Monday, April 04, 2011

तमिळनाडू डायरी...

खरा प्रचार चॅनल्सवरूनच

तमिळनाडू म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं मोठमोठाले फ्लेक्स, भव्य कटआऊट्स आणि फ्लोरसंट रंगांनी रंगविलेल्या भिंती. चित्रपटातील नटनट्यांचे मोठमोठाले फ्लेक्स पाहून राजकीय नेत्यांचेही तसेच भव्य फ्लेक्स वगैरे असतील, अशी धारणा होती. पण निवडणूक आयोगाच्या निर्बंधांमुळं इथं ते काहीही नाही. भव्य फ्लेक्स आहेत. पण ते द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या कार्यालयांमध्ये. प्रचाराचा विचार करता रस्त्यांवर शुकशुकाट आहे. मधूनच एखाद दोन रिक्शा द्रमुक किंवा अण्णा द्रमुकचे झेंडे लावून चाललेल्या दिसतात. पण बाकी सारे शांतशांतच.



नुसते रस्तेच नाही तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक या राज्यातील दोन प्रमुख कार्यालयांमध्येही शुकशुकाट. नेते नाहीतच आणि त्यामुळे कार्यकर्तेही नाहीत. आहेत फक्त सिक्युरिटी गार्डस आणि पोलीस. हाताच्या बोटावर मोजण्याइतके जे कार्यकर्ते दिसतात ते आपापल्या भागात प्रचार करताना येणा-या अडचणी सांगायला आलेले. द्रमुक अध्यक्श एम. करुणानिधी, त्यांचे पुत्र स्टॅलिन आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जे. जयललिता यांनी सध्या चेन्नई आणि परिसरावर लक्श केंद्रीत केले आहे. जयललिता यांनी शुक्रवारी संध्याकाळी चेन्नई शहरात रोड शो घेऊन मतदारांशी संवाद साधला. तर स्टॅलिन हे शनिवारी कोळथ्थूर (चेन्नई ग्रामीण) या त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात प्रचार करणार आहेत. रविवारी कलैंग्नार करुणानिधी यांची चेन्नईमध्ये जाहीर सभा आहे.

प्रचाराची खरी रंगत येते आहे, ती कलैंग्नार आणि जया टीव्ही या दोन चॅनल्सवर. कलैंग्नार हा करुणानिधी यांच्या मालकीचा चॅनल. तर जयललिता या जया टीव्हीच्या मालकीणबाई. अण्णा अरिवालयम इथं कलैंग्नार टीव्हीचं मुख्य कार्यालय आणि तिथंच द्रमुकचं हेडऑफिस. तर पोएज गार्डनमध्ये जे. जयललिता यांचा बंगला आणि शेजारीच जया टीव्हीचं हेडक्वार्टर. करुणानिधी यांच्या जाहीर सभा कलैंग्नारवरून लाईव्ह टेलिकास्ट केल्या जात आहेत. तर जयललिता यांचे रोड शोमधील भाषण जया टीव्हीवरून दिवसभर ऐकायला मिळतं. भाषा कळत नसली तरी जयललिता सगळीकडे एकच भाषण करतात, हे कळतं. ते देखील समोर लिहिलेल्या कागदावर वाचून. उलट करुणानिधी हे भाषणामधून मनमोकळा संवाद साधतात.

डीएमडीके पक्शाचे अध्यक्श आणि तमिळ अभिनेते विजयकांत यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानफटात लगाविल्याचे वृत्त सध्या इथल्या टीव्हीवर चर्चेने चघळते जाते आहे. विजयकांत यांची जयललिता यांच्याशी युती असल्याने जया टीव्हीवर त्या वृत्ताला थारा नाही. मात्र, कलैंग्नार आणि सन टीव्हीवर प्रत्येक बातमीपत्रात वारंवार ते दृष्य दाखवून चघळलं जातंय. सन टीव्ही हा दयानिधी कलानिधी मारन यांच्या मालकीचा चॅनल आहे. शिवाय दक्शिणेच्या चार राज्यांमधील ८५ टक्के केबल व्यवसाय करुणानिधी आणि कुटुंबीयांच्या हातात आहे.



इथं, जाणवलेला आणखी एक प्रकार म्हणजे लोक आपापल्या नेत्याबद्दल भरभरून बोलतात. मत देऊन आम्हाला काय फायदा, आम्ही मतदान केल्यामुळे थोडाच फरक पडणार आहे, आम्ही मतदानच करत नाही, असली वाक्य इथं ऐकायलाही मिळत नाही. अम्मा किंवा कलैंग्नार यापैकी त्याच्या आवडत्या व्यक्तीचे कौतुक तो सुरुच करतो. नुसतं कोण असं नाही तर ती व्यक्ती का पाहिजे, ते देखील दोन-चार वाक्यांमध्ये सांगतो. अर्थात, ते आपल्याला कळत नाही. पण भावना पोहोचतात.

चेन्नई म्हणजे दुसरी मुंबई. एक तर प्रशस्त रस्ते. दुसरं म्हणजे शहरातील बसव्यवस्था एकदम उत्तम आणि तिसरं म्हणजे समुद्र किनारा जवळच असल्यामुळं घाम आणि उकाडा यांचा अतूट संबंध. सकाळी आठ वाजताच अकरा साडेअकरा वाजल्यासारखं वाटतं. पण संध्याकाळ नंतर गार वारे वाहू लागल्यानंतर बरं वाटतं. इथले लोक तोडकं मोडकं हिंदी बोलतात. पण त्यापेक्शा उत्तम हिंदी बोलतात. तमिळा... असं म्हणून आपल्याला तमिळ येतं की नाही, याची खात्री करून घेतात आणि मग गाडी इंग्लिशकडे वळवितात. अर्थात, तरुण तरुणी मात्र, अधिक चांगल्या पद्धतीने हिंदीतून संवाद साधतात.

लिंबू सरवतवाल्याकडून शिकलेला आजचा तमिळ शब्दः नन्ड्री (धन्यवाद)

Tuesday, March 22, 2011

कावळे, चिमण्या, कबुतरं, खारूताई


आमचे रोजचे पाहुणे
तमाम पर्यावरणवादी मंडळींना हेवा वाटावा, असं चित्र गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या घरी रोज सकाळी दिसतंय. कावळा, चिमण्या, कबुतरं आणि अहो, आश्चर्यम म्हणजे चक्क खारूताईचं देखील आमच्या घराच्या खिडकीत रोज सकाळी आगमन होतं. अगदी न चुकता. ही मंडळी येतात आणि कोणतीही कुरबूर न करता खिडकीमध्ये ठेवलेल्या पदार्थांवर जोरात ताव मारतात. खरं, तर कावळ्यावर लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये याबद्दलचा ओझरता उल्लेख केला होता. पण आता न रहावल्यामुळं त्यावरच स्वतंत्र ब्लॉग लिहित आहे.

आई असल्यापासून आमच्याकडे एक पद्धत होती आणि अजूनही ती सुरु आहे. ती म्हणजे सक्काळी सक्काळी कुकर झाल्यानंतर गरमा गरम वाफाळलेला भात खिडकीतील कावळे आणि चिमण्यांना वाढायची. साधारणपणे १९७७ किंवा ७८ पासून असेल. मग भात वाढल्यानंतर कावळे, चिमण्यादेखील अगदी निर्धास्तपणे आमच्या खिडकीत येऊन मेजवानी झोडतात. कधी भात वाढायला उशीर झाला, की त्यांची कावकाव सुरु होते. कावळ्यांच्या पोटातही कावळे कोकलतात, याचा प्रत्यय आम्ही खूप पूर्वीपासून घेतो आहोत. जेव्हा केव्हा बाहेरगावी जातो, तेव्हा त्या बिचाऱ्यांचं काय होत असेल, असा विचारही मनात येऊन जातो.

अनेक वर्षांनंतर आजही आम्ही ती पद्धत जपली आहे. बदल फक्त इतका झाला आहे, की आता भातबरोबरच तुकडे केलेल्या पोळ्या, भिजविलेले पोहे, पोहे, भिजविलेला साबुदाणा, खिचडी, मुरमुरे अशी पदार्थांची रेलचेल झाल्यामुळे तमाम पक्शी एकदम खूष आहेत. घरात जे शिजतं ते आम्ही पहिल्यांदा त्यांना वाढतो. त्यामुळं जे शिजतं ते खाण्याची संधी त्यांना मिळते. पदार्थ जसे वाढले तसे पक्शीही वाढले आहेत. पूर्वी फक्त कावळे, चिमण्या आणि कबुतरं यायची. आता साळुंकी आणि अनोळखी पक्शी येऊनही आडवा हात मारताना दिसतात. फक्त पक्शीच नाही तर इटुकली पिटुकली खारूताई देखील येऊन पदार्थ फस्त करताना दिसते. रोज सकाळी पदार्थ वाढले की खारूताई आलीच म्हणून समजा.

मुक्या जीवांना खाल्ल्यानंतर पाणी पण प्यावंसं वाटत असेल, अशी आमची भाबडी समजूत असल्यामुळे आम्ही आता खलबत्त्यातील खलामध्ये त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवतो. या मंडळींचा इतका राबता इतका असतो, की साधारणपणे तास दीड तासात ते पाणी संपत. मग पुन्हा एकदा तो खल भरून ठेवावा लागतो. आपल्यालाच जर उन्हाळ्यात इतकी तहान लागत असेल तर उन्हातान्हात फिरणाऱ्या त्या मुक्या बिचाऱ्यांना किती तहान लागत असणार याचा विचारच केलेला बरा.


आमच्याकडे येणाऱ्या या पक्शांचं पण अनेकदा कौतुक वाटतं. गरमागरम पदार्थ वाढल्यानंतर जेव्हा एखादा पक्शी खिडकीत येतो, तेव्हा तो आणखी चार जणांना आरडाओरडा करून बोलावतो. कावळा असो किंवा चिमणी. मग आणखी एक दोन सहकारी येऊन खाऊ गट्टम करतात. पक्शांमध्येही शेअरिंग असतं, हे पाहून खूप गंमत वाटते. कधी कधी ते त्यांच्या इवल्याश्या चोचीमध्ये भाताचं ढेकूळ किंवा पोळ्यांचे तुकडे घेऊन जातात. घरट्यातील त्यांच्या पिल्लांना किंवा उडताही न येणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना नेतात माहिती नाही. पण चोचीत पदार्थ घेऊन भु्र्रकन उडून जातात. कदाचित एकांतात खाण्याची सवय असल्यामुळंही घेऊन जात असतील, देव जाणे.

कावळा तसं पहायला गेलं तर मांसाहारी. पण आमच्याकडे येणारे कावळे इतके शिस्तबद्ध आहेत, की इतक्या वर्षांच्या इतिहासात त्यांनी एकदाही बाहेरून मांसाहारी पदार्थाचा एक तुकडाही आणलेला नाही. पण कावळे जितके शिस्तबद्ध तितकीच कबुतरं बेशिस्त. कबुतर हे शांततेचं प्रतीक वगैरे असेल पण ते अस्वच्छतेचंही प्रतीक आहे. खाण्यासाठी रोज येतात आणि खाण्यापेक्शा इकडेतिकडे उडवाउडवीच जास्त करतात. खाणं कमी आणि चिवडणं जास्त. बरं, फक्त तितकंच नाही तर फक्त खिडकीतच थांबत नाहीत तर घरात येऊनही फडफड करतात. कावळे, चिमण्या किंवा खारूताई यांनी कधीच खिडकीची सीमारेषा ओलांडली नाही. पण कबुतरांनी हद्दच केलीय. बरं, नुसते घरात येत नाहीत तर येताना कधी पालापाचोळा, बारीक बारीक काड्या आणतात आणि घरभर करतात. कधीकधी पंखांची फडफड करून उच्छाद मांडतात. वैताग येतो त्या कबुतरांचा.

काल तर त्या दोन कबुतरांचा इतका राग आला होता, की समोर असते तर चांगली अद्दल घडविली असती. सक्काळी सक्काळी कबुतरं घरात घुसली. साधारणपणे आठची वेळ असेल. आता इतक्या सकाळी कशाला कडमडली काय माहिती. बरं, पंखांचा फडफडाट करून जाताना घरातील ट्यूबलाईट फोडून गेले हरामखोर... खाया पिया बहोत कुछ ट्यूब फोडा पाच पन्नास रुपये. संपूर्ण स्वयंपाकघर ट्यूबलाईटच्या काचांनी भरून गेलं. जळलं मेलं लक्शण त्या कबुतरांचं.... असो काय करणार. काहीही केलं तरी कबुतरं येणं थांबणार नाही आणि त्यांनी येणं थांबवावं, असंही आमचं म्हणणं नाही. पण त्यांनी चिमण्या-कावळ्यांसारखं शिस्तबद्ध तरी असावं, इतकीच आशा आहे. पण त्यांना समजावणार कोण?

बाकी काहीही असो, जे सुरु आहे ते खूप आनंददायी आहे. इथून पुढेही असंच सुरु रहावं आणि अधिकाधिक पक्शी तसंच खारूताया, याव्यात असंच आम्हाला (म्हणजे मला आणि बाबांना) वाटतं. फक्त एक आवाहन असं करावसं वाटतं, की तुम्हालाही जर शक्य असेल तर तुम्हीही या मुक्या पक्श्यांना खायला वाढत जा. खायला देणं शक्य नसेल तर खिडकीत किंवा गच्चीत त्यांच्यासाठी पाण्याची सोय तरी तुम्ही नक्कीच करू शकता. लोक पाणपोया सुरु करुन नागरिकांची सेवा करतात. तुम्ही पक्श्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून मुक्य जीवांची सेवा करा. पहा जमतंय का?

Tuesday, February 15, 2011

नवा बातमीदार

नाकाला पुन्हा मिरच्या झोंबणार

मराठी वृत्तपत्रसृष्टीत पत्रकारितेवर भाष्य करणाऱ्या, टीका करणाऱ्या आणि लोकांचे वाभाडे काढणाऱ्या ब्लॉगची परंपरा आणखी एक पाऊल पुढे गेली आहे. लेट्स भंकस, कळते-समजते, सहयोगी बातमीदार, फेकिंगन्यूज-ब्रेकिंगन्यूज आणि इतर काही ब्लॉगपुरती मर्यादित असलेली ब्लॉग परंपरा आता थेट सातासमुद्रापार गेली आहे. नवा बातमीदार हा नवा ब्लॉग मराठी पत्रकारितेत सुरु झाला असून हा ब्लॉग चालविणारी मंडळी थेॉ अमेरिकेत बसून ब्लॉग चालवित आहेत. (म्हणजे त्यांनी डिक्लेरेशन तरी तसं दिलंय बुवा)

याचाच अर्थ कोणी कोणावर टीका टिपण्णी केली आणि पत्रकाराच्या नाकाला मिरच्या झोंबल्या तरी त्याला हात चोळत बसण्यावाचून काहीही करता येणार नाही, असं दिसतंय. कारण पूर्वीप्रमाणेच हा ब्लॉगही बंद करावयाचा झाल्यास आता थेट अमेरिकेशी पंगा घ्यावा लागणार आहे. कारण आमच्या ब्लॉगमुळे तुमचे चारित्र्यहनन झाले असे वाटत असेल तर तुम्ही आम्हाला बिनदिक्कतपणे कायदेशीर नोटीस पाठवू शकता, असा नवा ब्लॉग नव्या बातमीदारवर पडला आहे. त्यात आयपी अॅड्रेस, संपूर्ण पत्ता आणि संपूर्ण नावही दिले आहे. त्यामुळे ज्यांना अशा ब्लॉगमुळे मनस्ताप होत असेल त्यांनी थेट अमेरिकी सायबर क्राईम डिपार्टमेंटशी संपर्क साधावा.

व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्यावर स्वतः निर्बंध घालायचे. आणि पत्रकारितेवरील स्वातंत्र्याच्या हल्ल्याच्या नावाने गळे काढणाऱ्यांविरोधात असे ब्लॉग वाढत जात आहेत, ही चांगलीच गोष्ट म्हटली पाहिजे. अर्थात, कोणत्याही प्रसंगी वाहवत न जाता इतर ब्लॉगवर आलेली परिस्थिती आपल्यावर ओढवू नये, याची जबाबदारी या ब्लॉगवर आहेच. तेव्हा नव्या सुरुवातीस शुभेच्छा...

नव्या बातमीदारवरील नवा ब्लॉग खालीलप्रमाणे...

लीगल डिसक्लेमर

या ब्लॉग मधील मतांशी आपण सहमत नसाल, आपणास जर अब्रूहनन झाल्यासारखे वाटत असेल तर आपण आम्हाला कायदेशीर नोटीस पाठवू शकता. अशी नोटीस आपण खालील पत्त्यावर पाठवू शकता -

Manish Birla,
Software Analyst, Microsoft,
1065, La Avenida Mountain View,
CA, 94043, US


भारतातील सायबर कायद्यानुसार, भारतीय हद्दीबाहेरील कार्यक्षेत्रातून कार्यान्वित असलेली वेबसाइट अथवा सायबर हालचाल यावर सध्या तरी काही नियंत्रण आणता येत नाही. आंतरराष्ट्रीय सायबर कायद्यानुसार मात्र एखाद्या व्यक्तीला जीवाला धोका संभवत असेल तर सायबर हालचाल रोखण्यासाठी परस्पर सहकार्य वापरले जाते. मात्र आम्ही व्यक्तीस्वातंत्र्य आणि पत्रकारितेच्या उच्च मूल्यांचे पालन करण्यास बांधील आहोत. आपण जर आम्हाला एखाद्या अनुचित बाबीसंदर्शात अमेरिकी कायद्याच्या अधीन राहून भारतातील सक्षम अमेरिकी वकिलातीमार्फत कायदेशीर नोटीस पाठविली तर आम्ही तिचा जरूर स्वीकार करू. त्यामुळेच आम्ही आमची ओळख लपवून ठेवलेली नाही. मात्र आम्ही थर्ड पार्टी सायबर फेसिलीटेटर आहोत, हे कृपया जरूर ध्यानात घ्यावे.

सायबर कायद्यान्वये एखाद्याची अथवा एखादीची फेक (बनावट) प्रोफाईल तयार करून त्या व्यक्तीच्या नावे सायबारविश्वात वावरणे आणि फीशिंग अर्थात आर्थिक फसवणूक हे सर्वात गंभीर गुन्हे मानले जातात. काही प्राथमिक बाबतीत आपण स्वत:ही खबरदारी घेऊन टाळू शकता. काही प्राथमिक बाबी आपण माहितीही करून घेऊ शकता. जसे तुम्ही ज्या संगणकावरून इंटरनेटचा वापर करताय त्याचा युनिक पत्ता अर्थात आयपी एड्रेस; कसा ते इथे बघा! अगदी सोपे आहे, तुम्हालाही सहज जमेल.. 'ई-मेल'ला आलेल्या हेडरवरुन तुम्हाला सायबर विश्वातल्या कुठल्या पत्त्यावरून ते 'ई-पत्र' आलेय ते अगदी काही क्षणात कळेल. ज्या 'आय-पी'वरुन ई-मेल आलाय तो 'आय-पी' इथे टाका आणि सर्च करा. कुठल्या शहरातून, कोणत्या संगणकावरून, कुठल्या इंटरनेट सर्व्हीस प्रोव्हायडरच्या (आयएसपी) कनेक्शनवरुन ई-मेल पाठविला गेला आहे ते कळेल. एव्ह्ढेच काय कुठला ब्राऊझर आहे, कोणती ओपरेटिंग सिस्टीम पाठविणारा वापरतोय हेही कळेल.

आमचे लोकेशन :
My IP address is: 66.45.240.66
My IP Address Location: Secaucus in United States
ISP of my IP: Interserver

Friday, February 11, 2011

सकाळी नऊ वाजताच

धुंधुरमासाचं भरपेट जेवण

सकाळी नऊ वाजता तुम्ही कधी जेवला आहात का? मी जेवलोय. गेल्या रविवारीच सक्काळी सक्काळी भरपेट जेवण्याचा आनंद लुटलाय. निमित्त होतं धुंधुर मासाच्या कार्यक्रमाचं. थंडीच्या मोसमात (बहुधा संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीत) एकेदिवशी सक्काळी सक्काळी एकत्र यायचं आणि थंडीमध्ये पोषक ठरतील, अशा पदार्थांवर ताव मारायचा. लोकमान्य नगरमधील जुने संघमित्र प्रदीप कोल्हटकर यांनी दिलेल्या निरोपाचं बरहुकुम पालन करीत मी धुंधुर मासाचा कार्यक्रम होणार होतो तिथं दाखल झालो. सिंहगड रस्त्यावरील अनुबंध इमारतीच्या टेरेसवर हा कार्यक्रम अगदी दणक्यात पार पडला. (सगळ्यात पहिल्यांदा प्रसाद जोशी या आमच्या लोकमान्य नगरमधील मित्राकडे धुंधुर मासानिमित्ताने जेवलो होतो. काही लोक त्याला धर्नुमास असंही म्हणतात.)

महेश चांडक, अनिल भांबुरकर, सचिन कुलकर्णी, प्रसाद बापट या जुन्या संघमित्रांची आणि नूमविच्या ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापक माधव परांजपे यांची भेट ही धुंधुर मासाच्या कार्यक्रमाइतकीच संस्मरणीय ठरली. सुरुवातीला सचिन कुलकर्णी यांचे छोटेखानी भाषण झाल्यानंतर आम्ही भोजनस्थानी दाखल झालो. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या विश्व संघ शिबिराची माहिती सचिननं दिली. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या सहाय्यानं. संघ बदलत असल्याचं पुन्हा एकदा अनुभवलं. भोजनावर ताव मारण्यासाठी साधारणतः तीस ते पस्तीस जण उत्साहानं आले होते. टेरेसवर मस्त पंगत मांडली होती. बसण्यासाठी सतरंज्या अंथरल्या होत्या. त्यासमोर पानं मांडली होती. दूर कुठेतरी उदबत्ती लावली होती. त्याचा सुवास दरवळत होता. मग सगळे जण पानावर आले. ज्येष्ठ नागरिकांची पंगत खुर्चीवरच बसली.


एकेक पदार्थ पानात पडू लागले आणि पाहूनच मन तृप्त होत गेलं. सुरुवातीला वाढण्यात आला मुळ्याचा चटका. म्हणजे मुळा किसून त्याची फोडणी देऊन केलेली कोशिंबीर. नंतर आली लेकुरवाळी भाजी. भोगीच्या दिवशी घरोघरी ही भाजी केली जाते. गाजर, वांगी, बटाटा, टोमॅटो, पावटा, श्रावण घेवडा आणि इतर अनेक भाज्या एकत्र करून ही भाजी तयार करतात. लेकुरवाळ्या भाजीनंतर वाटीमध्ये गरमागरम वाफाळती कढी वाढण्यात आली. भोजनमंत्र सुरु होण्याआधीच कढीचा एक घोट घेण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.


वाफाळत्या कढीच्या सोबतीला मुगाच्या डाळीची खिचडी आली. ती पण मस्त गरम होती. मला वाटलं सगळं संपलं. पण छे. आता वेळ होती बाजरीच्या तीळ पेरलेल्या भाकरीची. चतकोराचे दोन तुकडे पानात आले. भाकरीवर मस्त लोण्याचा गोळा आला. जवळपास सगळे पदार्थ पानात आल्यानंतर माधवरावांनी खड्या आवाजात भोजनमंत्र म्हटला आणि पुढच्या मिनिटाभरात सगळे जण आक्रमण म्हणत तुटून पडले. आधी गरमागरम कढी-खिचडी खावी का गरम लोणी पाघळलेली भाकरी खावी, या विचारात असतानाच खिचडीला हात घातला आणि सकापाहता पाहता कढी-खिचडीचा फडशा पडला. कढी-खिचडी संपता संपता ताटात गुळाच्या पोळीनं प्रवेश केला. बरं, येताना नुसती आली नाही, सोबतीला चमचाभर तूपही घेऊन आली.

वेळ सकाळी नऊची आणि सहा पदार्थ. इतकं संगळं संपेल की नाही, याची खात्रीच नव्हती. कारण इतक्या सकाळी इतकं भरपेट जेवण करण्याची ही पहिलीच वेळ. (गेल्या दोन-तीन वर्षांतील तरी) पण एकेक पदार्थ इतके चविष्ट होते की विचारता सोय नाही. त्यातही मुळ्याचा चटका सर्वाधिक उजवा (डावीकडे वाढला असूनही) ठरला. कढीपासून सुरु झालेली चवीची चढती भाजणी मुळ्याच्या चटक्यापाशी येऊन थांबली. बाजरीची भाकरी आणि भाजी, कढी आणि खिचडी सोबतील मुळ्याचा चटका आणि गुळाच्या पोळीचा गोडवा. आणखी काय पाहिजे. मस्त दिलखुष आणि पेटही खूष. सगळ्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारल्यानंतर सर्वजण पानांवरून उठले.



मग माझा शोध सुरु झाला की, बाबा हे जेवण कोणी केलंय. प्रदीपला विचारल्यानंतर तो म्हटला, की माधवराव यांच्या मिसेसने हा सारा स्वयंपाक केला आहे. मग नूमवित मी तुमच्या वर्गात होतो, असं माधवरावांना सांगितलं. त्यांना आठवणं शक्यच नव्हतं. कारण त्यालाही आता बारा पंधरा वर्षे उलटली होती आणि मी काही ब्राईट स्टुडंट नव्हतो. जेवण एकदम फर्स्ट क्लास असल्याचं माधवरावांना सांगितलं. त्यांनीही त्या मायमाऊलीचं (त्यांच्या भाषेत आमच्या राष्ट्रपती) कौतुक केलं. पदार्थ सगळेच करतात. पण चव एखादीच्याच हाताला असते. आम्ही आमच्या पंढरपुरी स्टाईलनं जमले तितकं केलंय, असं सांगून माधवरावांनी कौतुकाचा त्यांच्याइतक्याच सभ्य, सुसंस्कृत आणि नम्रपणे स्वीकार केला.

इतके सगळे पदार्थ पहाटे पहाटे उठून तयार करायचे आणि शिवाय इतक्या चांगल्या चवीचे. त्या मायमाऊलीचं कौतुकच करावं तितकं थोडं आहे. एक से बढकर एक पदार्थांवर ताव मारून आणि जुन्या मित्रांचा स्नेहपूर्ण निरोप घेऊन आम्ही सगळे निघालो. (अर्थातच, शंभर रुपये शुल्क जमा करून. फुकट काहीही न देता, प्रत्येक कार्यक्रमाला शुल्क घेण्याची पद्धत आहे म्हणूच संघ आजपर्यंत टिकला, असं मला उगाचच वाटतं) निघताना पोट भरगच्च होतं आणि मन एकदम तृप्त होतं. थँक्स टू प्रदीप कोल्हटकर, माधवराव परांजपे आणि त्यांच्या राष्ट्रपती.

Monday, January 24, 2011

विठ्ठलालाही भरून आलं....

भीमाण्णा गेले, भारत हळहळला


शास्त्रीय संगीताप्रमाणेच भजनं आणि अभंगांना घराघरात पोहोचविणारे स्वरभास्कर भीमसेन जोशी गेले आणि अवघा देश हळहळला. ज्यांनी विठ्ठलाच्या अभंग आणि भजनांना लोकांच्या ओठांवर आणलं तो भारतरत्न गेल्यामुळं विठ्ठलालाही भरून आलं असेल आणि त्याचेही डोळे पाणावले असतील.

अण्णांना भावपूर्ण आदरांजली...

Wednesday, January 12, 2011

ब्रेकिंग न्यूज अगेन...

स्वतःच्या कद्रूपणावर झालेली टीका सहन न झाल्यामुळे काही नतद्रष्ट लोकांनी लेट्स भंकस आणि बातमीदार (कळते-समजते आणि सहयोगी बातमीदार) असे ब्लॉग्ज बंद केले. पण बंदी घालून असे प्रकार थांबत नाहीत आणि कायमचे बंद तर होतच नाहीत. ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली असून ब्रेकिंग न्यूज नावाचा ब्लॉग पत्रकारितेतील गॉसिप करण्यासाठी सुरु झाला आहे. लेट्स भंकस आणि बातमीदार चालविणारी मंडळीच हा ब्लॉग चालवित आहेत की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पण तीच ही मंडळी आहेत, असे म्हणायला भलताच वाव आहे. प्रहार करण्याची स्टाईल, भाषेचा लहेजा, लोकसत्ताचे प्रचंड कौतुक आणि सर्व पेपर तसेच चॅनेल्समधील इत्थंभूत खबरा यामुळे ब्रेकिंग न्यूजही हीच मंडळी चालवित आहेत, अशा संशयास पुरेपूर वाव आहे. बापू अत्रंगे, अरुंधती पुणेकर, विसोबा खेचर आणि चांगदेव पाटील आर बॅक असं म्हणायला हरकत नाही.

मुळात टाईमपाससाठी असे ब्लॉग्ज चालविले जातात. पत्रकारितेतील काही लोकच हे ब्लॉग्ज चालवितात. एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढतात, कौतुक-अभिनंदन करतात, चुका दाखवितात आणि वेगवेळ्या वृत्तपत्रांमध्ये-चॅनेल्समध्ये घडणाऱ्या गोष्टींवर कॉमेंट्स करतात. आपल्या प्रश्नांची-समस्यांची कोणीच दखल घेत नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर लोक शेवटचा उपाय म्हणून अशा ब्लॉग्जवर त्या गोष्टी येतात. ब्लॉग्जवर अशा गोष्टी आल्यामुळे विशेष कोणताच फरक पडत नाही. मालक लोक त्याची फारशी दखलही घेत नाहीत. पण आपल्या मनातील गोष्टी शेअर केल्याचा आनंद लोकांना मिळतो आणि मिडियातील इतर लोकही त्यावर खमंग चर्चा करतात. असो.

अर्ध्या पॅटिसची गंमत, ओ मी गार्शियावाला आर्टिस्ट आहे, लोकसत्ताची जाहिरात असल्यामुळे कालनिर्णयवर लावलेली पांढरी पट्टी, पवार पंचविशी, साममध्ये पगारावरुन रंगले शीतयुद्ध, वृत्तगंधर्व इइ एकाहून एक सरस ब्लॉगहून तमाम पत्रकारांना हसवून हसवून लोळविणारे ब्लॉग्ज बंद झाले असले तरीही भविष्यात ब्रेकिंग न्यूजकडून तशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्शा आहे. बेस्ट लक टू ब्रेकिंग न्यूज!

Sunday, December 26, 2010

टिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर

ब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा

पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आता ठाणे महानगरपालिकेनेही दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलून संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघटनांपुढे मान तुकवावी, अशी आशा आहे. वास्तविकतः दादोजी कोंडदेव हे ब्राह्मण होते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ब्राह्मण इतिहासकारांनीच रंगविले, असा आक्शेप घेत संभाजी ब्रिगेड आणि त्यांच्या सहकारी संघटना थयथयाट करीत आहेत. पण हा विषय फक्त दादोजी कोंडदेव यांच्यापुरताच मर्यादित आहे का, तर नाही. हा विषय त्याही पुढे जाऊन ब्राह्मणविरोधाला जाऊन भिडतो.

ब्राह्मणवैरामुळेच समर्थ रामदासांना विरोध, वासुदेव बळवंत फडके पहिले क्रांतिकारक नव्हते तर उमाजी नाईक होते, लोकमान्य टिळकांनी नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंतीला सुरवात केली, अफझलखानाकडे कुलकर्णी आडनावाचा कोणी माणूस चाकरीस होता, या गोष्टी वारंवार पुढे आणून ब्राह्मण समाजावर आसूड ओढण्याचा प्रयत्न होतो आहे. पुस्तके लिहून नवा इतिहास बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सेतुमाधव पगडी, बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर हे ब्राह्मण असल्यामुळेच त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे, हे आता ओपन सिक्रेट आहे. अर्थात, १९४८ पासून (गांधी हत्येनंतर) ब्राह्मण समाज अशा प्रकारची टीका, निंदा सहन करत आला आहे. त्यामुळे हे नवीन आहे, असे वाटण्याचे काहीच कारण नाही. सत्तेतही त्यांचेच राजे (जाणते असूनही अजाणतेपणाचा बुरखा घेऊन वावरणारे) असल्यामुळे संभाजी ब्रिगेडला आयती संधी आहे. असो.

पण या निमित्ताने मला गेल्या काही दिवसांपासून मांडायचं होतं ते मांडण्याची संधी मिळाली आहे. सर्वप्रथम ब्रिगेडने जी मोहिम उघडली आहे ती स्तुत्य, कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. पण ब्रिगेडने त्यांचे हे ब्राह्मणवैर इथेच थांबवू नये, अशी माझी मागणी आहे. त्यामध्ये ब्रिगेड आणि त्यांच्या सहकारी संघटना यशस्वी झाल्या तरच त्या कौतुकास पात्र आहेत.

पहिले म्हणजे ज्याप्रमाणे ब्रिगेडने दादोजी कोंडदेव यांचे नामोनिषाण इतिहासातून मिटविण्याचा प्रयत्न चालविला आहे, त्याचप्रमाणे त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदास यांचेही नाव पुसण्यासाठी लढा उभारावा. संतमहंतांची जात काढण्याचे काहीच कारण नाही. तसे करणे चूकही आहे. पण फक्त ब्राह्मणवैरच ज्यांच्या नसानसांत भरले आहे, त्यांच्यासाठी हे काही चुकीचे ठरु नये. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि रामदास यांचे नाव इतिहासातून, शालेय अभ्यासातून वगळावे, यासाठी पुढील आंदोनल असावे. कारण हे दोघेही ब्राह्मणच होते. तेव्हा आषाढी एकादशीला संत तुकोबारायांच्या पालखीबरोबर ज्ञानेश्वर महाजारांच्या पालखीऐवजी नामदेव, चोखामेळा किंवा तत्सम अब्राह्मण संतांची पालखी काढण्याची मागणी ब्रिगेडने करावी. श्री ज्ञानेश्वर तुकाराम ऐवजी श्री नामदेव तुकाराम असाही बदला त्यांना करता येईल.

छत्रपती शिवरायांचे कार्य आणि स्वराज्याचा भगवा ज्यांनी अटकेपार (पाकिस्तानमध्ये अटक नावाचे शहर आहे.) फडकाविला त्या राघोबादादांचे आणि समस्त पेशव्यांचे नामोनिषाण ब्रिगेडने मिटवून टाकावे. शनिवारवाडा पाडण्याचा कट काही बहुजन संस्थानी रचलेला आहेच. तशी आंदोलनेही होत असतात. त्यामुळे ब्राह्मण समाजालाच नव्हे तर समस्त हिंदुस्थानला अभिमानास्पद वाटणारा शनिवारवाडा जमीनदोस्त करुन तथाकथिक ब्राह्मणी वर्चस्वाला तडा देऊन टाकावा.

आणखी थोडे पुढे जाऊन झाशीच्या राणीच्या संघर्षाचा लढा इतिहासाच्या पुस्तकातून वगळण्यास सांगावे. झाशीच्या राणीचे माहेरचे आडनाव तांबे होते. तांबे म्हणजे ब्राह्मण. (कऱ्हाडे ब्राह्मण) महिला असूनही जिने पुरुषांना लाजवेल, असा संघर्ष केला त्या लढवय्या रणरागिणीचे नाव इतिहासात आहे कारण ब्राह्मण इतिहासकारांनीच तसे चित्र रंगविले आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई खरोखरच रणरागिणी होती की नाही, हे ब्रिगेडच्या इतिहासकारांनी शोधून काढले पाहिजे. झाशीच्या राणीचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकले पाहिजे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकातील तिचा पुतळा आणि झाशी या गावी जर पुतळा असेल तर तिथूनही पुतळे काढून टाकले पाहिजेत.

संभाजी ब्रिगेडने थोडे त्याच्याही पुढे जायला हवे. पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील लढवय्ये मंगल पांडे आणि तात्या टोपे, तेल्यातांबोळ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य टिळक, सुधारणावादी विचारांचे गोपाळ गणेश आगरकर, तत्वशील विचारवंत महादेव गोविंद रानडे, क्रांतिकारकांचे मेरुमणी स्वातंत्र्यवीर विनायम दामोदर सावरकर, चापेकर बंधू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या जोडीने फासावर जाणारे राजगुरु, इंग्रजांशी मुकाबला करताना धारातीर्थी पडलेले रामप्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद, अनंत कान्हेरे, महात्मा गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले, विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्शणात दैदीप्यमान कामगिरी करणारे महर्षि धोंडो केशव कर्वे, हिंदुस्थानचे राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर आणि वंदे मातरम् चे जनक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे इतिहासातील योगदान पुसून टाकले पाहिजे.

स्वातंत्र्योत्तर काळातील हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, केरळचे मार्क्सवादी नेते ईएमएस नंबुद्रीपाद, श्रीपाद अमृत डांगे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी प्रल्हाद केशव अत्रे आणि एस एम जोशी, भूदान चळवळ उभारणारे विनोबा भावे, सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे, इन्फोसिस या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती, पहिला हिंदुस्थानी अंतराळवीर राकेश शर्मा, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर, वेंकटराघवन, चंद्रशेखऱ, प्रसन्ना, व्हीव्हीएस लक्श्मण, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि डॉन ब्रॅडमनलाही ज्याने वेड लावले तो सर्वांचा लाडका हिरो सचिन तेंडुलकर, जागतिक विजेतेपदाला वारंवार गवसणी घालणारा हिंदुस्थानचा अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, हिंदुस्थानची गानकोकिळा लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, माधुरी दीक्शित... ही यादी हजारो लाखोंपर्यंत वाढत जाईल. या सर्वांचे नामोनिषाण इतिहासाच्या पानापानातून मिटविण्याचे मोठे आव्हान संभाजी ब्रिगेडपुढे असणार आहे. कारण ही मंडळीही दुर्दैवाने ब्राह्मणच आहेत.

ही मंडळी आज त्यांच्या त्यांच्या क्शेत्रात अव्वलस्थानी आहेत. ती ब्राह्मण असल्यामुळेच त्या स्थानी आहेत किंवा ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यामुळे त्यांना ते स्थान सहजासहजी मिळाले आहे, असे जो म्हणेल त्याला बावळटच म्हटले पाहिजे. ही मंडळी कष्ट, परिश्रम आणि अथक मेहनत घेऊन त्या-त्या स्थानी पोहोचली आहेत किंवा प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत. फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी केकवॉक मिळालेला नाही किंवा कोणी मुद्दामून मदतही केलेली नाही. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वा परिश्रमांच्या जोरावर जर कोणी पुढे गेला असेल किंवा जात असेल, तर त्याची जात आडवी येत नाही. तसेच फक्त जातीच्या जोरावर कोणीही पुढे जाऊ शकत नाही, हे मान्य केलेच पाहिजे. किंवा तेच सत्य आहे. जे ही बाब मान्य करणार नाहीत, त्यांना भविष्य नाही हे मुद्दामून सांगण्याची गरज नाही.

सांगण्याचा मुद्दा असा की, काम केल्याशिवाय किंवा चमक दाखविल्याशिवाय फक्त ब्राह्मण आहे म्हणून कोणीही पुढे येत नाही, कोणालाही नाव मिळत नाही. जे शिकेल तो टिकेल, असे सध्याचे युग आहे. इतरांच्या दुर्दैवाने ब्राह्मण समाजाने शिक्शणाची कास सोडलेली नाही. त्यामुळे दादोजी कोंडदेवांपासून ते लतादीदींपर्यंत कोणत्याही ब्राह्मण व्यक्तीची कारकिर्द इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तरी त्यामुळे कोणालाही फरक पडणार नाही. ब्राह्मण समाजाला तर मुळीच नाही. आणखी पुढे जाऊन म्हणायचे झाले तर, इतिहासातून जरी नावे पुसली गेली ती समाजमनावरुन नक्कीच पुसता येणार नाही. म्हणूनच म्हणतो की, हिंदुस्थानच्या इतिहासात खारीचा वाटा उचललेल्या प्रत्येक ब्राह्मण व्यक्तीचे नाव पुसून टाकले पाहिजे. दादोजींपासून सुरुवात झाली आहे ती सचिन तेंडुलकरपर्यंत येऊन थांबावी, हीच अपेक्शा आहे.

हार्दिक शुभेच्छा...

Wednesday, December 22, 2010

चवीची परंपरा जपताना...

पेशवाई थाट आणि बादशाही ताट

चांदीच्या ताटात आणि पेशवाई थाटात... अशी जाहिरात करणारं श्रेयस आणि पुण्यातील हजारो-लाखो जणांना (विशेषतः विद्यार्थ्यांना) जगविणारं बादशाही. पुण्यातील या दोन खूप लोकप्रिय आणि तितक्याच जुन्या ठिकाणी जेवण्याचा योग आला. यापूर्वीही दोन्ही ठिकाणी अनेकदा जेवलेलो असल्यामुळे तिथल्या जेवणाची खासियत, चव आणि स्टाईल माहित होती. पण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये दोन्हीकडे जेवणं झालं नव्हतं. त्यामुळं जेवण कसं असेल, याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. एका ठिकाणी ती पूर्ण झाली तर दुसरीकडे मात्र, भलतीच निराशा उदरी (पदरी नव्हे) पडली.


सर्वप्रथम श्रेयस. आपटे रस्त्यावर असलेलं हे हॉटेल अगदी सुरुवातीपासून मराठी पद्धतीचा डायनिंग हॉल म्हणून प्रसिद्ध आहे. अस्सल मराठमोळं (ब्राह्मणी म्हटल्यास अधिक योग्य) जेवण ही इथली खासियत. अगदी वीक डेला सुद्धा इथं वेटिंग लिस्ट असते. रविवारची तर गोष्टच विचारु नका. (आम्ही रविवारीच गेलो होतो. शिवाय दहा-बारा जण होतो. त्यामुळं भलतंच थांबावं लागलं.) तर असं हे प्रचंड लोकप्रिय श्रेयस. प्रचंड लोकप्रियता, आपटे रोडवर असलेलं लोकेशन आणि वर्षानुवर्षांची चव यामुळे साहजिकच इथला रेट प्रचंड प्रचंड प्रचंड आहे. एका थाळीसाठी (स्वीटसह) तब्बल दोनशे रुपये मोजावे लागतात इथे. तरीपण लोक दोनशे रुपये मोजतात आणि आत्मा तृप्त करतात. जेवणाची चवच इतकी अफलातून आहे की, हातावर पाणी घेताना साहजिकच शब्द बाहेर पडतात दोनशे रुपये वसूल.

आम्ही गेलो होतो तेव्हा सणासुदीला असतो तसा मेन्यू होता. किंवा पूर्वीच्या लग्नांमध्ये असायचा तसा मेन्यू. आळूची भाजी, बटाट्याची सुकी भाजी, बिरड्याची उसळ (सोललेल्या वालाची), पुऱ्या, गोल भजी, पापड, चटणी, कोशिंबीर, थालिपीठ आणि सरते शेवटी सोलकढी किंवा ताक. आणखी दोन-चार पदार्थ असतीलही. पण मला आत्ता आठवत नाही. पण हे जे काही होतं ते इतकं टेस्टी होतं की बस्स.


आळूची भाजी जशी हवी अगजी तशी. चवीला आंबट-गोड. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. शिवाय त्यात शेंगदाणे, खोबरं इइ. ऐवज अगदी मुबलक प्रमाणात घातलेला. बटाट्याची भाजीही थोडी झणझणीत. मिरचीच्या ठेच्याचा अगदी योग्य प्रमाणात वापर. सजावटीला खोबरं आणि कोथिंबीरही. बिरड्याची उसळही तोडीस तोड. खोबऱ्याच्या वाटणाचा उपयोग चव वाढविणारा. त्यांच्या सोबतीला गोल भजी, थालिपीठ आणि बटाटा वडा होताच. अधून मधून ताकाची फेरीही होत होती. जेवणाची सुरुवात वरण भाताने, नंतर मसाले भात, नंतर पुऱ्या आणि अगदी शेवटी हवा असेल तर दहीभात किंवा पुन्हा साधा भात. अशा पद्धतीनं जेवणावर लोक तुटून पडत होते. जेवण सुरु असतानाच मध्ये स्वीट काय हवं, अशी विचारणा झाली. मग कोणी गुलाबजाम, कोणी श्रीखंड, कोणी पुरणपोळी मागविली. अशा स्वर्गसुख देणाऱ्या जेवणामुळे सर्वांचे आत्मे तृप्त झाले.

खरं तर सोलकढी या जेवणामध्ये मिसफिट. पण मासे खाल्ल्यानंतरच सोलकढी प्यायली पाहिजे, असा काही नियम नाही. त्यामुळे श्रेयसमधील त्या जेवणानंतरही मी सोलकढी प्यायली. सोलकढीही एखाद्या मालवणी हॉटेलवाल्याच्या तोंडात मारेल अशी. त्यामुळे सोलकढीने कळस चढविला, असं म्हणायला हरकत नाही. तुडुंब जेवण झाल्यानंतर श्रेयसवाल्यांनी पानाची सोय पण ठेवली होती. पण पानपट्टीच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी मिळणारं पान कसं असतं, याचा पुरेपूर अनुभव असल्याने मी पान मात्र खाल्लं नाही. थोडक्यात काय तर चांदीच्या ताटात अन् पेशवाई थाटात... अशी जाहिरात करणाऱ्या श्रेयसने त्यांची चव आणि परंपरा शब्दशः जपली आहे. चांदीचं ताट नसलं तरी थाट मात्र, पेशवाई होता, हे सांगायला नकोच. त्यामुळं अन्नदात्याचं भलं हो... असं म्हणत आम्ही श्रेयसमधून बाहेर पडलो.

थो़ड्याच दिवसांनी टिळक रोडवरील बादशाहीत जाण्याची वेळ आली. बादशाही म्हणजे परगावातून पुण्यात नोकरी किंवा शिकण्यासाठी पुण्यात आलेल्या लोकांचे अन्नदाता, जुन्या काळातील प्रचंड लोकप्रिय खाणावळ आणि अजूनही जुन्या पुणेकर मंडळींच्या ‍जिव्हाळ्याचा विषय. चर्चेचा विषय. दोन-अडीच वर्षांपूर्वी एकदा मित्रांबरोबर बादशाहीत गेलो होतो. त्यानंतर मुंबईला असल्यामुळं तिथं जाणं व्हायचं नाही. पण एका रविवारी बाहेर जायची वेळ आली, म्हणून मोठ्या उत्साहानं बादशाहीत गेलो.


पण उदरी प्रचंड निराशा पडली. बादशाही हे नुसतं नावात बादशाही नव्हतं. तर चवीतही बादशाही होतं. तिथल्या वाट्या आणि वाढण्याची पद्धत कधीच बादशाही नसली तरी त्याचं दुःख कधीच नसायचं. कारण तिथं अगदी घरच्यासारखं चविष्ट जेवण मिळत होतं. त्यामुळं बाकी सगळं माफ होतं. पण आता परिस्थिती बदलल्यासारखी वाटली. बादशाहीपण फक्त नावातच उरलं असल्याचं जाणवलं. वाट्यांचा आकार व वाढण्याची पद्धत पूर्वीसारखीच होती. त्यात शाहीपणा असण्याचा प्रश्नच नव्हता. पण चवीत मात्र, कमालीची घसरण झाल्याचं अगदी पहिल्या घासाला जाणवलं आणि प्रत्येक घासागणिक ही घसरण वाढतच गेली.


मुळात पांढरा भात आणि वरणाला सुट्टी. फक्त मसाले भात. तिथंच डोकं सटकलं. पोळ्या होत्या पण त्या गव्हाच्या होत्या की, मैद्याच्या ते कळत नव्हतं. गरम होत्या मऊही होत्या. पण मैदा जाणवत होता. आज पांढरा भात नाही. रविवार असल्यामुळे फक्त मसाले भात असं उत्तर मिळाल्यावर गिळा, असं मनातल्या मनात म्हणण्याखेरीज काहीच नव्हतं. बटाट्याच्या भाजीत ना तिखट ना मीठ. स्वीट म्हणून असलेले गुलाबजाम हे खेळण्यातील गोट्यांच्या आकाराचे. (तेही पाकात न मुरलेले). चटणीचा पत्ताच नाही. चटणीच्या ऐवजी फरसाण पानात आलं होतं. आता बादशाहीच्या ताटात फरसाण हे क्रांतिकारक असलं तरी ते संपूर्ण जेवणात मिसफिट होतं आणि काहीतरी पाहिजे म्हणून असल्यासारखं होतं. संपूर्ण जेवणात आळूची भाजीच चांगली होती. म्हणजे चवीला उत्कृष्ट होती. त्यानंतर नंबर होता तो काकडीच्या कोशिंबीरीचा. अर्थात, कोशिंबीर करण्याला फार अक्कल लागत नाही. तसंच कोशिंबीर खायला कोणी हॉटेलात जात नाही. त्यामुळे कोशिंबीर चांगली होती, याचं कौतुक असण्याचं कारण नाही.

असो. अन्न हे पूर्णब्रह्म असं मानून कोणतीच तक्रार न करता जेवलो. पोट भरलं पण तृप्त मात्र, झालो नाही. जेवल्यानंतर माझी प्रतिक्रिया मालकांना सांगण्याचा प्रश्नच नव्हता. कारण त्यांच्याकडे जेवणासाठी लोक वेटिंगवर होते. त्यामुळे माझ्या मताला त्यांच्या लेखी फारशी किंमत नसावी, असा विचार करुन मी बाहेर पडलो. आणखी एक-दोन जणांशी बोलताना सहज बादशाहीचा विषय निघाला आणि त्यांनीही माझ्यासारखीच प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळेच हा ब्लॉग लिहावासा वाटला आणि लिहिला. चवीतला बादशाहीपणा असा सहजासहजी सोडू नये, अशीच माझी अपेक्शा आहे आणि पुढच्या वेळी जेव्हा जाईन तेव्हा पुन्हा एकदा नव्याने ब्लॉग लिहावासा वाटेल, अशी जेवणाची चव असावी, अशीच इच्छाही आहे.

पुण्यातील खवय्यांनी या दोन्ही ठिकाणचा आस्वाद घेतलेलाच असेल. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया ब्लॉगवर जरुर नोंदवाव्यात. ही विनंती.

Sunday, December 19, 2010

नशीब सामनात कॉस्ट कटिंग नव्हतं...

कॉस्ट कटिंग हा शब्द अनेक संस्थांमध्ये (फक्त वृत्तपत्र नव्हे...) सगळ्यांत जास्त लोकप्रिय शब्द आहे. जागतिक मंदीच्या काळात तर या शब्दाला खूप महत्व प्राप्त झालं होतं. अनेकांचे अनेक अनुभव असतात. तसेच माझेही काही अनुभव आहेत. त्यामुळेच मला म्हणावसं वाटतं की, नशीब सामनामध्ये कॉस्ट कटिंग नव्हतं.

१) कॉस्ट कटिंगच्या नावाखाली (किंवा परफॉर्मन्स नाही, असे कारण देऊन) सामनातून एकाही व्यक्तीला काढून टाकण्यात आलेले नाही. हा मुद्दा मला सर्वाधिक लक्षवेधी वाटतो. अर्थातच, हे संजय राऊत साहेबांचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. काही वर्षांपूर्वी यांत्रिक पद्धतीने कामाची सुरवात झाल्यानंतरही कामगारांना काढून न टाकता, त्यांना नवे काम शिकण्याची संधी देण्यात आली. ती मंडळी अजूनही सामनामध्ये आहेत आणि यथायोग्य पद्धतीने काम करीत आहेत. जागतिक आर्थिक मंदी असतानाही सामनात माणुसकीचे कॉस्ट कटिंग कधीच झाले नाही.

२) जागतिक मंदी आली म्हणून कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ऑफिसातले एसी बंद करण्यात आले नाहीत. एसीच्या ऐवजी मंगल कार्यालयात लावतात तसे घों घों करणारे मोठ्ठाले पंखे ऑफिसात लावण्यात आले नाहीत. शिवाय बंद ऑफिसमध्ये एसीची काहीच गरज नाही, हे सांगण्यासाठी लेक्चर्सही देण्यात आली नाहीत. कर्मचा-यांच्या सोयीसुविधांचे कॉस्ट कटिंग तर अजिबात नाही.

३) कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ऑफिसातील निम्मे ट्यूब लाईट आणि निम्मे दिवे काढून टाकण्याचे (न लावण्याचे नव्हे) फर्मान साहेबांनी काढले नाही. विजेची बचत म्हणून दिवे न लावणे समजण्यासारखे आहे. पण बचत म्हणून दहापैकी फक्त चारच दिवे लावायचे आणि उरलेले सहा दिवे काढून टाकायचे, असले दळभद्री प्रकार सामनात अनुभवयास मिळाले नाहीत.

४) सामनात दररोज तीन-चार वेळा महाराज चहा घेऊन येतो. (राजेश शहा, विद्याधर चिंदरकरसाहेब आणि अनेक जण त्याला जहर म्हणून हिणवतात.) या चहाचे बिल कंपनी अदा करते. पण जागतिक मंदीचे कारण पुढे करत सामनाने चहा बंद केला नाही. दोन रुपयाचा चहा दिला म्हणून कोणी मोठा होत नाही आणि तेथे काम करणा-यांनाही दोन रुपयाच्या चहाने स्वर्गसुख मिळत नाही. पण द्यायची दानत लागते, हेच महत्वाचे. थोडक्यात काय तर प्रभादेवीत द्यायच्या वृत्तीचेही कॉस्ट कटिंग झाले नाही.

५) एखादी घटना एन्जॉय करण्याचा आनंद वेगळाच असतो. पण अशा एन्जॉयमेंटलाही कॉस्ट कटिंगचे कारण देऊन फाटा दिला जातो. मग एखाद्या गोष्टीच्या लॉन्चिंगची पार्टीही सामोसा आणि वेफर्सवर भागविली जाते. एखाद्या हॉटेलात जेवण देणंही कंपनीला परवडत नाही आणि कारण दिलं जातं, आपण असं करत नाही. पण सामनात असली फालतुचं कॉस्ट कटिंग नव्हतं. राऊत साहेबांना खासदारकीचं तिकिट मिळणं असो किंवा उद्धव साहेबांची मिटिंग असो, सगळं कसं एकदम जोरात. आनंद आणि मौजमजेचे कॉस्ट कटिंग मला प्रभादेवीत कधीच आढळले नाही. इतकंच काय तर क्वचित प्रसंगी रात्री मुक्काम करण्याची वेळ आली तर घरी जाण्यासाठी किंवा जेवणासाठी लागणारे पैसे देतानाही, कंपनीचा कधीच हात आखडता झाला नाही. शिवाय मांसाहारी जेवणाचं बिल मिळणार नाही, अशी भंपक कारणंही अकांऊट्स डिपार्टमेंट पुढं करायची नाहीत.

६) कंपनीत घेताना एक पगार सांगायचा, पत्र देताना वेगळीच फिगर दाखवायची आणि प्रत्यक्ष हातात येणारा पगार भलताच, अशी फसवाफसवी करुन बचत करण्याची वृत्ती मला सामनात अनुभवायला मिळाली नाही. राऊत साहेबांनी शब्द दिला म्हणजे दिला. त्याच्या अलिकडे नाही आणि पलिकडेही नाही. इथे वचननामा पाळला जातो, असंच म्हटलं पाहिजे. कामगारांच्या पगारातून कॉस्ट कटिंग करुन जागतिक मंदीला पळवून लावण्याचा बनाव करण्याचं धोरण सामनात नाही. त्यामुळंच इथं येणारा माणूस पगार मिळाल्यानंतरही खूष होऊन काम करतो. हातात पगार पडल्यानंतर डोळे फिरण्याची वेळ कामगारांवर येत नाही. समाधानाच्या बाबतीत तर कॉस्ट कटिंगमधला क पण इथं सापडत नाही.

७) सामना म्हणजे हास्यविनोदांची पंढरी. स्वतः राऊत साहेब विनोद करुन स्वतः हास्यकल्लोळात बुडून जायचे. समोरच्याची विकेट कधी काढायचे कळायचं देखील नाही. उगाचच चेह-यावर गांभीर्याचा मुखवटा चढवून जड मुद्रेनं वावरायचं, हे सामनाच्या स्वभावातच बसत नाही. शिवाय पाच डेसिबलपेक्षा कमी आवाजातच हसायचं वगैरे बंधनही नाही. त्यामुळे विनोदी वृत्ती आणि हसण्याखिदळण्याचं कॉस्ट कटिंग कधीच अनुभवलं नाही.

८) असं असतानाही सामनात मात्र, काही गोष्टींचं कॉस्ट कटिंग नक्कीच होतं. उगाचच आपण जागतिक स्तरावरचे अग्रगण्य आहोत, अशा थाटात वावरायचं आणि पगार तसेच सेवासुविधा गल्लीतल्या पेपरसारख्या पुरवायच्या, अशा कद्रू वृत्तीचं मात्र कॉस्ट कटिंग सामनात नक्कीच होतं. मिटिंगांचं कॉस्ट कटिंग होतं. रिपोर्टांचं कॉस्ट कटिंग होतं. इंटरनेटवरच्या वापरावर असलेल्या बंधनांचं कॉस्ट कटिंग होतं. पत्रकारांच्या कल्पना आणि स्वातंत्र्यावर असलेल्या परंपरेच्या बोज्याचं कॉस्ट कटिंग होतं.

गेल्या अनेक दिवसांपासून सामनातील कॉस्ट कटिंगवर लिहायचं होतं. पण आज वेळ मिळाला आणि ब्लॉग उतरला. आता या विषयाचं थोडंसं कॉस्ट कटिंग करुन पुन्हा एकदा खाद्यजत्रेला सुरुवात करावीशी वाटते आहे. गोव्याची ट्रीप, कोल्हापूरचा दावणगिरी लोणी डोसा, पेशवाई थाटाचं श्रेयस आणि `बाद`शाही इइ अनेक विषयांवर लिहायचं आहे. जसा वेळ मिळत जाईल तसं तसं लिहीत जाईन.

(शेवटी तुम्ही सगळीकडे नोकरीच करणार. कामगार तो कामगार तो कितीही बदलला तरी त्याची झेप वर्तुळाबाहेर जात नाही.आणि वर्तुळाला काही केंद्रबिंदू सापडत नाही, अशा निनावी कॉमेंट्सना मी फार महत्व देत नाही. त्यामुळे अशा लोकांनी नावाने कॉमेंट्स टाकण्याची हिंमत दाखवावी. अन्यथा वेळेचा आणि शब्दांचा अपव्यय टाळणेच इष्ट. धन्यवाद. )

Saturday, November 20, 2010

सामनातले दिवस...

अविस्मरणीय आणि अतुलनीय...

सचिन आणि सेहवाग सातच्या आत घरात, खल्लास, राजीनामा, लालूच, बारवाल्यांचे मापात पाप, शिक्षणाच्या आयचा घो..., ना-या बोल मुंबई कोणाची, येड्याच्या ढुंगणावर उगवलंय बाभूळ... अशी एक से बढकर एक दिलखेच आणि धक्कादायक हेडिंगं वाचून कोणीही पत्रकार सामनाच्या प्रेमात नाही पडला तरच नवल. रोखठोक भूमिका आणि आक्रमक भाषा यांच्यामुळे हा पेपर सदैव केंद्रस्थानी असतो. ज्या पेपरची पानं वाहिन्यांसाठी नियमितपणे बातम्या घेऊन येतात, असा हा एकमेव मराठी पेपर. त्यामुळं पहिल्यापासून मला सामनाविषयी प्रेम, जिव्हाळा आणि ऍट्रॅक्शन होतं. ये लोग कौनसी चक्की का आटा खाकर पेपर निकालते है, असं गंमतीनं आम्ही बोलायचो. इतकं वेगळेपण त्या पेपरमध्ये होतं. (ये आटा भांडुप, परळ और डोंबिवली में मिलता है, ही गोष्ट मला तिकडे गेल्यावर कळली.)



थँक्स टू राऊत साहेब...

मी सामनामध्ये काम करेन, अशी कल्पना स्वप्नातही केली नव्हती. पण योगायोग जुळून आला आणि संजय राऊत साहेबांनी स्वतः लक्ष घालून मला काम करण्याची संधी दिली. फक्त नऊच महिने मी सामनात काम केलं आणि नंतर पुन्हा पुण्यात जायचं असल्यामुळं मला मुंबई सामनाचा राजीनामा द्यावा लागला. पण ते नऊ महिने कधीही विसरु शकणार नाही, असे ठरले. सामनात जाताना अनेकांनी सांगितलं होतं की, बाबा सांभाळून रहा, तो सामना आहे. इतर वृत्तपत्रांपेक्षा तिथलं वातावरण वेगळं आहे. तिथल्या राजकारणाचा तूही बळी जाशील, असंही काहींनी सांगितलं होतं. अनेकांनी तर न जाण्याचा सल्लाही दिला होता. काहींनी तर पगार वेळेवर मिळत नाही, अशी भीतीही घातली होती. पण मी सामनात जाणार होतो, ते सामनानं मला दिलेल्या संधीमुळं, माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आणि माझ्या सामनावरील प्रेमामुळे. अनेकांनी दाखविलेली भीती खोटी ठरली आणि सामनातले दिवस हे माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस ठरले.



साम सोडताना जितकं वाईट वाटलं होतं तितकंच किंवा त्यापेक्षाही जास्त वाईट मला सामना सोडताना वाटलं होतं. सामनामध्ये मी फक्त नऊ महिनेच काम केलं. पण हे नऊ महिने कायम लक्षात राहतील असेच होते. सामनामधलं वातावरण, तिथली काम करण्याची पद्धत आणि वृत्तपत्राचा स्वभाव लक्षात घेतला तर मला राहून राहून केसरीशी तुलना करण्याचा मोह आवरता येत नाही. अगदी घरगुती वातावरण, हिंदुत्त्ववादी विचार, आक्रमक भूमिका, रोखठोक भाषा आणि बरंच काही...

सामना, सामना आणि सामना...
पहिल्या दिवसापासून पान एकवर काम करण्याची संधी भल्या भल्या दैनिकांमध्ये दिली जात नाही. पण राऊत साहेबांनी तो विश्वास दाखविला. मी संस्थेत नवीन आणि अननुभवी आहे, संस्थेमध्ये ज्युनिअर आहे, अशा पद्धतीने ते कधीच वागले नाही. प्रसंगी रोखठोक शब्दात कानउघाडणी केली. पण ती देखील अत्यंत योग्य आणि मनाला डाग देणारी नव्हती. जेव्हा चूक व्हायची तेव्हाच ते बोलायचे, हे माहिती असल्यामुळेच त्याचं वाईट वाटायचं नाही. शिवाय ते स्वतः सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपयंत शिवसेना आणि सामनाचाच विचार करत असायचे. त्यांची तळमळ लक्षात घेतली तर त्यांनी काहीही म्हटलं तरी वाईट वाटायचं नाही. मुख्य म्हणजे राऊत साहेब अंक छपाईला जाण्याआधी बोलायचे. अंक छापून आल्यानंतर दुस-या दिवशी संध्याकाळी सात वाजता बैठकीमध्ये बोलायचे नाहीत.

एखादी बातमी चुकली असेल तर ते वैतागून बोलायचे. एखादी बातमी किंवा फोटो चुकला की, माझा जीव अक्षरशः तळमळतो. तुम्हाला मात्र, काहीच कसे वाटत नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. जरा गंभीरपणे अंकाचा विचार करा. (हा आशय आहे, अगदी शब्दशः देता येणार नाही) राऊत साहेबांच्या फेसबुक अकाऊंटवर एकदा त्यांनी लिहिलं होतं की, सामना आणि शिवसेना हा माझ्या प्राण आहे. हे अगदी तंतोतंत खरं आहे.

स्वतः सदैव काही ना काही लिहित असायचे. एक टाकी लिहायचे आणि दुसरीकडे संस्थेतल्या लोकांनाही लिहिण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. कागदाला पेन लागू द्या, हा त्यांचा अगदी सुप्रसिद्ध डायलॉग. काही ठिकाणी जसे संपादक स्वतःही लिहित नाही आणि लिहिणा-या उपसंपादकांचाही हिरमोड करतात. अशाच मंडळींना मोठमोठी पदंही मिळतात. पण राऊत साहेबांचं तसं नाही. सामनामध्ये माझी जेव्हा पहिली बायलाईन आली होती, तेव्हा स्वतःहून त्यांनी कौतुक केलं होतं आणि असंच लिहित रहा, अशा शुभेच्छाही दिल्या होत्या. वरिष्ठ पदांवरील व्यक्तींनीही चांगल्या बातम्या स्वतः केल्या पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा आणि ते स्वतःही बातम्या लिहिण्यास मागेपुढे पहायचे नाही.

थांबा, घाई करु नका...
ओघवत्या शैलीत एकटाकी लिहिणारा, सातत्याने तसेच रोखठोकपणे आपली मते मांडणारा, सहका-यांनाही लिहिण्यास प्रोत्साहन देणारा, सहका-यांबरोबर हास्यविनोदात सहभागी होणारा, ट्रीट मागितली तर सहजपणे हजार दोन हजार रुपये खिशातून काढून देणारा, दिवाळीच्या निमित्ताने सगळ्या ऑफिस स्टाफला स्वतःच्या पैशातून गिफ्ट देणारा, बदलत्या जमान्यातही मॅनेजमेंटला तोडीस तोड उत्तर देणारा, शब्द दिलेल्या पगाराचा आकडा नंतर न फिरविणारा व पगाराच्या आकड्यांमध्ये कोणतीही गोलमाल न करणारा, असा संपादक विरळाच. मराठीतील शेवटचा संपादक कोण, असं ठरविण्याची अहमहमिका सध्या सुरु असली तरी संजय राऊत आणि इतर काही जण आहेत, तोवर कोणीही शेवटचा संपादक ठरविण्याची घाई करु नये.



संजय राऊत हे जसे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द जसेच्या तसे मांडतात. तसेच राऊत साहेबांना काय हवे, त्यांना काय म्हणायचंय हे तंतोतंत माहिती असणारी दोन मंडळी म्हणजे विद्याधर चिंदरकर साहेब आणि अतुल जोशी साहेब. चिंदरकर साहेब हे सामन्यातील बातम्यांचे प्राण आहेत तर जोशी साहेब हे सामनाच्या संपादकीय पानाचे आधारस्तंभ आहेत. या तीन मंडळींशिवाय सामनाचा विचार होऊच शकत नाही. ते तिघे आहेत म्हणूनच सामनाचे सध्याचे स्वरुप आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील या तीन असामान्य क्षमतेच्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच.

नो मिटिंग्ज, नो व्हीसी...
सामनातील वातावरणही लय भारी होतं. अत्यंत कमी साधनसामुग्रीमध्येही सामना ज्या पद्धतीने काढतात, ते चकित करुन टाकणारं आहे. फक्त खंडित अखंडित पद्धतीने पीटीआयची सेवा असूनही सामनामध्ये एकही बातमी चुकलेली नसते, हे विशेष. दीड सालाचं नियोजन नाही, दिवसाला चार-चार बैठका नाही, व्हिसी नाही ऑडिओ कॉन्फरन्सिंग नाही, एटीसी-बीटीसी-सीटीसी नाही. काही काही नाही. पण पेपरमध्ये दिवसभरातील सगळ्या बातम्या मात्र आहेत. सामनातले सगळे पत्रकाराच इटंरनेट, वेबसाईट्स, टीव्ही चॅनल्स, एसएमएस सेवा आणि बातम्यांच्या सगळ्या स्रोतांवर गरुड दृष्टी ठेवून असतात. दिसली बातमी की उचल. दिसली बातमी की उचल. त्यामुळेच अगदी अपवादात्मक परिस्थितीत सामनामध्ये बातमी चुकते.

शिवाय सामनामध्ये डिझाईन आणि ले-आऊट यांचे स्वातंत्र्य आहे. पाच-सात कोटी रुपये उधळून कोणतीही परकीय यंत्रणा न राबवूनही सामनाचा लेआऊट सगळ्यांच्या तोडीस तोड असतो. तो कलाकार आणि उपसंपादक यांना मिळणा-या स्वातंत्र्यामुळेच. कमीत कमी शब्दात हेडिंग हे सुद्धा सामनाचं वैशिष्ट्य. वेगवेगळ्या ऑप्शन्सचा विचार करुन मग कमीत कमी शब्दांचे हेडिंग दिले जातात. स्वतः राऊत साहेब, चिंदरकर साहेब, क्रीडा विभागातील मंगेश वरवडेकर, गजानन सावंत किंवा राजेश पोवळे ही मंडळी अशी काही सामनामय झाली आहेत, की ते अत्यंत अचूक आणि आक्रमक हेडिंग शोधूनच काढतात. त्यामुळे चांगले वृत्तपत्र काढण्यासाठी परदेशी प्रशिक्षकांचे सल्ले, महागडे डिझाईन्स, पाने लावण्यांची नियमावली आणि तत्सम कोणत्याही गोष्टींची गरज नसते. बातमीसाठी तळमळ असली की झालं. हे सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट सामनात अधिक प्रकरषानं जाणवली.

सामनातील खाद्यसंस्कृती
सामनात मला आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे सामनातील खाद्यसंस्कृती. काँट्रिब्युशन काढून वडापाव, दालवडा, सामोसे, भजीपाव आणायचे आणि सगळ्यांनी त्यावर तुटून पडायचे हा नित्यक्रमच होता. मग कधी नवनाथ दांडेकर आणि राजन शेलार शेवबुंदी आणायचे, कधी डाएट चिवडा आणायचे. नितीन सावंत आले की, सँडविचची मेजवानी ठरलेली. चिंदरकर साहेब कधी सारंगचा वडापाव, मूँगभजी मागवायचे , कधी सब वे मधून बेकरी आयटम्स आणायला सांगायचे. अनेकदा (म्हणजे बरेचदा) प्रभाकर पवार साहेबही उदार व्हायचे आणि सब वे किंवा होम डेलीमधून मेजवानी यायची.

न करत्याच्या वारी म्हणजे शनिवारी हरषदा परब तिच्या पोतडीतून काही ना काही भरुन घेऊन यायचीच. गुरुवारी अरविंदभाई शहा आस्वाद किंवा प्रकाशमधून काहीतरी (म्हणजे बटाटे वडा, कोथिंबीर वडी, साबुदाणा वडा किंवा थालिपीठ) घेऊन यायचे. कधी देवेंद्र भोगले पापडी किंवा शेव-जिलेबी घेऊन यायचा. उन्मेष गुजराती किंवा भीमराव गवळी भेळ-उपरवाला किंवा खारे दाणे-फुटाणे घेऊन यायचे. वाढदिवसाचं कारण पुढे करुन कधी गणेश कदमला मुंडक्यावर टाकलं जायचं तर कधी बायलाईन आली की गवळीला कापलं जायचं. मग मी किंवा गजा सावंतही कधीकधी सगळ्यासांसाठी काहीतरी मागवायचो. अशी ही खाद्ययात्रा कायमच सुरु रहायची.

सामनातील ज्येष्ठ सहकारी नवनाथ दांडेकर आणि राजन शेलार यांचे डबे हे सामनातील खास वैशिष्ट्य. मी तर नऊ महिने त्यांच्याच डब्यावर होतो. माझ्यामुळे ते किती दिवस उपाशी राहिले हे माहिती नाही. पण त्यांच्या डब्याची चवच इतकी भन्नाट असायची की मी कंट्रोलच नाही करु शकायचो. आणखी एक संस्मरणीय गोष्ट म्हणजे मंग्या आणि मेघा गवंडेची मेजवानी. स्पेनच विश्वकरंडक जिंकणार, ही पैज जिंकल्यानंतर मंग्या वरवडेकरनं सगळ्या सामनाला चिकन बियाणीची मेजवानी दिली होती. तर सामना सोडणार असल्यामुळे मेघा गवंडेनं सगळ्यांना कोंबडी-वडे आणि सोलकढीची मेजवानी दिली. इतकं इतकं प्रेम मिळाल्यानंतर संस्था कायमची सोडताना वाईट वाटणारच ना.

जिथं मला भरभरुन मिळालं. अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं. ती संस्था सोडताना वाईट वाटणार नाही तर काय. त्यामुळेच सामनाचे हे सोनेरी दिवस कधीही न विसरण्यासारखेच आहेत. कारण तिथला प्रत्येक दिवस मी मनापासून एन्जॉय केलाय.

(पुढच्या लेखात वाचाः नशीब सामनामध्ये कॉस्ट कटिंग नव्हतं...)

Thursday, October 28, 2010

माता न तू वैरिणी...

आणखी किती दिवस हे असं चालणार...

मुंबईमध्ये एका आईनं जुळ्या मुला-मुलींपैकी मुलीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिल्याची घटना नुकतीच घडली. प्रत्यक्ष जन्मदातीच आपल्या मुलीला असं मृत्यूच्या तोंडात कसं ढकलून देऊ शकते. हा विचार फक्त सुन्न करणारा नाही तर हा विचारही करता येण्यापलिकडचा आहे. मुलगी अशक्त आहे किंवा तिचा सांभाळ करण्याची आपली आर्थिक कुवत नाही, अशी स्पष्टीकरणं देऊन कदाचित या कृत्याचा समर्थन केलंही जाईल. पण मला मात्र, हे अजिबात पटत नाही.

प्राणी जसे आपल्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर वा-यावर सोडून देतात किंवा त्यांची फार फिकीर करत नाहीत, तसं माणूस कधीपासून वागायला लागला, हा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. आईचं हृदय इतकं राक्षसी कसं होऊ शकतं, मुलीला फेकून देण्यासाठी तिचे हात धजावतातच कसे, आपण मातृत्त्वाच्या नात्यालाच डाग लावतो आहोत किंवा महापाप करतो आहोत, असं तिला कसं वाटत नाही, याचंच आश्चर्य वाटतं.

दुसरी गोष्ट म्हणजे समजा ही सगळी कारणं मान्य केलीत तरी मग आईनं मुलीलाच का फेकलं, मुलाला का नाही. हा प्रश्न तर गेल्या अनेक पिढ्यांपासून आपल्याला सतावतो आहे. आजही स्त्री भ्रूण हत्येचं पाप करणारे हात या देशात आहेत, ही शरमेचीच गोष्ट म्हटली पाहिजे. खुद्द सायना नेहवालची आजीही लहानपणी तिचा राग राग करायची, असं नुकतंच पुढं आलंय. सायनाच्या आई-वडिलांनीही जर तशीच वागणूक सायनाला दिली असती तर आज अशी वर्ल्ड क्लास प्लेयर हिंदुस्थानला मिळाली असती का...

पाठोपाठ घडलेल्या या दोन गोष्टींमुळे स्त्री भ्रूण हत्या हा गंभीर विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून हे सारं कधी थांबणार... याचं उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. जोपर्यंत आपण मानसिकता बदलत नाही तोपर्यंत तरी हे शक्य नाही. गेल्या काही वर्षांपासून ह्याच विषयावर फॉर्वर्डेड मेल फिरत आहेत. त्यापैकी तीन उत्तम जाहिराती खाली देत आहे. त्या वापरण्याची परवानगी आहे किंवा नाही, हे मला माहिती नाही. पण एका चांगल्या हेतूनं त्या वापरत आहे, त्यामुळं त्याला कोणाचीही हरकत नसावी, ही अपेक्षा...






Wednesday, October 27, 2010

खा खा खादाडी भाग २

दादर-परळमदली काही राहिलेली ठिकाणं आणि पूर्वी साम मराठीमध्ये काम करत असताना बेलापूरमध्ये काही ठिकाणी चाखलेली वेगवेगळ्या पदार्थांची तोंडओळख इथं करुन देत आहे. प्रत्येक ठिकाणची प्रत्येक गोष्ट चांगली चविष्ट असतेच असं नाही आणि प्रत्येक पदार्थ आपण खातोच असंही नाही. पण जेजे उत्तम चविष्ट सुंदर तेते देण्याचा हा प्रयत्न...



मराठमोळी मिसळ...

मराठमोळ्या वरळीमध्ये अस्सल मराठमोळी मिसळ खाण्याचा योग साम मराठीचा जुना सहकारी पराग खरात याच्यामुळे आला. बोलता बोलता विषय निघाला तेव्हा तो म्हणाला तुम्ही वैशालीची मिसळ खाल्ली की नाही. एक नंबर मिसळ आणि झणझणीत रस्सा. मग निवांत वेळ काढून वैशालीत पोचलो. नुसती मिसळच नाही तर दही मिसळ, वडा, भजी या मराठी पदार्थांप्रमाणेच विविध गुजराती आयटम्स (खाण्याचे), फरसाण आणि सरते शेवटी फक्कड चहा असं सर्व काही मिळणारं हे मस्त रेस्तराँ म्हणजे वैशाली.

मिसळ खाण्यासाठीच आलो होतो, त्यामुळे आम्ही मिसळच घेतली. फक्त फरसाण आणि त्यावर वाटाण्याची उसळ ही मुंबईतली मिसळची व्याख्या असल्यामुळे इथं फारसं वेगळं दृष्य नव्हतं. तरीही फरसाणच्या जाड-बारीक शेव, नायलॉनच्या पोह्यांचा चिवडा असं वैविध्य होतं. पण रस्सा मात्र, इतरांच्या तुलनेत जरा हटके होता. थोडासा मालवणी स्टाईलचा किंवा नाशिकच्या काळ्या तिखटाच्या मिसळीच्या जवळ जाईल असा. जाळ निघेल असा झणझणीत नसला तरी घाम आला. त्यामुळं येणं फुकट गेलं, असं वाटलं नाही. शिवाय जांबोरी मैदानावरुन जाताना मंचेकर वडापाव आणि त्याच्या डायगोनली ऑपोझिट असलेल्या (साई की तत्सम काहीतरी) वडापावच्या आठवणी ताज्या झाल्या.



म्हैसूर मसाला...

दादरला परळ एसटी डेपोकडून पोर्तुगीज चौकाकडे जायला लागलं की दुस-या चौकात संध्याकाळी डोशाची एक गाडी लागते. सैतान चौकीच्या इथला चौक हे मला माहिती असलेलं नाव. इथं डोसा-उत्तप्पाचे काही प्रकार मिळतात. त्यापैकी म्हैसूर मसाला डोसा अप्रतिम. साध्या डोशावर बटाट्याची भाजी, कापलेला कांदा-टोमॅटो, किसलेले बिट, थोडी खोब-याची चटणी असा स्मॅश केलेला रगडा. एकदम स्वादिष्ट म्हैसूर डोसा तयार. सोबत सांबार आणि चटणी. त्यातही सांबार नसले तरी चालू शकेल, असा पद्धतीचे. पण ती उणिव चटणी भरुन काढते. त्यामुळे दिलखुश्श. इतर ठिकाणी साधा किंवा मसाला डोसा बारा रुपयांना असला तरी इथं मात्र, म्हैसूर मसाला डोसा अवघ्या बारा रुपयांना मिळतो.

शिवाय फुकटचा टाईमपास म्हणजे शिवसेना की मनसे की नारायण राणे यावर चौकातल्या तज्ज्ञांची चर्चा कानावर पडतेच. सातनंतर गेलात तर नक्कीच.



टीटीचा शिववडा...
दादर टीटीच्या (पूर्व) जवळ अशोक नावाचं हॉटेल आहे. तिथून पुढे स्वामीनारायण मंदिराकडे जायला लागलं की, कॉर्नरलाच शिववड्याची एक गाडी दिसेल. थोडी आतल्या बाजूला आहे. आतापर्यंत मी जे काही पाच-सहा ठिकाणचे शिववडा पाव आवर्जून खाल्ले त्यापैकी द बेस्ट शिववडा इथलाच. बाकीच्या ठिकाणांबद्दल न लिहिलेलंच बरं. पण इथला वडा मस्त गरमागरम असतो. पावही मऊ आणि चटणीही झणझणीत. त्यामुळे वडापावची दुसरा घेतल्याशिवाय स्वस्थ बसविणारच नाही.



बेलापूर गावातली मिसळ...

बेलापूर गावात मी जिथं राहतो (किंवा रहायचो) तिथं तळ्याशेजारी (राम मंदिराजवळ) मिळणारी मिसळ नवी मुंबई आणि मुंबईतील मला सर्वाधिक आवडलेली मिसळ आहे. एकदम छोटं झोपडीवजा टपरी. तीन बाकडी. त्यावर जेमतेम सात-आठ लोकं बसतील इतकीच जागा. पण चवीला बाप. रस्सा आणि तर्री पाहूनच पोट भरतं. फक्त फरसाण असलं तरी रस्सा बाकीची जबाबदारी पार पाडतो. कधीकधी गरमागरम रस्सा-वडाही भाव खाऊन जातो. दुपारी शाकाहारी मांसाहारी जेवणही तिथं मिळतं. पण मी काही जेवलेलो नाही. पण मिसळ मात्र, एक नंबर.



स्टेशनजवळची पाणीपुरी...

साम मराठीमध्ये असताना या पाणीपुरीवाल्याची दोस्ती झाली होती. स्टेशनकडून आल्यानंतर बाहेर पडताना उजवीकडे हा पाणीपुरीवाला असतो. संध्याकाळी साधारण सहानंतर. पाणीपुरीचं पाणी म्हणाल तर पित रहावं असं वाटतं. (दुस-या दिवशीचा विचार करुन जास्त पिणं होत नाही, हा भाग अलहिदा) गरमागरम रगडा आणि फक्त तिखट पाणी असं कॉम्बिनेशन खूप मस्त. खजूराचं गोड पाणी नाही घेतलं तरी चालेलसं. साममध्ये असताना आठवड्यातून सहावेळा तरी जाणं व्हायचं. त्या परिसरता किमान पाच ते सहा ठिकाणी पाणीपुरी मिळते. महागड्या हॉटेलांमधूनही मिळते. पण इथली चव त्याला नाही.



स्टेशनवरचा सामोसा...

बेलापूर स्टेशनवर जर तुम्ही बेलापूरहून सुटणारी गाडी पकडली तर ए गरम सामोसे... असं ओरडत एक मनुष्य चढतो. क्वचित कधीतरी हा योग जुळून आला तर त्याच्या कडचे सामोसे नक्की खा. दहा रुपयांत दोन सामोसे मिळतात. चवीला एकदम उत्तम असतात. शिवाय एकदम गरम. चटणी नसली तरी ते कोरडे वाटत नाहीत, हे विशेष. पाहता पाहता सामोसे कधी संपतात ते कळतही नाही.

बसस्टँडचा वडा...
बेलापूर बस डेपोच्या आवारातच एक छोटं दुकान आहे. तिथं स्नॅक्स आणि ज्यूस वगैरे मिळतात. तिथं सक्काळी सक्काळी गरमागरम बटाटे वडा मिळतो. पुण्यात जसा रौनक जवळ वडे, सामोसे, पॅटिससाठी गर्दी असते. तशीच गर्दी सक्काळी सक्काळी इथं वडा खाण्यासाठी असते. मुख्य म्हणजे फक्त वडा (पाव नाही) खाणा-यांचं प्रमाण अधिक. चटणी आणि वडा हे समीकरण इतकं फिट्ट आहे की बस्स. पण वड्यानंतर चहा मात्र, पिऊ नका. नाहीतर सगळी गंमत निघून जाईल.



सरतेशेवटी पान...
बेलापूरला पाम बीच रोडला अश्विथ नावाचं एक मध्यमवर्गीयांना परवडेल, असं चांगलं हॉटेल आहे. त्याच्या बाहेर एक पानाची टपरी आहे. लकलकीत पितळी भांड्यांच्या साक्षीनं तो पानं लावत असतो. त्याच्याकडे मसाला पानापासून ते १२०-३०० पर्यंत कोणतेही पान खा दिलखूष झालंच म्हणून समजा. तुम्ही त्याच्याकडे वारंवार येताय म्हटल्यावर साधा फुलचंद, रिमझिमवाला फुलचंद, डबल किवाम, हरीपत्ती सल्ली सुपारी, कात-चुना-किवाम लवंग जला के... असं काहीही भन्नाट कॉम्बिनेशन असलं तरी ते त्याच्या लक्षात असायचं. आपण गेल्यानंतर आपण काहीही न सांगता आपल्याला हवं असलेलं पान आपल्यासमोर ठेवेल तो खरा पानवाला, या पुलंच्या व्याख्येत हा पानवाला १०० टक्के बसणारा. कधी जर गेलात तर नक्की रसास्वाद घ्या.