Monday, June 25, 2007

शिवाजीची भेट एकदा तरी घ्या...

हैदराबादला असताना अनेकांच्या हेटाळणीचा विषय होऊनही तेलुगू चित्रपट पाहण्याची सवय लावून घेतली होती. भाषा कळत नसल्यामुळे संवाद समजायचे नाहीत. पण कथानक सहजपणे अवगत व्हायचे. तेलुगू चित्रपटाची कथा खूपच निराळी असते, हे मला चित्रपट पाहिल्यानंतरच समजले. मी रहायचो त्या दिलसुखनगर भागातच आठ-नऊ थिएटर होती, त्यामुळे वारंवार चित्रपट पाहिले जायचे. तेव्हापासूनच मला दाक्षिणात्य चित्रपटांविषयी जिव्हाळा उत्पन्न झाला होता.
हैदराबादहून मुंबईला बदली झाल्यानंतर आणि त्यानंतर पुण्यात आल्यावर तेलुगू चित्रपट पाहणे जवळजवळ बंदच झाले होते. आमचा तमिळ मित्र देविदास देशपांडे याच्या रुमवर गेल्यानंतर कधी तरी एखादा दाक्षिणात्य चित्रपट पाहिला जायचा. पण "शिवाजी - द बॉस' या तमिळ चित्रपटाने पुन्हा एकदा खेचून चित्रपटगृहाकडे नेले.
भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा, सावकारी किंवा वतनदारी समूळ नष्ट करण्यासाठीचा संघर्ष, प्रेमकथा या घासून गुळगुळीत झालेल्या विषयांप्रमाणेच कंपनीचा "सीईओ' निवडण्यासाठी "लेडी बॉस'कडून घेतली जाणारी परीक्षा हा "मिसाम्मा' या चित्रपटाच्या कथानकाचा गाभा असतो. एका विस्कटलेल्या प्रेमकथेचा पत्रकाराने लावलेला छडा आणि त्यातून उत्पन्न झालेला संघर्ष या कथेवर शिवमणी चित्रपट बेतलेला असतो. डाव्या विचारसरणीच्या प्रचारार्थ निघालेले "लाल सलाम' आणि "विळा कोयता' असे चित्रपटही चांगले "हाऊसफुल्ल' चालतात.
थोडक्‍यात म्हणजे फक्त परदेशात चित्रीकरण आणि भडक कपडे हेच तेलुगू किंवा एकूणच दाक्षिणात्य चित्रपटांचे वैशिष्ट्य नाही. तर कथानक, संवाद, संगीत व चित्रीकरण असेही मुद्देही तितकेच प्रभावशाली असल्यामुळेच चित्रपट भावतात. "टागोर' या चिरंजीवीच्या चित्रपट प्रदर्शनाच्या काळात हैदराबादमध्ये असल्याने त्याच्या लोकप्रियतेचा चुणूक जाणवली होती. आता "शिवाजी-द बॉस' या रजनीकांतच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या निमित्ताने कलाकाराची लोकप्रियता किती असू शकते, याचा प्रत्यय आला. मी काही रजनीकांतचा "फॅन' नाही. त्यामुळे रजनीकांतच्या प्रेमापायी मी तो चित्रपट पाहिला नाही. पण दाक्षिणात्य चित्रपटांची भव्यदिव्यता, त्याचे कथानक हे निश्‍चितपणे निराळे असते याची जाणीव असल्यामुळेच चित्रपट पाहण्याची हिंमत केली.
गॉगल घालण्याची आणि तो डोळ्यावरुन बाजूला करण्याची लकब, च्युईंगम खाण्याची अजब तऱ्हा, नाणे उडवून खिशात टाकण्याची पद्धत या गोष्टी पाहिल्यानंतर रजनीकांतचा चित्रपट पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळते. ती रजनीकांतची स्टाईल आहे. रजनीकांत स्टाईलसाठीच अधिक प्रसिद्ध आहे. चाहते त्याची स्टाईल पाहण्यासाठी चित्रपटाला गर्दी करतात. पण रजनीची स्टाईल आणि संवाद यापेक्षाही चित्रपटाचे कथानक मला अधिक भावले. चित्रपट तमिळ असल्यामुळे तो अतिरंजित असणे हे ओघाने आलेच. पण त्यामुळे चित्रपटाच्या विषयाचे गांभीर्य जराही कमी होत नाही.

सध्या शिक्षण आणि आरोग्य सुविधा इतक्‍या महाग झाल्या असून त्या सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याबाहेर गेल्या आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना फक्त चांगले शिक्षण आणि आरोग्य या परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या रजनीकांतचा लढा चित्रपटात दाखविण्यात आला आहे. हे सारे बदलून टाकण्यासाठी त्याने उभारलेला संघर्ष आणि प्रस्थापितांकडून त्यामध्ये आणण्यात येणाऱ्या अडचणी हे चित्रपटात दाखविलेले आहे. रजनीकांत नायक असल्याने तो या लढ्यामध्ये यशस्वी होणार आणि प्रस्थापितांची सद्दी संपणार, हे सांगायला नकोच.

मुद्दा असो की, वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आणण्यासाठीची धडपड नक्कीच स्तुत्य आहे. रजनीच्या अभिनयापुढे शंकरचे दिग्दर्शन आणि चित्रपटाची कथा मार खाते असा अनुभव आहे. पण हे मत आहे रजनीकांतच्या निस्सीम चाहत्यांचे! माझ्यासारख्या तटस्थपणे चित्रपट पाहणाऱ्या माणसाला रजनीच्या स्टाईलप्रमाणेच चित्रपटाची कथाही तितकीच आकर्षक वाटते. तर चित्रपटातील कथानकाप्रमाणेच रजनी आपला तारणहार आहे, ही सामान्यांची भावना झाल्यामुळेच कदाचित रजनीकांतचे चाहते त्याचे चित्रपट पाहण्यासाठी रांगा लावतात. सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्‍न चित्रपटामध्ये प्रतिबिंबीत झाल्यामुळेच चित्रपट अतिरंजीत असूनही आवडतो.

अर्थातच, "शिवाजी - द बॉस' पाहण्यासाठी जाताना रजनीकांतचा "लेटेस्ट' चित्रपट हीच गोष्ट ध्यानात ठेवून गेलो होते. डोक्‍याला ताप नाही, याच भूमिकेतून चित्रपट आपण चित्रपट पाहतो. पण संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर रजनीकांत इतकाच चित्रपटाचा विषय आणि मांडणी देखील भावते.

1 comment:

Yogesh said...

शिवाजीबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. :)