फारसी, पर्शियन, मोडी आणि इतर किती भाषा इतिहासाची ओळख करून घेण्यासाठी आत्मसात केल्यात. त्यांची साथ कोण देणार पुरुषोत्तम खेडेकर. अहो, या खेडेकरचा आणि इतिहासाचा काय संबंध? ब्राह्मण बायका त्यांचे लैंगिक समाधान मराठ्यांकडून करून घ्यायच्या आणि उत्तान कपडे घालून काय काय करायच्या असलं बीभत्स नि अश्लील लिखाण करणारा हा खेडेकर कोर्टात शेपूट घालतो. बिनशर्त माफी मागतो आणि पुस्तक मागे घेतो. असली कोकाटे नि खेडेकर ही मंडळी बाबासाहेब पुरंदरेंच्या लेखनावर आक्षेप घेणार? बरं अत्यंत वाईट शब्दात लिहिणाऱ्या खेडेकरला शिक्षा काय तर काहीच नाही. फक्त माफीनामा आणि पुस्तक परत घेण्यावर भागलं. 
(खेडेकरच्या लेखणीची लायकी कळावी, म्हणून त्याच्या पुस्तकातील ब्लॉगमध्ये काही पानांचे जेपीजी मुद्दाम टाकले आहेत.)



अहो, बाबासाहेबांच्या पासंगाला तरी ही मंडळी पुरणार आहेत का? बाबासाहेबांनी जेवढं लेखन केलंय आणि जेवढी व्याख्यानं दिलीयेत तेवढं या मंडळींनी ऐकलं आणि वाचलं तरी आहे का? ‘जाणता राजा’ सारखं महानाट्य बाबासाहेबांनी उभं केलं, जगभर पोहोचविलं, त्यासाठी किती कष्ट त्यांनी उपसलेत हे पाहण्याचं भाग्य मला मिळालंय. त्यांच्या नाटकात सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय. तुम्ही काय केलंय शिवराय जगभर पोहोचविण्यासाठी? अहो, ज्या माणासावर समोरच्या व्यक्तीच्या वयाचा मान ठेवण्याचे संस्कारही नाहीत, ती व्यक्ती काय लायकीची आहे, हे सांगायला कोणाचीही आवश्यकता नाही. आणि जितेंद्र आव्हाड सारखा बोलका पोपट असल्या दळभद्री लेखकांची तुलना बाबासाहेबांच्या लेखनाशी करतो. आव्हाडांनी खेडेकरच्या पुस्तकातील आक्षेपार्ह लेखनाबद्दल आधी बोलावे आणि मग इतिहासाचे ज्ञान पाजळावे. एक लक्षात ठेवा. बाबासाहेब ‘महाराष्ट्र भूषण’ आहेत, तर तुम्ही ‘महाराष्ट्र दूषण’ आहात.

पुरोगामी महाराष्ट्रात इतक्या नीच पातळीवर जाऊन जातीय राजकारण करणारी ही मंडळी महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. अहो, महाराजांनी काय फक्त मराठ्यांच्या जोरावर स्वराज्य उभारलं नाही. मदारी मेहतर, जिवा महाला, शिवा काशीद, नेताजी पालकर, हिरोजी फर्जंद, दौलतखान आणि अशी असंख्य सरदार मंडळी मराठा होती का हो? प्रत्येक गोष्टीत जातपात पाहण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत. घरातूनही नाही आणि ज्या संघटनेत वाढलो तिथंही नाही. पण किमान आडनावावरून तरी वाटत नाहीत. खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, रांझेगावचा बाबाजी पाटील, जावळीचे चंद्रराव मोरे ही मंडळी मराठा होती का? हे देखील बी ग्रेडींनी तपासावं एकदा. म्हणजे महाराजांसाठी लढणारे कोण होते नि त्यांच्या विरोधात कोण होते, हे जगासमोर येऊ दे. होऊ दे चर्चा. जातपात काढण्याची गरज नाही. पण तुम्हाला खुमखुमीच असेल जात काढायचीच असेल तर सर्वांचीच जात काढा.

अगदी जाणतेपणी जातीपातीचे राजकारण करणारी ही नीच आणि दळभद्री वृत्ती तातडीने नष्ट करण्याची आवश्यकता आहे. अशी प्रवृत्ती पसरविणाऱ्या आणि विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी संघटनांची पिलावळ प्रसृत करणारे नेते स्वकर्मानेच नष्ट होतील. पण हा विखारी विचार नष्ट करण्याचे आव्हान मोठे आहे. आपल्याला जिथे जमेल, जसे जमेल तशा पद्धतीने हा विचार खोडून काढण्यासाठी, हा विखार नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. ही विषवल्ली ठेचून काढण्यात सर्वाधिक जबाबदारी सरकारची आहे. इतकी वर्षे जाणत्या राजांचेच राज्य होते. आता मात्र, अशा विखारी विचारांच्या लोकांचा देवेंद्र फडणवीस सरकारने चोख बंदोबस्त करावा, ही आमची आग्रहाची विनंती आहे.



जाता जाता एकच गोष्ट सांगतो. परवा एका छोटेखानी कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अगदी थोडक्यात पण मार्मिकपणे बाबासाहेब बोलले. ते म्हणाले, ‘परिस्थिती सर्वांना माहिती आहे. जे आहे ते सगळं तुमच्यासमोर आहे. जास्त बोलत नाही. एकच सांगतो, दुसऱ्याची रेघ छोटी करण्यासाठी स्वतःची रेघ मोठी करावी लागते. स्वतःची रेघ मोठी करा, म्हणजे दुसऱ्याची रेघ आपोआप छोटी होईल.’ 

वयाची ७० वर्षे इतिहासाची अखंड तपश्चर्या करून आखलेली रेघ छोटी करण्यासाठी दुसरी मोठी रेघ ओढण्याचे सामर्थ्य ना तुमच्यात आहे ना तुमच्या पुढील पिढ्यांमध्ये आहे. कारण फक्त आरक्षण मागून स्वतःची रेघ मोठी होत नाही. जाळपोळ, फोडाफोडी नि आकांडतांडव करून आपली रेघ मोठी होत नाही. टीव्हीवरच्या चर्चांमध्ये शिरा ताणून आणि आवाज चढवून आपली रेघ मोठी होत नाही. त्यासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं. हजारो-लाखो ग्रंथ आणि दस्तऐवज हाताखालून घालावे लागतात. देशोदेशीच्या भाषा अवगत करून घ्याव्या लागतात. प्रसंगी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून संसार करावा लागतो. बाबासाहेबांनी ही कठोर तपश्चर्या यशस्वीपणे पूर्ण केली म्हणून ते आज इथं आहेत. त्या तपश्चर्येतील त लिहायचीही तुमची लायकी नाही, हे ध्यानात असू द्या…

संबंधित ब्लॉग...
ब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा

Thursday, March 27, 2014

ब्राह्मण महासंघाचा तमाशा

कसला आलाय समाजावर अन्याय


सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराधिकाराचा (नोटा) वापर करावा

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या गोविंद कुलकर्णी, विश्वजित देशपांडे आणि शाम जोशी यांनी असे आवाहन नुकतेच केल्याचे वाचनात आले. कारण काय, तर महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या टक्केवारीच्या प्रमाणात कोणत्याच पक्षाने समाजाला प्रतिनिधीत्त्व दिलेले नाही. कोणत्याच पक्षाने असे म्हणताना त्यांना भारतीय जनता पक्ष असेच म्हणावयाचे आहे, असे ठामपणे दिसून येते. कारण ब्राह्मण समाज हा मागील काही काळात नेहमीच भाजपसोबत राहिला. मात्र, त्यांनीही समाजाला गृहित धरून निवडणुकीची आखणी केली आहे काय… अशी शंका पत्रकात नमूद करण्यात आली आहे.

मुळात कुलकर्णी, देशपांडे आणि जोशी यांनी यांच्या ब्राह्मण संघामागे पुण्यातील १८-१९ टक्के ब्राह्मण समाजापैकी किती लोक आहेत, याचा खुलासा झालेला नाही. त्यामुळे अशा ब्राह्मण संघटनांबद्दल सहानुभूती असली तरीही त्यांचे आवाहन ऐकण्याऐवजी केराची टोपली दाखविणारे ब्राह्मणच पुण्यात अधिक मिळतील. मात्र, तरीही ब्राह्मण समाजावर अन्यायाचा टाहो फोडून ‘नोटा’चा वापर करण्याचे आवाहन करणे, म्हणजे ब्राह्मण मतदारांना विनाकारण संभ्रमात टाकण्यासारखे आहे. आता ही मंडळी हे आवाहन तिकिट नाकारलेल्या कोणाएकाच्या सांगण्यावरून करीत आहेत की स्वतःहून करीत आहेत, ते माहिती नाही. मात्र, अशा पद्धतीने ‘नोटा’ वापरण्याचे आवाहन करणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे.


मुळात ब्राह्मण समाजाला टक्केवारीच्या तुलनेत प्रतिनिधीत्व मिळालेले नाही, हा ब्राह्मण महासंघाचा दावाच चुकीचा आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाचा उल्लेख करून त्यांनी हे निवेदन दिले आहे. शिवाय पुण्यातील भाजपच्या उमेदवारीवरूनच हे पत्रक जारी केले आहे. त्यामुळे त्याच पक्षाविषयी बोलणे अधिक संयुक्तिक ठरेल. काँग्रेस, मनसे आणि इतर पक्षांबद्दल इथे बोलण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्रात साडेतीन टक्के ब्राह्मण समाज आहेत, असे ढोबळपणे बोलले जाते. म्हणजे महाराष्ट्रात शंभर जागा असतील, तर भाजपने ब्राह्मण समाजाला साडेतीन जागा दिल्या पाहिजेत. अर्थात, महाराष्ट्रात ४८ जागा आहेत आणि भाजप फक्त २४ जागा लढवित आहे. समीकरण सोडविले, तर तो आकडा ०.८४ इतका येतो. म्हणजे भाजपने महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाला फक्त एक जागा द्यायला हवी. ती त्यांनी मुंबईत दिली आहे, पूनम महाजन-राव यांना. मग ब्राह्मण महासंघाचा हा अनाठायी टाहो कशासाठी? टक्केवारीनुसार वाट्याची एक जागा पदरात पडल्यानंतरही पुण्यात टक्केवारीची सौदेबाजी करणाऱ्यांच्या मागे कोण आहे, हे पुढे आले पाहिजे. 


पुण्यात साधारण तीन ते साडेतीन लाख ब्राह्मण मतदार असावेत, असा अंदाज आहे. त्यामुळे पुण्यात पक्षांनी ब्राह्मण उमेदवारांना प्राधान्य द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. मुळात अशी मागणी करणाऱ्या ब्राह्मण संघटनांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात.

पहिले म्हणजे गेल्या महापालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या ब्राह्मण उमेदवारांच्या विजयासाठी तुमच्या संघटनेने आणि महासंघाने काय आणि किती प्रयत्न केले, याचे स्पष्टीकरण कृपया द्या. मनिषा घाटे, मेधा कुलकर्णी, नीलम कुलकर्णी, माधुरी सहस्रबुद्धे, मुक्ता टिळक, श्याम देशपांडे यांच्या पत्नी, उदय जोशी, उज्ज्वल केसकर आणि जर कोणत्या ब्राह्मण उमेदवाराचे नाव चुकून घ्यावयाचे राहिले असेल, तर ते सर्व. या उमेदवारांच्या विजयासाठी ब्राह्मण संघटनांनी काय प्रयत्न केले. आमच्या महासंघाचा या उमेदवारांना पाठिंबा आहे आणि ब्राह्मण मतदारांनी त्यांनाच मतदान करावे, असे पत्रक तरी तुम्ही काढले होते का? मी घेतलेल्या माहितीनुसार शून्य. तशी खंत काही ब्राह्मण नगरसेवकांनी सत्कार समारंभात बोलूनही दाखविली होती.

मुद्दा दुसरा म्हणजे ब्राह्मण समाजावर सातत्याने प्रहार करणारी आणि समाजाबद्दल, ब्राह्मण महिलांबद्दल अतिशय वाईट पद्धतीने अपप्रचार करणारी, साहित्य प्रसूत करणारी संभाजी ब्रिगेड ही संघटना अधूनमधून डोके वर काढीत असते. तेव्हा या ब्राह्मण संघटना कोणत्या बिळात तोंड खुपसून बसलेल्या असतात. ब्रिगेडच्या विखारी प्रचाराला आळा घालण्यासाठी तुम्ही काय पावले उचललीत सांगणार का? न्यायालयाचा दरवाजा ठोठावला की प्रत्युत्तर देणारे साहित्य निर्माण केले, की रस्त्यावर उतरून मोर्चा काढला… सांगा काय केले.

छत्रपती शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटविण्याचे षडयंत्र रचले जात असताना कुठे होते हे ब्राह्मण महासंघाचे देशपांडे, कुलकर्णी आणि जोशी. पुण्यात १८ ते १९ टक्के ब्राह्मण आहेत ना, पुण्यात मग त्यावेळी विरोध करण्यासाठी किती हजार ब्राह्मण लोक रस्त्यावर उतरले होते. पुतळा हटविण्यास का नाही ताकद लावून विरोध केला. तेव्हा रस्त्यावर कोण उतरले होते, शिवसेना-भाजपवालेच उतरले होते ना. रात्रभर जागून तिथे ठिय्या मांडून कोण बसले होते. शिवसेना-भाजपवालेच बसले होते ना. तेच ब्रिगेडवाल्यांना आव्हान देत होते ना. जेव्हा जेव्हा ब्रिगेडने दहशत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आवाज टाकला ना. शिवाय ज्यांची वकिली करण्यासाठी तुम्ही पत्रक काढले आहे, ते मात्र, दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविला तेव्हा तिथे नव्हते. ब्राह्मण असूनही. तेव्हा तुमची बोलती बंद झाली होती का? 

(दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यात आल्यानंतर लिहिलेला ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


शिवशाहीर आणि छत्रपती शिवरायांवर अधिकारवाणीने बोलू शकतील, असे व्यक्तिमत्त्व असलेल्या माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना धमकी देण्यापर्यंत संभाजी ब्रिगेडची मजल गेली होती. तेव्हा सर्व ब्राह्मण संघटना मिठाची गुळणी धरून का बसल्या होता. बाबासाहेबांच्या समर्थनार्थ का रस्त्यावर उतरल्या नाहीत. ‘आम्ही आहोत त्यांच्या पाठिशी, हा दिलासा का दिला नाहीत तुम्ही.’ बोला उत्तर द्या. 

चिपळूणच्या साहित्या संमेलनात परशुरामाच्या परशूचा आणि चित्राचा मुद्दा उपस्थित करून संभाजी ब्रिगेडने अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात ब्राह्मण महासंघाने आवाज उठवून जोरदार आंदोलन का उभारले नाही. का दिले नाही रस्त्यावर उतरून आव्हान. गल्लीतील एखादी किरकोळ संघटनाही पत्रकबाजी करते आणि पेपरमध्ये बातमी छापून आणते. तुमच्या संघटनेची ताकद आहे ना, मग नेमक्या वेळी मूग गिळून गप्प का बसता.

फक्त पत्रकबाजी करून बोलबच्चन करायला फारशी ताकद लागत नाही. मात्र, समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवायला, प्रतिकार किंवा विरोध करायला संघटनेची ताकद लागते, अंगात दम लागतो. ती ताकद आणि तो दम तुमच्याकडे आहे का, याचा विचार करा. भाजप आणि शिवसेनेकडे तो दम, ती ताकद आणि ती हिंमत आहे. त्यामुळेच बहुतांश ब्राह्मण समाज याच युतीच्या पाठिशी आहे. मध्यंतरी मनसेनेही ब्राह्मण मतदारांना पळविले. मात्र, राज ठाकरे हे सुद्धा फक्त बोलघेवडे आणि कृतीशून्य असल्याचे स्पष्ट होत चालल्यानंतर हळूहळू हा समाज पुन्हा पारंपरिक पक्षांकडे परतू लागला आहे. त्यामुळे नेमक्या वेळी अपशकुन करण्यासाठी तुम्ही कोणाची सुपारी घेऊन हे पत्रक काढले, याचा खुलासा व्हायला हवा.

राहता राहिला, प्रश्न अनिल शिरोळे यांचा. ते फक्त मराठा आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे, असा तुमचा समज असेल, तर या आधीचा ब्लॉग जरूर वाचा. मग तुम्हाला समजेल बापटांचे तिकिट कुणी आणि का कापले.

आणखी एक गोष्ट म्हणजे शिरोळे हे मराठा असले तरीही विचारांशी आणि संघटनेशी पक्के आहेत. संघ परिवारातील पतित पावन संघटना या आक्रमक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. १९७२ पासून ते एकाच विचारांशी एकनिष्ठ आहेत. संघबंदी आणि आणीबाणीच्या काळातमिसाखाली त्यांनी एक वर्षांचा तुरुंगवास भोगला. अयोध्येच्या आंदोलनातही ते सहभागी होते. १९९२ पासून भाजपतर्फे नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा लाडका, स्पष्ट विचार, स्वच्छ प्रतिमा आणि अॅडजस्टमेंटला विरोध करणारा नेता म्हणून शिरोळे ओळखले जातात. 


बेचाळीस वर्षे एकच पक्ष आणि एकाच विचाराशी एकनिष्ठ राहणाऱ्या नेत्याच्या उमेदवारीच्या आड जातीचा मुद्दा कसा काय येऊ शकतो, हे महासंघाचे पदाधिकार स्पष्ट करू शकतील काय. तुम्ही काहीच स्पष्ट केले नाही, तरी हरकत नाही. ब्राह्ण मतदार हा सूज्ञ, हुशार, विचार करून आणि सद्सद्विवेक बुद्धी वापरून मतदान करणारा समाज आहे. भांडारकर संस्थेवर हल्ला करणाऱ्यांच्या, लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविणाऱ्यांच्या आणि ब्राह्मण महिलांच्या लैंगिकतेबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लेखन करणाऱ्या प्रवृत्तींच्या पाठिशी उभे राहण्यात ब्राह्मणांचे हित आहे का, हे समाजातील सूज्ञ मतदार चांगले जाणतात.

हिंदू समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न केले तसेच जातीभेद कधीच मानला नाही, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणाऱ्यांच्या आणि राजकारणात ज्यांनी कधीही जातीपातीला थारा दिला नाही, त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसदारांच्या मागे ठामपणे उभे राहण्यात आपल्या समाजाचे हित आहे, न कळण्याइतका ब्राह्मण समाज, मतदार मूर्ख नाही.
त्यामुळे तुम्हाला काय पत्रकबाजी करायची ती करा. ब्राह्मण समाज नाराज आहे, असे म्हणायचे ते म्हणा. त्याचा ब्राह्मण मतदारांवर त्याचा परिणाम होणार नाही.

आणि हे कसे विसरलातः 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आयुष्यात जमणार नाही, असे मोठे काम बाळासाहेब ठाकरे यांनी करून ठेवले आहे. साडेतीन टक्के म्हणजेच खरं तर मूठभर असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मनोहर जोशी यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. जातीची गणिते डोळ्यासमोर ठेवून दुसऱ्या कोणताही पक्ष ही कामगिरी करूच शकणार नाही. बाळासाहेबांनी ते करून दाखविले. जातीपातीचा विचार न करता.

केंद्रात भारतीय जनता पक्षाने अटलबिहारी वाजपेयी या ब्राह्मण माणसाला पंतप्रधानपदावर विराजमान केले. अर्थातच, विचारांवरील निष्ठा आणि अखंड तपश्चर्या लक्षात घेऊनच.

त्यामुळे कोणत्या पक्षांनी ब्राह्मण समाजावर अन्याय केला आहे किंवा नोटा वापरा. अमक्याला मत द्या. तमक्याला देऊ नका, हे सांगायला ब्राह्मण महासंघ आणि संघटनांची गरज नाही. ब्राह्मण मतदार सूज्ञ आहे. तो सारासार विचार करूनच निर्णय घेईल.