Tuesday, June 26, 2007

अद्ययावत तंत्रज्ञानाचा "शिवाजी'


सदैव लॅपटॉप जवळ बाळगून असणारा, गरीब व गरजूंना स्वस्तात शिक्षण मिळण्यासाठी परदेशातील भारतीयांकडून "मनी ट्रान्सफर'द्वारे पैसे गोळा करणारा आणि एमएमएस तसेच "स्पायकॅम' हे अद्ययावत तंत्रज्ञान हाताळण्यात पुरता सरावलेला नायक हे रजनीकांतच्या "शिवाजी द बॉस'चे वेगळेपण किंवा वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.

परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर मिळालेली नोकरी सोडून पुन्हा भारतात परतलेला शिवाजी (रजनीकांत) हा चित्रपटाचा नायक आहे. तो अनेक वर्षे परदेशात राहिलेला असल्याने अद्ययावत तंत्रज्ञान त्याने आत्मसात केले असणे साहजिकच आहे. पण या गोष्टींचा चित्रपटामध्ये योग्य ठिकाणी उपयोग करुन कथानक अधिक रंजक केले आहे.

लॅपटॉपचा पासवर्ड हा एखादा शब्द नव्हे तर विशिष्ट पद्धतीने आवाज काढल्याशिवाय संगणकात "एन्टर'च करता येत नाही, हा तंत्रज्ञानातील पुढारलेपणाचे पहिले उदाहरण. त्याच्या या क्‍लृप्तीमुळेच पोलिस, सीबीआय व संगणक तज्ज्ञांनाही त्याचा पासवर्ड "हॅक' करता येत नाही. अवैध मार्गांनी पैसा जमविणाऱ्या अधिकाऱ्यांकडून काळा पैसा जमा करण्याची त्याची कल्पनाही वेगळी आहे. तुमच्याकडे किती काळा पैसा आहे, याची माहिती माझ्याकडे असून त्यापैकी निम्मा पैसा माझ्याकडे जमा करा. अन्यथा आयकर अधिकाऱ्यांकडे जाऊन मी माहित देतो, मग ते तुमचे सगळे पैसे काढून घेतील, ही शिवाजीची कल्पना चांगलीच लागू पडते.

शिवाय मोठ्या प्रमाणावर जमा झालेला काळा पैसा "व्हाईट' करण्याची त्याची शक्‍कलही अफाट आहे. परदेशातील भारतीय नागरिकांकडूनही शिवाजी पैसे जमा करतो, पण "मनी ट्रान्सफर'द्वारेच! जमा झालेला सगळा काळा पैसा तो अंडरवर्ल्डमधील मुस्लिम म्होरक्‍याकडे जमा करतो. त्यानंतर तो म्होरक्‍या अमेरिकेतील त्याच्या एजंटला कॉल करुन माझ्याकडे इतके रुपये जमा आहेत. तितक्‍या रकमेचे डॉलर्स तू अमूक अमूक माणसाच्या नावावर जमा कर, असे सांगतो. काळा पैसा अशा पद्धतीने चलनात येतो की नाही, माहिती नाही. पण असे घडत असल्यास ते अफाटच आहे.

अखेरच्या प्रसंगांमध्येही तंत्रज्ञान कसे कथानकाला उपयुक्त ठरु शकते ते आपण अनुभवतो. शिवाजी तुरुंगामध्ये असताना त्याचे तुरुंगातील काही हस्तक त्याला "एमएमएस' आणि "जीपीआरएस' सुविधा असलेला एक मोबाईल पुरवितात. त्याद्वारे तो साऱ्यांशी संपर्क साधतो. "एमएमएस' पाठवितो. पोलिस चौकीमध्ये शिवाजीच्या हस्तकाने छुपा कॅमेरा बसविलेला असतो. त्यातून पोलिस चौकीत घडणाऱ्या साऱ्या घटना शिवाजीच्या मोबाईलवर येत असतात. कल्पना म्हणून तरी ही नवीनच वाटते. शक्‍याशक्‍यतेच्या कसोटीवर हे असंभव वाटत असले तरी भविष्यात असे होणारच नाही, असा दावा कोणीच करणार नाही.

इतके अद्ययावत तंत्रज्ञान चित्रपटामध्ये असल्याने तो चित्रपट सध्याच्या जमान्यातील आहे, असे फक्त वाटतच नाही. तर नकळतपणे आपली त्याच्याशी नाळ जोडली जाते. वायफळ विनोद आणि फुटकळ कथानकाच्या आधारे झळकणारे मराठी, हिंदी चित्रपट पाहिल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांमधील वैविध्य आणि पुढारलेपण सहज जाणवते. त्यासाठी का होईना शिवाजी एकदा पहाच.

6 comments:

nandu said...

आशिश, तु म्हणतॊ ते बरोबर आहे. पण आपल्या येथे याची कदर नाही. असो.. काही पढतमुर्ख काहीही बॊलत असतात.

An2 said...

hmm, aata mala pn jaun baghyla hawa.... hehe

अभिजित पेंढारकर said...

मित्रा, तुझा ऍगल आवडला. असेच लिहीत जा. पण पुढच्या वेळी मराठी चित्रपटाबद्दलही लिहिलेस, तर आवडेल.

nithin said...

very nice presentation. what i think no tamil and telugu industries has got many films in a year. so not as in marathi. first question is that marathi hasnt that type? though tamil and telugu are producing a lot films they are not feeling short of subjects which are unknown to others. after all u have a dynamic style of presentation that has brought a fantastic reading feel in article

ऋयाम said...

very nice blog.
Marathi chitrapatanna nava thevu naka pan please.
changala kahi kahi ghadata ahe...
Let's B Positive :D

Prashant Lohar said...

sundar...